नाटकाविषयी
लेखक - दि. बा मोकाशी
संकलन - विजय तेंडुलकर
रंगावृत्ती, संगीत संकल्पना आणि दिग्दर्शन - अतुल पेठे
नेपथ्य - मकरंद साठे
संगीत - अशोक गायकवाड
प्रकाशयोजना - श्रीकांत एकबोटे , शिवाजी बर्वे
वेशभूषा - श्याम भूतकर
वादक - अशोक गायकवाड, उपेंद्र आरेकर, अतुल पेठे
निर्मिती सहाय्य - आनंद कानेटकर, अश्विनी परांजपे , प्रतिक खरवलीकर, धनेश जोशी, कौस्तुभ
अक्षरसुलेखन आणि छायाचित्रण - कुमार गोखले
विशेष आभार - डॉ. सदानंद मोरे , गजानन परांजपे, मेघना पेठे, जागर नाटसंस्था, समन्वय नाटसंस्था.
निर्मितीप्रमुख - धीरेश जोशी
सूत्रधार - प्रसाद वनारसे
निर्मिती - अभिजात रंगभूमी, पुणे
कलाकार - किशोर कदम
नाटक कालावधी - सलग पावणे दोन तास .
दि. बा. मोकाशी या मराठीतील मान्यवर लेखकाची आनंदओवरी कादंबरी महत्वाची मानली जाते. आनंदओवरी म्हणजे संत तुकारामांच्या श्रीविठ्ठल देवळातील ओवरी. या जागेवर बसून तुकोबांनी अभंग रचले. ही ओवरी कवीराय संतशिरोमणी तुकोबांच्या आयुष्याची साक्षीदार आहे. अनेक घटना तिने अनुभवल्या आहेत.
कान्होबा हा तुकोबांचे लहान भाऊ. नाटकात त्यांना तुकोबांविषयीच्या सर्व आठवणी दाटून येतात. तुकोबा नेहमीप्रमाणेच अचानक कोठेतरी हरवले आहेत. दरवेळी ते इंद्रायणी काठी नाहीतर त्यांच्या आवडत्या भामनाथ - भंडारा डोंगरावर तरी सापडतातच. पण यावेळी मात्र ते शोधून सापडत नाहीत. कान्होबांच्या मनात आता अशूभ शंका येतात. उत्कटतेने ते आपल्या भावाचा शोध घेत रहातात. ते जिथे जिथे जातात तिथे तिथे तुकोबांच्या आठवणी दाटून येतात. ही कहाणी सांगताना शोधाचे रूप बदलते. आपल्या परिवर्तनशील, बंडखोर, संवेदनशील कवीवृत्तीच्या स्वतःच्या भावाची ही कहाणी कान्होबा सांगत जातात. त्यांनी अनुभवलेला तुकोबांचा तीव्र कल्लोळ ते आपल्या समोर अलगद उलगडवतात.
तुकोबांच्या जीवनपटातील पारदर्शी कथा कान्होबा सांगत असतानाच ते स्वतःचा , स्वतःच्या कुटूंबाचा, समाजाचा वेध घेतात. त्याचबरोबर सर्जनशील माणसाची घालमेल आणि त्यातून निर्माण होणारे एकूण जीवनविषयक प्रश्न ते आपल्यापुढे ठेवतात. माणसाच्या जगण्याच्या प्रेरणा आणि उलघाल आपल्याला मग अस्वस्थ करते. कान्होबाच्या शोधाचे प्रश्न मग आपल्यालाही स्पर्श करतात. आपल्या जगण्यालाही अर्थपूर्णतेकडे नेतात.

किशोर कदम कान्होबांच्या भूमिकेत
दिग्दर्शकाचे विधान -
आनंदओवरी हे नाटक माझ्या मानगुटीवर गेले तेरा वर्ष घट्ट बसून होते. संत तुकारामाची कथा अगदी वेगळया तऱ्हेने या नाटकात कथन केली आहे. हा तुकोबा आधीच्या सर्व तुकोबांच्या वर्णनाहून निराळा आहे. त्याचा माणूस म्हणून शोध तर यात आहेच पण सर्जनशील माणसाची उलघाल फार उत्कट आहे. भावाने भावाचा घेतलेला हा भावपूर्ण शोध आहे. हा शोध अनेक पातळयांना स्पर्श करतो.
सर्वाहून निराळा तुका इथे आपल्याला भेटतो, जो अत्यंत मानवीय, संवेदनशील आणि भावस्पर्शी आहे. असा तुकोबा आणि त्याचा भाऊ कान्होबा यांच्याशी आपण सहज आपलेही नाते जोडू शकतो.
.bmp)
या नाटकातले आपल्या जगण्यातले अनेक प्रश्न उभे राहतात. ते आपल्याला अंतर्मूख करतात. एका तळमळीचा, उलघालीचा आणि वेदनेचा तो शोध आहे. तुकोबा हे आपल्या चारचौघांसारखेच असणारे गृहस्थ होते पण जीवनातल्या सुख-दुखाःच्या दर्शनानंतर त्यांच्यात नितांत बदल होत जातो. तुकोबा सर्वांत असूनही सर्वाहून निराळे होतात. माणसाच्या खऱ्याखुऱ्या जगण्याचा ते शोध घेतात. हा सगळाच भाग मला नेहमीच प्रेरणा देत आला आहे.
आनंदओवरी हे कान्होबाचे आत्मनिवेदन आहे, कथन आहे. मूळ कादंबरीची भाषा अत्यंत तरल, उत्कट आहे. ती रंगमंचस्थ करणे हे अवघड आव्हान होते. सतत प्रत्यक्ष जरी एकच पात्र बोलत असले तरी अनेक पात्रांशी तो संवाद आहे, आत्मसंवाद आहे. कधी वर्तमानात तर कधी खोल भूतकाळात असा त्यांचा प्रवास चालतो. या सर्व प्रसंगातून मूलभूत तात्विक प्रश्न पुढे येतात. ते महत्त्वाचे वाटले. इथे तुकाराम हे अध्यात्मिक बुवा, अवतारी पुरूष वगैरे न राहता माणूस म्हणून प्रगल्भ होत जाताना दिसतात. आताच्या गुंतागुंतीच्या आणि असहिष्णु कालखंडात तुकोबा आणि त्यांचे सामाजिक तत्त्वज्ञान या निमित्ताने तपासायला मिळाले.
ह्या नाटकात आपल्याला निसर्ग भेटतो, अवकाश भेटते. उघडा माळ, नदी, तिचे पात्र, भंडारा डोंगर, जाळी, जंगल, शेत, देऊळ भेटते. त्याचबरोबर पहाट, सकाळ, दुपार, सायंकाळ, रात्र, अपरात्र अनुभवायला येते. कडकडीत उन्हाळा, पावसाळा, दुष्काळही भेटतो. हे नाटकातले सर्व वर्णन अस्सल मराठी मातीचे गंध, रूप ल्यायलेली आहे. या सगळयातून काळातून प्रतीत होणारे अवकाश मला नाटक करताना दिसत होते, जे आम्ही नेपथ्यातून, संगीतातून, प्रकाशयोजनेतून व्यक्त केले आहे. हे अवकाश नातेसंबंधातही गहिरे होताना दिसते.
माझ्या आधीच्या सर्व नाटकांप्रमाणेच या नाटकातले माणसांचे जगणे आणि त्यांचे प्रश्न या नाटकातही मला उभे करता आले. त्यात मानवीय उत्कट संबंधांची गहरी छटा अनुभवायला मिळाली. एका ऐतिहासिक व्यक्तीरेखेचे नाते सरळ आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांशी भिडवता आले. अशा वेळी हे नाटक तुकारामाबाबत बोलत असले तरी ते खोलवर आपल्याच जगण्याविषयी बोलताना आढळते.
आनंद ओवरी - संहिता
लेखक - दिगंबर बाळकृष्ण मोकाशी
रंगावृत्ती -अतुल पेठे
लेखकाची माहिती
संपूर्ण नाव : दिगंबर बाळकृष्ण मोकाशी
जन्म तारीख : २७ नोव्हेंबर १९१५
जन्म ठिकाण : उरण,जिल्हा ठाणे, महाराष्ट्र.
मृत्यू : २९ जून, १९८१, पुणे .
आजपर्यंत पुस्तक रूपाने प्रकाशित झालेले साहित्य :
१)कथासंग्रह - १३
२) कादंबऱ्या - ५
३) ललित साहित्य - ३
४) बाल साहित्य - ११
इंग्रजीत झालेली भाषांतरे :
१) देव चालले - प्रकाशक- ओरिएंट पब्लिकेशन, दिल्ली.
२) पालखी - प्रकाशक - न्यूयॉर्क युनिव्ह़र्सिटी प्रेस.
हंगेरियन भाषेतील भाषांतरे :
१)देव चालले
उडिया भाषेतील भाषांतरे :
१) देव चालले - हिंदी, तमिळ, उडिया अशा अनेक भारतीय भाषांमध्ये कथांचे भाषांतर झाले आहे.
महाराष्ट्र शासनाची बक्षिसे :
१)कथासंग्रह- १
२) ललित साहित्य - १
३) कादंबऱ्या - २
४)बालसाहित्य - ३
साहित्य अकादमीने १९८८ मध्ये "दि. बा. मोकाशी यांची कथा " (निवडक कथांचा संग्रह ) हे पुस्तक प्रसिद्ध केले. तसेच मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. सरोजिनी वैद्य यांच्या मार्गदार्शनाखाली सौ. माधुरी पणशीकर यांनी मोकाशी यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट घेतली. (१९८८).
आनंदओवरी - संगीत नाटक
आनंदओवरी - रंगावृत्ती + संगीत निर्देशखुणा.
(संगीत*)
तुका हरवला तो दिवस सोमवार होता. फाल्गुन वद्य द्वितिया होती. अजून रानात धुकट हवा होती. त्या दिवशी शेणगोठा उरकून, दुधे काढून, पहिला प्रहर संपतासंपता गवताचा भारा आणायला मी रानात गेलो. बरोबर भाकरी बांधून घेतली होती. विळ्याचा हात गवतावर सपासप चालत होता आणि अधूनमधून स्वत:चे पूर्वीचे रचलेले अभंग कवीच्या आत्मानंदात मी म्हणत होतो.
मूळ स्थान ज्याचे गोमतीचे तीरी । *
तो हा सारी दोरी खेळवीतो ॥ *
पण त्यातून प्रपंचाचे विचार घुसत होते. रानात काम करताना अध्यात्माप्रमाणे प्रपंचातील प्रश्नांचा विचारही चांगला होतो. कोंडलेले विचार, संताप, निराशा यांना बडबडून वाट करून देता येते. गवत कापताना माझे तेच चालले होते. मी माझ्या बायकोला समजावीत होतो. वहिनीची - तुकाच्या बायकोची समजूत काढत होतो. दुकानाचे विचार मनात होतेच. गाठी असलेल्या तोटक्या द्रव्यात संसाराच्या खर्चाचा ताळमेळ बसवीत होतो. आणि वीसबावीस दिवस तुकाने जो वैकुंठाचा टकळा सुरु केला होता तोही मनातून जात नव्हता. मी म्हणत होतो तुकादादा ! तू जर थोडेसे प्रपंचात लक्ष घातलेस तर आपण किती सुखी होऊ.
गेली काही वर्षे तुका प्रपंचाला निरुपयोगी झाला होताच पण मागचे काही दिवस त्याच्या वैराग्याचा आवेग वाढला होता. भजन करताना इतके बेभान मी त्याला कधी पाहिले नव्हते. आतापर्यंत कधी नव्हती एवढि आर्तता त्याच्या कवित्वात आली होती. त्या आर्त अभंगांचे शब्द मानगुटीस बसल्यासारखे मनाला सोडत नव्हते. मधून नकळतच मी गुणगुणत होतो.
पैल आले हरी । शंखचक्र शोभे करी ॥
गरूड येतो फडत्कारे । ना भी ना भी म्हणे त्वरे ॥
मुकुटकुंडलांच्या दीप्ती । तेजे लोपला गभस्ती ॥
मेघश्याम वर्ण हरि । मूर्ति डोळस साजिरी ॥
कान्ह्या! सावध! इतका दंग होऊ नकोस. हा तुझा मार्ग नव्हे. मग हा तुकाचा मार्ग आहे का? केव्हा ठरला हा मार्ग तुकाचा? कुणी ठरवला? कधी? मी आठवू लागलो... लहानपणी तुका आमच्या बरोबर आमच्या प्रमाणे सर्व खेळ खेळ्ला होता. मग तो दुकानात बसू लागला. मग आमचे आई वडील गेले. आणि मागचे आठवताना नकळतच तुकाने स्वत:चे चरित्र सांगितले ते आठवले.
चरित्र सांगण्याचा हा प्रसंग आनंद ओवरीवर घडला. आमच्या देवळाच्या ओवरीला आनंद ओवरी म्हणत. इथे आमचे बालपण हुंदडले. जाणतेपण गरजले. इथे बसून तुकाने अभंग लिहिले आणि पुष्कळदा तुका आणि त्याचे सहकारी इथेच अभंग संकीर्तन करीत. एका रात्री कीर्तन संपलं. तुकाच्या सहकाऱ्यांनी बराच आग्रह केलाकी, बोवा तुमचे चरित्र ऐकायचे आहे. तेव्हा संकोचाने पंधरावीस अभंगांतून तुकाने ते संक्षेपाने सांगितले, ते अभंग मी म्हणू लागलो. पण म्हणता म्हणता ते कशासाठी म्हणत होतो ते विसरलो. तुकाचे अभंग म्हणू लागलो की भान रहात नाही. हा नेहमीचा अनुभव आहे. मी स्वत: अभंग रचले आहेत- तुकयाबंधू म्हणून, कान्होबा म्हणून. तुकाचे पाहून अनेकांनी रचले आहेत. रामा म्हणे, गोंद्या म्हणे, किशा म्हणे असे घराघराआड कवित्व सुरू झाले तेव्हा मी सोडून दिले.
**** (अंधार) ****
****टळटळीत दुपार! ****
त्या दिवशी दुपारपर्यंत मी गवत कापले. झाडा खाली बसून भाकर खाल्ली. नदीवर पाणी प्यालो. मग एक वाळलेले झाड दिसले. ते जळणासाठी तोडले. गवताचा भारा बांधला. त्यावर लाकडे आवळली आणि डोकीवर घेऊन घराकडे निघालो. घरी येऊन बेड्यात दोन्ही ओझी झोकून घरात गेलो.
*आत तुकाची बायको भिंतीला पाठ टेकून समोर पाय पसरून बसली होती. ती सहा महिन्यांची गर्भार होती. तिच्या डोळ्यांतून पाण्याचि धार लागली होती. भिंतीला मान टेकून ती हताश नजरेने शून्यात पहात होती.
तुका नक्की पुन्हा गायब होता. हा प्रसंग तसा जुनाच. गेला महिनाभर आपल्याला वैकुंठाचे बोलावणे आले आहे- आपण वैकुंठाला जात आहोत, असे गात तुका बाहेर पडत होता आणि आता गर्भार असल्यामुळे त्याला शोधायला तिला डोंगर- राने तुडविता येत नव्हती. त्यासाठी ती माझ्या येण्याची वाट पहात बसली होती. एकदा तिने माझ्याकडे पाहिले मात्र. ती थकली होती- गर्भाचा भार वाहून आणि तुकाच्या आयुष्याचा भार वाहून. "भावोजी” तिने हाक मारली आणि ती घळाघळा रडू लागली.
माझ्या बायकोने पुढे होऊन सांगितले की, तुकाभावोजी काल जे कीर्तनाला गेले ते अजून आलेले नाहीत. मुले देवळात पाहून आली होती तुकाभावोजी तिथे नव्हते.बायकोने ऐकताच मी हातातला विळा कोनाड्यात सारला वर खोवलेले धोतर तसेच ताळ ठेवून बाहेर पडलो. तुकाची टाळ गोधडी जागेवर नव्हती. तडक देवळात गेलो. आनंद ओवरीवर पाहिले. तिथेही दादाची टाळ गोधडी दिसली नाही.
पांडुरंगा!! *
दरवेळी याचे नाव घेत तुका कुठेतरी जाऊन बसतो. आता यानेच त्याला शोधून काढावे. "पांडुरंगा तू कोण आहेस रे? कुणी आहेस का? आमच्या संसारात सारखा व्यत्यय आणतो आहेस. तुका तुझ्यामागे मी तुकाच्यामागे. किती दिवस घालणार हा गोंधळ? गवताचे भारे आणायचे कुणी? साठवायचे कुणी? दुधे कुणी काढायची? शेतावर कुणी जायचे आणि दुकानात कुणी बसायचे? याघराचे कसे होणार? सहा महिन्यांच्या गरभारणीला का नवऱ्याला शोधायला बाहेर धाडणार? आणि तिला गर्भ का रहावा? "
नमस्कार करून देवळाच्या बाहेर पडल्यावर गावातील रस्त्यातून मी धावतच निघालो. लोकाआंना आता त्याची सवय झाली होती. कुणीतरी एखादा म्हणायचा, गेला वाटते तुक्या पुन्हा? " आणि त्याला शोधून काढून आलो की म्हणायचा, सापडला वाटते?" गेला का? आणि सापडला का? - या दोहोंमध्ये कायकाय होत होते , त्यांना काय ठाऊक? (रागाने) एखादे दिवशी सापडणार नाही तेव्हा कळेल. (हसून असहाय्यपणे) मग माझ्या मनात आले काय कळणार! काही कळणार नाही. आतापर्यंत गेले त्यांना लोक विसरले. तुकाला विसरतील. परमेश्वराचे रहातगाडगे इतके जबरदस्त फिरते आहे !
****
देवळातून बाहेर पडून मी धावत नदीकडे गेलो. इंद्रायणीच्या काठी कातळावर उभा राहिलो. दुपारची उन्हातली स्तब्धता न दी वर पसरली होती. इंद्रायणीचा प्रवाह चकाकत वाहात होता. "तुका! दादा! "* मग हाका देत, थांबत थांबत, काथाकाथाने पुधेमागे धावत, श्वासासाठी थबकत, जिथे जिथे धोका ठाऊक होता त्या ठिकाणी डोहाकडे पाहात, प्रवाहावर काही तरंगत येताना दिसले की धडधडत्या छातीवर हात देत, मी किती वेळ शोधत होतो कुणास ठाऊक !
संध्याकाळ झाल्यावर थकून एका कातळावर बसलो.
संध्याकाळ ! *
---------
संध्याकाळचा काळोख उतरताना कित्येकदा आम्ही तिघे भाऊ इथे बसलो. सावजी, तुका आणि मी. सावजी चौदापंधरा वर्षांचा. तुका बारा वर्षांचा. मी दहाएक वर्षांचा असेन. किती वर्षे गेली! इंद्रायणीचा प्रवाह असाच वाहात होता. समोरच्या काठावरली झाडी अशीच डोहात लवून पाहात होती. इंद्रायणीच्या पलीकडल्या तीरावरल्या या झाडीचे तुकाला नेहमी गूढ वाटे. तो घटकाघटका त्या झाडीकडॆ निरखून पाहात बसे. आणि मला तिची भीती वाटे. मी झाडीकडे पाठ करी. आधी चरायला सोडलेली ढोरे वळवून आणून उभी केलेली असत. माझ्याकडे आणि तुकाकडे ते काम होते. फक्त सोबतीला असावा तसा सावजी आमच्याबरोबर असे. आम्ही ढोरे नीट चरतात की नाही इकडे नजर ठेऊन असताना सावजी काठावरील एका कातळावर बसे.
* त्यावे भजन सुरू होई.
काळोख उतरण्यापूर्वी ढोरे वळवून आणून आम्ही दोघेही सावजीच्या शेजारच्या एखाद्या कातळावर बसत असू. मग तुका समोरच्या झाडीकडे टक लावून बसल्यावर , त्या झाडाची गर्द पालवी , मोठेमोठे तपकिरी बुंधे , त्यांना विळखा घालीत चढत गेलेल्या वेली , या सर्वांमागे काहीतरी भयंकर * लपलेय असे मला वाटत राही. तिथून निरनिराळे चित्कार घुमत कानावर येत. डोह काळेभोर चकाकत. मधेच वाळकी फांदी पडून धप्प आवाज होई. रात्री तिथूनच कोल्हेकुईला आरंभ होई.
संध्याकाळ वाढून आकाश लाल पडू लागले की झाडी काळा रंग घेऊन तटासारखी उभी ठाके. मला अधिकच भीती वाटू लागे आणि तुका झाडीविषयी बोलत राही. त्याला पडणारी स्वप्ने * तो सांगे. एका स्वप्नात त्याला दिसे- इंद्रायणीचा प्रवाह ओलांडून त्या झाडीत आपण शिरलो आहोत. झाडीतील पाऊलवाटेने जाता जाता मागची वाट बंद होत आहे. आपले आईवडील, भाऊबहीण, देहू गाव नाहीसे झाले आहे. आपण अगदी एकटे पडलो आहोत.
दुसऱ्या स्वप्नात हीच झाडी त्याला विलक्षण आनंदाची वाटे.* सूर्यप्रकाशात, निळ्या आकाशावर झाडीतून , झाडीतूनही उंच गेलेल्या एकच एका फांदीवर एखादा शुभ्र बगळा झोके घेत बसलेला दिसे. तुका नदी ओलांडून झाडीत शिरताक्षणीच झाडी प्रकाशाने फुलून जाई. पक्ष्यांची सुस्वर गीते चहू बाजूने कानांवर येत. वृक्षवेली कोवळ्या,जांभळ्या, पोपटी पानांनी फुललेल्या असत. फुले बहरलेली असत. हवेत मंद सुगंध भरलेला असे. आणि पाऊलवाट आपोआप वाट मोकळी करून देई. त्याला वाटे प्क्ष्यांबरोबर आपणही गावे. त्याचा गळा शब्दांनी दाटून येई. पण शब्द फुटण्यापूर्वीच तो श्वास कोंडून जागा होई.
तुकाने ही दोन स्वप्ने त्या कातळावर बसलो असता कितीतरि वेळा सांगितली असतील. माझे अर्धे लक्ष उभ्या करून ठेवलेल्या आमच्या गुरांकडे असे. ती पुन्हा उधळली तर अंधारात सापडणारही नाहीत आणि अधेमधे गावाशी येऊन जाणारा वाघ त्यांना खाईल. अशी भीती मला वाटत राही.* सावजीबुवा...
मला वाटते, संध्याकाळ्च्या त्या लाल प्रकाशातच आम्ही तिघे भाऊ मोठेपणी जसे होणार होतो तसे घडलो. त्या कातळावर तिघांचे भविष्य ठरले. सावजी पुढे संसारमुक्त झाला. मी संसाराच्या दरीवर , ब्रम्हद्य्नाव्या फांदीवर लोंबकळत राहिलो. आता त्याच कातळावर बसलो असता माझ्या मनात आले, जर तुका सापडला नाही तर तिघा भावांतला मि एकटाच उरलो असं होईल. जिथे तिघांनी बसायचे तिथे मी एकटाच बसलेला राहीन. (क्ष्ण्भर थांबून)जे विठ्ठलाच्या मागे लागले त्यांचे असेच होते. द्न्यानेशाचे आणि त्याच्या भावंडांचे असेच झाले. पण विठ्ठलाच्या मागे लागणे म्हणजे तरी काय?
*
(काळोखी दाटते)
मिट्ट कालोख!
आपल्याला दिसत नाही तरी काळोखातही सृष्टी चालूच आहे. फाल्गुनातली आटलेली इंद्रायणी वाहातच आहे. आपल्या दृष्टिक्षेपासाटी सृष्टी खोळंबत नाही. आपला अगदी सख्खा भाऊ असला तरी तो सृष्टीत नाहीसा होतो. सृष्टीला भाऊ नाही, बहीण नाही. वडील नाहीत. सृष्टीला कुणाचे काही नाही. मग सृश्टीला कोण आहे? विठ्ठल. तुकाचा तॊ लाडका विठ्ठल.? इथे कातळावर बसल्यावर वाटणारी भीती आठवली. ती भीती कुठे गेली? (थांबून) ती भीती आहेच. तिची रूपे बदलली आहेत. तुकाचे काय झालेय याची भीती. योगक्षेम कसा चालेल ही भीती.
योगक्षेमाचे विचार मनात येताच घर आठवले. (उभा राहातो) घरी सर्व काळजी करत असतील. वहिनीचा जीव अर्धा झाला असेल. लेकरांना जवळ घेऊन दोन्ही बाया बसल्या असतील. जाऊन वहिनीला काय सांगू?
मग मनात विचार आला तुका घरी आला असेल . आणि तो माझी वाट पाहात असेल. तो माझी चिंता करत असेल. तो मला शोधायला बाहेर पडेल. "कान्हा.... " (हसून) संसारी माणसाच्या चिंता कशा पलट्या घेत असतात. एक दुसऱ्याची चिंता करतो. दुसरा पहिल्याची चिंता करतो. एकमेकांच्या चिंतेत राहाणे त्याला आवडते. तो तेव्हाच खरा जगतो. गर्भार बायकोची पर्वा न करता तुकाने जावे! ... "तुका! दादा! "
*
घराशी पोहोचताच मला कळले, तुका आलेला नाही. उघडया दरातून आतली दिव्याची लाल ज्योत दिसली. घर सामसुम ! समोर दरवाजा उघडा होता. पण आत जावेसे वाटत नव्हते. किती हौसेने अनेकदा आम्ही हे आमचे घर सारवले होते. रंगवले होते. तुळया-खांबांना तेलपाणी केले होते. त्या घरात माझी बायकोमुले होती. तरी ते उदास वाटत होते.
डोक्यावर काळ्या ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली मागची सारी वर्षे रोज रोज हेच तारे डोक्यावरून गेले असतील. त्याचे कधी भान केले नव्हते. असेनाका वर आकाश. तारे उगवेनातका. सूर्य-चंद्र उगवोत, मावळोत- या पृथ्वीवर आम्ही किती गमतीत होतो. आम्ही, ही मोऱ्यांची मुले, ही महाजनांची मुले आम्हाला कधी काही कमी पडण्याचे कारण नव्हते. कधी दु:ख होण्याचे कारण नव्हते. * ज्या बैलगाडीच्या जोखडावर मी आता बसलो होतो ती गाडी रात्रभर जागून आम्ही रंगवली होती. वारीला जाताना इतर गाडयांबरोबर झडपा लावून आम्ही अग्रेसर राहिलो होतो. रंगवलेली आमची गाडी रस्त्याने जाऊ लागली की लोक टकामका बघत रहायचे. आम्हा भावांचा प्रत्येकाचा एकेक बैल लाडका होता.
आम्हाला लहानपणीच केव्हातरी कळले. आम्ही शूद्र आहोत. * जातीने कुणबी आहोत. आणि आमचा धंदा वाण्याचा आहे.* या सर्वाला मोठा अर्थ आहे असे आमच्यावर ठसवण्यात आले. आम्हांला कळले की, आमचा सातवा पूर्वज प्रथम देहूला आला आणि आम्ही देहूकर झालो. आम्हांला हे कळले की, जातीचा आम्ही अभिमान बाळगला पाहिजे. आम्हांला हेही कळले की, ज्याने त्याने आपली जात सांभाळली पाहिजे. * आईने महाजनकीचा अभिमान आमच्यात घातला तर सावजीने आमच्यात आमच्या मोरे घराण्यात चालत आलेली विठ्ठलाची मिराशी भिनवली.
आणि तुकाने ? तुकाने तर आम्हांला आमचे बालपण दिले. तो आम्हां मुलांचा सर्वस्व होता. तुका इतकी हौस कुणाला नसेल. लहान भावाला मोठया भावात जे जे हवे असते ते ते तुकात होते. अंथरुणातून उठताच तोंड वगैरे धुवून, भाकर खाऊन, तू बाहेर धावायचास. तुझ्यामागे बाहेर पडण्यास माझी धावपळ व्हायची. आणि तू रस्त्यावर येताच, बाळकृष्णामागे गोपांची मुले येत तशी घराघरांतून गावातील मुले बाहेर पडत. विटीदांडू तुझा लाडका खेळ. पण सगळे खेळच तुझे लाडके होते. विटी कोलायला लागलास की अगदी समोर जवळ उभा राहायचास. तुला भीती ठाऊकच नव्हती. आणि विटी मारू लागलास की, टोले कसे धडाडत डोक्यावरून जायचे.
गावच्या मुलींबरोबर वारुळाची पूजा करायला आम्ही मुले जायचो. त्या गाणी म्हणत जात असता आम्ही दगडादगडी खेळत मागे असायचो. मुलींची गाणी तुकाला सर्व पाठ होती. (गाणं) एवढेच काय, पहाटे दळताना बाया ओव्या म्हणत त्या त्याला पाठ होत्या. सर्वांना त्याचे नवल वाटायचे. श्रावणात झाडांना बांधलेल्या हिंदोळ्यांवर तो सर्वांत उंच झोके घ्यायचा आणि मुलींना घाबरवून सोडायचा.
एकदा उंच झोका गेल्यावर खाली येण्यापूर्वी क्षणभर थबकतो, त्याक्षणी खरी मजा येते. तू म्हणायचास, तेव्हा काय वाटते सांगता येत नाही.
*
दादा, डोंगरावर तू एकदा बेभान अवस्थेत सापडलास तेव्हा तीच भावना तुला झाली असेल का ? *
जोकडावरून उठलो. घरात आलो. खाली मान घालून एखाद्या अपराधी माणसासारखा मी झर्रकन तुकाच्या बायकोच्या अंगावरून पुढे गेलो. स्वयंपाकघरात चूल थंड होती. आमची दोन लहान मुले कोपऱ्यात गोधडे टाकून बायकोने झोपवली होती. पुढे होऊन मी चूल पेटवू लागलो. मागोमाग माझी बायको आत आली. शेजारी बसून माझ्या हातातले फाटे घेत तिने हळूच विचारले,
"काय झाले ? सापडले का ? "
मी " सापडला नाही " अशी मान हालवली. म्हणालो,
" नदीवर पाहिले. डोंगरावर जाऊन येईन उद्या. "
बायको चुलीत फाटे हालवीत खालच्या मानेनी म्हणाली, " भावोजी सापडणार नाहीत ! " मागच्या जन्मीच्या कोणत्या पापामुळे या वेडया घरात येऊन पडल्ये ! तुम्ही मात्र वेडे होऊ नका ! तुम्ही वेडे होणार नाही. सोडू या आपण हे गाव. या घराला विठ्ठलाचा शाप आहे. "
विठ्ठलाचा आणि शाप !
मी संतापाने ओरडलो, " गप बस रांडे ! "
*** (अंधार)
केव्हातरी अपरात्री मी जागा झालो ते तुकाचे स्वप्न पडून !
बालवयातही तुकाचा चेहरा गोल होता. डोळे वाटोळे मोठाले होते. भुवया जाड होत्या. त्याच्या डोळ्यात स्वप्ने होती. त्यात सावजी सारखे टक लावून बसलेले एकच स्वप्न नव्हते. मला स्वप्न पडले होते ते तुका पेढीवर जाऊ लागला त्या पहिल्या दिवसाचे. पहाटे लवकर उठून मोठया आनंदाने तो वडिलांबरोबर दुकानात गेला होता. तुका .. तुकाशेठ..
" शपथ घेऊन सांग , तुका ! तेराव्या वर्षी ऐटदार फेटा बांधून पेढीवर जाऊन तू उदीम करू लागलास, तो हौसेनेच की नाही ? सावजीने दुकान सांभाळणार नाही असे म्हणताच तू सरसावून पुढे आलास आणि एका वर्षात तुकाशेट म्हणून लोक तुला ओळखू लागले. सावजीचे वैराग्य हा तेव्हा तुला वेडेपणाच वाटला होता. दोन वर्षांत सावकारीचे, महाजनकीचे व्यापार तू सांभाळू लागलास. होन मोजताना तुला आनंद होत होता. तुरा उगवलेल्या कोंबडया सारखी , व्यवहार कळला आहे याची जाण तुझ्या प्रत्येक शब्दात, वागण्यात दिसू लागली . माणसातली जगण्यातली धडपड तुला नीट कळली. तुझे नाव पुण्यापर्यंत गेले. तुझी पहिलीबायको दमेकरी होती. तिला मूल होणार नाही असे वाटून बाबांनी तुझे दुसरे लग्न करून दिले. ही तुझी दुसरी बायको श्रीमंताची. विशेष म्हणजे सुदृढ ! ती तुला एवढी आवडली नाही. मनोमन तुमचे पटले नाही तरी तिच्यापासून मिळणाऱ्या शरीरसुखाचा मोह तुला कधी आवरला नाही. कबूल ? सावजीने भोग नाकारले. तू सारे भोगलेस. घरातला मोठा मुलगा म्हणून खरे सावजीने दुकान सांभाळायचे, पण सावजीने दुकानात बसायला नकार दिला होता. तो आपले भजन-पूजन करीत राहिला.
हा सर्व काळ सावजीची बायको कुठे होती ? ती कधी होती का या आमच्या घरात ?खरे पाहिले तर, ती सर्वात लक्षात राहायला हवी होती. आमच्या घरात विठ्ठलाचा ती पहिला बळी होती. सावजीने तिच्याशी कधी नवऱ्याचे नाते ठेवले होते का या बद्दल मल शंका आहे.
तुकाची शेवटची वर्षे गूढ होती तर सावजीचा आरंभच गूढ होता. दुसरी कसलीच जाण येण्यापूर्वीच त्याला वैराग्याची जाण कशी आली असेल ? एखादे इंद्रिय नसावे तसे त्याला ऐहिकतेचे इंद्रिय जन्मत:च नव्हते का ? किती विचित्र ? आम्हाला तो जसा कधी कळला नाही, तसा त्याच्या बायकोलाही तो कधी कळला नसावा. पडल्या पडल्या मला वाटले, कोणत्याही क्षणी अंधाऱ्या दारातून सावजीची बायको पुढे येऊन तुका न सापडल्याने कष्टी झालेल्या आमच्याकडे पाहून करुण हसेल.
*
( अंधार. दिवस पहिला समाप्त. )
पहाटे उठून मी तुकाला शोधायला बाहेर पडलो. हातातली खुळखुळ्याची काठी आपटीत मी परत नदीकडे निघालो. पाचपन्नास पावले गेलो नाही तोच गावातला वेडा, म्हातारा जन्या समोर उभा ! मला पाहताच तो हसला आणि ओरडला, " हरवला - हरवला - तुक्या पुन्हा हरवला ! " ओरडत नाचू लागला. हा जन्या जेव्हा वेडा झाला आणि मुले त्याव्या मागे दगडे मारत येऊ लागली तेव्हा, दादा ! तूच मुलांना पिटाळून लावून अनेकदा त्याला वाचवलेस. आणि आता तोच जन्या तू हरवलास म्हणून नाच्तोय ! दादा ! तू हरवलास हे ऐकून काहींना आनंद होईल - मला ठाऊक आहे. पण या वेड्यालाही आनंद व्हावा !
" कुठे पाहिलेस दादाला ? बोल. "
"कुठे ? नदीपलीकडे ? "
न बोलता तो धोतर वर खोचण्याची नक्कल करीत राहिला. त्याला सोडून मी पुढे निघालो. माझ्या पाठीला त्याचे खळखळून हसणे ऐकू आले.मला एकदा वाटले, त्याने माझी गंमत चालवली आहे; एकदा वाटले तो खरे पाहिलेले सांगतोय. मी मागे वळून पाहिले, चिपळ्या धरल्यासारखे हात वर करून तुकाच्या नाचण्याची नक्कल करीत तो कर्कश भेसूर सुरात म्हणू लागला. * मला तो भेसूर सूर ऐकवेना. कानांवर हात ठेऊन मी धावत सुटलो. गेला महिनाभर असेच अभंग म्हणत बेभान होऊन तुका बाहेर पडत होता.
नदीवर येऊन श्वास आवरीत ऊभा राहिलो. पण वेडयाचे मनातून जाईना. या वेडयाचे नि आपले नाते असल्या सारखे तुका बोलत असे. कित्येकदा वेडया जन्याकडे तो टक लावून बसे. एकदा मला तुका म्हणाला, "कान्हा, जन्या वेडा असला तर सगळ्यांनी वेडे व्हावे. वस्त्रप्रावरणांसाठी आम्ही तगमगतो तर शरीराला लंगोटीसुद्धा पुरते हे त्याने दाखवून दिलेय. बायको,मुले, मित्रपरिवार यांच्या मायेशिवाय जगता येते हे त्याने आम्हांला शिकवलेय. राहायला प्रासादाची गरज नाही, वर निळे आकाशही पुरते- त्याने सिद्ध केलेय. पोटाला भाकरी-कालवणच लागते आणि दिवसातून तीन वेळा लागते- त्याने तेसुद्धा खोटे ठरवलेय. कान्हा ! त्याने मला शिकवलेय की, जे जे आपण मूल्यवान मानतो ती ती माया आहे. अरे ! त्याला देव सुद्धा लागत नाही जगायला. काय सांगावे ! आपण जगतो ते खोटे असेल. त्याचेच खरे असेल. तो आपल्या कुणाहूनही सुखी दिसतो, पाहिलास ना ? "
( शांततेनंतर *)
पळसामध्ये कोवळी, तांबडी पालवी फुटायला लागली आहे. करवंदी हिरव्या व्हायला लागल्या आहेत. गावाकडून एक कोकिळा ओरडते आहे. दादा ! ती सृष्टी बघ कशी आनंदात नाचते आहे. या सृष्टीचे हे वैभव पाहून तू अनेकदा वेडा झाला आहेस. ती सृष्टी सोडून तू निघून गेला आहेस हे खरेच वाटत नाही. या सृष्टीवे मला काय असे तू म्हणूच शकत नाहीस. आमच्या कोणाहीपेक्षा या सृष्टीत तू जास्त रमला होतास. जीवनावर तुझी जास्त आसक्ती होती आणि तू आपल्या कुलदैवताचे करत होतास. तोही एक आसक्तीचाच भाग होता. आम्हा चारचौघांसारखीच तुझी देवावरली श्रद्धा व्यवहारमिश्रीतच होती.
मग दादा ! तू केव्हा बदललास ? केव्हा बदललास तू ? ( शांतता ) आपले सगळे घरच बदलले. एखाद्या झाडाची फुले गळावी, मग पाने गळावी, मग फांद्या शुष्क व्हाव्यात तसे या आपल्या घराचे झाले. आपले घर !! केव्हापासून हे आमचे घर बदलले ? आनंदात असलेल्या घराला एकदम दृष्ट लागली तो दिवस !! पांडुरंगा !! मृत्यू !!
**
मृत्यूनी सगळ्यांची घरं बदलत नाहीत, पण आमचे बदलले !
वडील... मग आई... मग सावजीची बयको!!
सावजीची बायको मेली आणि घराला अवकळा सुरू झाली. सावजीची बायको मेली- दु:खांतून सुटली. ती मेली आणि सावजी यात्रेला गेला. पण एखाद्या कुटुंबात कोणी विरक्त निघत नाही का ? आणि ( शांतता ) आईबाप केव्हा ना केव्हा जातातच प्रत्येकाचे. आणि दुष्काळ पडला तो एकट्या मोरे घराण्यावरच पडला का ? सबंध देहूवर, सबंध प्रांतावरच पडला. सर्व घरी कुणी ना कुणी उपाशी मेले आणि कुणाचे दिवाळे निघाले. मग आमच्याच घरात हा सावजी, हा तुका असे का निर्माण व्हावे ?
*
डोंगर चढताना मी रुळलेली पायवाट सोडून मुद्दाम आडवाटा जवळ केल्या. मला वाटत होतं की, अशाच एखाद्या जाळीत, खबदाडात तुका सापडणार. डोंगर माथ्यावर आलो. तुका बसे त्या जागेवर बसलो.** ( ध्यानस्त होत ) मी तुका आहे.. मी तुका आहे.. मी कान्हा नाही.. मी तुका आहे.. आता मी इथून उठून कोठे जाईन ? काय करीन ? .. असं दोन क्षण तुकाच्या आयुष्यात नाही डोकावता येणार. शक्यच नाही ते. तुकाचे मन मी कसे पकडणार ? तो नाहीसा झाला तेव्हा त्याच्या विचारांची परिणती कुठपर्यंत कशी झाली असेल ? तुकाचे काय काय झाले असेल ? याच्या कल्पना मनात येऊ लागल्या. तुका बेभान अवस्थेत नदीत शिरला असेल आणि वहात गेला असेल ? किंवा नदीत शिरला असताना एखाद्या सुसरीने त्याला ओढून नेले असेल ? किंवा नदी ओलांडून काठ चढून जाऊन तो सरळ चालत राहिला असेल आणि एखाद्या श्वापदाने त्याच्यावर झडप घातली असेल ? पांडुरंग ! पांडुरंग ! ** त्याने बेभान होऊन नाचत गात म्हणलेले अलिकडचे अभंग माझ्या कानात घुमू लागले. वैकुंठाला जातो म्हणून तो निरोप घेत होता. दादा! येतो. जातो वैकुंठाला ! जातो जातो जातो म्हणत भेटेल त्याचा निरोप घेत होता. आपणच कल्पना करायच्या आणि आपणच नवनवी विश्वं निर्माण करायची . परस्त्रीने आपल्यावर मोह घातला तर ? अशी एकदा कल्पना त्याच्या डोक्यात आली आणि लगेच "आपण त्या मोहातून सुटलो " असा त्याने अभंगही रचून टाकला.तसा मोहही नव्हता आणि तशी स्त्रीही नव्हती. तसंच हे विमानही नाही आणि वैकुंठही नाही. तो इथेच कुठेतरी जाळीत, खबदाडात मला सापडणार. माझी खात्री आहे. मागल्यावेळी सात दिवस शोधले होते. आता वेळ आली तर सतरा दिवस शोधेन.
पण तुका असा का झाला ?
**
ते दोन मृत्यू झाले नसते तर ? तुका असा झाला नसता.
आमचे वडिल अवचित गेले. ते गेले तेव्हा बैलावर गोणी लादून तुका व्यापाराला कोकणात गेला होता. वडलांचे अंत्यसंस्कार उरकून आम्ही त्याची वाट पहात होतो. घर उदास होते. आईने अंथरूण धरले होते. तुकाने बाहेरच्या अंगणात बैल थांबवले. मग तो गोणी उतरवू लागला. त्याला पहाताच मी आवेगाने ओरडलो, " दादा.."
" काय झाले कान्ह्या ? "
"बाबा गेले रे ! "
( शांतता )
आई..
मी हळूच बाहेर आलो. बैलांवरच्या, जोत्यावर आणून ठेवलेल्या गोणी व्यवस्थित लावल्या. त्यातच पैशांची थैली होती. ती आत आणून कपाटात ठेवली. कुणीतरी हेही करायला हवे. इतक्यात तुका उठून बाहेर आला. आणि अनवाणीच नदीच्या रस्त्याने चालू लागला. मी चमकून हातातले काम टाकून त्याच्या मागे गेलो. स्मशानात येऊन थांबलो. मी तुकाच्या मागे जाऊन उभा राहिलो. तुकाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. तुका तेव्हा रडला. मग आईच्यावेळी रडला. त्यानंतर तो कधी रडलेला मला आठवत नाही. ते दोन मृत्यू झाले नसते तर ? वडिलांचा , नंतर आईचा.
या दोन मृत्यूंनी पुढचा तुका घडला. माझी खात्री आहे.
आई गेल्यावर त्याने केलेला विलक्षण शोक !
"तुकादादा ! तुझ्या त्यावेळच्या अतीव दु:खाचा मला उलगडा होत नाही. दादा ! तुला ठाऊक नव्हते का की, कुणाचेच आईबाप रहात नाहीत. आपले आईवडील जातात. आपल्या मुलांचे आईवडील, म्हणजे आपण जातो. हे असेच होत असते, ही जग रहाटी आहे. असेच जग जगत राहात असते. तुझा अहंकार तरी केवढा होता ? की साध्या माणसालाही ज्या गोष्टी कळतात , त्या न कळण्याइतका तू अद्न्यानी आहेस ? "
अर्थात हे मी तुकाला बोललो नाही. पण दिवसभर त्याच्याजवळ बसून होतो. संध्याकाळी तुका माझ्याशी बोलण्याइतपत शांत झाला. " कान्हा ! बाबा गेल्यावर आईने विचारले, "हे काय झाले रे ?" मी तेच विचारतो, हे काय झाले ? बाबा का गेले ? आई का गेली ? सावजीने अंग काढून घेतल्यावर किती हिरिरीने मी उदीम करू लागलो. हौसेने व्यापार केला. कसोशीने सावकारी केली. थैल्या भरभरून होन घरी आणले. वडलांना धन्य वाटले, आईने कुरवाळले. आणि काय झाले ? मला वाटले मी उद्योग नीट संभाळू लागलो आहे. वडलांना सुख देत राहू. मोठया वैभवात जगू. सगळे उत्तम होत राहाणार. कष्टाची फळे मिळणारच. पण काय झाले ? काय मिळाले ? धन मिळाले. आईबाबा गेले. त्यांचा मृत्यू टाळण्यास धनाचा उपयोग झाला नाही. भरलेल्या सुखी संसारातून बाबा-आईला कुणी उचलून नेले? हा मृत्यू कोण आहे ? * आणि त्याला माणसांच्या भावनांची चाड का नाही ? आम्ही करतो त्याच्याशी मृत्यूचा काही संबंध नाही.कान्हा किती भय़ंकर आहे हे ! एक मृत्यू सारे संपवतो आणि आपल्याला त्याची जाणच नसते ? "
( शांतता ) कोण आहे ?
(शांतता. नुसता डफ चालू होतो. ** )
एकीकडे डोके या असल्या विचारात ! उन्हाची काहिली ! ज्या उन्हात शेत नांगरत असताना, गवत कापत असताना, खड्डा खणत असताना, शक्ती कमी न होता वाढल्यासारखी वाटली होती. ज्या उन्हात हातावरल्या, पायावरल्या, मानेवरल्या शिरा टरा टरा फुगल्या होत्या, जे ऊन्ह जीवनाने रसरसलेले वाटले होते, तेच ऊन्ह आता पार निराळी भावना देत होते. तुकादादा सापडला की ही भावना कोठल्याकोठे निघून जाईल.
( हसतो ) सृष्टी तीच असते. मनाची अवस्था बदलली की वेगळी दिसते. तुकाऽऽ दादा.
दुष्काळ !
या दुष्काळातच , तुका ! तुझी पहिली बायको अन्न अन्न करत तडफडत मेली.
त्या वेळी दादा ! तू विठ्ठलवेडा नव्हतास . तू कवीही नव्हतास. त्यावेळी आज जी चार संतमंडळी तुझ्याभोवती आहेत ती नव्हती. लहानपणी न खेळता येणारा खेळ तू जिद्दीने खेळलास. अंगावर पडलेली सावकारी चोखपणे सांभाळलीस. तसाच दुष्काळाचा तडाखा तू हिमतीने अंगावर घेत होतास. तो "दादा " मला आवडत होता. अजूनही तोच आवडतो. हालाखी सहन करीत पहिली बायको आणि मुलगा मेल्यावर भयंकर दु:खाने तू हतबल झालस. तुला इतके हतबल मी कधी पाहिले नव्हते. तरी तो दादा मला आवडला. कारण अशा संकटात आम्ही जसे वागू तसा तू वागत होतास.
...आणि हतबल झाल्यावर घराचा कारभार मी हिमतीने अंगावर घेतला.
त्यावेळी सावकार आपल्या दारी आला ! !
आकाश कोसळले ! तरी काय बिघडले दादा ! दुष्काळ संपतो . पुन्हा पाऊस पडतो. धान्य येते. व्यवहार सुरू होतात. पुन्हा सावकारी सुरू करता येते. पण तुझे विश्वच निराळे झाले.
**
( थांबून )( डोळे पुसून ) पाऊस !!!
दुष्काळानंतरचा पाऊस !! मला आठवतंय की मी या पायथ्याशी खाण्यासाठी कंद किंवा मुळे किंवा पाला मिळतोय का ते पहात होतो. गेले काही दिवस आकाशात ढग दिसत होते-जात होते. ढगांनी जोर धरावा म्हणून मनात प्रार्थना करीत होतो. आणि...
आणि एकदम पावसाचे थेंब सडसडून पडू लागले. ते तोंडावर घेत, खोल श्वास ओढीत मी नाचू लागलो. .. मी थेंब पकडू लागलो. गारा पकडू लागलो... नंतर गारा थांबून जोराचा पाऊस सुरू झाला. मी कृतद्न्य उभा होतो ! चहूकडून पाणी वाहण्याचे गोड आवाज येत होते.मघा मी मेलेल्या ढोराचा सापळा समजलो होतो त्या सापळ्याने मान वर केली.
दादा ! माझ्यासारख्या साध्या संसारी माणसाला आनंद होण्यास दुसरे काय हवे असते? देवाने पाऊस द्यावा. शेतात कणसे चांगली यावीत. विहिरींना पाणी यावे. पोरेबाळे, बायको आनंदात, सुखात असावीत. सण-समारंभ थाटात साजरे करावे. आणखी काय हवे?
दादा ! माझे खोटे आहे का सांग ? पण हे सारे मला वाटले. तुला नाही !! तू आपला उठलास आणि आपल्या घरातील भंगलेल्या देऊळ दुरुस्तीला लागलास. पाऊस चांगला झाला होता. तुझ्यासारख्या अनुभवी वाण्याला धंदा सहज उभा करता आला असता, पण तू तिकडे वळलाच नाहीस. आईवडील गेले. बायको-मुले गेली. दुष्काळात अपमान झाले. लोकांत छी थू: झाली. हृदय पिळवटून निघाले. पण आमच्यासाठी काळ त्यावर इलाज करतो. दु:ख भरून निघतात. पण तू मात्र मनाला लावून घेतले. भंगलेले देऊळ तू उभारत राहिलास. हाती जे काही द्रव्य होते ते तू त्यात घातलेस. दुकानाकडे पूर्ण दुर्लक्ष केलेस.
आम्हांला तुझा राग आला. मी बायकोला म्हटले, प्रत्येक दमडी आपल्याला हवी आहे आणि दादा हातात द्रव्य आले की देवळाकडे घालतोय. कसे निभायचे आपले ? तुझ्या बायकोने-आवलीने त्यावेळी प्रथम तोंड सोडले. पण पहिल्यांदाच तू तिचे ऐकले नाहीस. भंगलेले देऊळ बांधत राहिलास. एकदा बेभान अवस्थेत तू मला डोंगरावर सापडलास तेव्हा तुझ्या त्या कृत्याबद्दल मी एकदा न राहववून विचारले तेव्हा तू म्हणालास..
" कान्हा ! भिंत नीट करून, हातपाय धुवून मी देवळात जाऊन विठ्ठलाला नमस्कार करून बाजूला बसलो. माझ्या मागून एक गावकरी आला. तोही नमस्कार करून बसला. मला नवल वाटले. कारण माझी जराही चलबिचल झाली नाही. दुष्काळानंतर माणसांची मला भीती वाटू लागली होती. प्रत्येक जवळ आलेला माणूस मला घेणेकरी वाटू लागला होता. कित्येकदा मी भिऊन घरात अगदी आत काळोखात जाऊन बसे. पण यावेळी त्या दोघांची मला थोडीही भीती वाटली नाही. माझे मन निवांत होते ! त्यापूर्वी मी अनेकदा देवळात गेलो असेन, पण त्या दिवशी मला देऊळ काय असते हे कळले. गावात देऊळ हेच एक असे ठिकाण असते, जिथे व्यवहार संपतात . विठ्ठल-रखुमाई असलेल्या या चार भिंतींत माझ्यासारखा दिवाळे निघालेला येतो. माझा सावकार येतो. पांडुरंगापुढे सर्व समान होतात. आपण माणूस म्हणून हे समानतेचे तत्त्व हरवून बसतो. -कान्हा मी ठरवले, " सावकारी " इंद्रायणीत बुडवायची!!!
***
( शांतता. प्रखर निश्चयाने - )
कान्हा ! ज्याच्या घरावर मी जप्ती आणेन , ज्याच्या दाराशी धरणे धरेन त्याचा आणि माझा शेवट एकच ! मग मी धनको होऊन दुसऱ्याला का लुबाडावे ? मी ठरवले "सावकारी " इंद्रायणीत बुडवायची!!!*** (अंधार) ( पाण्यात पाहातोय )
दादा! सर्वांना वाटतेय , केवळ भावाच्या नात्यामुळे मी तुला शोधतोय. असेही वाटेल की, भावाने भावाला शोधले नाही तर लोकापवाद येईल म्हणून मी तुला शोधतोय. मी तुला का शोधतोय हे मला मनोमन ठाऊक आहे. मी युला शोधतोय पण जे मी हरवून बसलोय ते शोधतोय ? दादा ! तू जे शोधत असायचास त्याची चुणुक मी अनुभवली आहे. तू ज्या विरक्तीत पूर्ण बुडला होतास, त्यात चुकलीमाकली बुडी मारून घाबरा होत मी बाहेर आलो आहे. ज्या विरक्तीने आपल्या कुटुंबाला पछाडले तिने मला तरी कुठे सोडले ? संपूर्ण विरागी होणे कदाचित सुखाचे असेल पण विरक्तीचे झटके येण्यासारखे दुर्दैवाचे काही नाही. मधूनच संसार वमन वाटतो. पण तो सोडवत नाही .
दादा, तुला सावकारी इंद्रायणीत बुडवायची होती ! सावकारी इंद्रायणीत बुडवायची!! तुझे ते बोलणे ऐकून मी इतका भारावलो की सरळ उठून गहाणखतांची दप्तर आणायला घरात गेलो. कपाट उघडताना माझ्या पाठीला आपल्या दोन्ही बायकांच्या नजरा टोचत होत्या. इतक्यात मुलांपैकी एकजण येऊन माझ्या धोतराचा सोगा धरून पायाशी उभा राहिला. मी त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले, गहाणखत बुडवल्यावर या मुलांचे कसे होणार ? ही अन्न अन्न करीत दारोदार भटकणार. तू आपल्या सगळ्या कुटुंबालाच भिकेला लावणार ? आमचा दुष्काळ कधीच संपणार नाही ? दादा, मी त्यावेळी तुझ्याशी भांडलो, क्षमा कर. तुझी मनस्थिती मला तेव्हा कळली नव्हती. तुझ्या मनात काय चालले आहे हे कळण्याचा पोच मला नव्हता. तू आपला एकेक मार्ग मोकळा करत चालला होतास हे माझ्या ध्यानातच आले नाही.
संसारी, स्वार्थी, संकूचित वृत्तीचा भाऊ जे बोलेल ते मी तुला त्यावेळी बोललो. तुला बायकोमुलांची, भावाची, भावाच्या कुटुंबाची पर्वा नाही म्हटले. आपल्या वडिलांनी कष्टाने बांधीत आणलेला धंदा तू धुळीला मिळवतो आहेस. विरक्त पुष्कळ आहेत. आपला सावजी विरक्त होता. पण सर्व जबाबदारी संपल्यावर तो निघून गेला. पण तुझी बायको-मुले आहेत. माझी बायको-मुले आहेत. सर्वांच्या पोटापाण्याचा प्रश्न असता तू गहाणखतं बुडवायला निघालास ? " तुका ? तू संसार बुडवणार आहेस ? मग माझा गहाणखतातील हिस्सा मला दे आणि तुझे तुला काय करायचे तू कर. " तुझा चेहरा कष्टी झाला. मी दिलेले दप्तर तू परत माझ्या हातात दिलेस.
मी ती निवडून काढली.उरलेली तुझ्या हाती ठेवली. तू डोहाशी गेलास. दप्तरात दगड ठेवलास. आणि ती दूर भिरकावलीस. ** इंद्रायणीत ती गहाणखतं खोल तळाशी गेली असतील. तुझा चेहरा विलक्षण आनंदला होता. तू कसलेतरी जड वजन दूर केले होतेस.
आणि त्यानंतर काही क्षण तुकात आणि माझ्यात आतापर्यंत कधी न उत्पन्न झालेला दुरावा उत्पन्न झाला. इन्द्रायणीवर आम्ही दोघे उभे होतो. मला गदगदून येत होते. झालेल्या अपराधाबद्दल क्षमा मागावी आणि बाजूला काढलेली गहाणखतं पाण्यात फेकावीत असे मनात येत होते. पण ते धैर्य मला झाले नाही. मला गोंजारीत तुका म्हणाला, " मी तुझ्यावर रागावलो नाही. चल ! घरी जाऊ." ***
भामनाथ डोंगर शोधल्यावर मी भंडारा डोंगराकडे निघालो. गहाणखतं बुडवल्यावर या इथेच तुकाने संतांची अक्षरे अभ्यासायची ठरवली होती. दादा..**
माझ्या नकळत मी कधी बालपणीच्या कातळावर येऊन बसलो मळा कळलंच नाही. का कोणास ठाऊक काल पासून सारखे येथे येऊन बसावेसे वाटतेय. का कोणास ठाऊक, काल पासून सारख्या तुकाच्याच आठवणी येतायत. पुष्कळांचे भाऊ विरक्त होऊन गेले असतील. आमचा सावजीही विरक्त होऊन गेला. केवळ विरक्तीचे काय आठवायचे ? की तुकाने आमचे सगळे कुटुंबच विरक्तीत ओढून नेण्याचा प्रयत्न केला म्हणून आठवतोय? आणि ही विरक्ती तरी कोणत्या तऱ्हेची आहे ? ती सावजीची विरक्ती नाही . एखाद्या नव्या प्रदेशात वस्ती करायला न्यावे तशा आनंदाने तुका आम्हांला नेऊ पाहातोय. हा नवा विलक्षण प्रदेश कुठे आहे, कसा आहे याचा त्याला स्वत:लाच अनेकदा संदेह पडतोय. तरी तो आम्हांला ओढतोय. आम्ही ओढाळपणा केला की चिडतोय., रागावतोय, आक्रस्ताळा होतोय. प्रथम त्याला वाटत होते, माणसांची दु:खे दूर केली पाहिजेत. जे संत आहेत त्यांची सेवा केली पाहिजे. दुसऱ्या जीवांशी एकरूप होता आलं पाहिजे. अवघे जग ब्रह्मरूप पाहिले पाहिजे. मग घरात कित्येकदा अन्नाचा कण नव्हता तरीही तू इतर संत मंडळी घरी आणायचास. त्यांची सेवा करायचास, कोणी म्हातारी जड ओझे घेऊन जाताना दिसली की तिचे ओझे घेऊन तिला घरी पोहोचवायचास. कोणी पांथस्थ आजारी दिसला की त्याला धर्मशाळेत नेऊन त्याची सुश्रुषा करायचास. लोकांनी सोडून दिलेल्या गुरांढोरांना तू दवापाणी करायचास. सांगितलेली कुठलीही कामे तू फुकट करतोस हे पाहून लोकं तुला वाटेल ती कामे सांगायची आणि तू ती करायचास. दादा, मग तुझ्या केव्हा लक्षात आले की, माणुसकी वगैरे गोष्टी तोकडया आहेत ?
" कान्ह्या, माणसांची जी सांसारिक दु:खे दिसतात, ती खरी दु:खे नव्हेतच. व्यवहारातून दु:खे निर्माण होतात, ती दु:खे खोटी. खरे दु:ख जन्म घेण्याचेच आहे. कारण एखाद्याचे एक दु:ख दूर करावे तोच तो दुसरे दु:ख करू लागतो. एक गरज पुरवावी तर दुसरी उत्पन्न होते. अशी दु:खे निवारण करणे पोरपणाचे आहे. कान्हा, माणसाचे दु:ख निराळेच आहे. " (शांतता )
जय जय रामकृष्ण हरी ! जय जय रामकृष्ण हरी ! ( उदघोषानंतर अंधार ) पोटापाण्याच्या उद्योगात धडपडीत दिवस-महिने कसे जातात कळत नाही. आमचा संसार आणि अडचणी वाढत होत्या. मागे वळून पाहिले की कधी कधी वाटते, किती कंटाळवाणे तेच तेच काम आपण करीत आलो ! मी दुकानदारी करतो आहे. माझ्या वडलांनी केली . आजोबांनी केली. माझ्याप्रमाणे माझे पूर्वज नांगर धरीत आले. रानात गवत कापायला गेले. त्या सर्वांतून काय निष्पन्न झाले ?
सूर्य क्षितिजाकडे उतरू लागला आहे. यथाक्रम रात्र पडेल. तुका सापडला किंवा न सापडला याचे सूर्याला काही आहे का ? माणसाचे महत्त्व फक्त माणसाला. पंच महाभूते त्याला पुसत सुद्धा नाहीत. दादा ! त्या निर्घृण पंचमहाभूतांपासून तुझ्या देहाचे संरक्षण करायला आम्ही पाहत आहोत. शरीर म्हणजे सर्व आहे एवढेच आम्हांला कळते. माझ्या एका हाकेला तरी उत्तर दे.
(शंका येऊन ) का तू मला आता कधीच सापडणार नाहीस ? तू असा कोठे लपला आहेस, की ती जागा मला अपरिचित आहे ? तू गेल्यावर मला काय उरले? लोकांना काय तुझे कवित्व पुरेल. पण मला मात्र तुझे कवित्व तुझ्यावाचून वाचवणार नाही. ते नुसते कागद पाहून मला रडू कोसळेल. तू माऊलीहून मायाळ । चंद्राहून सीतळ । पाण्याहून पातळ । कल्लोळ प्रेमाचा । (शांतता) आंधळयासि जग अवघेचि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाही ।
तुला एक सांगू का ? तू लिहिलेले अभंग वाचून मीही अभंग करू लागलोय. तुला अभंगामागून अभंग कसे सुचतात हे मला कधी कळले नाही मी खूप विचार करायचो. अमुक एक अभंग तुला कसा सुचला असेल ?
परिमळ म्हणोन चोळू नये फूल । खाऊ नये मूळ आवडते । मोतियाचे पाणी चाझू नये स्वाद । यंत्र भेदुनिया नाद पाहू नये ।
त्याची गाभ्याची कल्पना तुला कशी सुचली असेल ? तुझ्या अभंगाचे मूळ विठ्ठल आहे का "तुका" आहे ? काही विचार सुचला की त्याचा अभंग तयार होतो, की काही प्रसंग पाहून तुला अभंग सुचतो ? मीही एखादी उत्कट भावना मनात येऊन अभंग करायचो. मग पुढचे कित्येक दिवस थंड जायचे. कधी महिनेही. तुझ्या डोक्यात एवढे अभंग कसे येतात ते कळत नाही. अखादी मधमाशी जशी भराभरा फुलाफुलांवरून जाते, तसे तुझे अभंग वस्तू-विषयांवरून मध वेचत जातात. प्रत्येक क्षण तुझ्या लेखी जिवंत, उल्हासित आहे. मला सांग, माझे जीवन जास्त धडपडीचे असूनही माझ्यापेक्षा जीवनातले सूक्ष्म तुला कसे कळते ? जणू तुला पाहाताच जीवन आपल्या अंतरंगाच्या पाकळ्या उघडून तुझ्यापुढे उभे रहाते आणि मला पहाताच ते डोळे मिटून घेते. मरण माझे मरोनि गेले । मज केले अमर ।
ठाव पुसिले बूड पुसिले । वोस वोसले देहभाव ।
आला होता गेला पूर । धरिला धीर जिवनी ।
तुका म्हणे अनिकेचे । झाले साचे उजवणे ।
जलदिव्य !! ***
तेरा दिवसांचा निश्चक्र उपवास !! जीव कासावीस !! अभंगांच्या वह्या तरल्या तरच पुढे कवित्व !! "कान्हा, मी वह्या इंद्रायणीत बुडवणार. माझ्या वह्यांचे कागद बुडणार की कवित्व हे पांडुरंगाला आणि ज्या लोकांना माझे अभंग महत्त्वाचे वाटतात त्यांना ठरवू दे ! अनुभवाचे शब्द बेगडी असतील तर रसातळाला गेलेले बरे. त्यानिमित्ताने आपलीपण पारख होईल. केवळ जन्माच्या आधाराने कोणी मनुष्य द्न्यानी-अद्न्यानी ठरत नाही आणि आपले तोंड शक्तीच्या जोरावर दाबले जाऊ शकते, मन आणि बुद्धी नाही. अन्याय करणारा कोणीही मक्तेदार असेच वागतो. पण आपण का घाबरावे ? चोखोबा, द्न्यानोबा कुठे घाबरले ? दह्यामध्ये लोणी असते हे सर्वांना ठाऊक असते पण जो मंथन कसे करायचे हे जाणतो, तोच ते लोणी वेगळे काढू शकतो. लाकडात आपोआप अग्नी प्रज्वलीत कसा होईल ? त्यासाठी घर्षण करावे लागते ना ? खडे निवडले तरच दळण चोख मिळेल. तण काढूनच शेताचे हित राखावे लागते. वागण्याची ही नीती हे नियम यांचा विचार केला नाही तर हित होत नाही. माणसाने स्वत: हालचाल केली तरच त्याच्यावरची सर्वसंकटे निवारली जातील . मी वेद बोलतो. काही ब्राह्मण माझ्या पाया पडतात आणि धर्म बुडतो. मला गुरु-शिष्य भोंदूबाजी मान्य होत नाही. हा माझा दोष असेल तर त्याचे प्रायश्चित्त ** घ्यायला हवे. आणि मी नाही म्हणले तरी ते मला भागच पाडतील. माझा भरंवसा आता पांडुरंगावर आणि लोकांवर आहे कान्हा ! "
जलदिव्य झाले. उपवास झाला. आणि वह्या तरल्या....जलदिव्यातून सुरक्षित बाहेर आल्या. त्या कशा तरल्या कोण सांगणार ? वर ठेवलेला दगड कासवाने किंवा मगरीने ढकलला किंवा नंतर लॊक म्हणू लागले तशा त्या विठ्ठलाने काढून तुझ्यापुढे धरल्या. पांडुरंग ! पांडुरंग ! * नदीवरच्या या अंधारात तू शेजारी नाहीस याची तीव्र वेदना होत आहे. तू खरा काय होता हे थोडे थोडे कळू लागल्यावर आता तू सापडावास म्हणजे काय मजा येईल ! तू म्हणत होतास ते खरेच आहे. हा प्रपंच खोटा आहे.येथील सर्व खोटे आहे. पाहा ! तुझा सहवास आहे म्हणता म्हणता चाळीस वर्षे गेलीही आणि आणखी पंधरावीस वर्षांत आपल्यापैकी कुणी राहणार नाही. जसे बाबा होते, आई होती असे म्हणता म्हणता दोघेही गेली. सावजी गेला सगळे जाण्यासाठीच आले. कुठून आले ? कुठे गेले ? या विचाराने तू वैतागलास. तुझा मागचा अटटाहास याचसाठी होता. हे सृष्टीतले सारे कुठे गेले हे शोधण्याचा हा प्रयत्न होता ?
तू जीवनात खोल बुडया मारीत होतास आणि लहानपणी मी डोहाच्या काठावर तुझ्या बुडया पहात विचारीत होतो, दादा ! तळ लागला का ? श्वासासाठी धडपडत पाण्यावर मान काढून , चूळ टाकत तू " नाही-नाही " मान हालवीत होतास. तसेच मला आताही वाटत होते. कित्येक जागी तू " सापडले - सापडले" ओरडत , दोन्ही हात वर करून मुठी उघडत होतास आणि मूठ मोकळी होती. कित्येकदा काही हातात येत होते आणि मला ते कळत नव्हते. **
( शांतता )
तुकाच्या शोधाचा हा तिसरा दिवस. !
शोधाच्या तिसऱ्या दिवशीही मी इंद्रायणीवर जाऊन पोहोचलो. मागोमाग रामेश्वर भट., बहिणाबाईचा नवरा, मंबाजी आले. तुका विषयी उशिरा का होईना पण त्यांना ममत्व वाटू लागले होते. पाठोपाठ काही गावकरीही आले. गप्प उभे. कोणीच काही बोलेना. असह्य शांतता. मग एकजण धीर घेऊन म्हणाला , " तुका सदेह वैकुंठाला गेल्याच्या वदंता आहेत. एका गुराखी पोराने म्हणे विमानही पाहिले. कुणी म्हणतात, तुकाने डोहात उडी घेतली. कुणी म्हणतात, त्याला मगरीने ओढून नेले. कुणाचे म्हणणे, तो आपला निघून गेला तर कुणाचे म्हणणे त्याला...
मला कुठलेच काही ऐकू येई नाहीसे झाले. डोळ्यांपुढे अंधारी आली. पायाखालची जमीन हादरू लागली. डोक्यात सर्वत्र कोलाहल सुरू झाला. तुका मला या पुढे दिसणार नाही ही जाणीव मी सहनच करू शकत नव्हतो. मी एकटाच झरझर इंद्रायणीच्या काठाकाठाने निघालो. मन अस्थीर झाले होते. तुकादादा असा जाईल कसा हा प्रश्न मनात उसळून येत होता. मन सर्व संशयाने ग्रासले गेले. पण कोणी सांगावे प्रत्यक्ष पांडुरंगानेही त्याला आपल्याबरोबर नेलेही असेल. पण कुठे ? दादा ! *** ( अंधार )
काय रे नष्ट्या नारायणा, बरा भेटलास आम्हाला. काळतोंडया, तू आमच्या घराची पुरती विल्हेवाट लावलीस. काय रे बाबा, आम्ही निष्काम राहिलो म्हणून का रे तुझ्या मनात येईल ते करतोस ? बोल कुठाय माझा भाऊ ? ***
धींद धींद तुझ्या करीन चिंधडया !
ऐसे काय वेडया जाणितले॥
केली तरी बरे मज भेटी भावास ।
नाही तरी नास आरंभिला ॥ **
मरावे मारावे या आले प्रसंगा ।
बरे पांडुरंगा कळलेसावे ॥
तुकयाबंधू म्हणे तुझी माझी उरी ।
उरली न धरी भीड काही ॥ **
भक्ति मुक्ति तुझे जळो ब्रह्मद्न्यान ।
दे माझ्या आणोनी भावा वेगी ॥
रिद्धी सिद्धी मोक्ष ठेवी गुंडाळून ।
दे माझ्या आणून भावा वेगी ॥ **
नको आपुलीया नेऊ वैकुंठासी ।
दे माझ्या भावासी आणून वेगी ॥
नको होऊ काही होशील प्रसन्न ।
दे माझ्या आणून भावा वेगी ॥
तुकयाबंधु म्हणे पाहा हो नाही तरी ।
हत्त्या होईल शिरी पांडुरंगा ॥ **
तुका जाऊन दोन दिवस उलटले मी सारखा आत बाहेर करतो आहे. दर वेळि माझी दृष्टी घरातले सामान पाहण्याऐवजी त्याला चिकटून बसलेल्या स्मृती पाहत आहे. आम्ही येथे जन्मलो, वाढलो, हसलो, रुजलो,जेवलो, खेळलो दंगलो, रंगलो, भंगलो... ( रडू लागतो )
" पांडुरंगा ! परवा मी तुझ्यावर संतापलो. शुद्धहरपलो, पाया पडतो. क्षमा कर ! आता राग संपले. या पुढचे दिवस मी सरळ योगक्षेमात, मुलेबाळे वाढवण्यात घालवणार. तुकाचे अभंग गात जबाबदारीने वागणार. विठ्ठला तू आहेस - नाहीस, तुझी कृपा आहे - नाही हा आता कसलाच विचार नाही. तू असशील तर सुखाने घरी अस. मी माझ्या घरी सुखाने असेन. जरी आमच्या भावातला मी एकटाच उरलो आहे तरी तुला दोष देत नाही, तुझ्यावर राग नाही. तू कोणत्या गावी आहेस ? तुका तुला विचारीत होता. तो तुझे गाव शोधायला गेला. तुझे गाणे गायचे सोडून गेला. मी तुझे गाणे गातच संसाराच्या सागरात उतरत आहे. जोवर माझ्या भावाची माझी भेट होत नाही तोवर तुझे नाव मी घेत राहीन. तुकाच्या आकांताने घेत राहीन. "
( प्रथम वीणा वाजते. पखवाज, टाळ वाजू लागतात. अंधारत जाताना- पडदा )
१. वेगळी अनुभूती जागवणारी कलाकृती
अर्जुन डांगळे
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या वतीने माणगावजवळील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परिसरात २०-२१ डिसेंबर रोजी संपन्न झालेला आंतरभारती साहित्य संवाद - २००२ हा अनेक घटनांनी लक्षात राहील. पहिल्या दिवशी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात जे नाटक सादर करण्यात आलं त्या नाटकाने प्रेक्षकांना शंभर मिनिट जागेवर खिळवून ठेवल होत. आनंदओवरी हे नाटक दि. बा. मोकाशी यांच्या कादंबरीवर आधारित आहे. विजय तेंडुलकर यांनी संकलन आणि नाटरूपांतर केल आहे. संकल्पना-दिग्दर्शन हे अतुल पेठे यांनी केलेल आहे. तर या एकपात्री नाटकातील कलावंत आहेत किशोर कदम.महाराष्ट्रातील सामजिक साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेत संतकवींना विशिष्ट असं महत्त्व आहे. वारकरी संप्रदायाने विठ्ठलभक्तीच्या रूपाने जी आध्यात्मिक वाट चोखाळली, त्या वाटचालीतील एक महत्त्वाचा संत म्हणजे तुकाराम होय. एक बंडखोर कवी म्हणून तुकारामाकडे पाहण्याचा आणि त्यांच्या अभंगाद्वारे व्यक्त झालेल्या वाङ्मयीन गुणाचा म्हणजे अस्सल कवित्वाचा शोध दिलीप चित्रेंसारखे समीक्षक घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूने सामाजिक - धार्मिक दंभाविरुध्द विषमतेविरुध्द आवाज उठवणारा विद्रोही म्हणून आ. ह. साळुंखेंसारखे विचारवंत तुकाराम चित्रित करत आहे. एकूणच तुकारामांच व्यक्तिमत्त्व हे इतकं विलक्षण आहे की सर्वच पातळयांवर तुकारामांच शोध घेण्याचे प्रयत्न होत आहेत.आनंदओवरी या नाटकात मात्र तुकारामाचा शोध घेण्याचा एक वेगळाच प्रयत्न आहे. तो साहित्यिक वाङ्मयीन पातळीवर नाही सामाजिक पातळीवर नाही. खरं म्हणजे तुकारामांच्या जीवनाशी संबंधित अशी संहिता असली तरी प्रत्यक्ष तुकारामांच पात्र नाही. कान्होबा हा तुकारामांचा धाकटा भाऊ. हा कान्होबा तुकारामांच व्यक्तिगत आयुष्य कौटुंबिक आयुष्य आणि त्याची विठ्ठलाप्रती असलेली श्रध्दा कथन करतो. त्यांच्या घराण्याचा इतिहास सांगतो. वर म्हंटल्याप्रमाणे हा जरी सामाजिक-वाङ्मयीन पातळीवरचा तुकारामाचा शोध नसला तरी कान्होबांच्या निवेदनातून ते काही संदर्भ येतात ते अतिशय सहजस्वाभाविक आहेत. त्यामुळे याला एक वेगळंच सामाजिक परिमाण लाभतं आणि या पार्श्वभूमीवर तुकारामाच्या व्यक्तिगत आयुष्याचे विशेष उलगडत जातात.

किशोर कदम कान्होबांच्या भूमिकेत
ओवरी म्हणजे घरासमोरील अंगण किंवा मोकळी जागा. तुकाराम ज्या ओवरीवर बसून आपले अभंग रचीतआपल्या सहकाऱ्यांशी विठ्ठलभक्तीत रंगून जात तिला आनंदओवरी असं म्हणत. याच आनंदओवरी वरून तुकारामाचा धाकटा भाऊ कान्होबा तुकारामाचं जीवन कथन करतो म्हणजे तोही काही प्रश्न स्वतःला विचारत असतो. घरचा व्यापारउदिम सांभाळणाराव्यवहारी असणारा तुकाराम हा विठ्ठभक्तीत वेडापिसा का होतो आपल्या कुटुंबावरभावंडांवर प्रेम करणारा कुटुंबवत्सल तुकाराम हा परागंदा का होतो परोपकारी वृत्ती जपणाऱ्यालोकांमध्ये मिसळणाऱ्या तुकारामालां एकाकीपणा का जाणवतोहे प्रश्न उपस्थित करत असतानाच बालपणापासून घडत गेलेलाआयुष्यातील अनेक वाकडी वळणं ओलांडून साकार झालेला तुकाराम कान्होबा आपल्या आठवणींद्वारे उभा करतो.
हे नाटक म्हणजे कान्होबाने तुकारामांशी केलेला संवादस्वतःच्या मनाशी केलेला संवाद आणि प्रेक्षकांशी केलेला संवाद होय. या संवादातून कान्होबा कधी तुकारामांच्या आठवणींनी गहिवरून जातोमोठा भाऊ म्हणून जबाबदारी पार पाडली नाही म्हणून चिडतोरागावतोतर कधी विठ्ठलभक्तीत अभंगाद्वारे खिळवून ठेवणाऱ्या तुकारामां पुढे लीननतमस्तक होतो. नदीच्या बाजूला असलेल्या कातळावर बसून तुकाराम समोरच्या निसर्गाशी जे तादात्म्य साधतो त्याचं वर्णन तो करतो. तर दुष्काळात झालेली झालेली सबंध कुटुंबाची परवड तो सांगतो. तुकारामांचा मोठा भाऊ सावजी असाच विठ्ठलभक्तीपायी परागंदा झालेला असतो. भरल्या संसारातून उठून जातो. तुकारामही त्याच मार्गाने जात असतो. म्हणून कान्होबा विठ्ठलावर रागावलेला दिसतो. त्याला जाब विचारताना दिसतो. या सगळया प्रक्रियेत त्याच्या कुटुंबातील स्त्रियांचीपोराबाळांची कशी परवड होत गेली हे सांगतो. तर कधी तुकाराम आपली अभंगरचना कशी करायचा हे सांगतो.
घरप्रपंच सोडून अचानक रानावनातडोंगरदऱ्यात जाऊन विठ्ठलनामाचं चितंन करण्यासाठी गायब होण्याचे प्रसंग तुकारामांच्या जीवनात आहेत. अशाच एका प्रसंगाने नाटकाची सुरुवात होते. नेहमीप्रमाणे कान्होबा त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. कान्होबाला वाटतं तुकाराम नेहमीप्रमाणे कुठेतरी सापडेल पण शोध लागत नाही. ज्या नदीच्या कातळावर बसून तुकाराम चिंतन करायचा तिथे तो नसतोच. डोंगरदऱ्यांत कपारीत नसतो. कुणी सांगतो विमान आल होत ते तुकारामाला घेऊन गेल. गुराख्याच पोर सांगततुकारामाला सुसरीने ओढून नेताना पाहिल. तुकारामाच्या मृत्यूने अस्वस्थ आणि हतबल झालेला कान्होबा मृत्यू म्हणजे काय याविषयी भाष्य करतो आणि शेवटी तोही विठ्ठलापुढे लीन होऊन तुकारामांच्या भक्तिमार्गाची कास धरतो.
सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे आनंदओवरी या नाटकाने प्रेक्षकांना शंभर मिनिट खिळवून ठेवलं होत. आणि हे खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य होतं ते किशोर कदम याच्या अभिजात अभिनयात. कान्होबांसारख्या अपरिचित पात्राच्या माध्यमातून तुकाराम उभा करणं म्हणजे एक आव्हान होतं. अनेकपात्री नाटकातून सादर केली जाणारी नाटकृती आणि एकपात्री नाटकृती यात मूलभूत फरक आहे. अनेकपात्री नाटकात संवादघटनाअभिनय यांच्यातील तोल सांभाळला जाऊ शकतो. पण एकपात्री नाटक म्हणजे एकूण त्या नटाचा-कलाकाराचा व्यक्तिमत्त्वाचा कस असतो. किशोर कदमसारखा तरुण कलावंत या कसाला उतरलेला दिसतो. विशेषतः विनोदाच्या अंगाने जाणाऱ्या किंवा पारंपरिक नेपथ्याचा डोलारा उभा करून किंवा निवेदनाद्वारे सादर केलेल्या मनोरंजनप्रधान एकपात्री प्रयोगात अनेक गोष्टी खपून जातात. पण आनंदओवरी सारख्या गंभीर नाटकृतीत ज्यात भावभावनांचेमनोव्यापाराचे अनेक चढउतार आहेत ते केवळ अभिनयाद्वारे सजीव करणं ही साधी गोष्ट नाही. प्रेक्षक आणि रंगमंच यांच्यातील क्षणभराचाही विसंवाद नाटकृती अनुभवताना विक्षेप निर्माण करू शकतो. पण या नाटकात कान्होबाच्या भूमिकेत असणारा किशोर कदम आपल्या प्रतिभासंपन्न अभिनयाने प्रेक्षकांशी भावनिक नात जोडतो.
किशोर कदमचा अभिनय हा अभिजात आणि प्रतिभासंपन्न आहे तो यासाठी कीनाटकाला नेपथ्य असं नाही. एक साधं जुनंदोन खणांचं घर. पुढे ओवरी आणि त्यावर असलेली खाटरंगमंचाच्या डाव्या बाजूला प्रेक्षकांना न दिसणारा पण प्रकाश योजनेच्याद्वारे उभा केलेला छोटासा देव्हाराया नेपथ्याच्या पार्श्वभूमीवर हातात असलेल्या एका शेल्याच्या माध्यमाचा वापर करून तो वातावरणनिर्मिती करतो. एखादा नवीन प्रसंग सांगताना तो शेला तो डोक्याला मुंडास म्हणून गुंडाळतो. तर हा शेला अवघड आणीबाणीच्या प्रसंगी हाताला गुंडाळतो. तर चित्तवृत्ती स्थिर असताना तो गळयात उपरणं म्हणून घालतो. त्या शेल्याचा वापर करताना त्याच्या चेहऱ्यावरच्या भावछटात्या वेळच्या भाववृत्ती इतक्या अनुरूप असतात की वाटतंकिशोर अभिनय करत नाही तर कान्होबाच त्याच्या अंगात संचारला आहे. भूमिकेशी तादात्म पावणं किंवा एकरूप होणं म्हणजे काय असतंहे या नाटकात दिसतं.
केवळ चेहऱ्यावरचे हावभाव बदलण किंवा हातवारे करत संवाद फेकण म्हणजे भूमिका पार पाडण नव्हे. तर संपूर्ण रंगमंचावर चपखलपणे वावर करूनत्यावर हुकूमत मिळवून अभिनयाबरोबरसंवादाबरोबर त्यातही जिवंतपणा आणण हे सगळयांनाच जमतं असं नाही. पण या नाटकात किशोर कदमसारखा कलावंत प्रेक्षकांचा ताबा तर घेतोपण संपूर्ण रंगमंचाचादेखील ताबा घेतो. यात शारीरिक चापल्य असलं तरी एकूण नाटप्रक्रियेशी असलेली बांधिलकीही दिसून येते. या प्रक्रियेतच रंगमंचाचा संपूर्ण आवाका लक्षात येतो. एकपात्रीनेपथ्यही नाटकात याला महत्त्व असत कारण प्रसंगानुरूप परिणामकारक दृश्य उभ करण्याच सामर्थ्य या हालचालीत असतं. उदाहरणार्थ तुकाराम जेव्हा गायब होतो त्याला शोधण्यासाठी कान्होबा बाहेर पडतो तेव्हा त्याला तो रस्त्यावर गावात नदीकाठी झाडीझुडपात डोंगर कपारीत कसा असहाय्य आणि वणवण फिरत असताना दिसतो याच अत्यंत प्रत्ययकारी दर्शन किशोर कदमने आपल्या या हालचालीतून घडवल आहे. विशेषतः वेडा जन्याशी त्याचा रस्त्यावरचा संवाद तर मनाचा ठाव घेतो.
किशोरला आवाजाची देन आहे. या कविमनाच्या संवेदनशील कलावंताच्या आवाजात जो आर्त पण धारदार असा कंप आहे तो केवळ कानापर्यंतच पोहोचते नाहीतर काळजापर्यंत पोहोचतो. तुकारामाला शोधताना तो ज्या अगतिकपणे तुकातुकोबातुक्या अशा हाका मारत रानोमाळ भटकतो त्या वेळच्या त्याच्या अभिनयाने आणि आवाजाने प्रेक्षक स्वतः हरवतात.किशोर हा प्रतिभासंपन्न असा कलावंत आहे याचं आणखी एक प्रत्यंतर म्हणजे त्याने फेकलेले नाटकातील संवाद होय. शंभर मिनिटांच हे नाटक आहे. मध्यंतर नाही. या प्रदीर्घ कालावधीत संपूर्ण संवाद न अडखळता न थांबता त्यातील चढ उताराचा आलेख सांभाळून सादर करण्याची सर्वच पातळयांवरची किशोरची क्षमता ही खरोखरच कौतुकास्पद आहे.
हा संपूर्ण नाट्यानुभव घेत असताना एका गोष्टीचा अभाव मात्र जाणवला आणि तो म्हणजे कान्होबाच्या भाषेचं वळण होय. वास्तविक कान्होबा हा मावळहवेली या ग्रामीण परिसरात वाढलेला जगलेला. नाटकातील कान्होबाच्या भाषेला हे ग्रामीण वळण किंवा डूब नाही किशोर कदम यांचं मराठी वळण हे शहरी मध्यमवर्गीय आहे. मध्येमध्ये काही ठिकाणी वळण बदलण्याचा प्रयत्न केलेला जाणवतो. या संदर्भात नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागू यांची देवकीनंदन गोपाला तील गाडगेबाबांची भूमिका आठवते. त्यातीत त्यांचं वऱ्हाडी भाषेचं वळण हे मोहवणारं आहे. अर्थात सिनेमात हे शक्य करता येतं. कारण सिनेमा आणि नाटक यांच्या तंत्रातच मूलभूत फरक आहे.
अतुल पेठे या तरुण दिग्दर्शकाचा या नाटकाच्या यशात मोठा वाटा जाणवतो. सूर्य पाहिलेला माणूसउजळल्या दिशा यासारखी नावीन्यपूर्ण आणि वेगळया आशयाचीधाटणीची नाटकं त्यांनी रंगभूमीवर सादर केली आहेत. आनंदओवरी या नाटकाची रंगावृत्तीसंगीत संकल्पना आणि दिग्दर्शन त्यांनी केलेल आहे. त्यांच्या दिग्दर्शनाची सामर्थ्यस्थळ नाटकात प्रकर्षाने जाणवतात. प्रकाशयोजनेचा उचित आणि परिणामकारक वापर केलेला आहे. विशेष म्हणजे संगीताचा वापरम्हणजे ढोलकी आणि टाळ याचा वापर फारच सूचक आणि परिणामकारक केलेला आहे. आनंद गायकवाड हे ढोलकीवादक आहेत. अतुल पेठे यांचं वैशिष्ट हे की तुकारामाचे अभंग गेय स्वरुपातटाळ-मृदुंगाच्या गजरात सादर करून नाटकाचं साधारणीकरण न करता म्हणजे संगीत नाटक करण्याचं कटाक्षाने टाळलं आहे. अर्थात मूळ संहितेत हे नसेल. पण अनेक दिग्दर्शक प्रेक्षकांशी तडजोड करताना मूळ संहितेत बदल करतात. अतुल पेठे यांचं दिग्दर्शन आणि किशोर कदम यांचा अभिनय यामुळे या नाटकाच्या सादरीकरणाला एक उंची आणि कलामूल्य लाभलं आहे. दि. बा. मोकाशी आणि विजय तेंडुलकर यांच्यासारख्या साहित्यक्षेत्रातील दिग्गजांचा वाटादेखील तितकाच महत्त्वाचा आहे. एकूण आनंदओवरीहा नाट्यानुभव हा दीर्घकाळ मनात रेंगाळणारा आहे. विषयात नावीन्य तर आहेचपण वेगळी अनुभूती जागवणारी कलाकृती आहे. या नाटकाच्या प्रयोगानंतर माझा सहकारी सुनील कदम याला मी प्रतिक्रिया विचारली. त्याने एका वाक्यात उत्तर दिल किशोर कदम हा उद्याचा श्रीराम लागू आहे.
सौजन्य : आपल महानगर, ३०डिसेंबर, २००२.
२. तुकोबांचे वेधक दर्शन
विश्वास मोरे
मराठीजनांच्या भावविश्वाचे अतूट, अविभाज्य अंग असलेले कविश्रेष्ठ तुकोबाराय साहित्य, कविता, चित्रपटांच्या माध्यमातून आजपर्यंत आपण अनुभवले आहेत. कविकुलगुरू तुकोबारायांच्या जीवनाचे अनेकविध पैलू आहेत. त्यापैकी एक वेगळा पदर आनंदओवरी या एकपात्री नाटकातून उलगडून दाखविण्याचा प्रयत्न रंगमंचावर होत आहे. प्रसिध्द साहित्यिक दि. बा. मोकाशी यांच्या आनंदओवरी कांदबरीवर आधारित प्रसिध्द दिग्दर्शक अतुल पेठे यांनी रंगावृत्ती केलेले हे एकपात्री नाटक नुकतेच रंगभूमीवर आले आहे. त्याचा हा रसास्वाद.
मराठमोळया भाविक भक्तांच्या हृदयात स्थान प्राप्त करणारे तुकोबाराय संसारातून परमार्थ साधत महाराष्ट्रातील भागवत धर्माच्या मंदिराचे कळस बनले. कविश्रेष्ठ तुकोबारायांचा जीवनपट साकारण्याचा प्रयत्न आनंदओवरी या नाटकातून केला गेला आहे. मराठीतील मान्यवर लेखकांमध्ये दि. बा. मोकाशी यांची आनंदओवरी ही कादंबरी सर्वपरिचित आहे. आनंदओवरी म्हणजे तुकोबांच्या श्री क्षेत्र देहू येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील ओवरी; या जागेवर बसून तुकोबारायांनी अभंग रचले. ही ओवरी तुकोबारायांच्या आयुष्याची साक्षीदार आहे. गेल्या चार शतकांच्या कालखंडात तुकोबारायांच्या अभंगांनी नागरांना-ग्रामस्थांना, बुध्दिमंतांना, भाविक परदेशस्थांनाही सारखेच प्रभावित केले आहे. दिशाहीनांबरोबर आंधळेपणाने वाहत जाण तुकोबारायांनी नाकारल. अशा आकाशएवढा तुकोबारायांचे अनेकविध पदर आहेत. ते आतापर्यंत विविध माध्यमांतून समाजासमोर आले आहेत.

किशोर कदम कान्होबांच्या भूमिकेत
आनंदओवरी या नाटकातून तुकोबारायांचे कनिष्ठ बंधू कान्होबा यांनी काही आठवणी सांगितल्या आहेत. तुकोबारायांचे कनिष्ठ बंधू कान्होबा यांनी काही आठवणी सांगितल्या आहेत. तुकोबारायांचे वैकुंठगमन होण्या अगोदर ते देहभान विसरायचे. असेच ते एकदा नेहमीप्रमाणे अचानक कुठेतरी हरवतात. ऐरवी इंद्रायणीकाठी नाही तर त्यांच्या आवडत्या भामनाथ- भंडारा डोंगरावर तरी ते सापडत. मात्र या वेळी शोधाशोध करूनही तुकोबा सापडत नाहीत. त्यामुळे कान्होबाच्या मनात असंख्य शंका येतात. अशी या नाटकाची सुरूवात भावाची काळजी वाहणारा कान्होबा तुकोबांच्या शोधार्थ निघतो. इंद्रायणीतीरी असणाऱ्या बालपणीच्या कातळावर व बैलगाडीच्या जोखडावर बसल्या नंतर कान्होबाच्या मनात तुकोबांविषयीच्या असंख्य आठवणी दाटून येतात. कान्होबा स्वतःशीच अंर्तमुख होऊन विठ्ठलाच्या मागे लागणं म्हणजे काय, तुका कुठं व कसा गेला असेल, तुक्यालाच अभंग कसे सुचतात, असे प्रश्न स्वतःला विचारू लागतो. क्षण दोन क्षण तुकोबांच्या आयुष्यात जाणं अवघड असून तुकोबाने स्विकारलेला मार्ग आपल्याला झेपणार नाही अशी स्वतःचीच समजूतही कान्होबा काढतात. तुकोबांचे अभंगही ते बडबडतात. बालपणीच्या कातळावर बसून तुकोबाराय कविश्रेष्ठ कसे, त्यांचे बालपण, संसारी जीवन कसे होते याविषयी सांगताना त्यांची विठ्ठलभक्ती, स्वभावाविषयी काही उदाहरणं देतात. तुकोबारायांतील संवेदनशील, परिवर्तनशील, बंडखोर कवीची कथाच सांगतात. तुकोबारायांच्या पारदर्शी जीवनाची कथा सांगताना स्वतःचा व कुटुंबाचा वेध घेतात. कान्होबाने केलेल्या शोधाचे प्रश्न श्रोत्यांच्या हृदयालाही स्पर्शतात. त्याद्वारे जगण्याला एक नवी दिशा देतात. नाटकातील कान्होबाची भूमिका किशोर कदम या उमद्या अभिनेत्याने केली आहे. भूमिकेविषयी बोलताना किशोर म्हणाला, आनंदओवरीतील कान्होबाची व्यक्तिरेखा साकार करणं थोडसं अवघडच होतं. मात्र ही भूमिका मी आव्हान म्हणून स्विकारली. इतर कामांतून या भूमिकेसाठी आवर्जून वेळ दिला. त्यामुळे मी या भूमिकेला न्याय देऊ शकलो. शिवाय सलग शंभर मिनीटे अभिनय करणं अवघडच होतं. आव्हानं स्विकारायला आवडत असल्याने मी ही भूमिका स्विकारली.
नाटकाचे दिग्दर्शक व रंगावृत्ती करणारे अतुल पेठे नाटकाविषयी बोलताना म्हणाले, आनंदओवरी तून संत तुकाराम महाराजांची कथा अगदी वेगळया पध्दतीने कथन केली आहे. ते कान्होबांचे आत्मनिवेदन आहे. मूळ कादंबरीतील भाषा अत्यंत तरल आणि उत्कट आहे. ती रंगमंचीत करणे हे अवघड आव्हान होते. या नाटकात आपल्याला निसर्ग भेटतो, उघडे माळ, इंद्रायणी नदीचे पात्र, भंडारा डोंगर, जंगल, जाळी, शेत, देऊळ भेटले. त्याचबरोबर पावसाळा व उन्हाळा असे ऋतूही भेटतात. या सगळया काळातून प्रतित होणारे अवकाश मला नाटक करताना दिसत होते. नेपथ्यातून, संगीतातून व प्रकाश योजनेच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. माझ्या आधिच्या नाटकांप्रमाणेच या नाटकातल माणसांच जगण आणि त्यांचे प्रश्न या नाटकातही मला उभे करता आले. त्यात मानवीय उत्कट संबंधाची गहरी छटा अनुभवयाला मिळाली. एका ऐतिहासिक व्यक्तिरेखेचं नातं आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांशी भिडवता आल ते महत्त्वाच. अशा वेळी हे नाटक तुकारामांबाबत बोलत असल तरी आपल्यालाच जगण्याविषयी बोलताना आढळतं.
आनंदओवरी मध्ये तुकोबांचा माणूस म्हणून शोध तर आहेच पण सर्जनशील भावाने घेतलेला भावाचा भावपूर्ण शोध आहे. आकाशाएवढा तुकोबारायाच्या जीवनाचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न या एकपात्री नाटकातून खुबीने केला गेला आहे. रंगमंचावर कान्होबा हे एकच पात्र संवाद साधत असल तरी त्याचा अनेक पात्रांशी संवाद होतो. किशोरची या नाटकातील गोळीबंद संवादफेक हृदयाला भिडते. विशेष म्हणजे सलग शंभर मिनीटे कान्होबा स्वतःशी आणि प्रेक्षकांशी संवाद साधत असल्याने आजच्या अन्य नाटकांच्या तुलनेत हे नाटक आपला ठसा निश्चितच उमटवत. जिवंत संगीतामुळे प्रयोगाला वेगळीच उंची प्राप्त होते.
मूळ संहितेच संकलन ज्येष्ठ नाटककार विजय तेंडूलकर यांनी केल असून अतुल पेठे यांनी रंगावृत्ती तयार केली आहे. दिग्दर्शन व संगीत संकल्पनाही त्यांचीच आहे. मकरंद साठे यांच नेपथ्य आणि अशोक गायकवाड यांच संगीत प्रभावी आहे . श्रीकांत एकबोटे यांनी प्रकाश योजनेचा चपखल वापर केला आहे. वेशभूषेने कान्होबा जिवंत करण्याचा प्रयत्न शाम भूतकर यांनी केला आहे. पुण्याच्या अभिजात रंगभूमी या संस्थेने या नाटकाचा उत्तम प्रयोग सादर केला आहे.
सौजन्य : लोकमत - चित्रगंधा १६,जानेवारी, २००३.
३. अंतर्मुख करणारी आनंदओवरी
वि. भा. देशपांडे
स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्यात ज्यांनी जाणतेपणाने सर्जनशील स्तरावरचे कथा कादंबरी लेखन केले आहे त्यामध्ये दि. बा. मोकाशी हे अग्रेसर नाव आहे. त्यांनी आनंदओवरी नामक लघू कादंबरी लिहिली. एखादी लघुकादंबरी किती आशयद्दन असू शकते याचा तो वस्तुपाठच आहे. या कादंबरीला नाटरूप किंवा रंगमंचीय रूप द्यावे असे काही वर्षे निरनिराळे लोक बोलत होते. तर काहींनी त्याची तयारीही केलेली होती. काहीना काही कारणांनी ते राहात गेले. पण आता अतुल पेठे या धाडशी प्रयोगशील वृत्तीच्या दिग्दर्शक निर्मात्याने ही ओवरी रंगमंचावर आणून एक उत्तम कामगिरी केलेली आहे.
आनंदओवरी या शीर्षकाला अनेक पदर आहेत. तुकाराम महाराज ज्या घरात (देहू गावात) राहात होते, त्या घरात जिथे तुकोबांनी बसून विठ्ठलभक्ती आळवली ती जागा, ती ओवरी ! पण हा वाच्यार्थ झाला. या नाटगत लेखनाचे आशयसूत्र आणखी खोलवरचे आहे. तुकाराम महाराजांचा धाकटा भाऊ कान्होबा हा आपल्या भावाचा शोध घेतोय. तुकाराम नेहमीप्रमाणे विठ्ठलशोधासाठी घर सोडून गेले आहेत. त्यांना शेतात, नदीवर, डोंगरावर आणखी कोठे कोठे शोधणे चालू आहे. त्या शोधातून तुकारामांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्तरांवरचे अनेक पदर उलगडत जातात. एरवी आपल्या परिचयाचे तुकाराम त्यात थोडे आहेत. त्यांच्या जीवनातील साधक, वंचित आणि पर्यायाने आपल्या मनात साकार होत जातात. कान्होबाने तुकोबाचा घेतलेला शोध हा लौकिकाने अलौकिकाचा घेतलेला वेध आहे. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसासारखा वाटणारा हा तुकाराम अध्यात्म्याच्या पायरीपर्यंत कसा गेला असेल त्याचे हे विदारक, अस्वस्थ करणारे चित्रण आहे. कान्होबाने एका अर्थाने स्वतःचाही शोध घेतला. नंतर आपणही त्यात सामील होतो आणि स्वतःला त्यात पाहायला लागतो, इतकी जबरदस्त ताकद मूळच्या लेखनात आहे.
.bmp)
मोकाशींचे मूळचे लेखन नाटकाच्या माध्यमासाठी नाही हे दर्शनी ध्यानात येते. पण त्याचवेळी हे नाटात्मक स्वरूपाचे एक दीर्घ स्वगत आहे, म्हणूनच ते आवाहक आणि आव्हानात्मक आहे ! ते नाटात्मक स्वरूप किंवा आशय-अंतरंग शोधून त्याला रंगमंचीय रूप द्यावे असा निर्धार अतुल पेठेने केला. त्याने रंगावृत्ती तयार केली, संगीत संकल्पन आणि दिग्दर्शन संकल्पना ही दुहेरी जबाबदारी स्वीकारली. अतिशय अवघड अशी ही जबाबदारी होती ती त्याने सार्थपणाने पार पाडली याबद्दल त्याचे मनःपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करायला हवे. एक वेगळा प्रयोग पेश करणे हे तर याचे कारण आहेच, पण तिच्यात चैतन्य निर्माण करण्याचे काम असे प्रयोग करीत असतात त्यासाठीचे श्रेय त्याला द्यायला हवे. श्रयनामावलीत संकलन विजय तेंडुलकर असे म्हटले आहे. ते नेमके काय आहे हे मूळ संहिता तपासून मगच सांगता येईल. प्रयोग पाहताना तरी नेमका तो परिणामांच्या संदर्भात करून दिली असावी !
अतुल पेठेने रंगमंच अवकाशाचा केलेला वापर आणि त्यासाठी मकरंद साठेने केलेली नेपथ्यरचना हा प्रयोगाच्या यशाचा आणखी एक मानबिंदू ठरेल इतक्या मोलाचा आहे. स्तरानिविष्ट नेपथ्य आणि त्यावर काळया-निळया गडदतेने निर्माण केलेले वातावरण, श्रीकांत एकबोटे यांनी केलेल्या प्रकाशयोजनाची साथ यामुळे नाटसंहितेतील विविध स्थळ -काळाची विश्वासार्हता निर्माण झाली. ती विश्वाहार्यताच प्रयोगाची गुणवत्ता वाढवीत होती. या साऱ्या प्रयोगतंत्राचा, साधनांचा वापर करताना दिग्दर्शक म्हणून अतुलने कान्होबाच्या रंगमंचीय हालचाली, त्यातून निर्माण होणाऱ्या विरचना किंवा आकृतीबंध तितकेच महत्त्वपूर्ण होते. दिग्दर्शक नाटसंहितेचा स्वरूप निर्णय कसा करतो आणि त्यातून एका प्रयोगाला मूर्त रूप कसे लाभले याचा अनुभव हा प्रयोग पाहताना येत होता. अतुलने या प्रयोग निर्मितीची प्रक्रिया एकदा सविस्तरपणाने लिहावी. ती पुढिलांना अथवा विद्यमान प्रेक्षकांनाही उपयोगी ठरणारी असेल. तूर्तास त्याने एक टिपण - विधान लेखन केलेले आहे. त्याचा सोदाहरण विस्तार करावा. कारण या संहितेत प्रयोग रीतींच्या आणखीही काही शक्यता संभवतात.
संहितेची निवड, संकलन, संपादन आणि स्वरूप निर्णय ही जितकी आव्हानाची गोष्ट आहे, तितकीच किंबहुना दशांगुळाने अधिक असणारी कान्होबा ही व्यक्तिरेखा रंगमंचावर साकारणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. ती महत्त्वाची कामगिरी किशोर कदम या गुणी कलावंताने चोखपणाने पार पाडली. त्याच्यावर दुहेरी जबाबदारी होती. एकतर तुकोबाचा लहानगा भाऊ कान्होबा उभा करणे. तो कोण, काय, कसा, याचा पत्ता सर्वसामान्य प्रेक्षकाला माहीत नसल्याने सारे पहिल्या पासून आकाराला आणणे. दुसरी जबाबदारी होती ती म्हणजे आपल्या सगळया बोलण्यातून, वावरण्यातून, अस्तित्वातून प्रत्यक्ष रंगमंचावर समोर नसलेला संतश्रेष्ठ तुकाराम उभा करणे. या संताची घडण कशी झाली. सामान्य व्यवहारी, कुटुंबप्रेमी, जनसामान्यात राहणारा माणूस वैकुंठाला कसा गेला, त्याचा हा लौकिक - अलौकिक प्रवास सांगणे. ह्या दोन्ही व्यक्तीरेखा (कान्होबा , तुकोबा) किशोरने समर्थपणाने उभ्या केल्या. अनुषंगिक काही पूरक व्यक्तीरेखाही होत्याच. हे सारे एका माणसाने सादर करून नाटानुभावाच्या स्तरावर नेण्याचे अवघड काम किशोर कदमने केले. त्याची भूमिका पाहताना प्रथम दर्शनीच जाणवत राहिले की, त्याने जो कान्होबा उभा केलाय तो हाच आहे अशी आश्वासकता अधिक अधोरेखित करीत जातो. त्याचबरोबरीने आपल्या देहबोलीने त्याचा प्रत्यय तो देत राहतो. तो स्वतः उत्तम कवी असल्याने आणि साहित्य जाणकार असल्याने त्याच्या अभिनयाची घनता वाढती राहते. जस जसे प्रयोग संख्येने अधिक होतील तसतशी कान्होबाच्या व्यक्तिरेखेची आणि पर्यायाने मूळ संहितेतील आणखी जाग त्याला सापडत जातील. सध्या रंगमंचावर मराठी शब्द - संवादांचे परिणामवारी उच्चारण झाले की मन सुखावते. असा आनंद देणारे विद्यमान रंगभूमीत जे मोजके गद्य कलाकार आहेत त्यामध्ये किशोर कदम हा एक आहे. त्याच्या नाट - चित्रपट वाटचालीतील कान्होबाची व्यक्तिरेखा किंवा ही आनंदओवरी ही एक महत्त्वाची रंगखूण ठरेल असा विश्वास वाटतो.
या प्रयोगाला अशोक गायकवाड यांनी दिलेले पार्श्वसंगीत प्रयोगात एकजीव झाल्याने अर्थपूर्ण वाटले. मोजक्या वाद्यांच्या साह्याने आणि साथीने अशी अर्थपूर्णता आणता येते हेही ध्यानात येत गेले. दि. बा. मोकाशी यांची एक अलक्षित, सार्थ संहिता प्रयोगारूपाने सर्वांना भावेल अशा ताकदीने पेश केल्याबद्दल किशोर कदम, अतुल पेठे यांच्या बरोबरीनेच धीरेज जोशी (निर्माता), प्रसाद वनारसे (सुत्रधार) आदींचे मनःपूर्वक अभिनंदन. हा प्रयोग मराठी बरोबरच हिन्दीत करून महाराष्ट्राबाहेर नेण्याचा विचार करावा. एक प्रयोग म्हणून तर याचे महत्त्व आहेच, पण अ-मराठी मंडळींना तुकाराम महाराज काही प्रमाणात कळायला मदत होईल. तसेच उपेक्षित दि. बा. मोकाशीही महाराष्ट्राबाहेर थोडे माहीत होतील. तसे घडो !
४. शोध तुकयाचा...
गोपाळ जोशी
माऊली आणि तुकोबाराय हे अवघ्या मराठी मनांचे प्राण आहेत. दि. बा. मोकाशी यांनी आनंदओवरी या कादंबरीत तुकोबारायांचा मनोवेधक शोध घेतला आहे. याच कादंबरीची रंगावृत्ती दिग्दर्शक अतुल पेठे यांनी रंगमंचावर आणली आहे. अभिजात रंगभूमीने तिचा अतिशय उत्तम प्रयोग सादर केला आहे. एकपात्री असेच या प्रयोगाचे स्वरूप आहे. दि. बा. मोकाशींनी मात्र तुकोबांमधला माणूस आणि त्याचा संतत्वाचा प्रवासयांचाच वेध घेतला आहे. तथापि हा शोध ही सरळ घेतलेला नाही. आनंदओवरी म्हणजे तुकोबांच्या विठ्ठल मंदिरातील ओवरी. याच जागेवर बसून त्यांनी अभंग रचले. ही ओवरी तुकोबांच्या जीवनातल्या अनेक घटनांची साक्षीदार आहे. तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबा नाटकात तुकोबांचा शोध घेत आहेत. नेहमी प्रमाणेच ते हरविल्याची कान्होबांची भावना होऊन ते तुकोबांना शोधत आहेत. मात्र शोधूनही तुकोबा न सापडल्याने कान्होबांना भावनावेग आवरत नाही.
कान्होबा जिथे जिथे जातात तिथे तुकोबांच्या आठवणी दाटून येतात. कान्होबा या शोधात तुकोबांची कहाणीच सांगत राहतात. मात्रती सांगतानाच तुकोबांच्या शोधाचे रूप पालटते. परिवर्तनशील संवेदनशील व कवी वृत्तीच्या भावाचा तीव्र कल्लोळ ते उलगडत राहतात. इथेच मोकाशींनी तुकोबांमधला माणूस उलगडून दाखविला आहे. तुकोबांच्या अभंगांचे मूळ काय तुकोबा की विठ्ठल,असा प्रश्न मोकाशी उपस्थित करतात.

किशोर कदम कान्होबांच्या भूमिकेत
कान्होबा फक्त तुकोबांचाच शोध घेत नाहीततर ते स्वतःचाआपल्या कुटुंबाचा व समाजाचाही वेध घेतात. इथे मोकाशी आपल्यासारख्या सर्वसामान्यांशी कान्होबांची नाळ जोडतात. त्यामुळे कान्होबा एकूणच जगण्याविषयी जे प्रश्न उपस्थित करतात ते फक्त त्यांचे न राहता आपलेही बनून जातात. त्याशिवाय कान्होबा सर्जनशील आहेत. त्यामुळे एका सर्जनशील माणसाची घालमेलही मोकाशी दर्शवून जातात.
ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांनी या प्रयोगाचे संकलन केले आहे, तर अतुल पेठे यांनी रंगावृत्ती तयार केली आहे. प्रयोगाचे दिग्दर्शन व संगीत संकल्पनाही त्यांचीच आहे. आनंदओवरीतले हे विविध पदर पेठेंनी रंगावृत्ती आणि प्रयोगात छानच फुलविले आहेत. नेपथ्य रंगमंच अवकाश व प्रकाश योजनेचा चपखल वापर प्रयोगात दिसून येतो. त्याचबरोबर लाईव्ह संगीतही प्रयोगाला वेगळीच रंगत प्राप्त करून देते. किशोर कदम या गुणी अभिनेत्याने कान्होबा अक्षरशः जिवंत केला आहे. त्यांची ही भूमिकाही दीर्घ काळ स्मरणात राहील अशीच आहे . देहबोली व आवाजाचा उत्तम वापर आणि गोळीबंद संवादफेक ही त्यांच्या अभिनयाची वैशिष्टे या प्रयोगात विशेषत्वाने जाणवत राहतात. श्रीकांत एकबोटे यांची प्रकाश योजना श्याम भूतकर यांची वेषभूषा अशोक गायकवाड यांचे संगीत व मकरंद साठे यांचे नेपथ्ययाही या प्रयोगाच्या जमेच्या बाजू आहेत..
५. तुकाराम नावाचा माणूस
संत तुकारामांचे अभंग, विठ्ठलभक्ती आणि मुळामधे संतप्रवृत्ती यामुळे मराठी माणसाच्या मनात खोलवर तुकारामांनी आपली जागा तयार केली आहे. तुकारामांच साहित्य केवळ विद्यापीठ चौकटीत न अडकता वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून खेडापाडातल्या जनतेपर्यंत पोचलेलं आहे. रुजलेलं आहे. तुकारामांची अशी प्रतिमा आपल्या मनात असतानाच आनंदओवरी हे नाटक पाहताना मात्र आपल्याला एक नवा तुकाराम, जो पूर्वी पाहिला नाही, जाणवला नाही असा थेट भिडतो. तुकारामांच्या सख्ख्या धाकटा भावाकडून कान्होबा कडून तुकाराम समजावून घेण ही कल्पनाच रोमांचकारी आहे. तुकारामांच बालपण, घरातले नातेसंबंध, आयुष्यातले चढउतार, त्या परिस्थितीत त्यांची झालेली मनोवस्था हे सगळ या नाटकात अत्यंत तरल पातळीवर आपल्यापुढे उलगडत जातं आणि एक वेगळा तुकाराम आपल्याला भेटतो. गोष्टींमधून किंवा अभंगातून पाहिलेल्या तुकारामा पेक्षा हा तुकाराम अधिक प्रेमळ, अधिक मनस्वी आणि खरं सांगायचं तर एक हाडामासाचा माणूस म्हणून आपल्यापुढे येतो.

किशोर कदम कान्होबांच्या भूमिकेत
आपल्या अभंगाच्या आणि विठ्ठल भक्तीच्या तंद्रीत घर सोडून कुठेतरी भरकटलेला तुका शोधण्यासाठी कान्होबा घराबाहेर पडतो आणि इथून नाटकाला सुरुवात होते. आनंदओवरी ही मूळ कांदबरी दि. बा. मोकाशी यांची तुकारामांच्या घराजवळ जे विठ्ठलाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या ओवरीला आनंदओवरी म्हणत असत. या जागेवर बसून तुकारामांनी अभंग रचले. ही ओवरी तुकारामांच्या आयुष्याची साक्षीदार आहे. म्हणून कादंबरीच आणि नाटकाच नाव आनंदओवरी नाटकासाठी या कादंबरीच संकलन विजय तेंडुलकरांनी केल आहे. नाटक एकपात्री असून, कान्होबाची भूमिका किशोर कदम या सशक्त अभिनेत्याने अतिशय ताकदीने केली आहे. नाटकामध्ये प्रकाश योजना, नेपथ्य, पार्श्वसंगीत या बाबींचा उपयोग चपखलपणे केलेला आहे. कादंबरीच नाटक करण्याची कल्पना या नाटकाचे दिग्दर्शक अतुल पेठे यांची. प्रयोग मंचस्थ करण्यासाठी त्यांनी घेतलेली अपार मेहनत नाटक पाहताना लक्षात येते. दिग्दर्शक म्हणून त्यांनी आणखी एक आशयसंपन्न नाटक प्रेक्षकांपुढे आणलं आहे.
आनंदओवरी :
मूळ कांदबरी : दि. बा. मोकाशी
संकलन : विजय तेंडुलकर
मुख्य भूमिका : किशोर कदम
सौजन्य : अनुभव, जानेवारी २००३.
जगण्यातल्या विविध वाटांचा शोध
प्रसाद कुवळेकर
तुकारामांनी ज्या जागेवर बसून अभंग रचलेत्या विठ्ठल मंदिरातील ओवरी. दि. बा. मोकाशींची याच नावाची अत्यंत गाजलेली कादंबरी. त्यांच्यावरचं नाटक. रंगावृत्ती दिग्दर्शन-अतुल पेठे आणि कलाकार - किशोर कदम-ही नांव प्रयोगापर्यंत खेचायला पुरेशी होती. प्रयोग पाहिल्यावर मनात अनेक प्रश्न उभे राहिले. त्यासाठी प्रयोगाचे कर्ता-करविते अतुल पेठे यांनाच गाठलं आणि या निर्मितीबद्दलच कुतूहल त्यांच्यापुढे उघड केल.
परंपरेशी असलेल्या नात्याचा धागा तोडताना तो आधी जोडावा लागतो. व्याकरणातले नियम बदलण्यासाठी ते आधी माहीत असावे लागतात. सॉक्रेटिस हा विचारांच्या पातळीवर किती शिल्लक राहतो आणि त्याची नाळ आजच्या युगातल्या प्रश्नांशी कशी जोडता येईलया विचारातून सूर्य पाहिलेला माणूस ची निर्मिती झाली. तसंच आनंदओवरी ही एका अर्थाने तुकारामाचा शोध घेणारी गोष्ट असली तरी कान्होबाच्या आत्मकथनातून ती जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा त्याच्या मुखातून सामान्य माणूसपणाचे प्रश्न निर्माण करून ती मोकळी होते. तुकारामाच्या संत होण्याच्या प्रक्रियेतील वेदना जी त्याच्या कुटुंबियांनी भोगलीती तर तुमच्या - आमच्या घरातीलच ! मग तुकाराम ही ऐतिहासिक व्यक्ती असेना का! त्यातला माणूस एकदा सापडला की काळाची बंधनं आपोआपच गळून पडतातहे जाणवलं. १९८८ साली मी दि. बा. मोकाशीची आनंदओवरी वाचली.
संतांच्या आयुष्याबद्दल मला पहिल्यापासून विलक्षण आकर्षण आहे. वारकरी संप्रदायातील एकेक संतचरित्र हे अत्यंत क्रांतिकारक आणि तत्कालीन समाजाला न पेलणारं असं आहे. त्या कोणीही बुवाबाजी करणाऱ्या ढोंगी व्यक्ती नव्हत्यातर मानवतावादसहिष्णुता आणि एकात्मतेची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणणाऱ्या सामान्य व्यक्तीच होत्या ! जगण्यातल्या विविध वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न करत सामान्य माणसाला जगणं शिकवणाऱ्या या व्यक्ती होत्या. भक्तीपरंपरेबरोबरच भाषिक परंपरेचा मोठाच साठा त्यांनी लोकांसमोर उघडा केला. विविध विषयांवरच्याविविध अनुभवांवरच्या ओव्या अभंग आणि त्यातलं विपुल शब्दभांडार ही त्यांची शक्ती होती.

किशोर कदम & अतुल पेठे
कांदामुळाभाजी अवघी विठाई माझी असं म्हणताना सावतामाळी work is workship हाच मंत्रोच्चार करतो. आपल्या दैनंदिन विश्वातल्या प्रत्येक वस्तूला परमेश्वर मानून त्यातं एक निर्गुण रूप त्यांनी तयार केलं. विठ्ठलाची मूर्ती ही तर माझ्या विशेष आवडीची ! कारण त्याच्या हातात कुठलंही आयुध नाही. हात कमरेवर ठेवून अगदी सामान्य माणसासारखं वाटणारं ते रूप आहे. हे सगळं मनात आधीपासूनच साठलं होतं. आनंओवरी वाचल्याबरोबर तुकाराम हा माझ्या मनातल्या किंवा माझ्यातल्या कलाकाराच्या मनातल्या तुकारामाच्या चौकटीत फिट्ट बसला आणि मग मी पुढच्या प्रवासाचं तिकीट काढलं. नाना पाटेकर डोळयांसमोर ठेवून अतुलने सुरुवातीला रंगावृत्ती तयार केली. पण काही कारणांमुळे ही निर्मिती प्रक्रिया मागे पडली. पाच-सहा वर्षांपूर्वी किशोर कदमच्या वाचनात ती कादंबरी आल्यावर त्याच्यातल्या कलाकाराने अतुलकडे मागणी केली की ही गोष्ट मी एकटा सांगणार ! अतुल पेठेंनी एकवार त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्यातल्या कलाकारावर अविश्वास दाखवत चक्क त्याला नकार दिला. किशोरला स्वस्थ बसवेना. तो पुन्हा त्याच मागणीसहित अतुलकडे आला आणि हट्ट धरून बसला. दीड महिन्यात पंचवीस पानं पाठ करून दाखव. पानं पाठ झाली तर पुढचं पाहूअसं अतुलनं बजावलं. दीड महिन्यानंतर किशोर आला आणि त्यानं पंचवीस पानं धडाधडा बोलून दाखवली.
मग सुरू झाला निर्मितीचा मुख्य प्रवास ! तब्बल सात महिने अविश्रांत मेहनत ! शेवटच्या दीड महिन्यात बाहेरचे प्रयोगशूटिंगकाव्यवाचन.... सगळं बंद. सकाळचा व्यायाम सक्तीचा. कारण अतुलच्या मतेकान्होबा हा काबाडकष्ट करणारा काटक गडी तो पोट वाढलेलासुखवस्तू दिसता कामा नये. शरीरानं कान्होबा तयार होत होता. दरम्यानच्या काळात इंद्रायणीचा काठभंडाऱ्याचा डोंगरदेहू इथली भटकंती ! कारण तुकोबाचं अवघं विश्व त्या निसर्गतत्त्वाशी एकरूप झालेलं ! आणि जोडीला तुकारामांची गाथानेमाडेचित्रेसदानंद मोरे यांनी लिहिलेलं तुकारामावरचं साहित्य होतंच. कारण तोही एक या निर्मिती प्रक्रियेचाच भाग होता.
खरं तर सुरुवातीला गणेश यादवसयाजी शिंदे आणि किशोर अशा तिघांना घेऊन मला हे करायचं होतंअतुल पेठे यांच्यातला दिग्दर्शक सांगत होता - मला हे कान्होबा तिघांतून हवा होता. त्यामुळे तीन वेगवेगळे आवाज मला मिळणार होते. तीन वेगळी परिमाणं मिळणार होती आणि पुन्हा त्या तिघांचा एकसंध कान्होबा हे मला खूप आव्हानात्मक वाटत होतं. मात्र किशोरच्या आत्मविश्वासावर आणि मेहनतीवर मी विश्वास टाकला आणि त्याने तो एकशेएक टक्के सार्थ ठरविला. नेपथ्यातले अंधार-प्रकाशाचे खेळही खूप विचारपूर्वक केले आणि पार्श्वसंगीतासाठी वापरलेली वाद्यं ही त्याच मातीतली होती. यातल्या घंटेचा नाद करण्यासाठी जी घंटा वापल्येय ती खास राजस्थानमधली आहे. उंटांच्या गळयात अशा घंटा बांधतात. ती अहमदाबादच्या एका मैत्रिणीने पाठवली. कारण देवळातल्या घंटेचं नादमाधुर्य मला नको होतं. या घंटेच्या नादात एक गूढता आहे. ती मला हवी होती.
इतक सगळ झाल्यानंतर अभिजात रंगभूमीपुणे या संस्थेनंविशेषतः प्रसाद वनासरेसारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या रंगकर्माने निर्मितीचा उत्साह दाखवला आणि अतुल पेठेकिशोर कदम आणि इतर तंत्रज्ञ यांच्या मेहनतीला फळ आलं. आनंओवरी चा प्रत्यक्ष रंगमंचीय आविष्कार बरंच काही देऊन जातो. संपूर्ण पार्श्वभूमीवरचा निसर्ग सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र-मध्यरात्र अशा वेगवेगळया प्रहरातील कान्होबाची आणि आजूबाजूच्या निसर्गाच अवस्थापावसाळयात निसर्गाच्या तांडवाबरोबरच बेभान होणारा कान्होबाबैलगाडीची सुसाट सफर....आणि या सगळयाबरोबर किशोर कदम यांचा परकायाप्रवेश यांत प्रेक्षक नकळत गुंतून जातो.
माणसामध्ये उपजत असलेल्या नातेसंबंधांची चर्चा करणारं किंवा नात्याच्या घट्ट विणीच हे नाटक आहे. आजच्या काळातल्या तुकडा-तुकडांत सापडणाऱ्या आयुष्याच्या किंवा जगण्याच्या संकल्पना तपासून पांहणारं हे नाटक आहे. म्हणूनच ते मला करावंस वाटलं. अतुल पेठे बोलत होते- कान्होबाला सापडणारा तुकाराम हा एक परिवर्तनशीलजीवनाच्या अनेक वाटा शोधणारा जगण्यातल्या अनेक रसरशीत अनुभवांचा आस्वाद घेणारा सामान्य माणूस आहे. मात्रया प्रवासात त्याच्या कुटुंबाची होणारी ससेहोलपट आणि कान्होबाला शेवटी गवसलेलं शहाणपण या सगळयाची नाळ ही २१ व्या शतकातल्या सामान्य माणसाच्या प्रश्नांशी जुळणारी आहे.
कुमार गंधर्वांनी एका अत्यंत खाजगी मैफिलीत केवळ स्वरांच्या साहाय्याने (कुठलाही सूर न वापरता) तुकारामाला शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे केवळ दोनच प्रयोग झाले. पण तो प्रयत्न विलक्षण प्रभाव टाकणारा होता. एका खऱ्या खुऱ्या कलावंताने रसिकाला दिलेली ती भेट होती. चर्चा संपता संपता अतुलने ही आठवण सांगितली. असाच प्रयत्न आनंदओवरी नाटनिर्मितीतून केला गेला आहे आणि एक तरी ओवी त्यांनी अनुभली आहे. आता पाळी रसिक प्रेक्षकांची आहे!
सौजन्य : लोकसत्तामुंबई, ८ डिसेंबर, २००२.