|| तुकाराम ||
तुकोबांचे हात लिहिताती जे जे । ते ते सहजे पांडुरंग ॥
बहेणि म्हणे लोक बोलती सकळ । तुकोबा केवळ पांडुरंग ॥
प्रस्तावना
महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष तुकाराम (१६०९-१६५०) यांचे काव्य मराठी मनाचा चिरंतन आविष्कार आहे आणि तो ज्ञानदेव-नामदेवांपासून उत्क्रांत होत आलेल्या मराठी काव्याचा उत्कर्ष आहे.
“शुध्द बीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ॥”
शुध्द बीजापासून उगम पावलेले, त्यांच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाला वारकरी परंपरेचे अधिष्ठान लाभले व हे काव्य मराठी संस्कृतीची गुण वैशिष्टये सारभूत होउन प्रगट झाले.
मराठी साहित्य समृध्द करणारे हे काव्य मानवी जाणिवांचा आणि मराठी संवेदन स्वभावाचा गाभा स्पर्श करणारा तरल अविष्कार आहे. पेशाने वाणी आणि पिंडाने शेतकरी असल्यामुळे अस्सल मराठी पोताची शब्दकळा, भाषेच्या सूक्ष्म पदरांसह तुकोबांच्या काव्यात उमटली आहे. त्यांचे अंत:स्फूर्त शब्द मराठी भाषेच्या रसरशीतपणा मुळे, तिच्यात गर्भित असलेल्या उर्जेमुळे अजरामर झाले. त्या द्वारे मराठी माणसाला कायमस्वरूपी काव्याचा एक निर्मळ, नितळ, निखळ खळाळत वाहणारा झरा लाभला.
“झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥”
“तुका म्हणे झरा । आहे मुळीचाचि खरा ॥”
साडेतीन शतके उलटली तरी आजही त्यांच्या कविता आपल्याला भिडतात, आवडतात, समकालीन वाटतात. याच महत्त्वाच कारण म्हणजे मानवी मनाचा तळ धुंडणारी आणि माणसाच्या जगण्यातील ताणतणाव सूक्ष्मपणे टिपणारी त्यांची असाधारण प्रतिभा. कवितेवर नितांत प्रेम करणाऱ्या या प्रतिभावंत कवीने स्वत:ला कवितेच्या ताजव्यात टाकून घेतले. आपले स्वायत्त आत्माविष्काराचे माध्यम आणि आपल्या आत्मभानाचे माध्यम कविता हेच राहिल हे जीवनध्येय ठरविले. सामूहिक मनाची अचूक संवेदना पकडणाऱ्या काव्याला नैतिक परिमाण असल्यामुळे त्यांची प्रतिभा अधिक वृद्धिंगत होते आणि हेच त्यांच्या प्रतिभेच बलस्थान आहे.
मानवी जीवनातील भावनिक कल्लोळ, मानसिक उलघाल व मूल्यांसाठी संघर्ष तुकोबांच्या काव्यात उमटले आहेत. मराठी भाषेचा कस असणाऱ्या या काव्यातिल मानवी भावभावनांच्या तरल व भेदक मांडणीत प्रादेशिक विशिष्टतेचे लेणे लेवूनही ते वैश्विक आशय मांडतात. चिरंतन मानवी मूल्यांचा शोध घेत हा कवी व्यक्तिगत अनुभवांनाच वैश्विक परिमाण देऊन जातो. त्यांच्या कवितेचा संदर्भ वर्तमान काळाशी, वर्तमान काळातील जगण्याशी आहे म्हणून ते आजचेच आहे. त्यामुळेच त्यांची कविता देश-काल परिस्थितीच्या सीमा ओलांडून सर्वांना आपली वाटते.
तुकोबांचे काव्य याचे आकर्षण महाराष्ट्रपुरते मर्यादित नाही.भाषा, प्रांत यांच्या मर्यादा पार करुन हे काव्य आज डॉट कॉमच्या युगात लोकांना मोलाचा ठेवा वाटत आहे. तुकाराम डॉट कॉम (www.tukaram.com) या संकेतस्थळाच्या लोकप्रियतेवरून याचीच प्रतीती येते. जगाच्या पाठीवर कुठल्याही नात्यामध्ये चपखल बसेल असे चिंतन मांडणारा या कवीची पांचही खंडात लोकप्रियता वाढत आहे. तब्बल एकशे चाळीस देशातील वाचकांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे. पुरातन चीन, इजीप्त पासून नवनिर्मित पॅलस्टीन, बेनिन मध्ये तुकोबांच्या साहित्यात रस घेणाऱ्या या वाचकांना आजच्या काळाच्या प्रतिनिधित्व करण्याची ताकद त्यांच्या काव्यात दिसून येते.
“ऐसी कळवळयाची जाती । करी लाभेविण प्रीती ॥”
अंतिम लाभाची आशा न धरता, सर्व मानवतेविषयी जिव्हाळा असणे ही वैश्विक संस्कृती त्यांना भावते.
अखिल मानवते विषयी जिव्हाळा असणार्या या कवीने मानवी संवेदनांचे सारच जणू काव्यातून व्यक्त केले आहे. समाजातील वास्तावर आधारित , समस्यांशी निगडित थेट मनाला आकळणारे आणि हृदयाला भिडणारे त्यांचे काव्य मराठी माणसाच्या स्मृतीत शतकानुशतके तळ ठोकून आहेत. एक अनुभवी सखा, धीर देणारा सांगाती, हात धरून वाट दाखवणारा मार्गदर्शक या स्वरूपात त्यांची सोबत होते. आपल्यासारख्याच उणिवांनी ग्रासलेला या कवीने काळांतराने आंतरिक सामर्थ्याच्या बळावर आणि असामान्य कवित्वाच्या आधारे आयुष्यातल्या प्रत्येक संकटावर मात केली याचा प्रत्यय येतो. आत्मिक संघर्षातून निर्माण झालेले या काव्याचे नाते थेट जीवनानुभवाशी आहे, म्हणून ते जिवंत आहे.
तुकोबांचे कवितेचे जीवनानुभवाशी हे नाते रघुनाथ वामन दिघेंनी (१८९६-१९८०) समर्थपणे आपल्या कादंबरीत आणले आहेत. ‘पड रे पाण्या’ मध्ये संतू म्हणतो ‘‘मानसाचा अनुभव मोठा भयंकर असतो तो मानसाला धोबीपछाड मारतो. अवो पुस्किल वेळा तुकारामबुवा बद्दलबी मला तेच वाटत. मास्तर हा देहूचा गाडीवान खोपोलीच्या घाटातन हाळीचा धंदा करायचा. कोकणात घाटावरन मिरची, कांदे न्यायचा आन कोकणातन घाटावर मीठ आणायचा. गाडी तळात वाटेन त्याला लाख लोक भेटले असतील, लाख गोस्टी त्यान पाहिल्या असतील. लाख अनुभव त्येला आले असतील. तवा त्येच्या मुखातून अभंगवाणी बाहिर पडली.’’
मुळात कवित्व करणे ही तुकारामांची सहज प्रवृत्ती आहे. “अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरे ना”. श्रेष्ठ भाषिक आविष्कार असलेल्या या काव्याचे लोकप्रियतेचे रहस्य बोलीभाषेच्या वापरात आहे. अलंकारितेचा आश्रय न घेता अगदी रोखठोकपणे तात्कालीन बोलीतल्या स्वाभाविक सहजसुंदर, भावपूर्ण शब्दांमध्ये अभिव्यक्ती असल्यामुळे आशयसुलभ आहे. तुकोबांचे अभंग जितके सोपे, सरळ तितके त्यात भावाची आर्द्रता अधिक दिसून येते. सामान्य माणसाच्या भाषिक विश्वात वावरणारे तुकाराम जीवनाचे अंतरंग आपल्या भाषेत सांगतात ज्यामुळे तुकोबा आपल्यातलेच एक आहेत हा आंतरिक दिलासा मिळतो. म्हणून तुकोबांची कविता महत्त्वाचीच नव्हे तर आपलीशी वाटते.
कवितेचा प्रवास हा आत्मशोधासाठी असतो आणि त्या अनुषंगाने जीवनशोधाचा असतो. हा शोध काळ, परिस्थितीशी संबधित तर असतोच पण त्या कवीच्या सर्जनशिलतेशी, संवेदनशीलतेशी असतो. जगत असताना माणूस प्रेमाच्या बंधनात बांधला जातो. हे बंध जितके घट्ट, एकबीज होतात, तितक्याच त्याच्या तुटताना होत असणाऱ्या यातना जीवघेण्या असतात. एकत्र कुटुंबिय पध्दतील समृध्द भावनिक संबंधाचे अनुभव घेणाऱ्या या कवी वर ऐन तारुण्यात दु:खाचे डोंगर कोसळले.
“संवसारे जालो अतिदुःखे दुखी । मायबाप सेखी कर्मलिया ॥”
“दुष्काळे आटिले द्रव्ये नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली ॥”
इथून तुकोबांची आत्मशोधाची आणि जीवनशोधाची सुरुवात झाली. दुष्काळाने होरपळलेल्यांचे खतपत्र जेव्हा त्यांनी इंद्रायणीच्या डोहात बुडविले, तेव्हा त्या देणेकऱ्यांचे दु:ख त्यांनी बुडविले. मनात खोलवर रुजलेली सतत सळसळणाऱ्या माणुसकीचे, सामाजिक बांधिलकीची ही संवेदनशीलता तुकोबांच्या “जे का रंजले गांजले” मध्ये दृगोच्चर होते आणि त्यांची मानवतेवरील निष्ठा आपल्याला स्पर्श करते.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” या अप्रतिम अभंगात तुकोबांनी निसर्गातील पशुपक्षी, लतावेली यांचे नितांत सौंदर्य आपल्या सर्जनशिलतेने टिपले आहेत. हा अभंग तुकोबांची अनुकंपा, सर्व सजीव सृष्टी बरोबरचे त्यांची तद्रूपता याचे मनोहर आकलन दर्शवतो.
कला आणि समकालीन संस्कृतीचा एक प्रतिकात्मक संबंध असतो. तुकोबांची गाथा एका कवीमनाने कवितेच्या माध्यमातून रचलेल्या व्यापक समग्र सांस्कृतिक जीवनाचे रेखाचित्र आहे. त्यात तात्कालीन समाजाचे आकांक्षाचे प्रतिबिंब आहे. मावळ भागातील जनजीवन, भोवतालचा निसर्ग, रुढी, चालीरीती , ग्रामीण भावविश्व आणि समाजजीवनाचे मनोज्ञ तपशील त्यांनी टिपले आहेत. मानवी व्यवहारातील अंतर्विरोध, सामाजिक ढोंग, धंदेवाईक बाह्य धर्माचार, जातीभेदभावातून होणारे शोषण यांचे पडसाद काव्यात उमटले आहेत. त्यांच्या भोवतालच्या वास्तवातून, त्यातल्या जगण्यातून आणि स्वत:च्या चिंतनातून त्यांना पडलेले प्रश्न आणि त्यांनी शोधलेली उत्तरे स्वत:च्या सद्सद्विवेक बुध्दीच्या आधारे मांडले आहेत.
एका मूल्याधिष्ठित जीवन जगणाऱ्या कवीचे हे वास्तवदर्शी आत्मकथन आहे. त्यात आंतरिक विकासक्रमाचा आलेख आहे. आत्मिक आणि सामाजिक संघर्षाचे प्रत्यक्षपणे आलेल्या अनुभवांना वास्तवतेचा स्पर्श असल्यामुळे आयुष्याचे विविध कंगोरे अतिशय सहजपणे यात उतरले आहेत. संवेदनशीलता हा या अनुभवाधिष्ठित, चिंतनात्मक आत्मकथनचा गाभा आहे. आत्मीयतेने मांडलेल्या या कथनात वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक , धार्मिक अशा अनेक स्तरांवरील घटनाक्रम वेधक शैलीत रेखाटले आहेत. जीवनानुभवावर मर्मभेदी भाष्य असणाऱ्या या आत्मकथनातील विचार व व्यवहारातील नैतिक मूल्यांच्या सातत्यामुळे त्याचे प्रभावीपण आजही टिकून आहे.
तुकोबांच्या कवित्वावर पुरुषोत्तम यशवंत देशपांडे (१८९९-१९८६) यांनी अतिशय मौलिक आणि मनोज्ञ विवेचन केलेले आहे. “तुकारामांची कविता एका अवरुध्द भावजीवनाची वास्तवपूर्ण अभिव्यक्ती आहे. संत या नात्याने तुकाराम कदाचित विसरला जाईल. पण कवी या नात्याने तुकारामांचे महाराष्ट्राला विस्मरण पडणे दुरापास्त आहे. कारण तुकारामांच्या काव्यातील वास्तवतेचा स्पर्श इतका प्रभावी आहे की, त्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक कल्पनांची गडद् नी गूढ आवरणे क्ष किरणांप्रमाणे आरपार छेदून त्यातील विशुध्द मानवता आजही आपल्या नजरे समोर मनोरम स्वरूपात तरंगू लागते.”
दिलीप चित्रे यांनी तुकोबांचे अनुवाद केलेले खालील ९ अभंगचा समावेश विश्व साहित्य कोश मध्ये केला आहे .
१
नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥१॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥धृ॥
माप टाकी सळ धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥२॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥धृ॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटीं लावी तुका ॥३॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥धृ॥
२
द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥
आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदासीन न धरावें ॥धृ॥
सेवटील स्थळ निंच माझी वृत्ति । आधारें विश्रांती पावईन ॥२॥
आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदासीन न धरावें ॥धृ॥
नामदेवापायीं तुक्या स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे ॥३॥
आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदासीन न धरावें ॥धृ॥
३
करूं कवि काय आतां नाही लाज । मज भक्तराज हांसतील ॥१॥
आतां आला एका निवाडयाचा दिस । सत्याविण रस विरसला ॥धृ॥
अनुभवाविण कोण करी पाप । रिते चि संकल्प लाजलावे ॥२॥
आतां आला एका निवाडयाचा दिस । सत्याविण रस विरसला ॥धृ॥
तुका म्हणे आतां न धरवे धीर । नव्हे जीव स्थिर माझा मज ॥३॥
आतां आला एका निवाडयाचा दिस । सत्याविण रस विरसला ॥धृ॥
४
पावावे संतोष । तुम्हीं यासाटीं सायास ॥१॥
करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥धृ॥
द्यावें अभयदान । भुमीन पाडावें वचन ॥२॥
करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥धृ॥
तुका म्हणे परस्परें । कांहीं वाढवीं उत्तरें ॥३॥
करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥धृ॥
५
कांहीं च न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसां ॥१॥
अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ति जाली पुढें ॥धृ॥
बोलिलें वचन हारपलें नभीं । उतरलों तों उभीं आहों तैसीं ॥२॥
अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ति जाली पुढें ॥धृ॥
तुका म्हणे कांहीं न करावेंसें जालें । थकित चि ठेलें वित्त उगें ॥३॥
अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ति जाली पुढें ॥धृ॥
६
करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥१॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥२॥
काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥३॥
निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥४॥
तुका म्हणे आहें पाईक चि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥५॥
७
नाहीं सरो येत जोडिल्या वचनीं । कवित्वाची वाणी कुशळता ॥१॥
सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतों ॥धृ॥
काय आगीपाशीं शृंगारिलें चाले । पोटींचें उकले कसापाशीं ॥२॥
सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतों ॥धृ॥
तुका म्हणे येथे करावा उकल । लागे चि ना बोल वाढवूनि ॥३॥
सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतों ॥धृ॥
८
बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ॥१॥
विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसऱ्याचें काज ॥धृ॥
बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥२॥
विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसऱ्याचें काज ॥धृ॥
पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥३॥
विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसऱ्याचें काज ॥धृ॥
माता मेली मज देखतां । तुका म्हणे हरली चिंता ॥४॥
विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसऱ्याचें काज ॥धृ॥
९
याति शूद्र वैश केला वेवसाव । आदि तो हा देव कुळपूज्य ॥१॥
नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुम्हीं संतीं ॥२॥
संवसारें जालों अतिदुःखें दुखी । मायबाप सेखीं कर्मलिया ॥३॥
दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली॥४॥
लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देख तुटी येतां ॥५॥
देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥६॥
आरंभीं कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥७॥
कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें करोनियां ॥८॥
गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुध्द करोनियां ॥९॥
संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥१0॥
टाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि ॥११॥
वचन मानिलें नाहीं सहुर्दाचें । समूळ प्रपंचें वीट आला ॥१२॥
सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१३॥
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥१४॥
यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥१५॥
निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥१६॥
बुडविल्या वहया बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ॥१७॥
विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥१८॥
आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१९॥
भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥२०॥
तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले पांडुरंगें ॥२१॥
तुकोबांची गाथा ही वाङ्मयीन महाकृती आहे आणि म्हणून मानवाच्या वैश्विक वाङ्मयीन वारशाचा एक भाग आहे. मराठी संस्कृतीत, मराठी भाषेत, एका विशिष्ट कालखंडात तुकोबांची गाथा निर्माण झाली असली तरी तिचा संदर्भ वैश्विक आणि मानवी आहे. कारण तुकोबा स्वत:चे अनुभव वैश्विक परिप्रेक्ष्यात किंवा सार्वभौम मानवी पातळीवरच मांडतात.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे ( पुन्हा तुकाराम )
तुकोबा आणि छ्त्रपती शिवाजी
बाबाजी गणेश परांजपे

तुकोबारायांची शब्दसृष्टि पढिक विद्वानाची नव्हती. त्यांनीं विश्वासानें, आदरानें-जीं कांहीं संतांची वचनें पाठ केलीं होतीं, तेवढींच त्यांचीं शब्दसृष्टि ! ती संतांचीं वचनें कानांत विसावून मनांत परिपाक होऊन त्यांच्या अंतरांत जेव्हां सुखाचा झरा लागला, आनंदाला पूर आला तेव्हां प्रेमामृतानें ओलावलेल्या, हरिगुणगानानें गोडावलेल्या, विठ्ठल गजरानें पिकलेल्या वाचेच्याद्वारां तो प्रेमाचा पूर-तो सुखाचा झरा-वाट काढूं लागला; तेव्हां त्या निःशब्दाचे शब्दांनीं आळें करून परब्रह्म कवळावें अशी स्थिति झाली. प्रत्येक शब्द हा अरवस्थेच्या प्रतीतीनें स्थानापन्न असल्यामुळें तो ज्या कळकळीनें उच्चारला जाई तेवढया च आर्ततेनें त्या समोरच्या श्रोत्यांच्या आर्त मनोभूमींत रुजे. त्यामुळें तुकोबांचें कीर्तन वा भजन परिणामकारक होई. अगदी बालपणांत च शिव छत्रपती त्यांच्या वक्तृत्वाच्या प्रभावांत सांपडले. त्यांनीं इतर उपदेशकांनीं सांगितल्याप्रमाणें सर्वसंग परित्याग करून भजन पूजन कीर्तनांत आयुष्य वेचावें असें मनांत आणलें व तसा क्रम सुरू केला. तुकोबांस ही गोष्ट कळली तेव्हां तुम्ही स्वराज्यस्थापनेच्या कामावर रहा आम्ही भजन कीर्तन द्वारां लोकांची अवनत स्थिती सुधारण्याच्या, त्यांच्या अंतरांत रवीचा प्रकाश पाडण्याच्या, त्यांच्या हातून पाप कृत्य होणार नाहीं, अशा त-हेनें त्यांच्या विचारांच दिशा बदलविण्याच्या कामावर राहूं असें आपण एकमेक एकमेकांस सहाय्य करूं व सर्व जण सुपंथ धरतील असें वागूं; असें म्हणून तुमच्या कार्याच्या पाठीशीं मी आहें याची खूण म्हणून तुमच्या सहका-यांना प्रसाद म्हणून अभंग देतों, असे हे पाइकीचे अभंग आहेत. आज जरी स्वराज्य आहे तरी सध्याचे सरकार त्या अभंगांचें निरूपण पटवून घेऊन पचवितील अशी मला खात्री देववत नाहीं. असो, तात्पर्य काय, कीं अभंगवाणी ही फार प्रतापवंत व प्रभावी होती. याची साक्ष रामेश्वर भटाची फिर्याद, व "गुरुत्व गेले नीच याती" अशी रामदासांची पोटदुखी, मंबाजीबोवांचा तडफडाट, व चिंतामणी देवांची परीक्षा अशा गोष्टी देत आहेत. अशीं आणखी हि कांहीं उदाहरणें झालीं असतील. पण अशा अडथळयांस न जुमानतां देवा हातीं रूप धरवूं आकार नेदु निराकार होऊं त्यासी । या बाण्यानें तुकाराम महाराज वागत होते.
शिवछत्रपतींच्या सैनिकांस पाईकीचे अभंग महाराजांनीं दिलें व शिवरायास निष्ठावंत माणसें लाभलीं म्हणून स्वराज्य स्थापतां आलें. त्या निष्ठावंत माणसांनीं स्वराज्य अवनत अवस्थेंत संभाळलें.
पाईक - अभंग ११
१
पाईकपणें जोतिला सिध्दांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥१॥
पाइकावांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दुःख न सरे पीडा ॥२॥
तरि व्हावें पाईक जिवाचा उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥३॥
पाइकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनीं ज्यावें वांयांविण ॥४॥
तुका म्हणे एका क्षणांचा करार । पाईक अपार सुख भोगी ॥५॥
२
पाइकीचें सुख पाइकासी ठावें । म्हणोनियां जीवें केली साटीं ॥१॥
येतां गोळया बाण साहिले भडमार । वर्षातां अपार वृष्टि वरी ॥२॥
स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडन शोभा दावी ॥३॥
पाइकांनीं सुख भोगिलें अपार । शुध्द आणि धीर अंतर्बाहीं ॥४॥
तुका म्हणे या सिध्दांताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥५॥
३
पाईक जो जाणे पाइकींनीं भाव । लाग पगें ठाव चोरवाट ॥१॥
आपणां राखोनि ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हरूनियां ॥२॥
येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाईक त्या जग स्वामी मानी ॥३॥
ऐसें जन केलें पाइकें पाईक । जया कोणी भीक न घलिती ॥४॥
तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक । बळिया तो नाइक त्रैलोकींचा ॥५॥
४
पाइकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥१॥
पारखिये ठायीं घेउनियां खाणें । आपलें तें जन राखियेलें ॥२॥
आधारेंविण जें बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥३॥
सांडितां मारग मारिती पाईक । आणिकांसी शीक लागावया ॥४॥
तुका म्हणे विश्वा घेऊनि विश्वास । पाईक तयास सुख देती ॥५॥
५
पाईक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥१॥
तो एक पाईक पाइकां नाईक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥२॥
तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥३॥
विश्वासावांचूनि पाइकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥४॥
तुका म्हणे नये स्वामी उणेपण । पाइका जतन करी त्यासी ॥५॥
६
धनी ज्या पाइका मानितो आपण । तया भितें जन सकळीक ॥१॥
जिवाचे उदार शोभती पाईक । मिरवती नाईक मुगुटमणि ॥२॥
आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥३॥
कमाइचीं हीणें पडिलीं उदंडें । नाहीं तयां खंड येती जाती ॥४॥
तुका म्हणे तरि पाइकी च भली । थोडीबहुत केली स्वामिसेवा ॥५॥
७
पाइकपणें खरा मुशारा । पाईक तो खरा पाइकीनें ॥१॥
पाईक जाणें मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥२॥
एके दोहीं घरीं घेतलें खाणें । पाईक तो पणें निवडला ॥३॥
करूनि कारण स्वामी यश द्यावें । पाइका त्या नांव खरेपण ॥४॥
तुका म्हणे ठाव पाइकां निराळा । नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥५॥
८
उंच निंच कैसी पाइकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले ॥१॥
स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबध्द
॥२॥
प्रसंगावांचूनि आणिती आयुर्भाव । पाईक तो नांव मिरवी वांयां ॥३॥
गणतीचे एक उंच निंच फार । तयांमध्यें शूर विरळा थोडे ॥४॥
तुका म्हणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाईक पाहोन मोल करी ॥५॥
९
एका च स्वामीचे पाईक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥१॥
स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळीं जवळी दुरी ॥२॥
हीन कमाईचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥३॥
पाइकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढया ठाव ॥४॥
तुका म्हणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥५॥
१0
प्रजी तो पाईक ओळीचा नाईक । पोटासाटीं एकें जैशीं तैशीं ॥१॥
आगळें पाऊल आणिकांसी तरी । पळती माघारीं तोडिजेती ॥२॥
पाठीवरी घाय म्हणती फटमर । धडा अंग शूर मान पावे ॥३॥
घेईल दरवडा देहा तो पाईक । मारी सकळीक सर्व हरी ॥४॥
तुका म्हणे नव्हे बोलाचें कारण । कमाईचा पण सिध्दी पावे ॥५॥
११
जातीचा पाईक ओळखे पाइका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥१॥
धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥२॥
जीताचें तें असे खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥३॥
धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥२॥
तुका म्हणे नमूं देव म्हूण जना । जालियांच्या खुणा जाणतसों ॥४॥
धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥२॥
तुकोबा - शिवराय भेट
भाऊ राहिरकर

महाराष्ट्राच्या या दोन परमोच्च विभूतींची भेट हा एक सूर्यचंद्र, गंगायमुना, मेरुमंदार, यांच्या मीलनाचा, श्रेष्ठ तत्त्वांचा संगम होता. आमच्या दृष्टीने यातल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक शिवाजी व तुकोबा यांच्या भेटीचा काल साधारणत: शके १५६५ ते १५७०-७१ एवढाच असू शकेल. रामदास, शिवाजी व तुकोबा यांच्या संबंधाबद्दल सर्वसामान्य वाचक जेव्हा विचार करू लागतो तेव्हा हे तिघेही एकमेकांच्या संपूर्ण हयातीत जिवंतच होते असे गृहीत धरलेले असते. तीत एक स्पष्ट कल्पना ध्यानी घेणे अवश्य आहे. ती म्हणजे शिवरायाचा जन्म सन १६३० चा निश्चित असेल तर तुकोबांचे निर्याणप्रसंगी ते फक्त एकोणीस वर्षाचे होते. तेव्हा तुकोबांची व शिवरायाची भेट, वह्या तरल्यानंतर जी तुकोबांची प्रसिध्दी झाली त्या सुमारास व शिवराय स्वराज्याकरिता चळवळ करू लागले त्या त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षानंतर झाली आहे. शिवराय हे स्वराज्यासाठी जशी मावळयांची प्रत्यक्ष मदत घेत होते, त्याचप्रमाणे ते हिंदवी राज्यासाठी साधुसंतांचा आशीर्वाद मिळवीत होते. त्यांनी या कामी मुसलमान साधूकडूनही जर शुभकामना अपेक्षिल्या व त्यांच्या परामर्ष घेतला तर हिंदुधर्मातले त्याकाळचे निरपेक्ष सर्वश्रेष्ठ साधुवर्य यांनाच तेवढे न भेटता, वगळले असेल हे शक्यच नाही. शिवराय व तुकोबा यांच्या भेटीबद्दलची तुकोबारायांची प्रत्यक्ष अक्षरे आता पाहा. ते गातात-
दिवटया छत्री घोडे। हे तो बऱ्यात न पडे॥
आता येथे पंढरिराया। मज गोविसी कासया
मुंगी आणि राव। आम्हा सारखाची देव
गेला मोह आणि आशा। कळिकाळाचा हा फासा
सोने आणि माती। आम्हा समान हे चित्ती
तुका म्हणे आले। घरा वैकुंठ हे सावळे॥
या प्रसंगातील दोन्ही पुरुषांचे वर्तन त्यांचे जीवनाचे पैलू अधिक उजळविणारे आहेत असे दिसेल. आर्यधर्मातील राजा हा सत्तेने उन्मत्त नसतो तर तो संतश्रेष्ठांचे आशीर्वाद घेणारा व आपले शिर त्या चरणावर ठेवणारा असतो. म्हणून सारे राज्य आणि जीवनही त्यांना समर्पण करण्याची इच्छा झाल्याने बहुमोल रत्नांचा नजराणा शिवरायाने पाठविला, हे उल्लेखनीय आहे. तुकोबाही हे साधुश्रेष्ठ एवढे की, असा बहुगुणी राजा आपणाला शिष्य म्हणून लाभतो म्हणून ते हुरळले नाहीत. ‘इंद्रपदादिक भोग। भोग नव्हती ते भवरोग॥’ अशा सत्य जीवनधारणेमुळे आलेला नजराणा त्यांनी परत करून ‘राजा! प्रभूला स्मरून जनकल्याण करणे हेच आम्हाला आवडते, ते तू आम्हाला पुरवावे’ असा उलट निरोप पाठविला. या अभंगावरून संत तुकोबाराय राजाच्या समृध्द स्वराज्यसिध्दीसाठी चिंत्ता करीत होते हे निश्चित.
मात्र, हा नजराणा पाहून देवाला त्यांनी ऐकवले ते महत्त्वाचे आहे. धनराज्य, ऐश्वर्यसत्ता, लौकिक यांचा पाऊस पडला तरी न डगमगण्याचे धैर्य जिथे ते हृदय प्रभूला त्या निमित्ताने सांगते-
आता पंढरिराया। येथे मज गोविसी कासया॥
आम्ही तेणे सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी॥
तुमचे येर ते धन। ते मज मृत्तिकेसमान॥
तुकोबांचे शिवरायभेटीबद्दलचे आणखीही अभंग आहेत. पण दिलेले उतारे सूचक व परिपूर्ण आहेत.
दिवटया छत्रीचा उल्लेख, शिवरायांनी त्या पाठविल्या नसत्या तर एवढया तपशिलाने वर्णन होण्याची आवश्यकता काय? मुंगी आणि राव, सोने आणि मृत्तिका समान असून आम्हाला तुम्ही प्रभुचिंतन करण्याचे खरे सुख आहे ही भूमिका त्या भेटीखेरीज इतरत्र चपखल बसूच शकत नाही.
यावरून जे घडले ते साहजिक दिसते. तुकोबांची दिगंतकीर्ती ऐकून-वाऱ्याहाती गेलेल्या मापाने-भक्तिभाव व सत्पुरुषाबद्दल आदर असणारा हा धर्मवृत्तीचा बालराजा त्यांना नजराणा पाठविणे सहज शक्य आहे. याप्रमाणे तो धर्मरत बालराजा न पाठविता तर त्याच्या स्वभावप्रवृत्तिविरुध्द आक्षेप आला असता. फकीरांच्या कबरींना जो दान देतो तो सजीव, साक्षात्कारी आणि कीर्तनसिंधू वाहणाऱ्या व पुण्यापासून 16 मैलांवरील साधूला न भेटता विसरला असेल हे शक्यच नाही.
अर्थात शिवरायाची व तुकोबांची भेट होण्यावर दोघांचाही मोठेपणा अवलंबून नाही. दोघेही आपापल्या क्षेत्रात स्वयंभू, स्वप्रकाशी आहेत. मात्र स्वराज्य उदयकाली स्वराज्याची स्वप्ने साकार व्हावी म्हणून गगनपाताळ उचंबळविणारा हा दूरदृष्टी धर्मनिष्ठ राजा, सर्व आचारधर्माला लाजविणाऱ्या भक्तिमान व अखंड गर्जणाऱ्या कीर्तनश्रेष्ठाला ओळखू शकला नसेल, व महाराष्ट्राच्या भाग्यनौबती गर्जविणाऱ्या या बालाकरिता, देवाला तो संतश्रेष्ठ सादावीत नसेल हे शक्यच नाही. अधर्म व अंदाधुंदी वाढल्याने ‘पांडुरंगा तुम्ही निजलेत काय’ असा खडसावून सवाल विचारणारे, पांडुरंगच शिवरायाच्या रूपाने धर्माची पहाट घडवीत असल्याचे पाहून डोळे झाकून बसले असतील काय? तुकोबांची वचने सांगतात की, ते तसे गप्प बसले नव्हते. जो अल्पकाल या दोघात समान होता, त्या चारपाच वर्षांच्या अवधीत तुकोबांनी पाईक कसे असावेत, रणात कोण नीतीने वर्तावे याचे धडे घातले तेही जाणत्यांचे डोळे उघडण्यास पुरे आहेत. अर्थात निजलेल्यांना जागे करणे शक्य आहे. जागे असून झोपेचे सोंग घेणारांना नाही. त्या मोकळया आत्मप्रत्ययी जीवापुढे तुकोबांच्या पाईकावरील अभंगातील काही मार्मिक वचने ठेवीत आहे. ती वाचा, मनन करा. (येथे पाईक म्हणजे शिपाई हा अर्थ प्रथम ध्यानी घेणे अवश्य आहे.)
पाईकी वाचून नव्हे कधी सुख। प्रजामध्ये दु:ख न सरे पीडा॥
तरि व्हावे पाईक जीवाचे उदार। सकळ त्यांचा भार स्वामी वाहे॥
पाईकीचे सुख जया नाही ठावे। धि त्यांनी जियावे वायावीण॥
तुका म्हणे एका क्षणाचा करार। पाईक अपार सुख भोगी॥
शिपाई कर्तव्यतत्पर असले तरच प्रजेला सुख शक्य आहे. तो पाईक राजासाठी जिवावर उदार असावा लागतो. मग त्याचा धनी त्याचे सर्व काही बरे करतो. हे धन्याकरिता जीवन अर्पण करण्याचे सुख ज्यांना नाही ते फुका कशाला जगावे? म्हणजे तुकोबांना असे शिपाई देशरक्षक नाहीत ते सारे भूमीभार आहेत असे वाटतात. हा शिपाईपणा एका क्षणात जिवाचा करार करून भेटू शकतो. त्या एका क्षणाच्या निश्चयाने जे ध्येय अंगी जडते, त्यात अपार सुख असते.
पाईकीचे सुख पाईकासी ठावे। म्हणोनिया जीवे केली साटी॥
येता गोळया बाण साहिले भडिमार। वर्षता अपार वृष्टी वरी॥
स्वामीपुढे व्हावे पडता भांडण। मग त्या मंडण शोभा दावी॥
पाईकांनी सुख भोगिले अपार। शूर आणि धीर अंतर्बाही॥
पाईक तो जाण पाइकाचा भाव। लगबग ठाव चोरवाट॥
आपण राखोनी ठकावे आणिक। घ्यावे सकळीक हिरोनिया॥
तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक। बळिया तो नाईक त्रैलोकीचा॥
पाईक असेल त्याला ते खरे ध्येयसुख माहीत, म्हणूनच जीवाभावापासून त्या जीवनाची साठवण (जोडी) केली. ते अंतर्बाह्य शूर आणि धीर असल्याने स्वामीपुढे होऊन गोळया आणि बाणांच्या वर्षावाला छाती पुढे करतात. असे शिपाई ज्याच्याजवळ तो कुठल्यातरी एखाद्या राज्याचा नव्हे तर त्रैलोक्याचाही धनी-बळिया म्हणून शोभेल. म्हणजे असे शिपाई शिवरायाचे होते, असावे ही आकांक्षा, धर्मजीवनाने आधार पुरविणाऱ्या या साधुश्रेष्ठाची होती.
पाईकावरील अभंग ज्ञानराजादि इतर संतांचेही आहेत. पण त्यात शूरधीरत्वाचे व एकनिष्ठतेचे वर्णन प्रमुख आहे. तुकोबाराय "आपणा राखूनि ठकावे आणिक" म्हणतात, चोराच्या वाटा माहीत असाव्या असे दाखवितात ते वैशिष्टय इतर पाईक अभंगात नाही. आणि याचे कारण उघड आहे. त्याकाळच्या परिस्थितीला तुकोबा जागे होते, त्या कालच्या राजाला अभिष्ट चिंतून देता येईल ते साह्य देण्याचे उत्कट प्रयत्न त्यात दिसून येतात.
‘रणी निघता शूर न पाहे माघारे’
‘एका बीजा केला नास। मग भोगिले कणीस।’
‘तुका म्हणे आधी करावा विचार। शूरपणे तीर मोकलावा॥’
‘मनाचा उदार रायाचा झुंजार। फिरंगीचा मार करीतसे॥’
‘शूरत्वावाचूनी शूरामाजी ठाव। नाही आविर्भाव आणिलीया॥’
अशी अनेक वचने तुकोबांच्या अंगीचे शौर्यचैतन्य राष्ट्रात फुलवीत होते, शिवप्रभूला साह्य देत होते. ईश्वरीलिखित एवढेच की, ही दोन श्रेष्ठांची संगती तुकोबांचा निर्याणकाळ येऊन चारपाच वर्षात संपली. ती अधिक काळ राहती तर?
पाईकीचे अभंग परमार्थवीर आणि राज्यचालक या दोघांनाही लागू पडणारे आहेत. पण ती अक्षरे ज्या परिस्थितीत उमटली तेथला वेष घेऊन आली आहेत असे वरील उदाहरणांनी स्पष्ट म्हणावेसे वाटते. नाथांनी भावार्थ रामायणात राक्षसांना दाढया असल्याचे वर्णन व्यर्थ केले नव्हते; तसेच तुकोबांचे पाईक दैवावर हवाला ठेऊन बसणारे नव्हते हे त्या अक्षरातून आपण ओळखू शकलो तर संत देश बुडवे होते, ते परिस्थितीपासून दूर राहणारे, पलायनवादी होते, इत्यादी आळशी व पोकळ डोक्यातील निंदेला वाव न देता कुठल्याही व्यक्तीचे मूल्यमापन त्या कालची परिस्थिती, व त्यांची कृत्ये व अक्षरे यांना धरूनच करू शकू.
पण शब्दशूर व जगाला धक्के देणारांना हे पटत नाही. ते आजचे संकेत, आजचे जीवन डोळयापुढे ठेऊन मागील काळातील लोकांचे मूल्यमापन करतात. तुकोबांच्या काळी यथा राजा तथा प्रजा हा राजधर्म होता, वर्णाश्रम हा समाजधर्म होता आणि वेदांतवाणी ही अध्यात्माची बाब हेती. तुकोबांनी आपले ध्येय, भक्तीने स्वत:चे व जगत्कल्याण साधण्याचे मानले. ते करताना हा देश सामाजिक दृष्टयाही पतित आहे हे जाणून उपदेशपर अभंगाने त्याला जागविला. प्रभूने अवतार घेऊन दुष्टाला दमन करावे ही आर्त वाणी ऐकविली.
००१ आम्ही वैकुंठवासी
आम्ही वैकुंठवासी । आलो या चि कारणासी ।
बोलिले जे ॠषी । साच भावे वर्तावया ॥१॥
झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग ।
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥
अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्दज्ञाने ।
विषयलोभी मन । साधने बुडविली ॥२॥
झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग ।
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥
पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ।
तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ॥३॥
झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग ।
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥
निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :-
वैकुंठवासी-श्रीविष्णूच्या वैकुंठात राहणारे.
साच-खरोखर.
लोपली-लपली.
शब्दज्ञाने-शाब्दिक ज्ञानाने.
अर्थ :- खरे म्हणजे आम्ही वैकुंठात श्रीविष्णुबरोबर राहणारे असून एका विशिष्ट कारणासाठी आम्ही या भूमीवर आलो आहोत. पूर्वी ऋषिमुनींनी जे सांगितले तेच सत्यार्थाने सांगण्यास व त्याप्रमाणे वर्तन करण्यासाठी - आम्ही या पृथ्वीवर अवतरलो आहोत.
पूर्वीच्या सर्व साधुसंतांचे, ऋषिमुनींचे मार्ग आम्ही झाडून स्वच्छ करू. जग आडरानाच्या बिकट मार्गाने चालले आहे. पण त्यास आम्ही साधुसंतांच्या व प्राचीन ऋषिमुनींच्या उच्छिष्टाच्या भागाचे सेवन घडवून नीट सरळ मार्गावर आणू व आम्हीही तो भाग सेवन करू. ध्रु. आज पुराणांतील ख-या अर्थाचा लोप झाला असून केवळ शाब्दिक ज्ञानाने सर्व आयुष्याचा नाश आरंभिला आहे. सर्वांच्या मनांत विषयांचाच लोभ असल्याने सर्व महत्वाची साधने बुडाली आहेत.
परंतु तुकोबा म्हणतात, आम्ही मात्र या भक्तीचाच डांगोरा पिटू. या भक्तीचाच प्रचार करू. यामुळे प्रत्यक्ष यमासही दरारा वाटेल. चला, त्या हरीच्या नामाचा जयजयकार मोठ्या आनंदाने करा.
विवरण:- तुकोबांचे आत्मप्रचीतीचे, आत्मसार्मथ्याचे, आत्मविश्वासाचे व आपण कोणत्या कार्यासाठी जन्मलो आहोत यासंबंधीच्या निश्चित जाणिवेचे जे काही अभंग आहेत, त्यात वरील अभंग फारच महत्त्व आहे. यापूर्वी आम्ही ईश्वराच्या सानिध्यात, वैकुंठीच होतो हे बुवांचे वचन त्यांच्या एकंदर चरित्रक्रमास व तत्त्वज्ञानास धरून आहे. आपण प्राचीन ऋषिमुनी व साधुसंत यांच्याच मार्गानी जात असून तीच परंपरा चालवीत आहोत असा स्पष्ट निर्देश त्यांनी अनेक ठिकाणी केलेला आहे. ' यासाठीच भक्तीचा डांगोरा पिटण्यासाठी ते सिद्ध झाले आहेत.
या सर्व आत्मप्रचीतीच्या व निश्चयात्मक भावाच्या अभंगांवरून तुकोबांचे कार्य हे एक लोकोत्तर असे ईश्वरी कार्य होते असे मानावयास हरकत नाही. आपली वाणी 'नारायणी मिश्रीत' आहे असेही त्यांनी एका अभंगात सांगितले आहे. 'मज विश्वंभर बोलवितो' हा त्यांचा आत्मविश्वास प्रसिद्ध आहे. याच अभंगात,'वदवी गोविंद तेंचि वदे' म्हणून त्यांनी स्वतःच्या वाणीचे दिव्यत्व सूचित केले आहे. 'संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे' असा त्यांचा नम्र भाव आत्मविश्वासासहित प्रकट झाला आहे. 'बोलविती देव मज,' 'परि त्या विश्वंभरे बोलाविले' अशा ओळींतून तुकोबांच्या अभंगवाणीचा प्रासादिक गुण सहज ध्यानात येणारा आहे आणि याच प्रासादिक वाणीमुळे व ईश्वरी अंशामुळे तुकोबांना 'पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । ' असा आत्मसार्मथ्याचा घोष करता आला; जे आपण दुस-यांना सांगणार, साधकांना वा प्रापंचिकांना मार्गदर्शनासाठी सांगणार, त्याची प्रचीती स्वतःस आल्याखेरीज त्याचे तेज पडत नाही; लोकांच्या मनावरही त्याचा परिणाम होत नाही. परंतु तुकोबांना ही सर्व अनुकूलता प्राप्त झाली. नामदेवांनी कवित्वाची जागृती दिली, ईश्वरसाक्षात्कार झाला आणि मग तुकोबांच्या वाणीस आत्मप्रचीतीचे, ईश्वरी कृपेचे तेज चढले. 'तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊनी बाण फिरे' असे सामथ्र्य मग त्यांच्या अंगी प्रकट झाले. ‘गर्जू हरिचे पवाडे । मेळवू वैष्णव बागडे । घालू पायतळी । कळिकाळ त्या बळे । ' या सारख्या शब्दांना धार आली ती तुकोबांच्या सार्मथ्यसंपन्न व आत्मविश्वासात्मक दैवी बळामुळे, 'सूर्याचिया परी । तुका लोकीं क्रीडा करी ' हे सार्मथ्यवान बोल साध्या माणसाचे कसे असतील?
००२ कास घालोनी बळकट
कास घालोनी बळकट ।
झालो कळिकाळासी नीट।
केली पायवाट।
भव सिंधू वरूनी ॥१॥
या रे या रे लहान थोर ।
याती भलते नारीनर।
करावा विचार।
न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥
कामी गुंतले रिकामे ।
जपी तपी येथे जमे ।
लाविले दमामे ।
मुक्त आणि मुमुक्षा ॥२॥
या रे या रे लहान थोर ।
याती भलते नारीनर।
करावा विचार।
न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥
एकंदर शिक्का ।
पाठविला इहलोक ।
आलो म्हणे तुका ।
मी नामाचा धारक ॥३॥
या रे या रे लहान थोर ।
याती भलते नारीनर।
करावा विचार।
न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥
निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
नीट - धीटपणे लढण्यास सिद्ध.
मुमुक्षु - मोक्षाची इच्छा करणारे.
दमामे - नगारे.
अर्थ :- बळकटपणे कास बांधून मी प्रत्यक्ष यमाशीही लढण्यास धीटपणे सिद्ध झालो आहे. संसाररूपी सागर तरून जाण्यास मी या नामस्मरणाची नावच तयार केली आहे.॥१॥
या हो. जे कोणी लहान, थोर, नर, नारी, कुठल्याही जातीचे, तुम्ही असा. कुणासही इकडे येण्यास विचार करण्याची जरूरी नाही. निश्चिंत मनाने यावे. ॥ध्रु.॥
कुणी कामात, आपापल्या व्यवहारात गुंतलेले असतील, कुणी रिकामे असतील, कुणी जप करण्यात गुंतले असतील, कुणी तपश्चर्यात व्यग्र असतील, कुणी मुक्त असतील, कुणी मोक्षाची इच्छा करणारे असतील. सर्वांसाठी मी येथे विठ्ठलाच्या नामस्मरणाचे नगारे सुरू केले आहेत.॥२॥
या सर्व लोकांना एकच नामाचा शिक्का या लोकात उपयोगी असल्याने ईश्वराने पाठविला आहे. तुकोबा म्हणतात, मी या नामाचा धारकच येथे आलो आहे.॥३॥
विवरण: या नामस्मरणाच्या मार्गावर ते काचा घालून प्रत्यक्ष यमाशीही लढण्यास सिद्ध झाले आहेत. त्यांच्या या सामर्थ्यामुळे यमासही दरारा वाटू लागला आहे. साधक, मुमुक्षु, प्रापंचिक कोणीही कोणत्याही पंथातील असोत, नामस्मरणाचा शिक्का त्यांच्यावर या कलियुगात बसावयास हवा, अशी त्यांची इच्छा आहे.
००३ आम्ही नामाचे धारक नेणो प्रकार आणीक
आम्ही नामाचे धारक नेणो प्रकार आणीक ।
सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण ॥१॥
न लगे जाणावे नेणावे गावे आनंदे नाचावे ।
प्रेमसुख घ्यावे वैष्णवांचे संगती ॥ध्रु.॥
भाव बळे घालू कास लज्जा चिंता दवडू आस ।
पायी निजध्यास म्हणो दास विष्णूचे ॥२॥
न लगे जाणावे नेणावे गावे आनंदे नाचावे ।
प्रेमसुख घ्यावे वैष्णवांचे संगती ॥ध्रु.॥
भय नाही जन्म घेता मोक्षपदा हाणो लाता ।
तुका म्हणे सत्ता धरू निकट सेवेची ॥३॥
न लगे जाणावे नेणावे गावे आनंदे नाचावे ।
प्रेमसुख घ्यावे वैष्णवांचे संगती ॥ध्रु.॥
निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
धारक - धारण करणारे.
अर्थ:- आम्ही या श्रीहरीचे नाम घेणारे भक्त आहोत. याच्याशिवाय आम्हांस इतर दुसरे प्रकार माहीत नाहीत. आम्हास सर्वभावांनी हा एक विठ्ठलच प्रमाण आहे॥१॥
याच्या पुढे आम्ही काही जाणावे अथवा नेणावे असे नाहीच. याच्या नामाच्या धुंदीत प्रेमाने नाचावे, गावे आणि प्रेमसुखाची लयलूट या वैष्णवांच्या संगतीत करावी. एवढेच आम्हास माहीत आहे॥ध्रु.॥
श्रीहरीच्या प्रेमाची कास घालून लज्जा, चिंता, आशा या वृत्तींना नाहीसे करू. या एका विठोबाच्याच चरणांचा ध्यास धरून आम्ही स्वतःस त्याचेच विष्णुदास म्हणवून घेऊ॥२॥
तुकोबा म्हणतात याच्या संगतीत आम्हाला अनेक जन्म घेताना कसलेही भय वाटत नाही. मोक्षसुखावर तर आम्ही लाथ मारून तुच्छ केलेला असतो. यापुढे या श्रीहरीच्या सेवेची सत्ताच संपादन करू॥३॥
००४ आम्ही हरिचे सवंगडे जुने ठायीचे वेडे बागडे
२
आम्ही हरिचे सवंगडे । जुने ठायीचे वेडे बागडे ।
हाती धरुनी कडे । पाठीसवे वागविलो ॥१॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥
निद्रा करिता होतो पायी । सवे चि लंका घेतली तई ।
वानरे गोवळ गाई । सवे चारित फिरतसो ॥२॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥
आम्हा नामाचे चिंतन । राम कृष्ण नारायण।
तुका म्हणे क्षण । खाता जेविता न विसंभो ॥३॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥
निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
ठायीचे-मूळचे.
गोवळ-गुरेराखी, गोपाळ.
अर्थ : आम्ही श्रीहरीचे फार जुन्या काळाचे खेळगडी मित्र आहोत मूळचे आम्ही त्याचेच वेडेवाकडे सोबती असून आम्ही श्रीहरीला हातांवर, कडेवर, पाठीवर घेऊन वागविले आहे.॥१॥
म्हणून त्याच्यात व आमच्यात भिन्नभाव नाही. देव व आम्ही देहानेही एकरूप आहोत, यासाठीच आम्ही एकमेकांना सोडून कधी वेगवेगळे झालेलो नाही.॥ध्रु.॥
श्रीहरी जेव्हा निद्रा करीत असे तेव्हा त्याच्या पायांशी आम्ही होतो. त्याने ज्या वेळी लंका घेतली त्यावेळी आम्ही वानररूपाने त्याच्या साह्यास होतो. गोकुळात त्याच्या बरोबर गोपाळांच्या रूपात गाई चारताना आम्ही फिरत असू.॥२॥
तुकोबा म्हणतात, आम्हांस रामकृष्ण, नारायण या नावाचे चिंतन खाताना, जेवताना नित्य होत असते. त्याला आम्ही कधी एक क्षणभरही विसंबत नाही.॥३॥
००५ मागे बहुता जन्मी
मागे बहुता जन्मी । हे चि करित आलो आम्ही ।
भवतापश्रमी । दुःखे पीडिली निववू त्या ॥१॥
गर्जो हरिचे पवाडे । मिळो वैष्णव बागडे ।
पाझर रोकडे । काढू पाषाणामध्ये ॥धृ॥
भाव शुध्द नामावळी । हर्षे नाचो पिटू टाळी ।
घालू पाया तळी । कळिकाळ त्याबळे ॥२॥
गर्जो हरिचे पवाडे । मिळो वैष्णव बागडे ।
पाझर रोकडे । काढू पाषाणामध्ये ॥धृ॥
कामक्रोध बंदखाणी ।तुका म्हणे दिले दोन्ही ।
इंद्रियांचे धनी । आम्ही जालो गोसावी ॥३॥
गर्जो हरिचे पवाडे । मिळो वैष्णव बागडे ।
पाझर रोकडे । काढू पाषाणामध्ये ॥धृ॥
निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ : भवतापश्रमसंसारतापाच्या मुळे, कष्टाने, बागडेशूर, बंदखाणींबंदिखान्यात, तुरुंगात, धणीमालक, धनी
अर्थः मागे अनेक जन्मांत आम्ही हेच काम करीत आलो आहोत संसारतापाच्या कष्टाने जे दुःखी झाले असतील त्यांना शांत करणे हेच आमचे काम होते १ आम्ही शूर वैष्णव जमवून हरिकीर्तनाच्या गजराने पाषाणहृदयी माणसाच्या हदयातूनही करुणेचे पाझर फोडू २ श्रीहरींचे नाम आम्ही शुद्ध भावाने घेऊ आणि मोठ्या आनंदाने नाचत नाचत टाळी पिट आणि या बळाच्या योगाने प्रत्यक्ष कळिकाळालाही आम्ही पायांखाली तुडवू ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कामक्रोधादी विकार बंदिखान्यात टाकून इंद्रियांचे मालक असूनही गोसावी बनलो आहोत ४
। विवरण : वरील दोन महत्त्वाच्या अभंगांत श्रीहरीची व आपली संगत फार जुन्या काळापासून आहे असे सांगितले आहे श्रीविठ्ठल हा बाळकृष्णाचा अवतार, तर त्यावेळचे त्याचे सवंगडी जे गोपाळ ते आम्हीच होतो असे तुकोबा म्हणतात श्रीहरीत व आमच्यांत भेद नाही हे पटवून देण्यासाठी हे मूळचेच नाते प्रस्थापित करण्यात येत आहे रामावतारातही आपणं श्रीहरीच्या बरोबर लंकाहरणाच्या समयास वानररूपाने होतो असे येथे तुकोबा म्हणतात संसारतप्त लोकांचे दुःख दूर करणे आणि हरिनामाचे पवाडे गर्जून म्हणणे हे काम आपण अनेक जन्मांत करीत आलो आहोत असे तुकोबांना म्हणायचे आहे शुकाला जनकराजाच्या भेटीस श्रीहरीने पाठविले व त्याचा अभिमान गळल्यानंतर तो समाधी लावू लागला तेव्हां ‘तुका म्हणे तध होत आम्ही ॥' याही वेळी आपल्या अस्तित्वाची साक्ष तुकोबांनि खालील अभंगात दिलेली आहे:
००६ ब्रह्मज्ञान जरी एके दिवसी कळे
ब्रह्मज्ञान जरी एके दिवसी कळे ।
तात्काळ हा गळे अभिमान ॥१॥
अभिमान लागे शुकाचिये पाठी ।
व्यासे उफराटी दृष्टी केली ॥२॥
जनक भेटीसी पाठविला तेणे ।
अभिमान नाणे खोटे केले ॥३॥
खोटे करूनिया लाविला अभ्यासी ।
मेरु शिखरासी शुक गेला ॥४॥
जाऊनिया तेणे साधिली समाधी ।
तुका म्हणे तधी होतो आम्ही ॥ ५ ॥
निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ : शुकाचिये - ईश्वराच्या निर्गुण स्वरूपास मानणारा ब्रह्मनिष्ठ मुनी.
अर्थ : ब्रह्मज्ञानाची गोष्ट ही एका दिवसात समजण्यासारखी असती तर हा अभिमान ताबडतोब गळाला असता.॥१॥
असाच अभिमान शुकाच्या पाठीमागे लागला, पण व्यासांच्या ध्यानात आल्यावर त्यांनी त्याची दृष्टी फिरविली.॥२॥
मग त्यांनी शुकाला जनकभेटीस पाठविले आणि जनकराजाने शुकाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश देऊन त्यांचा अभिमान दूर केला.॥३॥
अभिमान खोटा केल्यानंतर त्यांना जनकाने ब्रह्मप्राप्तीच्या अभ्यासास लावले; त्याच्या साधनासाठी शुक मेरु पर्वतावर गेले.॥४॥
तुकोबा म्हणतात, आणि त्यांनी त्या पर्वतावर समाधी लावली; आम्ही त्या वेळेस तेथे होतो.॥५॥
विवरण :- शुकाचा अभिमान दूर करण्याचा प्रयत्न व्यासांनी व जनक राजाने कसा केला हे या अभंगात तुकोबांंनी सांगितले आहे. पराशरसत्यवतीपुत्र व्यासास शुकाचे रूप धारण करून राहिलेल्या एका शुकीपासून झालेला हा पुत्र असून आजन्म ब्रह्मनिष्ठ व मोठा भगवद्भक्त म्हणून याची प्रसिद्धी होती. याच्या उग्र तपामुळे भयभीत होऊन इंद्राने त्याचे तप भंग व्हावे म्हणून वसंत व काम यांच्याबरोबर रंभा नावाच्या रूपवतीस त्याच्याकडे पाठविले. तरीही त्याचे एकचित्त ढळले नाही. याला तपश्चर्येचा व ब्रह्मज्ञानाचा सूक्ष्म अभिमान असल्यामुळे व्यासांनी जनकराजाकडे त्याची रवानगी केली. जनकाने त्याचा अभिमान दूर केला. येथून पुढे एक मोठा भगवद्भक्त म्हणून त्याची ख्याती झाली. यानेच परीक्षिती राजास भागवत सांगितले. याचे सर्व आयुष्य परमेश्वराच्या चिंतनात गेले. निर्गुण ब्रह्माच्या उपासनेपेक्षा त्याचे मन भगवंतांच्या सगुण लीला वर्णन करण्यातच विसावले."मी निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी नेहमी रममाण असलो तरी पुण्यश्लोक नारायणाच्या लीलेने माझे मन वेधून घेतल्याने मी भगवंताचे पुष्कळ अध्ययन केले ते तुला सांगतो", असे शुकानेच म्हटलेले आहे.शुकाचा अभिमान नष्ट होऊन ते भगवंताच्या चिंतनात कसे रममाण झाले, एवढेच सांगण्याचा हेतू या अभंगाचा नाही; तर ' तुका म्हणे तधी होतो आम्ही' आम्ही स्वतः त्यावेळी उपस्थित होतो असे तुकोबांनी म्हटले आहे; त्याचाही भावार्थ समजावून घ्यायला पाहिजे. आपला आणि श्रीहरीचा फार जुना संबंध आहे असे तुकोबा वारंवार सांगताना दृष्टीस पडतात; आपण श्रीहरीचे जुने सवंगडी आहोत असे त्यांनी एका अभंगांत म्हटले आहे. आपण खरे म्हणजे श्रीहरीच्या बरोबर वैकुंठात राहणारे असून धर्मरक्षणासाठी, संतांचे मार्ग झाडण्यासाठी, खऱ्याखोट्याचा निवाडा करण्यासाठी पृथ्वीवर अवतरलो असे बुवांनी अनेकदा म्हटले आहे. 'मागे बहुता जन्मी । हेची करित आलो आम्ही' असे बुवा म्हणतात. हे मागील जन्म कोणते ? याही प्रश्नाचे उत्तर त्यांच्याच अभंगात सापडण्यासारखे आहे. प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव असे चार युगांतील चार अवतार होऊन शेवटी तुकोबांच्या ठिकाणी सर्व अवतारांचा कळस झाला.अशा या अवतार परंपरेत तुकोबा शुकाच्या समाधीच्या वेळी असणे हे सहज शक्य आहे.
००७ कोटी जन्म पुण्य साधन साधिले
कोटी जन्म पुण्य साधन साधिले । तेणे हाता आले हरिदास्य ॥१॥
रात्रीं दिवस ध्यान हरीचे भजन । काया वाचा मन भगवंती ॥ध्रु॥
ऐसिया प्रेमळा म्हणताती वेडा । संसार रोकडा बुडविला ॥२॥
रात्रीं दिवस ध्यान हरीचे भजन । काया वाचा मन भगवंती ॥ध्रु॥
एकवीस कुळे जेणे उद्धरिली । हे तो न कळे खोली भाग्यमंदा ॥३॥
रात्रीं दिवस ध्यान हरीचे भजन । काया वाचा मन भगवंती ॥ध्रु॥
तुका म्हणे त्याची पायधुळी मिळे । भवभय पळे वंदिताची ॥४॥
रात्रीं दिवस ध्यान हरीचे भजन । काया वाचा मन भगवंती ॥ध्रु॥
निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ : भवभय-संसाराचे भय.
अर्थ: कोटी जन्मांचे पुण्यसाधन करून श्रीहरीचे दास्य हाती आले आहे.॥१॥
आता कायावाचामनेकरून रात्रंदिवस या श्रीहरीचेच भजन करीन.॥ध्रु॥
अशा या प्रेमळ भक्तास लोक वेडा म्हणतात त्याने आपला संसार बुडविला असे म्हणतात.॥२॥
खरे म्हणजे याने आपल्या हरिभक्तीने आपल्या एकवीस कुळांचा उद्धार केला पण त्याच्या पुण्याची खोली जे मतिमंद आहेत त्यांना समजत नाही.॥३॥
तुकोबा म्हणतात, अशा माणसाची पायधूळही वंदन केली तरी संसाराचे भय पळून जाईल.॥५॥
००८ प्राक्तनाच्या योगे आळशावरी गंगा
प्राक्तनाच्या योगे आळशावरी गंगा।
स्नान काय जगा करू नये ॥१॥
उभी कामधेनू मांगाचे अंगणी ।
तिसी काय ब्राम्हणी वंदू नये ॥२॥
कोढियाचे हाते परिसे होय सोने ।
अपवित्र म्हणोन घेऊ नये ॥३॥
यातिहीन जाला गावीचा मोकासी ।
त्याच्या वचनासी मानू नये ॥४॥
भावारूढ तुका मुद्रा विठोबाची ।
न मनी तयांची तोंडे काळीं ॥५॥
निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
मोकासी-गावाचा प्रमुख.
न मनी-मानीत नाहीत.
अर्थ : प्रारब्धाच्या योगाने जर आळशावर गंगा आली तर जगाने स्नानाचा लाभ घेऊ नये की काय?॥१॥
मांगाच्या अंगणात कामधेनू उभी आहे तिला ब्राह्मणांनी वंदन करू नये की काय?॥२॥
कोड हातास फुटले आहे अशा माणसाच्या हातातील परिसाने जर लोखंडाचे सोने झाले तर ते अपवित्र म्हणून घेऊ नये की काय?॥३॥
एखादा यातिहीन मनुष्य गावचा प्रमुख झाला तर त्याच्या हुकुमास लोक मानत नाहीत की काय?॥४॥
तुकोबा म्हणतात, मी विठोबाची मुद्रा धारण करून भावारूढ झालो आहे. या मुद्रेला जे कुणी मानणार नाहीत त्यांची तोंडे काळी होतील.॥५॥
००९ विश्वी विश्वंभर
विश्वी विश्वंभर ।
बोले वेदांतांचा सार ॥१॥
जगी जगदीश ।
शास्त्रे वदती सावकाश ॥२॥
व्यापिले हे नारायणे ।
ऐसी गर्जती पुराणे ॥३॥
जनी जनार्दन ।
संत बोलती वचन ॥४॥
सूर्याचिया परी ।
तुका लोकी क्रीडा करी ॥५॥
निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ : वदती-बोलतात, सांगतात.
सर्व विश्वात हा श्रीहरी व्यापून राहिल्यामुळे त्यास विश्व भर म्हणतात हे सर्व वेदांतील मुख्य तत्त्व आहे.॥१॥
जगाचा स्वामी जगदीश आहे असे सर्व शास्त्रे एकमताने सांगत आहेत.॥२॥
सर्व विश्व हे या नारायणाने व्यापिले आहे अशी गर्जना पुराणांनी केली आहे.॥३॥
सर्व जनांत जनार्दनाची वस्ती अाहे असे संत बोलतात.॥४॥
तुकोबा म्हणतात, सूर्य ज्याप्रमाणे सर्व जगात भ्रमण करून सर्वत्र प्रकाश देतो त्याप्रमाणे हा तुका सर्व जगतात क्रीडा करीत आहे.॥४॥
विवरण: हा एक तत्त्वदर्शी व अनुभूतिसंपन्न असा तुकोबांचा अभंग आहे शेवटच्या ओळीचा अर्थ तुकाराम या लोकात सूर्याप्रमाणे क्रीडा करतो असाच धरणे युक्त असल्याने तुकोबांचा यथार्थ आत्मविश्वासही येथे चांगलाच प्रकट झाला आहे सर्व जगतात, चराचर विश्वात एकच वासुदेवतत्त्व भरून राहिलेले आहे सर्व विश्वाला भरून राहिलेला हा श्रोहरो विश्वंभर आहे सर्व जगताचा स्वामी म्हणून जगदीश आहे नारायण म्हणजे सर्व 'पाण्याच्या समूहाचे आधारस्थान, सर्वं जगताचे अधारस्थान या नारायणाने सर्व जगताला व्यापले आहे श्रीविष्णू सर्व जगताला व्यापून आहे जे जे काही ते सर्व वासुदेवमय आहे 'वासुदेवः सर्वमिति' अशी गीतेची निष्ठा आहे ‘बीजं मां सर्वभूतानां ' असे अतूट नाते श्रीहरीचे व व्यक्त जगाचे आहे एकतत्त्वाच्या या आविष्काराची अनुभूती तुकोबांनी घेतली होती सर्व विश्वात जसा विश्वंभर भरून राहिलेला आहे, तसाच सूर्येही सर्व जगतावर अधिराज्य गाजवणारा आहे सूर्य जसा निर्भयपणे सर्वत्र प्रवेश करून अंधार दूर करतो त्याप्रमाणे मी तुकाराम सर्व जगतास सामावून अज्ञानाचा अंधार दूर करतो संशयाची जाळी जळमटे नष्ट करतो सूर्याप्रमाणेच साच्या विश्वास धवळून टाकतो अणुरेणुहूनही लहानसा असणारा तुकाराम आकाशाएवढा होतो ' धवळलें जगदाकार। अंधार तो निरसला' अशी बुवांची साक्ष आहे आमुचा स्वदेश । भुवनत्रयामध्ये वास' अशी त्यांच्या अनुभूतीची उंची आहे या प्रभूच्याच वास्तव्याने ' विश्व अवघे कोंदाटले' असल्यामुळे ' जेथे देखें तुझीच पाऊलें' अशी प्रचीती तुकारामबुवांना येत राहाते.
०१० पूर्वी जो प्रल्हाद तोची जाणा अंगद
पुढील दोन अभंगांत तुकोबांच्या पूर्वजन्म वृत्तान्त आहे. नाथांनी प्रल्हाद, अंगद, उद्धव व नामदेव असा जन्मांचा क्रम दिला अाहे. रामेश्वर भटांनी तुकोबा हे नामदेवरायांचे अवतार अाहेत असं सांगतात -
ज्ञानेश्वरे मज केला उपकार ।
स्वप्नी सविस्तर सांगितले ॥
पूर्वी जो प्रल्हाद तोची जाणा अंगद ।
तोची उद्धव प्रसिद्ध कृष्णावतारी ॥१॥
कलीमाजी जाणा नामदेव म्हणती ।
लडिवाळ श्रीपती लळा पाळी ॥२॥
तीर्थ यात्रा सर्व केलासे उद्धार ।
सर्व त्याचा भार चालविला ॥३॥
लडिवाळ नामा विठ्ठलचरणी ।
एकाजनार्दनी नमन त्याते ॥४॥
***
माझी मज आली रोकडी प्रचित ।
होउनी फजीत दु:ख पावे ॥१॥
काही द्वेष त्याचा करिता अंतरी ।
व्यथा या शरीरी बहुत जाली ॥२॥
ज्ञानेश्वरे मज केला उपकार ।
स्वप्नी सविस्तर सांगितले ॥३॥
तुका सर्वां श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर ।
का जे अवतार नामयाचा ॥४॥
त्याची तुज काही घडली निंदा ।
म्हणुनी हे बाधा जडली तुज ॥५॥
आता एक करी सांगेन ते तुला ।
शरण जाई त्याला निश्चयेसी ॥६॥
दर्शनेची तुझ्या दोषा परिहार ।
होय तो विचार सांगितला ॥७॥
तोची हा विश्वास धरुनी मानसी ।
जाय कीर्तनासी नित्य काळ ॥८॥
म्हणे रामेश्वर त्याच्या समागमे ।
जाले हे आराम देह माझे ॥९॥
निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ : वदती-बोलतात, सांगतात.
सर्व विश्वात हा श्रीहरी व्यापून राहिल्यामुळे त्यास विश्व भर म्हणतात हे सर्व वेदांतील मुख्य तत्त्व आहे.॥१॥
जगाचा स्वामी जगदीश आहे असे सर्व शास्त्रे एकमताने सांगत आहेत.॥२॥
सर्व विश्व हे या नारायणाने व्यापिले आहे अशी गर्जना पुराणांनी केली आहे.॥३॥
सर्व जनांत जनार्दनाची वस्ती अाहे असे संत बोलतात.॥४॥
तुकोबा म्हणतात, सूर्य ज्याप्रमाणे सर्व जगात भ्रमण करून सर्वत्र प्रकाश देतो त्याप्रमाणे हा तुका सर्व जगतात क्रीडा करीत आहे.॥४॥
विवरण: हा एक तत्त्वदर्शी व अनुभूतिसंपन्न असा तुकोबांचा अभंग आहे शेवटच्या ओळीचा अर्थ तुकाराम या लोकात सूर्याप्रमाणे क्रीडा करतो असाच धरणे युक्त असल्याने तुकोबांचा यथार्थ आत्मविश्वासही येथे चांगलाच प्रकट झाला आहे सर्व जगतात, चराचर विश्वात एकच वासुदेवतत्त्व भरून राहिलेले आहे सर्व विश्वाला भरून राहिलेला हा श्रोहरो विश्वंभर आहे सर्व जगताचा स्वामी म्हणून जगदीश आहे नारायण म्हणजे सर्व 'पाण्याच्या समूहाचे आधारस्थान, सर्वं जगताचे अधारस्थान या नारायणाने सर्व जगताला व्यापले आहे श्रीविष्णू सर्व जगताला व्यापून आहे जे जे काही ते सर्व वासुदेवमय आहे 'वासुदेवः सर्वमिति' अशी गीतेची निष्ठा आहे ‘बीजं मां सर्वभूतानां ' असे अतूट नाते श्रीहरीचे व व्यक्त जगाचे आहे एकतत्त्वाच्या या आविष्काराची अनुभूती तुकोबांनी घेतली होती सर्व विश्वात जसा विश्वंभर भरून राहिलेला आहे, तसाच सूर्येही सर्व जगतावर अधिराज्य गाजवणारा आहे सूर्य जसा निर्भयपणे सर्वत्र प्रवेश करून अंधार दूर करतो त्याप्रमाणे मी तुकाराम सर्व जगतास सामावून अज्ञानाचा अंधार दूर करतो संशयाची जाळी जळमटे नष्ट करतो सूर्याप्रमाणेच साच्या विश्वास धवळून टाकतो अणुरेणुहूनही लहानसा असणारा तुकाराम आकाशाएवढा होतो ' धवळलें जगदाकार। अंधार तो निरसला' अशी बुवांची साक्ष आहे आमुचा स्वदेश । भुवनत्रयामध्ये वास' अशी त्यांच्या अनुभूतीची उंची आहे या प्रभूच्याच वास्तव्याने ' विश्व अवघे कोंदाटले' असल्यामुळे ' जेथे देखें तुझीच पाऊलें' अशी प्रचीती तुकारामबुवांना येत राहाते.
भक्त प्रल्हाद
१
प्रल्हादाकारणे नरसिंह जालासी । त्याचिया बोलासी सत्य केले ॥१॥
राम कृष्ण गोविंद नारायण हरी । गर्जे राजद्वारी भक्तराज ॥२॥
विठ्ठल माधव मुकुंद केशव । तेणे दैत्यराव दचकला ॥३॥
तुका म्हणे तया कारणे सगुण । भक्ताचे वचन सत्य केले ॥४॥
३०९१ पृष्ठ ५१७ (शासकीय)
२
नामाचे सामर्थ्य का रे दवडीसी । का रे विसरसी पवाडे हे ॥१॥
खणखणा हाणती खर्ग प्रल्हादासी । न रुपे आंगासी किंचित ही ॥२॥
राम कृष्ण हरी ऐसी मारी हाक । तेणे पडे धाक बळियासी ॥३॥
असो द्यावी सामर्थ्ये ऐसिया कीर्तीची । आवडी तुक्याची भेटी देई ॥४॥
३०९२ पृष्ठ ५१७ (शासकीय)
३
वाटीभर विष दिले प्रल्हादासी । निर्भय मानसी तुझ्या बळे ॥१॥
भोक्ता नारायण केले ते प्राशन । प्रतापे जीवन जाले तुझ्या ॥२॥
नामाच्या चिंतने विषाचे ते आप । जाहाले देखत नारायणा ॥३॥
तुका म्हणे ऐसे तुझे बडिवार । सीणला फणीवर वर्णवेना ॥४॥
३०९३ पृष्ठ ५१७ (शासकीय)
४
अग्निकुंडामध्ये घातला प्रल्हाद । तरी तो गोविंद विसरेना ॥१॥
पितियासी म्हणे व्यापक श्रीहरी । नांदतो मुरारी सर्वा ठायी ॥२॥
अग्निरूपे माझा सखा नारायण । प्रल्हाद गर्जून हाक मारी ॥३॥
तुका म्हणे अग्नि जाहाला शीतळ । प्रताप सबळ विठो तुझा ॥४॥
३०९४ पृष्ठ ५१७ (शासकीय)
५
कोपोनिया पिता बोले प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठे आहे ॥१॥
येरू म्हणे काष्ठी पाषाणी सकळी । आहे वनमाळी जेथे तेथे ॥२॥
खांबावरी लात मारिली दुर्जने । खांबी नारायण म्हणताची ॥३॥
तुका म्हणे कैसा खांब कडाडिला । ब्रह्मा दचकला सत्यलोकी ॥४॥
३०९५ पृष्ठ ५१७(शासकीय)

६
डळमळिला मेरु आणि तो मंदार । पाताळी फणीवर डोई झाडी ॥१॥
लोपे तेजे सूर्य आणिक हा चंद्र । कापतसे इंद्र थरथरा ॥२॥
ऐसे रूप उग्र हरीने धरिले । दैत्या मारियेले मांडीवरी ॥३॥
तुका म्हणे भक्ताकारणे श्रीहरी । बहु दुराचारी निर्दाळिले ॥४॥
३०९६ पृष्ठ ५१७(शासकीय)

नृसिंह-लक्ष्मी मंदिर, १४२० सदाशिव पेठ,पुणे ४११०३०.
मंदिरात भगवान नृसिंह आणि मांडीवर देवी लक्ष्मी यांची सुंदर संगमरवरी मूर्ती आहे. हे मंदिर गणेश भट्ट जोशी यांनी इ.स. १७७४ मध्ये बांधले .
मूर्तीची स्थापना - आषाढ शुद्ध दशमी शके १६९६.
गुण रूप नाम नाही जयासी । चिंतिता तैसाची होसी तयांसी ।
मत्स्य कूर्म वराह नरसिंह जालासी । असुरा काळ मुनी ठाके ध्यानासी ॥
जय देव जय देव जय गरुडध्वजा । आरती ओवाळीन तुज भक्तीकाजा ॥ध्रु॥
कृष्ण जन्म अभंग
१
फिराविली दोन्ही । कन्या आणि चक्रपाणी ॥१॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृ॥
तुटली बंधने । वसुदेव देवकीची दर्शने ॥२॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृ॥
गोकुळासी आले । ब्रम्ह अव्यक्त चांगले ॥३॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृ॥
नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपती ॥४॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृ॥
निशी जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥५॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृ॥
आनंदली मही । भार गेला सकळ ही ॥६॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृ॥
तुका म्हणे कंसा । आट भोविला वळसा ॥७॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृ॥
३१० पृ ५७ (संताजी), ११५९ पृ १९५ (शिरवळकर), २८३६ पृ ४७५(शासकीय)
कृष्ण जन्म अभंग
२
करूनि आरती । आता ओवाळू श्रीपती ॥१॥
आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥धृ॥
पाहा वो सकळा । पुण्यवंता तुम्ही बाळा ॥२॥
आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥धृ॥
तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥३॥
आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥धृ॥
३११ पृ ५८ (संताजी), ४००७ पृ ७२६ (शिरवळकर), ५०८ पृ ९६(शासकीय)
कृष्ण जन्म अभंग
३
सोडियेल्या गांठी । दरुषणे कृष्णभेटी ॥१॥
करिती नारी अक्षवाणे । जीवभाव देती दाने ॥धृ॥
उपजल्या काळे । रूपे मोहीली सकळे ॥२॥
करिती नारी अक्षवाणे । जीवभाव देती दाने ॥धृ॥
तुका तेथे वारी । एकी आडोनि दुसरी ॥३॥
करिती नारी अक्षवाणे । जीवभाव देती दाने ॥धृ॥
३१२ पृ ५८ (संताजी), ११५२ पृ १९५ (शिरवळकर), २८३७ पृ ४७६(शासकीय)
कृष्ण जन्म अभंग
४
मुख डोळा पाहे । तैशीच ते उभी राहे ॥१॥
केल्याविण नव्हे हाती। धरोनि आरती परती ॥धृ॥
न धरिती मनी। काही संकोच दाटणी ॥२॥
केल्याविण नव्हे हाती। धरोनि आरती परती ॥धृ॥
तुका म्हणे देवे । ओस केल्या देहभावे ॥३॥
केल्याविण नव्हे हाती। धरोनि आरती परती ॥धृ॥
३१३ पृ ५८ (संताजी), ११५३ पृ १९५ (शिरवळकर), २८३८ पृ ४७६(शासकीय)
कृष्ण जन्म अभंग
५
गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही लेखा ॥१॥
बाळकृष्ण नंदा घरी । आनंदल्या नरनारी ॥धृ॥
गुढिया तोरणे । करिती कथा गाती गाणे ॥२॥
बाळकृष्ण नंदा घरी । आनंदल्या नरनारी ॥धृ॥
तुका म्हणे छंदे । येणे वेधिली गोविंदे ॥३॥
बाळकृष्ण नंदा घरी । आनंदल्या नरनारी ॥धृ॥
३१४ पृ ५८ (संताजी), ११५४ पृ १९५ (शिरवळकर), २८३९ पृ ४७६(शासकीय)
कृष्ण जन्म अभंग
६
विटंबिले भट । दिला पाठीवरी पाट ॥१॥
खोटे जाणोनि अंतर । न साहे चि विश्वंभर ॥धृ॥
ते चि करी दान । जैसे आइके वचन ॥२॥
खोटे जाणोनि अंतर । न साहे चि विश्वंभर ॥धृ॥
तुका म्हणे देवे । पूतना शोषियेली जीवे ॥३॥
खोटे जाणोनि अंतर । न साहे चि विश्वंभर ॥धृ॥
३१५ पृ ५८ (संताजी), ११५५ पृ १९५ (शिरवळकर), २८४० पृ ४७६(शासकीय)
रूपाचे अभंग
१
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।
तेथे माझी हरी वृत्ती राहो ॥१॥
आणिक न लगे मायिक पदार्थ ।
तेथे माझे आर्त नको देवा॥ध्रु॥

ब्रम्हादिक पदे दुःखाची शिराणी ।
तेथे दुश्चित झणी जडो देसी ॥२॥
आणिक न लगे मायिक पदार्थ ।
तेथे माझे आर्त नको देवा॥ध्रु॥
तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म ।
जे जे कर्म धर्म नाशिवंत॥३॥
आणिक न लगे मायिक पदार्थ ।
तेथे माझे आर्त नको देवा॥ध्रु॥
१ पृष्ठ १ (देहूकर सांप्रदायिक), १ पृष्ठ १ (शासकीय)
२

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवुनिया ॥१॥
तुळसी हार गळा कासे पीतांबर ।
आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥
मकर कुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणी विराजित ॥२॥
तुळसी हार गळा कासे पीतांबर ।
आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीने ॥३॥
तुळसी हार गळा कासे पीतांबर ।
आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥
२ पृष्ठ १ (देहूकर सांप्रदायिक), २ पृष्ठ १ (शासकीय)
३

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्वकाळ ॥ध्रु॥
विठो माउलिये हाची वर देई ।
संचरोनी राही हृदयामाजी ॥२॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्वकाळ ॥ध्रु॥
तुका म्हणे काही न मागे आणिक ।
तुझे पायी सुख सर्व आहे ॥३॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्वकाळ ॥ध्रु॥
४३३ पृष्ठ ९४ (देहूकर सांप्रदायिक), ३ पृष्ठ १ (शासकीय)
४

राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरी मळवट चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठी वैजयंती ॥२॥
मुकुट कुंडले श्रीमुख शोभले ।
सुखाचे ओतले सकळ ही ॥३॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा ।
घननीळ सांवळा बाइयानो ॥४॥
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा।
तुका म्हणे जीवा धीर नाही ॥५॥
४३४ पृष्ठ ९४ (देहूकर सांप्रदायिक), ४ पृष्ठ १ (शासकीय)
५

कर कटावरी तुळसीच्या माळा ।
ऐसे रूप डोळा दावी हरी ॥१॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी ।
ऐसे रूप हरी दावी डोळा ॥२॥
कटी पीतांबर कास मिरवली ।
दाखवी वहिली ऐसी मूर्ती ॥३॥
गरुडपारावरी उभा राहिलासी ।
आठवे मानसी तेची रूप ॥४॥
झुरोनी पांजरा होऊ पाहे आता ।
येई पंढरीनाथा भेटावया ॥५॥
तुका म्हणे माझी पुरवावी आस ।
विनंती उदास करू नये ॥६॥
४३५ पृष्ठ ९४ (देहूकर सांप्रदायिक), ५ पृष्ठ २ (शासकीय)
६

गरुडाचे वारिके कासे पीतांबर ।
सांवळे मनोहर कै देखेन ॥१॥
बरवया बरवंटा घनमेघ सावळा ।
वैजयंतीमाळा गळा शोभे ॥२॥
मुकुट माथा कोटी सूर्यांचा झळाळ ।
कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ॥३॥
श्रवणी कुंडले नक्षत्रे शोभती ।
रत्नप्रभा दीप्ती दंतावळी ॥४॥
ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ ।
वामांगी वेल्हाळ रखुमादेवी ॥५॥
उध्दव अक्रूर उभे दोही कडे ।
वर्णिती पवाडे सनकादिक ॥६॥
तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा ।
तोची माझा सखा पांडुरंग ॥७॥
४३६ पृष्ठ ९४ (देहूकर सांप्रदायिक), ६ पृष्ठ २ (शासकीय)
तुकाराम बीज
संकल्पना व छायाचित्र : संदेश भंडारे

तुकाराम बीज : फुले उधळतांना
श्री तुकोबा गोसावी सत्पुरुष हे मौजे देहू ता. हवेली , जि. पुणे येथे भागवत कथा करीत असता अदृश्य झाले हे गोष्ट विख्यात आहे.रा.तुकोबा गोसावी हे बहुत थोर सत्पुरुष होते. इ.स.१७०४ च्या देहूगावची सनद. सनद रामचंद्र नीळकंठ अमात्यांचे हातची आहे.रामचंद्र पंत छत्रपती शिवाजी राजे यांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदावरील एक प्रधान होते.

वारकरी स्त्रीया तुळशीमाळा खरेदी करतांना

गाथा वाचन

कोळी समाजाची वारकरी

जागर

गोपाळपुरी गाथा गायन

गोपाळपुरी गाथा गायन

दिंडी
तुकोबांचे अभंग - इंग्रजी अनुवाद
महात्मा गांधी (१८६९-१९४८)

महात्मा गांधी (१८६९-१९४८) यांनी कविश्रेष्ठ तुकाराम (१६०९-१६५०) यांचे १६ अभंग येरवडा कारावासात (१५-१०-१९३० ते २८-१०-१९३०) इंग्रजीत अनुवादीत केले. ‘गांधीजींच्या विचारांवर तुकारामांचाही प्रभाव’ या लेखात उस्मानाबादचे सुनील बडूरकर लिहितात - गांधीजींच्या प्रार्थनेत तुकारामांच्या अभंगाचा समावेश होता. नागपूरचे डॉ. इंदुभूषण भिंगारे व कृष्णराव
देशमुख यांनी ‘श्रीसंत तुकारामांची राष्ट्रगाथा’ हा संग्रह १९४५ साली प्रकाशित केला. त्या ग्रंथास स्वत: गांधींनीच प्रस्तावना लिहिली. त्यात “तुकाराम मुझे बहुत प्रिय है.” असे त्यांनी नमूद केले आहे. एवढेच नव्हे,तर त्या संग्रहात समाविष्ट करण्यासाठी शांतिनिकेतनमधील प्रसिध्द चित्रकार नंदलाल बोस यांना खास विनंती करून गांधींनी तुकारामांचे चित्र काढून घेतले. गांधी-तुकाराम-शांतिनिकेतन याची एकत्र गुंफण ज्या ‘सुता’ने झाली, त्यास कोणती संस्कृती म्हणावे, हा प्रश्न मनात येतो. दुष्काळाच्या होरपळीतून अनुभवलेल्या मानवी समाजाच्या विराट दु:खाने तुकोबांच्या चिंतनाचा स्फोट झाला. सर्वांगीण, चिरंतन, वैश्विक

तुकाराम - नंदलाल बोस
महाकवी अशी मला भावलेली तुकारामांची ओळख आहे. काळांतराने तुकारामांचे विश्वरूप हळूहळू जाणिवांच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर भिनत गेले. तरी मनात प्रश्न पडतच असे - “तुकारामांच्या असीम अवकाशाला गवसणी घालण्याची ताकद कुणात आहे ? त्याचे उत्तर आता सहज मिळाले आहे. काळाच्याही पुढे ज्यांच्या चिंतनाचा वावर आहे, असा ‘माणूस’ असणाऱ्या महात्म्यानेच तुकारामांना आपल्या उराशी धरले आहे ! या पारलौकिक सत्याला दोन अवकाशांचे मीलन असे म्हणावे का ? ”
१.
जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥धृ॥
मॄदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ॥२॥
ज्यासी आपंगिता नाही । त्यासी धरी जो हॄदयी ॥३॥
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥४॥
तुका म्हणे सांगू किती । तोचि भगवंताची मूर्ती ॥५॥
Know him to be a true man who takes to his bosom those who are in distress. Know that God resides in the heart of such a one. His heart is saturated with gentleness through and through. He receives as his only those who are forsaken. He bestows on his man servants and maid servants the same affection he shows to his children. Tukaram says: What need is there to describe him further? He is the very incarnation of divinity
15-10-1930
२.
पापाची वासना नको दावू डोळा । त्याहुनि अंधळा बराच मी ॥१॥
निंदेचे श्रवण नको माझे कानी । बधिर करोनि ठेवी देवा ॥२॥
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याजहुनि मुका बराच मी ॥३॥
नको मज कधी परस्त्रीसंगति । जनातुन माती उठता भली ॥४॥
तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा । तू एक गोपाळा आवडसी ॥५॥
O God, let me not be witness to desire for sin, better make me blind; let me not hear ill of anyone, better make me deaf; let not a sinful word escape my lips, better make me dumb; let me not lust after another's wife, better that I disappear from this earth. Tuka says: I am tired of everything worldly, Thee alone I like, O Gopal.
16-10-1930
३.
पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरिचे दास घेती जन्म ॥१॥
कर्म धर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥धृ॥
वर्ण़अभिमाने कोण जाले पावन । ऐसे द्या सांगुन मजपाशी ॥२॥
अंत्यजादि योनि तरल्या हरिभजने । तयाची पुराणे भाट जाली ॥३॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥४॥
कबीर मोमीन लतिब मुसलमान । सेना न्हावी जाण विष्णुदास ॥५॥
कान्होपात्रा खोदु पिंजारी तो दादु । भजनी अभेदू हरिचे पायी ॥६॥
चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥७॥
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवे ॥८॥
मैराळा जनक कोण कुळ त्याचे । महिमान तयाचे काय सांगो ॥९॥
यातायातीधर्म नाही विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्री ॥१०॥
तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणो किती ॥११॥
Blessed is that family and that country where servants of God take birth. God becomes their work and their religion. The three worlds become holy through them. Tell me who have become purified through pride of birth? The Puranas have testified like bards without reserve that those called untouchables have attained salvation through devotion to God. Tuladhar, the Vaishya, Gora, the potter, Rohidas, a tanner, Kabir, a Momin, Latif, a Muslim, Sena, a barber, and Vishnudas, Kanhopatra, Dadu, a carder, all become one at the feet of God in the company of hymn singers. Chokhamela and Banka, both Mahars by birth, became one with God. Oh, how great was the devotion of Jani the servant girl of Namdev! Pandharinath (God) dined with her. Meral Janak's family no one knows, yet who can do justice to his greatness? For the servant of God there is no caste, no varna, so say the Vedic sages. Tuka says: I cannot count the degraded.
४.
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हाती धरूनिया ॥१॥
चालो वाटे आम्ही तुझाचि आधार । चालविसी भार सवे माझा ॥धृ॥
बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केलो देवा ॥२॥
अवघे जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥३॥
तुका म्हणे आता खेळतो कौतुके । जाले तुझे सुख अंतर्बाही ॥४॥
Wherever I go, Thou art my companion. Having taken me by the hand Thou movest me. I go alone depending solely on Thee. Thou bearest too my burdens. If I am likely to say anything foolish, Thou makest it right. Thou hast removed my bashfulness and madest me self-confident, O Lord. All the people have become my guards, relatives and bosom friends. Tuka says: I now conduct myself without any care. I have attained divine peace within and without.
22-10-1930
५.
न कळता काय करावा उपाय । जेणे राहे भाव तुझ्या पायी ॥१॥
येऊनिया वास करिसी हॄदयी । ऐसे घडे कई कासयाने ॥२॥
साच भावे तुझे चिंतन मानसी । राहे हे करिसी कै गा देवा ॥३॥
लटिके हे माझे करूनिया दुरी । साच तू अंतरी येउनि राहे ॥४॥
तुका म्हणे मज राखावे पतिता । आपुलिया सत्ता पांडुरंगा ॥५॥
When one does not know, what is one to do so as to have devotion to Thy sacred feet? When will it so happen that Thou wilt come and settle in my heart? O God, when wilt Thou so ordain that I may meditate on Thee with a true heart? Remove Thou my untruth and, O Truth, come and dwell Thou in my heart. Tuka says: O Panduranga, do Thou protect by Thy power sinners like me.
६.
मुक्तिपांग नाही विष्णुचिया दासा । संसार तो कैसा न देखती ॥१॥
बैसला गोविंद जडोनिया चित्ती । आदि तेचि अंती अवसान ॥धृ॥
भोग नारायणा देऊनि निराळी । ओविया मंगळी तोचि गाती ॥२॥
बळ बुद्धि त्यांची उपकारासाटी । अमृत ते पोटी साटवले ॥३॥
दयावंत तरी देवा च सारिखी । आपुली पारखी नोळखती ॥४॥
तुका म्हणे त्यांचा जीव तोचि देव । वैकुंठ तो ठाव वसती तो ॥५॥
To the servants of Vishnu there is no yearning even for salvation; they do not want to know what the wheel of birth and death is like. Govind sits steadily settled in their hearts; for them the beginning and the end are the same. They make over happiness and misery to God and themselves remain untouched by them, the auspicious songs sing of them; their strength and their intellect are dedicated to benevolent uses; their hearts contain gentleness; they are full of mercy even like God; they know no distinction between theirs and others. Tuka says: They are even like unto God and Vaikuntha is where they live.
23-10-1930
७.
काय वाणू आता न पुरे हे वाणी । मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥
थोरीव सांडिली आपुली परिसे । नेणे सिवो कैसे लोखंडासी ॥२॥
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारे ॥३॥
भूतांची दया हे भांडवल संता । आपुली ममता नाही देही ॥४॥
तुका म्हणे सुख पराविया सुखे । अमृत हे मुखे स्रवतसे ॥५॥
How now shall I describe (the praises of the good); my speech is not enough (for the purpose). I therefore put my head at their feet. The magnet leaves its greatness and does not know that it may not touch iron. Even so good men's powers are for the benefit of the world. They afflict the body for the service of others. Mercy towards all is the stock-in-trade of the good. They have no attachment for their own bodies. Tuka says: Others' happiness is their happiness; nectar drops from their lips.
८.
नाही संतपण मिळते हे हाटी । हिंडता कपाटी रानी वनी ॥१॥
नये मोल देता धनाचिया राशी । नाही ते आकाशी पाताळी ते ॥२॥
तुका म्हणे मिळे जिवाचिये साटी । नाही तरी गोष्टी बोलो नये ॥३॥
Saintliness is not to be purchased in shops nor is it to be had for wandering nor in cupboards nor in deserts nor in forests. It is not obtainable for a heap of riches. It is not in the heavens above nor in the entrails of the earth below. Tuka says: It is a life's bargain and if you will not give your life to possess it better be silent.
24-10-1930
९.
भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले अशापाश निवारुनी ॥१॥
विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे धन जन माता पिता ॥धृ॥
निर्वाणी गोविंद असे मागेपुढे । काही च साकडे पडो नेदी ॥२॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहे । घातलिया भये नर्का जाणे ॥३॥
He is a devotee who is indifferent about body, who has killed all desire, whose one object in life is (to find) Narayana, whom wealth or company or even parents will not distract, for whom whether in front or behind there is only God in difficulty, who will not allow any difficulty to cross his purpose. Tuka says: Truth guides such men in all their doings.
१०.
वेद अनंत बोलिला । अर्थ इतकाचि शोधिला ॥१॥
विठोबासी शरण जावे । निजनिष्ठा नाम गावे ॥धृ॥
सकळ शास्त्रांचा विचार । अंती इतकाचि निर्धार ॥२॥
अठरापुराणी सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥३॥
The essence of the endless Vedas is this : Seek the shelter of God and repeat His name with all thy heart. The result of the cogitations of all the Shastras is also the same; Tuka says: The burden of the eighteen Puranas is also identical.
25-10-1930
११.
आणीक दुसरे मज नाही आता । नेमिले या चित्तापासूनिया ॥१॥
पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी । जागृती स्वप्नी पांडुरंग ॥धृ॥
पडिले वळण इंद्रिया सकळा । भाव तो निराळा नाही दुजा ॥२॥
तुका म्हणे नेत्री केले ओळखण । साजिरे ते ध्यान विटेवरी ॥३॥
This heart of mine is determined that for me now there is nothing else; I meditate on Panduranga, I think of Panduranga, I see Panduranga whether awake or dreaming. All the organs are so attuned that I have no other desire left. Tuka says: My eyes have recognized that image standing on that brick transfixed in meditation unmoved by anything.
१२.
न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥१॥
ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हेचि सांगे ॥धृ॥
विटंबो शरीर होत का विपत्ति । परि राहो चित्ती नारायण ॥२॥
तुका म्हणे नासिवंत हे सकळ । आठवे गोपाळ तेचि हित ॥३॥
What though I get nothing to eat and have no progeny? It is enough for me that Narayana's grace descends upon me. My speech gives me that advice and says likewise to the other people -Let the body suffer, let adversity befall one, enough that Narayana is enthroned in my heart. Tuka says: All the above things are fleeting; my welfare consists in always remembering Gopal.
26-10-1930
१३.
महारासी सिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥१॥
तया प्रायश्चित्त काही । देहत्याग करिता नाही ॥धृ॥
नातळे चांडाळ । त्याचा अंतरी विटाळ ॥२॥
ज्याचा संग चित्ती । तुका म्हणे तो त्या याती ॥३॥
He who becomes enraged at the touch of a Mahar is no Brahmin. There is no penance for him even by giving his life. There is the taint of untouchability in him who will not touch a Chandal. Tuka says: A man becomes what he is continually thinking of.
27-10-1930
१४.
पुण्य पऱउपकार पाप ते परपीडा । आणीक नाही जोडा दुजा यासी ॥१॥
सत्य तोचि धर्म असत्य ते कर्म । आणीक हे वर्म नाही दुजे ॥धृ॥
गति तेचि मुखी नामाचे स्मरण । अधोगति जाण विन्मुख ते ॥२॥
संतांचा संग तोचि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥३॥
Merit consists in doing good to others, sin in doing harm to others. There is no other pair comparable to this. Truth is the only religion (or freedom); untruth is bondage, there is no secret like this.God's name on one's lips is itself salvation, disregard (of the name)know to be perdition. Companionship of the good is the only heaven,studious indifference is hell. Tuka says: It is thus clear what is good and what is injurious, let people choose what they will.
१५.
शेवटची विनवणी । संतजनी परिसावी ॥१॥
विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हासी ॥धृ॥
पुढे फार बोलो काई । अवघे पायी विदित ॥२॥
तुका म्हणे पडिलो पाया । करा छाया कृपेची ॥३॥
This is my last prayer, O saintly people listen to it: O God, do not forget me; now what more need I say, Your holy feet know everything. Tuka says: I prostrate myself before Your feet, let the shadow of Your grace descend upon me.
१६.
हे चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गायीन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥धृ॥
न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥२॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ॥३॥
O God, grant only this boon. I may never forget Thee; and I shall prize it dearly. I desire neither salvation nor riches nor prosperity; give me always company of the good. Tuka says: On that condition Thou mayest send me to the earth again and again.
28-10-1930.
पक्षी




अवघी भूते साम्या आली । देखिली म्या कै होती॥१॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंग कृपेचा ॥ध्रु.॥
माझी कोणी न धरो शंका । हो का लोका निर्द्वंद्व ॥२॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंग कृपेचा ॥ध्रु.॥
तुका म्हणे जे जे भेटे । ते ते वाटे मी ऐसे ॥३॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंग कृपेचा ॥ध्रु.॥
छायाचित्र : विलास आंब्रे
अभंग निरुपण : प्रल्हाद नरहर जोशी
शब्दार्थ : भूते - प्राणीमात्र, सर्व जीव
निर्द्वंद्व- सुखदु:ख, यशापयश, आशा निराशा इत्यादी द्वंद्वांच्या पलीकडे .
अर्थ : सर्व जीवांच्या ठिकाणी एकाच हरीच्या रुपाची प्रचीती साम्यत्वाने मला कधी येइल काय ? अशी अवस्था जेव्हा निर्माण होईल तेव्हाच पांडुरंगाची खरी कृपा झाली असे मानता येईल.॥१॥
माझी भीती कुणालाही वाटू नये. माझ्याविषयी सर्व विश्वाने सुखदु:ख, भीती, आशानिराशा इत्यादी बाबतीत निर्द्वंद्व व्हावे. अशी अवस्था जेव्हा निर्माण होईल तेव्हाच पांडुरंगाची खरी कृपा झाली असे मानता येईल.॥२॥
तुकोबा म्हणतात “जो जो प्राणी मला भेटेल ते ते माझेच रुप आहे, असे वाटावे. अशी अवस्था जेव्हा निर्माण होईल तेव्हाच पांडुरंगाची खरी कृपा झाली असे मानता येईल.”॥३॥
दिनरात्री निद्रा न ये तिळभरी । तुकोबा अंतरी प्रवेशला ॥
बहेणि म्हणे येती सुखाचे डोलावे । जाणती अनुभवे जाणते जे ॥
विवरण : तुकोबांच्या आत्मानुभूतीचा एक सर्वोत्तम आविष्कार या तत्त्वदर्शी अभंगात झालेला दिसतो. सर्वत्र एकच चैतन्यतत्त्व व्यापकपणे भरुन राहिल्याचा अनुभव आपणांस यावा अशी तीव्र उत्कांठाही या अभंगात आहे. या अभंगामागे तुकोबांच्या आयुष्यातील एक लहानसा पण महत्त्वाचा प्रसंग सांगितला जातो. एकदा एकादशीच्या निमित्ताने तुकोबा आळंदीस श्रीज्ञानेश्वरांच्या दर्शनास गेले होते. दर्शन झाल्यावर त्यांनी प्रदक्षिणेस प्रारंभ केला. वाटेतील शेतात कणसे डौलाने डुलत होती. त्यावर पाखरांचा थवा मनसोक्तपणे दाणे टिपीत होता. तुकोबांना पाहाताच पक्षी उडून गेले. एक साधी घटना. पण आपल्या जाणिवेने पक्षी उडाल्याचे पाहून तुकोबा मनात चरकले. त्यांच्या मनात शंका चाटून गेली. या पाखरांना आपले भय वाटले ? ते तसे का वाटावे ? आपण चैतन्यमय, पाखरे चैतन्याचा नाजुक व सहजसुंदर आविष्कार ! जोंधळ्याची ताटेही एका बीजाच्या पोटीच फुलून आलेली ! असे असताना चैतन्याची ओळख चैतन्याला वाटावी ? की परस्परांबद्दल भय निर्माण व्हावे ? की आपल्या चैतन्यप्रतीतीमध्ये काही कमतरता आहे ? या प्रश्नांनी तुकोबांचे अंत:करण हेलावून गेले. साऱ्या विश्वातील चराचर सृष्टीत एकाच चैतन्याचा धागा अनुभविणारा हा सत्पुरुष कळवळून गेला. या साम्यत्वाची वा चैतन्यानुभूतीची प्रचीती त्वरेने यावी म्हणून तुकोबा पांडूरंगाचा धावा करु लागले. “अवघी भूते साम्या आली । देखिली म्या कै होती” अशी एक तत्त्वदर्शी ओळ त्यांच्या मुखातून स्त्रवली. आपली भीती कुणासच वाटू नये, एकच चैतन्यस्वरुप असणारे सर्व भूतमात्र साम्यत्वाने आपणांस अनुभवास यावेत, जे जे आपणांस भेटेल ते ते स्वत:प्रमाणेच वाटावे, अशी फार मोठी झेप तुकाबांच्या मनाने या अभंगात घेतली आहे. पांडूरंगाची पूर्ण कृपा झाली. चैतन्यानुभूतीचा आविष्कार रोमरोमांत थबथबून गेला. निर्भयता प्रगटली. मग पूर्वी भीतीने उडून गेलेली पाखरे तुकोबांच्या अंगाखांद्यावर निर्भयपणे खेळू लागली ! तुकोबांच्या नामस्मरणात सामील झाली. द्वंद्वातीत अवस्थेत तुकोबा रमून गेले.



काउळा, काग
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचे ॥१॥
अंतरीची बुध्दि खोटी । भरले पोटी वाईट ॥धृ॥
काय उंदीर नाही धांवी । राख लावी गाढव ॥२॥
अंतरीची बुध्दि खोटी । भरले पोटी वाईट ॥धृ॥
तुका म्हणे सुसर जळी । काउळी का न न्हाती ॥३॥
अंतरीची बुध्दि खोटी । भरले पोटी वाईट ॥धृ॥


छायाचित्र : © उमंग दत्त
वसने थिल्लरी । बेडुक सागरा धिक्कारी ॥१॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥
फुगाते काउळे । म्हणे मी राजहंसा आगळे ॥२॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥
गजाहूनि खर । म्हणे चांगला मी फार ॥३॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥
मुलाम्याचे नाणे । तुका म्हणे नव्हे सोने ॥४॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥
***
परजन्ये पडावे आपुल्या स्वभावे । आपुलाल्या दैवे पिके भूमि ॥१॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
दीपाचिये अंगी नाही दुजाभाव । धणी चोर साव सारिखे चि ॥२॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
काउळे ढोपरा कंकर तित्तिरा । राजहंसा चारा मुक्ताफळे ॥३॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
तुका म्हणे येथे आवडी कारण । पिकला नारायण जया तैसा ॥४॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
***
लाडाच्या उत्तरी वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥१॥
तमाचे शरीरी विटाळचि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥धृ॥
कवतुके घ्यावे लेकराचे बोल । साहिलिया मोल ऐसे नाही ॥२॥
तमाचे शरीरी विटाळचि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥धृ॥
तुका म्हणे काय उपदेश खळा । न्हाउनि काउळा खते धुंडी ॥३॥
तमाचे शरीरी विटाळचि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥धृ॥
***
आणिता त्या गती । हंस काउळे न होती ॥१॥
सांडा सांडा रे मठारे । येथे गांठीसवे धुरे ॥धृ॥
नाकेविण मोती । उभ्या बाजारे फजिती ॥२॥
सांडा सांडा रे मठारे । येथे गांठीसवे धुरे ॥धृ॥
हुकुमदाज तुका । येथे कोणी फुंदो नका ॥३॥
सांडा सांडा रे मठारे । येथे गांठीसवे धुरे ॥धृ॥
***
जाळे घातले सागरी । बिंदु न राहे भीतरी ॥१॥
तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥
गाढव गंगेसी न्हाणिले । जाउनि उकरड्यावरी लोळे ॥२॥
तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥
प्रीती पोसिले काउळे । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥३॥
तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥
तुका म्हणे तैसी हरि । कीरव्या नावडे कस्तुरी॥४
तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥
***
कावळयाच्या गळा मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥
गजालागी केला कस्तुरीचा लेप । तिचे तो स्वरूप काय जाणे ॥२॥
बकापुढे सांगे भावार्थे वचन । वाउगाचि सीण होय त्यासी ॥३॥
तुका म्हणे तैसे अभाविक जन । त्यांसी वाया सीण करू नये ॥४॥
***
गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी । कोठे चराचरी त्याग केला ॥१॥
गायत्री स्वमुखे भक्षीतसे मळ । मिळाल्या वाहाळ गंगाओघ ॥२॥
कागाचिये विष्ठे जन्म पिंपळासि । पांडवकुळासि पाहाता दोष ॥३॥
शकुंतळा सूत कर्ण शृंगी व्यास । यांच्या नामे नाश पातकासि ॥४॥
गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर । पाहाता विचार पिंगळेचा ॥५॥
वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । याचे पूर्व शुध्द काय आहे ॥६॥
न व्हावी ती जाली कर्मे नरनारी । अनुतापे हरि स्मरता मुक्त ॥७॥
तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरि । मूळ जो उच्चारी नरक त्यासि ॥८॥
***
जातीचे ते चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥१॥
ते काय गुण लागती येरा । कागा पिंजरा शोभेना ॥धृ॥
शिकविले ते सुजात सोसी । मग तयासी मोल चढे ॥२॥
ते काय गुण लागती येरा । कागा पिंजरा शोभेना ॥धृ॥
तुका म्हणे वेषधारी ॥ हिजड्या नारी नव्हती ॥३॥
ते काय गुण लागती येरा । कागा पिंजरा शोभेना ॥धृ॥
***
परस्त्रीते म्हणता माता । चित्त लाजविते चित्ता ॥१॥
काय बोलोनिया तोंडे । मनामाजी कानकोंडें ॥धृ॥
धर्मधारिष्टगोष्टी सांगे । उष्टया हाते नुडवी काग ॥२॥
काय बोलोनिया तोंडे । मनामाजी कानकोंडें ॥धृ॥
जे जे कर्म वसे अंगी । ते ते आठवे प्रसंगी ॥३॥
काय बोलोनिया तोंडे । मनामाजी कानकोंडें ॥धृ॥
बोले तैसा चाले । तुका म्हणे तो अमोल ॥४॥
काय बोलोनिया तोंडे । मनामाजी कानकोंडें ॥धृ॥
***
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ?
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ?
मर्कटे अंघोळी लावियेले टिळे । ब्राम्हणाचे लीळे वर्तू नेणे ?
जरी तो ब्राम्हण जाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिही लोकी ?
***
पावलो हा देह कागतालिन्याये । न घडे उपाये घडो आले ॥१॥
आता माझी खंडी देह देहांतरे । अभय दातारे देऊनिया ॥धृ॥
अंधळयाचे पाठी धनाची चरवी । अघटित तेवि घडो आले ॥२॥
आता माझी खंडी देह देहांतरे । अभय दातारे देऊनिया ॥धृ॥
तुका म्हणे योग घडला बरवा । आता कास देवा न सोडी मी ॥३॥
आता माझी खंडी देह देहांतरे । अभय दातारे देऊनिया ॥धृ॥

छायाचित्र : © विलियम व्हॅन
रोगिया मिष्टान्न मर्कटा चंदन । कागासी लेपन कर्पूराचे ॥१॥
निर्नासिका जैसा नावडे आरिसा । मूर्खालागी तैसा शास्त्रबोध ॥धृ॥
दास तुका म्हणे विठ्ठल उदारे । अज्ञान अंधारे दूरी केले ॥२॥
कोकिळ
पतिव्रता नेणे आणिकाची स्तुती । सर्वभावे पति ध्यानी मनी ॥१॥
तैसे माझे मन एकविध जाले । नावडे विठ्ठलेविण दुजे ॥धृ॥
सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेसी ॥२॥
तैसे माझे मन एकविध जाले । नावडे विठ्ठलेविण दुजे ॥धृ॥

छायाचित्र - प्रदीप हिरुरकर
तुका म्हणे बाळ मातेपुढे नाचे । बोल आणिकाचे नावडती ॥३॥
तैसे माझे मन एकविध जाले । नावडे विठ्ठलेविण दुजे ॥धृ॥
कोंबडा
काय दिनकरा । केला कोंबड्याने खरा ॥१॥
का हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथा देवा ॥धृ॥
आडविले दासी । तरि का मरती उपवासी ॥२॥
का हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथा देवा ॥धृ॥
तुका म्हणे हाती । कळा सकळ अनंती॥३॥
का हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथा देवा ॥धृ॥

छायाचित्र - प्रदीप हिरुरकर
मागे जैसा होता माझे अंगी भाव । तैसा एक ठाव नाही आता ॥१॥
ऐसे गोही माझे मन मजपाशी । तुटी मुद्दलेसी दिसे पुढे ॥धृ॥
पुढिलांचे मना आणि गुणदोष । पूज्य आपणांस करावया ॥२॥
ऐसे गोही माझे मन मजपाशी । तुटी मुद्दलेसी दिसे पुढे ॥धृ॥
तुका म्हणे जाली कोंबडयाची परी । पुढेची उकरी लाभ नेणे ॥३॥
ऐसे गोही माझे मन मजपाशी । तुटी मुद्दलेसी दिसे पुढे ॥धृ॥
***
नारे तरी काय नुजेडे कोंबडे । करूनिया वेडे आघ्रो दावी ॥१॥
आइत्याचे साहे फुकाचा विभाग । विक्षेपाने जग छी थू करी ॥धृ॥
नेमून ठेविला करत्याने काळ । नल्हायेसे बळ करू पुढे॥२॥
आइत्याचे साहे फुकाचा विभाग । विक्षेपाने जग छी थू करी ॥धृ॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहे । घातलिया भये नर्का जाणे ॥३॥
आइत्याचे साहे फुकाचा विभाग । विक्षेपाने जग छी थू करी ॥धृ॥
घार
पाहा कैसे कैसे । देवे उध्दरिले अनायासे ॥१॥
ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥धृ॥
कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बैसला ॥२॥
ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥धृ॥
पांखांच्या फडत्कारी । उध्दरुनी नेली घारी ॥३॥
ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥धृ॥

छायाचित्र - विलास आंब्रे
खेचरे पिंडी दिला पाव । त्या पूजने धाये देव ॥४॥
ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥धृ॥
तुका म्हणे भोळा । स्वामी माझा हो कोंवळा ॥५॥
ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥धृ॥
घुबड
ऐसे पुढती मिळता आता । नाही सत्ता स्वतंत्र ॥१॥
म्हणउनि फावले ते घ्यावे । नाम गावे आवडी ॥धृ॥
संचित प्रारब्ध गाढे । धांवे पुढे क्रियमाण ॥२॥
म्हणउनि फावले ते घ्यावे । नाम गावे आवडी ॥धृ॥
तुका म्हणे घुबडा ऐसे । जन्म सरिसे शुकराचे ॥३॥
म्हणउनि फावले ते घ्यावे । नाम गावे आवडी ॥धृ॥

छायाचित्र - प्रदीप हिरुरकर
चकोर
भेटीलागी जीवा लागलीसे आस । पाहे रात्री दिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्र चकोराचे जीवन । तैसे माझे मन वाट पाहे ॥धृ॥
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥२॥
पूर्णिमेचा चंद्र चकोराचे जीवन । तैसे माझे मन वाट पाहे ॥धृ॥
भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥३॥
पूर्णिमेचा चंद्र चकोराचे जीवन । तैसे माझे मन वाट पाहे ॥धृ॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावी देवा ॥४॥
पूर्णिमेचा चंद्र चकोराचे जीवन । तैसे माझे मन वाट पाहे ॥धृ॥

तुझे प्रेम माझ्या हृदयी आवडी । चरण न सोडी पांडुरंगा ॥१॥
कासया सिनसी थोरिवा कारणे । काय तुझे उणे होइल देवा ॥धृ॥
चातकाची चिंता हरली जळधरे । काय त्याचे सरे थोरपण ॥२॥
कासया सिनसी थोरिवा कारणे । काय तुझे उणे होइल देवा ॥धृ॥
चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याची कळा न्यून होय ॥३॥
कासया सिनसी थोरिवा कारणे । काय तुझे उणे होइल देवा ॥धृ॥
तुका म्हणे मज अनाथा सांभाळी । हृदयकमळी स्थिर राहे ॥४॥
कासया सिनसी थोरिवा कारणे । काय तुझे उणे होइल देवा ॥धृ॥
***
मृगाचिये अंगी कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥१॥
भाग्यवंत घेती वेचूनिया मोले । भारवाही मेले वाहता ओझे ॥धृ॥
चंद्रामृते तृप्ति पारणे चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥२॥
भाग्यवंत घेती वेचूनिया मोले । भारवाही मेले वाहता ओझे ॥धृ॥
अधिकारी येथे घेती हातवटी । परीक्षावंता दृष्टी रत्न जैसे ॥३॥
भाग्यवंत घेती वेचूनिया मोले । भारवाही मेले वाहता ओझे ॥धृ॥
तुका म्हणे काय अंधळिया हाती । दिले जैसे मोती वाया जाय ॥४॥
भाग्यवंत घेती वेचूनिया मोले । भारवाही मेले वाहता ओझे ॥धृ॥
***
कामिनीसी जैसा आवडे भ्रतार । इच्छीत चकोर चंद्र जैसा ॥१॥
तैसी हे आवडी विठ्ठलाचे पायी । लागलिया नाही गर्भवास ॥धृ॥
दुष्काळे पीडिल्या आवडे भोजन । आणिक जीवन तृषाक्रांता ॥२॥
तैसी हे आवडी विठ्ठलाचे पायी । लागलिया नाही गर्भवास ॥धृ॥
कामातुर जैसा भय लज्जा सांडोनी । आवडे कामिनी सर्वभावे ॥३॥
तैसी हे आवडी विठ्ठलाचे पायी । लागलिया नाही गर्भवास ॥धृ॥
तुका म्हणे तैसी राहिली आवडी । पांडुरंग थडी पाववील ॥४॥
तैसी हे आवडी विठ्ठलाचे पायी । लागलिया नाही गर्भवास ॥धृ॥
चातक

छायाचित्र - प्रदीप हिरुरकर
लेकरा लेववी माता अळंकार ।
नाही अंतपार आवडीसी ॥१॥
कृपेचे पोसणे तुमचे मी दीन ।
आजी संतजन मायबाप ॥धृ॥
आरुषा उत्तरी संतोषे माऊली ।
कवळूनि घाली हृदयात ॥२॥
कृपेचे पोसणे तुमचे मी दीन ।
आजी संतजन मायबाप ॥धृ॥
पोटा आले त्याचे नेणे गुणदोष ।
कल्याणची असे असावे हे ॥३॥
कृपेचे पोसणे तुमचे मी दीन ।
आजी संतजन मायबाप ॥धृ॥
मनाची ते चाली मोहाचिये सोई ।
ओघें गंगा काई परतो जाणे ॥४॥
कृपेचे पोसणे तुमचे मी दीन ।
आजी संतजन मायबाप ॥धृ॥
तुका म्हणे कोठे उदार मेघा शक्ति ।
माझी तृषा किती चातकाची ॥५॥
कृपेचे पोसणे तुमचे मी दीन ।
आजी संतजन मायबाप ॥धृ॥
***
अधीरा माझ्या मना ऐक एकी मात । तू का रे दुश्चित निरंतर ॥१॥
हेचि चिंता काय खावे म्हणऊनि । भले तुजहूनि पक्षिराज ॥२॥
पाहा ते चातक नेघे भूमिजळा । वरुषे उन्हाळा मेघ तया ॥३॥
सकळ यातींमध्ये ठक हा सोनार । त्याघरी व्यापार झारियाचा ॥४॥
तुका म्हणे जळी वनी जीव एक । तयापाशी लेख काय असे ॥५॥
***
मातेविण बाळा । आणिक न माने सोहळा ॥१॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृ॥
वाट पाहेमेघा बिंदु । नेघे चातक सरिता सिंधू ॥२॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृ॥
सारसासी निशी । ध्यान रवीच्या प्रकाशी ॥३॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृ॥
जीवनाविण मत्स्य । जैसे धेनूलागी वत्स ॥४॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृ॥
पतिव्रते जिणे । भ्रताराच्या वर्तमाने ॥५॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृ॥
कृपणाचे धन । लोभालागी जैसे मन ॥६॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृ॥
तुका म्हणे काय । तुजविण प्राण राहे ॥७॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृ॥
***
वांजा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥१॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥
चातक पाखरू । त्यासी वर्षे मेघधारु ॥२॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥
पक्षी राजहंस । अमोलिक मोती त्यास॥३॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥
तुका म्हणे देवा । का गा खोचलासी जीवा ॥४॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥
***
कासया या लोभे केले आर्तभूत । सांगा माझे चित्त नारायणा ॥१॥
चातकाचे परी एकचि निर्धार । लक्ष भेदी तीर फिरो नेणे ॥धृ॥
सावळे रूपडे चतुर्भुज मूर्ति । कृष्णनाम चित्ती संकल्प हा ॥२॥
चातकाचे परी एकचि निर्धार । लक्ष भेदी तीर फिरो नेणे ॥धृ॥
तुका म्हणे करी आवडीसी ठाव । नको माझा भाव भंगो देऊ ॥३॥
चातकाचे परी एकचि निर्धार । लक्ष भेदी तीर फिरो नेणे ॥धृ॥
***
नित्य उठोनिया खायाची चिंता । आपुल्या तू हिता नाठवीसी ॥१॥
जननीचे पोटी उपजलासी जेव्हा । चिंता तुझी तेव्हा केली तेणे ॥धृ॥
चातका लागूनि मेघ नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवी ॥२॥
जननीचे पोटी उपजलासी जेव्हा । चिंता तुझी तेव्हा केली तेणे ॥धृ॥
पक्षी वनचरे आहेत भूमीवरि । तया लागी हरि उपेक्षीना ॥३॥
जननीचे पोटी उपजलासी जेव्हा । चिंता तुझी तेव्हा केली तेणे ॥धृ॥
तुका म्हणे भाव धरुन राहे चित्ती । तरी तो श्रीपति उपेक्षीना ॥४॥
जननीचे पोटी उपजलासी जेव्हा । चिंता तुझी तेव्हा केली तेणे ॥धृ॥
***
तुझे प्रेम माझ्या हृदयी आवडी । चरण न सोडी पांडुरंगा ॥१॥
कासया सिनसी थोरिवा कारणे । काय तुझे उणे होइल देवा ॥धृ॥
चातकाची चिंता हरली जळधरे । काय त्याचे सरे थोरपण ॥२॥
कासया सिनसी थोरिवा कारणे । काय तुझे उणे होइल देवा ॥धृ॥
चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याची कळा न्यून होय ॥३॥
कासया सिनसी थोरिवा कारणे । काय तुझे उणे होइल देवा ॥धृ॥
तुका म्हणे मज अनाथा सांभाळी । हृदयकमळी स्थिर राहे ॥४॥
कासया सिनसी थोरिवा कारणे । काय तुझे उणे होइल देवा ॥धृ॥
***
पक्षीयाचे घरी नाही सामुग्री । त्याची चिंता करी नारायण ॥धृ॥
अजगर जनावर वारुळात राहे । त्याजकडे पाहे पांडुरंग ॥१॥
पक्षीयाचे घरी नाही सामुग्री । त्याची चिंता करी नारायण ॥धृ॥
चातक हा पक्षी नेघे भूमिजळ । त्यासाठी घननीळ नित्य वर्षे ॥२॥
पक्षीयाचे घरी नाही सामुग्री । त्याची चिंता करी नारायण ॥धृ॥
तुका म्हणे आम्ही पिप्पलिकाची जात । पुरवी मनोरथ पांडुरंगा ॥३॥
पक्षीयाचे घरी नाही सामुग्री । त्याची चिंता करी नारायण ॥धृ॥
***

छायाचित्र : © उमंग दत्त
धीर तो कारण एकविधभाव ।
पतिव्रते नाहो सर्वभावे ॥१॥
चातक हे जळ न पाहाती दृष्टी ।
वाट पाहे कंठी प्राण मेघा ॥२॥
सूर्यविकाशनी नेघे चंद्रामृत ।
वाट पाहे अस्त उदयाची ॥३॥
धेनु येऊ नेदी जवळी आणिका ।
आपुल्या बाळकाविण वत्सा ॥४॥
तुका म्हणे नेम प्राणांसवे साटी ।
तरी च या गोष्टी विठोबाची ॥५॥
तित्तीर
परजन्ये पडावे आपुल्या स्वभावे । आपुलाल्या दैवे पिके भूमि ॥१॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥

चित्र : पर्यावरण शिक्षण केंद्र
दीपाचिये अंगी नाही दुजाभाव ।
धणी चोर साव सारिखे चि ॥२॥
बीज ते चि फळ येईल शेवटी ।
लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
काउळे ढोपरा ककर तित्तीर ।
राजहंसा चारा मुक्ताफळे ॥३॥
बीज ते चि फळ येईल शेवटी ।
लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
तुका म्हणे येथे आवडी कारण । पिकला नारायण जया तैसा ॥४॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
पारवा
परजन्ये पडावे आपुल्या स्वभावे । आपुलाल्या दैवे पिके भूमि ॥१॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥

छायाचित्र : © उमंग दत्त

छायाचित्र : © उमंग दत्त
रज्जु धरूनिया हाती। भेडसाविली नेणती ।
कळों येता चित्ती। दोरी दोघा सारिखी ॥१॥
तुम्हा आम्हा मध्ये हरि । जाली होती तैसी परी ।
मृगजळाच्या पुरी । ठाव पाहो तरावया ॥धृ॥
सरी चिताक भोंवरी । अळंकाराचिया परी ।
नामे जाली दुरी । एक सोने आटिता ॥२॥
तुम्हा आम्हा मध्ये हरि । जाली होती तैसी परी ।
मृगजळाच्या पुरी । ठाव पाहो तरावया ॥धृ॥
पिसांची पारवी । करोनि बाजागिरी दावी ।
तुका म्हणे तेवी । मज नको चाळवू ॥३॥
तुम्हा आम्हा मध्ये हरि । जाली होती तैसी परी ।
मृगजळाच्या पुरी । ठाव पाहो तरावया ॥धृ॥
तुका म्हणे येथे आवडी कारण । पिकला नारायण जया तैसा ॥४॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
पुंसा, शुक (पोपट)
परजन्ये पडावे आपुल्या स्वभावे । आपुलाल्या दैवे पिके भूमि ॥१॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥

छायाचित्र : © उमंग दत्त
सिकविला तैसा पढो जाणे पुंसा ।
कैंची साच दशा तैसी अंगी ।
स्वप्नींच्या सुखे नाही होत राजा ।
तैसा दिसे माझा अनुभव ॥१॥
कासया हा केला जिहुवे अळंकार ।
पायासी अंतर दिसतसे ॥धृ॥
दर्पणीचे धन हातीना पदरी ।
डोळा दिसे परी सत्याचिये ।
आस केली तरी लाळची घोटावी ।
ठकाठकी तेवी दिसतसे ॥२॥
कासया हा केला जिहुवे अळंकार ।
पायासी अंतर दिसतसे ॥धृ॥
कवित्वे रसाळ वदविली वाणी । साक्ष ही पुराणी घडे ऐसी ।
तुका म्हणे गुरे राखोनि गोवारी । माझी म्हणे परी लाभ नाही ॥३॥
कासया हा केला जिहुवे अळंकार । पायासी अंतर दिसतसे ॥धृ॥
***
माकडे मुठी धरिले फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथे ॥१॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुले ते ॥धृ॥
शुके नळिकेशी गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुले ते ॥धृ॥
तुका म्हणे एक ऐसे पशु जीव । न चले उपाव काही तेथे॥३॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुले ते ॥धृ॥
***
संदेह बाधक आपआपणया ते । रज्जुसर्पवत भासतसे।
भेऊनिया काय देखिले येणे । मारे घाये विण लोळतसे ॥१॥
आपणची तारी आपण चि मारी । आपण उध्दरी आपणया ।
शुकनळिकेन्याये गुंतलासी काय । विचारूनि पाहे मोकळिया ॥धृ॥
पापपुण्य कैसे भांजिले अख । दशकाचा एक उरविला ।
जाणोनिया काय होतोसी नेणता । शून्या ठाव रिता नाही नाही ॥२॥
आपणची तारी आपण चि मारी । आपण उध्दरी आपणया ।
शुकनळिकेन्याये गुंतलासी काय । विचारूनि पाहे मोकळिया ॥धृ॥
दुरा दृष्टी पाहे न्याहाळूनि । मृगजला पाणी न म्हणे चाडा ।
धांवता चि फुटे नव्हे समाधान । तुका म्हणे जाण पावे पीडा ॥३॥
आपणची तारी आपण चि मारी । आपण उध्दरी आपणया ।
शुकनळिकेन्याये गुंतलासी काय । विचारूनि पाहे मोकळिया ॥धृ॥
बगळा

छायाचित्र : प्रदीप हिरुरकर
कावळयाच्या गळा मुक्ताफळमाळा ।
तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥
गजालागी केला कस्तुरीचा लेप ।
तिचे तो स्वरूप काय जाणे ॥२॥
बकापुढे सांगे भावार्थे वचन ।
वाउगाचि सीण होय त्यासी ॥३॥
तुका म्हणे तैसे अभाविक जन ।
त्यांसी वाया सीण करू नये ॥४॥
***
जळो प्रेमा तैसा रंग । जाय भुलोनि पतंग ॥१॥
सासूसाठी रडे सून । भाव अंतरीचा भिन्न ॥धृ॥
मैंद मुखीचा कोंवळा। भाव अंतरी निराळा ॥२॥
सासूसाठी रडे सून । भाव अंतरीचा भिन्न ॥धृ॥
जैसी वृंदावनकाती । उत्तम धरू नये हाती॥३॥
सासूसाठी रडे सून । भाव अंतरीचा भिन्न ॥धृ॥
बक ध्यान धरी । सोंग करूनि मासे मारी ॥४॥
सासूसाठी रडे सून । भाव अंतरीचा भिन्न ॥धृ॥

छायाचित्र : © विलियम व्हॅन
तुका म्हणे सर्प डोले । तैसा कथेमाजी खुले ॥५॥
सासूसाठी रडे सून । भाव अंतरीचा भिन्न ॥धृ॥

छायाचित्र : © विलियम व्हॅन
देवाचे भजन का रे न करीसी ।
अखंड हव्यासी पीडतोसी ॥१॥
देवासी शरण का रे न वजवे तैसा ।
बक मीना जैसा मनुष्यालागी ॥२॥
देवाचा विश्वास का रे नाही तैसा ।
पुत्रस्नेहे जैसा गुंतलासी ॥३॥
का रे नाही तैसी देवाची हे गोडी ।
नागवूनी सोडी पत्नी तैसी ॥४॥
का रे नाही तैसे देवाचे उपकार ।
माया मिथ्या भार पितृपूजना ॥५॥
का रे भय वाहासी लोकाचा धाक ।
विसरोनि एक नारायण ॥६॥
तुका म्हणे का रे घातले वाया ।
अवघे आयुष्य जाया भक्तिविण ॥७॥

छायाचित्र : © विलियम व्हॅन
भाव नाही काय मुद्रा वाणी ।
बैसे बगळा निश्चळ ध्यानी ॥१॥
न मनी नाम न मनी त्यासी ।
वाचाळ शब्द पिटी भासी ॥धृ॥
नाही चाड देवाची काही ।
छळणे टोंके तस्करघाई ॥२॥
न मनी नाम न मनी त्यासी ।
वाचाळ शब्द पिटी भासी ॥धृ॥
तुका म्हणे त्याचा संग ।
नको शब्द स्पर्शअंग ॥३॥
न मनी नाम न मनी त्यासी ।
वाचाळ शब्द पिटी भासी ॥धृ॥
***
करिता वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा ॥१॥
हे तो झोंडाईचे चाळे । काय पोटी ते न कळे ॥धृ॥
आरगुणी मुग । बैसलासी जैसा बग ॥२॥
हे तो झोंडाईचे चाळे । काय पोटी ते न कळे ॥धृ॥
तुका म्हणे किती । बुडविली आळविती ॥३॥
हे तो झोंडाईचे चाळे । काय पोटी ते न कळे ॥धृ॥
***
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचे ॥१॥
अंतरीची बुध्दि खोटी । भरले पोटी वाईट ॥धृ॥
काय उंदीर नाही धांवी । राख लावी गाढव ॥२॥
अंतरीची बुध्दि खोटी । भरले पोटी वाईट ॥धृ॥
तुका म्हणे सुसर जळी । काउळी का न न्हाती ॥३॥
अंतरीची बुध्दि खोटी । भरले पोटी वाईट ॥धृ॥
भोरड्या

छायाचित्र : © उमंग दत्त
देह जाईल जाईल ।
यासी काळ बा खाईल ॥१॥
का रे नुमजसी दगडा ।
कैचे हत्ती घोडे वाडा ॥२॥
लोडें बालिस्ते सुपती ।
जरा आलिया फजिती ॥३॥
शरीरसंबंधाचे नाते ।
भोरड्या बुडविती सेताते ॥४॥
अझुनि तरी होई जागा ।
तुका म्हणे पुढे दगा ॥५॥

छायाचित्र : © उमंग दत्त
मयूर, मोर
न लगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥१॥
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरेना ॥धृ॥
सूर्य नाही जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हून ॥२॥
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरेना ॥धृ॥
तुका म्हणे मेघ नाचवी मयूरे । लपविता खरे येत नाही ॥३॥
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरेना ॥धृ॥

छायाचित्र : विलास आंब्रे
पैल सावळे तेज पुंजाळ कैसे । सिरी तुर्बिली साजिरी मोरवीसे ।
हरे त्यासि रे देखता ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥१॥
जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा ।
शोभे मध्यभागी कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठी ॥२॥
असे यादवा श्रेष्ठ हा चक्रपाणि । जया वंदिती कोटि तेहतीस तीन्ही ।
महाकाळ हे कापती दैत्य ज्यासी । पाहा सांवळे रूप हे पापनासी ॥३॥
कसी पाउले साजिरी कुंकुमाची । कसी वीट हे लाधली दैवाची ।
जया चिंतिता अग्नि हा शांति नीवे। धरा मानसी आपला देहभाव ॥४॥
मुनी देखता मूख हे चित्त ध्याय। देह मांडला भाव हा बापमाय ।
तुक्या लागले मानसी देवपीसे । चित्त चोरटे सावळे रूप कैसे ॥५॥

छायाचित्र : प्रदीप हिरुरकर
भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती ।
पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती ॥१॥
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनि चरणी ठेवीन माथा ॥धृ॥
काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती ।
कोटि ब्रम्हहत्या मुख पाहता जाती॥२॥
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनि चरणी ठेवीन माथा ॥धृ॥
राही रखुमाई दोही दो बाही ।
मयूर पिच्छचामरे ढाळिति ठायी ठायी ॥३॥
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनि चरणी ठेवीन माथा ॥धृ॥
तुका म्हणे दीप घेऊनि उन्मनति शोभा ।
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥४॥
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनि चरणी ठेवीन माथा ॥धृ॥
ससाना
परजन्ये पडावे आपुल्या स्वभावे । आपुलाल्या दैवे पिके भूमि ॥१॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥


छायाचित्र : प्रदीप हिरुरकर
सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे ।
प्रेम मिठी पडे वदनासी ॥१॥
व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी ।
आला दुराचारी पारधी तो ॥२॥
वृक्षाचिया माथा सोडिला ससाना ।
धनुष्यासि बाणा लावियेले ॥३॥
तये काळी तुज पक्षी आठविती ।
धावे गा श्रीपती मायबापा ॥४॥
उडोनिया जाता ससाना मारील ।
बैसता विंधील पारधी तो ॥५॥
ऐकोनिया धावा तया पक्षियाचा ।
धरिला सर्पाचा वेष वेगी ॥६॥
डंखोनि पारधी भुमीसि पाडिला ।
बाण तो लागला ससान्यासी ॥७॥
ऐसा तू कृपाळु आपुलिया दासा ।
होसील कोंवसा संकटीचा ॥८॥
तुका म्हणे तुझी कीर्ति त्रिभुवना ।
वेदाचिये वाणी वर्णवेना ॥९॥
सारस
मातेविण बाळा । आणिक न माने सोहळा ॥१॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृ॥
वाट पाहेमेघा बिंदु । नेघे चातक सरिता सिंधू ॥२॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृ॥
सारसासी निशी । ध्यान रवीच्या प्रकाशी ॥३॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृ॥

छायाचित्र : विलास आंब्रे
जीवनाविण मत्स्य । जैसे धेनूलागी वत्स ॥४॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृ॥
पतिव्रते जिणे । भ्रताराच्या वर्तमाने ॥५॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृ॥
कृपणाचे धन । लोभालागी जैसे मन ॥६॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृ॥
तुका म्हणे काय । तुजविण प्राण राहे ॥७॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृ॥
साळुंकी

छायाचित्र : प्रदीप हिरुरकर

छायाचित्र : © उमंग दत्त
आपुलिया बळे नाही मी बोलत ।
सखा भगवंत वाचा त्याची ॥१॥
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी ।
शिकविता धणी वेगळाची ॥धृ॥
काय म्या पामरे बोलावी उत्तरे ।
परी त्या विश्वंभरे बोलविले ॥२॥
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी ।
शिकविता धणी वेगळाची ॥धृ॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा ।
चालवी पांगळा पायाविण ॥३॥
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी ।
शिकविता धणी वेगळाची ॥धृ॥
हंस
मज पाहाता हे लटिके सकळ । कोठे मायाजाळ दावी देवा ॥१॥
कोणाचा कोणासी न धरे संबंध । आहे शुध्दबुध्द ठायीचे ठायी ॥धृ॥
काढा काढा जी मोह बुंथा जाळ । नका लावू बळे वेड आम्हा ॥२॥
कोणाचा कोणासी न धरे संबंध । आहे शुध्दबुध्द ठायीचे ठायी ॥धृ॥
जीव शिव का ठेवियेली नांवे । सत्य तुम्हा ठावे असोनिया ॥३॥
कोणाचा कोणासी न धरे संबंध । आहे शुध्दबुध्द ठायीचे ठायी ॥धृ॥
सेवेच्या अभिळासे न धराची विचार । आम्हा दारोदार हिंडविले ॥४॥
कोणाचा कोणासी न धरे संबंध । आहे शुध्दबुध्द ठायीचे ठायी ॥धृ॥
आहे तैसे आता कळलियावरी । परते सांडा दुरी दुजेपण ॥५॥
कोणाचा कोणासी न धरे संबंध । आहे शुध्दबुध्द ठायीचे ठायी ॥धृ॥
तुका म्हणे काय छायेचा अभिलाष। हंस पावे नाश तारागणी ॥६॥
कोणाचा कोणासी न धरे संबंध । आहे शुध्दबुध्द ठायीचे ठायी ॥धृ॥

छायाचित्र : प्रदीप हिरुरकर
क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो ॥१॥
आता झडझडा चाले । देई उचलू पाउले ॥धृ॥
सांडी हंसगती । बहु उत्कंठा हे चित्ती॥२॥
आता झडझडा चाले । देई उचलू पाउले ॥धृ॥
तुका म्हणे आई । श्रीरंगे विठाबाई ॥३॥
आता झडझडा चाले । देई उचलू पाउले ॥धृ॥
***
आणिता त्या गती । हंस काउळे न होती ॥१॥
सांडा सांडा रे मठारे । येथे गांठीसवे धुरे ॥धृ॥
नाकेविण मोती । उभ्या बाजारे फजिती ॥२॥
सांडा सांडा रे मठारे । येथे गांठीसवे धुरे ॥धृ॥
हुकुमदाज तुका । येथे कोणी फुंदो नका ॥३॥
सांडा सांडा रे मठारे । येथे गांठीसवे धुरे ॥धृ॥
***
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ?
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ?
मर्कटे अंघोळी लावियेले टिळे । ब्राम्हणाचे लीळे वर्तू नेणे ?
जरी तो ब्राम्हण जाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिही लोकी ?
राजहंस
वसने थिल्लरी । बेडुक सागरा धिक्कारी ॥१॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥
फुगाते काउळे । म्हणे मी राजहंसा आगळे ॥२॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥

गजाहूनि खर । म्हणे चांगला मी फार ॥३॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥
मुलाम्याचे नाणे । तुका म्हणे नव्हे सोने ॥४॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥
***
परजन्ये पडावे आपुल्या स्वभावे । आपुलाल्या दैवे पिके भूमि ॥१॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
दीपाचिये अंगी नाही दुजाभाव । धणी चोर साव सारिखे चि ॥२॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥

काउळे ढोपरा ककर तितिरा । राजहंसा चारा मुक्ताफळे ॥३॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
तुका म्हणे येथे आवडी कारण । पिकला नारायण जया तैसा ॥४॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
***
मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची॥१॥
एकाचिये अंगी दुजियाचा वास । आशा पुढे नाश सिध्द करी ॥धृ॥
आधी फळासी कोठे पावो शके । वासनेची भिकेवरी चाली ॥२॥
एकाचिये अंगी दुजियाचा वास । आशा पुढे नाश सिध्द करी ॥धृ॥
सांडा सांडा रे मठारे । येथे गांठीसवे धुरे ॥धृ॥

तुका म्हणे राजहंस ढोरा नाव । काय तया घ्यावे अळंकाराचे ॥३॥
एकाचिये अंगी दुजियाचा वास । आशा पुढे नाश सिध्द करी ॥धृ॥
***
वांजा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥१॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥
चातक पाखरू । त्यासी वर्षे मेघधारु ॥२॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥

पक्षी राजहंस । अमोलिक मोती त्यास॥३॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥
तुका म्हणे देवा । का गा खोचलासी जीवा ॥४॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥
***
नका दंतकथा येथे सांगो कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥१॥
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हा पुढे ॥धृ॥
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळाली ॥२॥
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हा पुढे ॥धृ॥

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरा गाबाळाचे काय काम ॥३॥
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हा पुढे ॥धृ॥
***
अगा ये मधुसूदना माधवा । अगा ये कमळापती यादवा ।
अगा श्रीधरा केशवा । अगा बांधवा द्रौपदीच्या ॥१॥
अगा विश्वव्यापका जनार्दना । गोकुळवासी गोपिकारमणा ।
अगा गुणनिधि गुणनिधाना । अगा मर्दना कंसाचिया ॥धृ॥
अगा सर्वोत्तमा सर्वेश्वरा । गुणातीता विश्वंभरा ।
अगा निर्गुणा निराकारा । अगा आधारा दीनाचिया ॥२॥
अगा उपमन्यसहाकारा । अगा शयना फणिवरा ।
अगा काळकृतांत असुरा । अगा अपारा अलक्षा ॥३॥
अगा वैकुंठनिवासा । अगा अयोध्यापति राजहंसा ।
अगा ये पंढरिनिवासा। अगा सर्वेशा सहजरूपा ॥४॥

अगा परमात्मा परमपुरुषा। अगा अव्यया जगदीशा ।
अगा कृपाळुवा आपुल्या दासा । तोडी भवपाशा तुका म्हणे ॥५॥
लेख
खालील लेख वाचण्यासाठी येथे Click करा.
ग्रंथ / लेखाचे नाव | लेखक / संपादक |
---|---|
धरणेकऱ्याचे अभंग | बा. ग. परांजपे |
बहेणी म्हणे हात घातला मस्तकी | दिलीप चित्रे |
तुकोबांचे अनुवादक - दिलीप पुरुषोत्तम चित्रे | दिलीप धोंडे |
तुकाराम दर्शन - प्रस्तावना | राम बापट |
पुन्हा तुकाराम | दिलीप चित्रे |
तुकोबांच्या नशिबात हे का नसावं ? | दिलीप चित्रे |
प्रस्तावना - गाथा (देहू प्रत) | डॉ. सदानंद मोरे |
मानवी जीवनाचा महाभाष्यकार | डॉ. सदानंद मोरे |
तुकारामांच्या अभंगांचा शैलीवैज्ञानिक अभ्यास | डॉ. दिलीप धोंडगे |
तुकारामाची प्रतिभा | पुरुषोत्तम यशवंत देशपांडे |
तुकाराम महाराज आणि गांधी | सचीन परब |
तुकाराम आणि शेक्सपीयर | अरुण अनंत भालेराव |
तुको बादशहा - (कविता संग्रह) - प्रस्तावना | डॉ. सदानंद मोरे |
देहू दर्शन
संकल्पना व छायाचित्र - संदीप आपटे
विठोबा-रखुमाई

गरुडाचे वारिके कासे पीतांबर । सांवळे मनोहर कै देखेन ॥१॥
बरवया बरवंटा घनमेघ सावळा । वैजयंतीमाळा गळा शोभे ॥२॥
मुकुट माथा कोटी सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ॥३॥
श्रवणी कुंडले नक्षत्रे शोभती । रत्नप्रभा दीप्ती दंतावळी ॥४॥
ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ । वामांगी वेल्हाळ रखुमादेवी ॥५॥
उध्दव अक्रूर उभे दोही कडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥६॥
तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तोची माझा सखा पांडुरंग ॥७॥
तुकोबांचे आठवे पूर्वज श्रीविश्वंभर बुवा एकनिष्ठ वारकरी होते. महाराष्ट्रात श्रीविठ्ठलाची उपासना एवढी सुंदरतेने प्रज्वलित झाली की, मूळचा हा कानडा विठ्ठल, अगदी प्राकृत मऱ्हाठा होऊन राहिला. भोळेभाळे वारकरी त्या सुंदर ध्यानाकडे पाहता पाहता संसार हरपून त्याच्या भेटीसाठी श्रीनामयाच्या आर्ततेने वारंवार पंढरीला येऊ लागले. विश्वंभर बुवांनी देवाला पाहून हृदयात एवढासाठविला की, विश्वंभराचे घर आणि कुळ सारेच आपलेसे करावे, असे विठ्ठलालाही वाटू लागले. तो विश्वंभर बुवांच्या स्वप्नात जाऊन ‘मी तुझ्याकडेच वस्तीला येतो’ म्हणून ‘आपण आंबियाच्या वनांत झोपलो आहोत’ असा दृष्टांत दिला.विश्वंभरबुवांनी गावकऱ्यासहित तेथे जाऊन हातांनी जागा उकरली. तो बुक्क्याचा सुगंध सुटून तुळशी-फुलेही विखुरलेली आढळली, आणि नंतर हल्लीचे देहूतले श्रीतुकोबारायांच्या प्रीतीतले ध्यान रुक्मिणी मातु:श्रीसह प्रगट झाले. मोठया समारंभाने बुवांनी विठूची प्रतिष्ठापना कुळपूज्य देव म्हणून केली. हल्लीच्या देवळापूर्वी या मूर्ती तुकोबांच्या पूर्वजांच्या राहत्या घरी होत्या असे समजते. अशा रमणीय स्थळी विश्वंभर बुवांनी आपल्या कुळाची राखण करण्यासाठी स्थिर केला आणि आपण यथाकाल त्याच्या चरणी विलीन झाले.
दिनरात्री निद्रा न ये तिळभरी । तुकोबा अंतरी प्रवेशला ॥
बहेणि म्हणे येती सुखाचे डोलावे । जाणती अनुभवे जाणते जे ॥p>
भंडारा

अंतरीचा रंग उमटेल व सादावील असे तुकोबांचे जीवन होते. त्यांचा दिवसातला पुष्कळसा काळ भंडारा डोंगरावर जात होता .भंडारा हे त्यांचे विशेष आवडीचे ठिकाण होते. दिवसभर तेथे अंगी रस भिनला म्हणजे देवभक्त आणि नाम यांचा संगम असलेल्या कथाकीर्तनरूपाने सकळ जनासहित ते सुख भोगावयाला, वाटावयाला गावात येत. भंडारा व भोवतालच्या परिसरात वृक्षवल्लीच्या सहवासात ते आत्मानंद गात विहरू लागले.
ध्यानी योगीराज बैसले कपाटी । लागे पाठोवाटी तयांचिया ॥१॥
तान भुक त्यांचे राखे शीत उष्ण । जाले उदासीन देहभाव ॥२॥
कोण सखे तया आणीक सोयरे । असे त्या दुसरे हरीविन ॥३॥
कोण सुख त्यांच्या जिवासी आनंद । नाही राज्यमद घडी तया ॥४॥
तुका ह्मणे विष अमृता समान । कृपा नारायण करिता होय ॥५॥

आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥२॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवश्वरु॥३॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवू रुची ॥४॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
तुका ह्मणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपणासी ॥५॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
मंदीर परिक्रमा
बहेणाबाई शिऊरकर (इ.स. १६५० ते १७००)

बहेणाबाई देहूला मुक्कामी असता, त्यांनी मंबाजी यांचे शिष्य होण्यास नकार दिल्यावर, मंबाजीने चिडून बहेणाबाईंची कपिला गाय चोरली व घरात ठेवून तिला मारले. कपिला गाईला पाठीवर मारल्याचे वळ तुकोबांच्या पाठीवर उठले. पुढे मंबाजीच्या घरी आग लागली तेव्हा लोकांनी कपिला सोडवून आणली.तुकोबांच्या पाठीवरील वरील वळ व कपिलाच्या अंगावरील वळ सारखेच आहेत हे पाहून रामेश्वर भट यांना गहिवरून आले.
रामेश्वर भटे ऐकिला वृत्तांत । धावोनी त्वरीत तेथे आले ॥१॥
तुकोबाचे तेही घेतले दर्शन । गाय तेही पूर्ण पाहियेली ॥२॥
दोहीचा पाठीचा दिसे एक भाव । रूदनी ते सर्व प्रवर्तले ॥३॥
तुकोबाचा पार वर्णीलसा कोण । कलियुगी जाण प्रल्हाद हा ॥४॥
सर्वांतर साक्षी करूनिया स्तुती । स्वमुखे रमती आपुलिया ॥५॥
बहेणी म्हणे लोक बोलती सकळ । तुकोबा केवळ पांडुरंग ॥६॥
बॅ. परांजपे यांचे शोचनीय निधन
ध्यानी मनी नसता ह.भ.प. श्री. बॅ. बा.ग. परांजपे हे दिनांक २१ ला मुंबई मुक्कामी हृदय विकाराने वैकुंठवासी झाले. पंढरीची व आळंदीची वारी करून व देहूस तीची सांगता करून ते मोठ्या आनंदाने मुंबईस स्वस्थानी गेले होते व पुढील संतवाङ्मयाच्या संशोधन कार्यास लागले होते ; त्यांच्या हातच्या पत्रावरून त्यांच्या पुढील संकल्पित उद्योगाची आपणास कल्पना येईल.
"मुंबईहून ता. ११/१२/१९५३ रोजी मी तुकाराम महाराजांचे वशंज ह.भ.प. श्रीधरबुवा गोसावी देहूकर यांना पाठविलेल्या पत्रात ते लिहितात - "ता. २०/२२ नंतर आम्हास कोर्टास सुट्टी आहे. तेव्हा प्रश्न असा आहे की, श्री. ह.भ.प. बाबासाहेब यांस देहूचे आसपास मोटार घेऊन रोज दुपारी १ वाजता बाहेर पडून ६ वाजेपर्यंत हिंडता येईल का ? ते काम एकवार केले पाहिजे इत्यादी."
यावरून ता. २२ ला नाताळच्या सुट्टीत श्रीतुकोबारायांच्या अप्रसिध्द लिखाणाच्या शोधार्थ ते हिंडायला निघणार होते. परंतु अकस्मात् त्यांचे देहावसान झाल्याने त्या कार्याची अपरिमित हानि झाली आहे.पूर्वीपासून ते संशोधन कार्यात होतेच. "English Records on Shivaji" ग्रंथ शिवचरित्र कार्यालयाने १९३१ त प्रसिध्द केला. तो त्यांच्या परिश्रमाचेच फळ होय, व त्यांच्या विद्वत्तेची साक्ष त्या ग्रथांची विस्तृत प्रस्तावनाच देते. कै. दादा महाराज सातारकर यांच्या संगतीत त्यांना संतवाङ्मयाची गोडी लागली व त्यांच्या प्रेरणेने त्यांनी तुकोबारायांच्या अभंगवाणीचा ध्यास घेतला.
देहूस जाऊन वारंवार गाथ्याची पारायणे केली. अभंग संशोधनर्थ अनेक गावीं जातीने ते हिंडले. अनेक वर्षें घालविल्यावर देहूस श्री. बाबासाहेब यांचेकडे असलेल्या श्री. तुकोबारायांच्या हातच्या वहीचे संपादन करून ती प्रसिध्द करण्याचे श्रेय संपादिले. तुकोबारायांच्या शिकवणुकीचे व त्यांच्या अभंवाणीतून प्रत्ययास येणाऱ्या क्रममालिकेचे दिग्दर्शन करणारी त्यांची प्रस्तावना प्रत्येक अभ्यासकाने मनन केले पाहिजे. हा ग्रंथ प्रसिध्द झाल्यावर त्यांनी अनेक योजना आखल्या होत्या. संताजीच्या वहीचे योग्य मूल्यमापन करणे, ज्ञानेश्वरीची पाठभेदावर उत्तम आवृत्ती तयार करणे इत्यादी कामे करण्यास त्यांनी कंबर कसली होती व अशा स्थितीतच ते इहलोक सोडून गेले.
श्री दादा महाराज सातारकर यांच्या हातून माळ धारण करणारे ते शेवटचे वारकरी होते.आषाढी, कार्तिकीस पंढरीस व कार्तिकीस आळंदीस ते नेमनिष्ठेने येत. गेल्या आषाढीस त्यांचे वडील वारल्यास २-३ झाले असताच ते पंढरीस गेले व वारी चुकू दिली नाही ! शेवटी त्या निष्ठेनेच ते श्री तुकाराम चरणी विलीन झाले.
************************
पोष्ट श्रीपूर तालुका माळशिरस येथे रहाणारे बॅ. परांजपे यांचे बंधु श्री.गोविंद गनेश परांजपे यांनी बॅ. परांजपे यांच्याबद्दल खालील माहिती पाठविली आहे.
बॅ. परांजपे यांचे संपूर्ण नाव श्री. बाबाजी गणेश परांजपे असे असून ते मु. पापडी ता. वसई जि. ठाणे येथे ता.२० जुलै १८८९ रोजी जन्मले. इतिहास प्रसिध्द चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसई प्रांत काबीज केल्यानंतर त्या प्रांतातील कामीण भागाची देशमुखी परांजपे यांच्या घराण्यात होती. पण इंग्रजांनी ते हक्क मान्य केले नाहीत व परांजपे घराण्याकडे तिकडे काही घरें व शेती फक्त उरली होती.
सरकारी नोकरीनिमित्त बॅ. परांजपे यांचे वडिलांची बदली पुण्यास झाल्यामुळे बॅ. परांजपे यांचे इंग्रजी शिक्षण नूतन मराठी विद्यालयात होऊन ते मॅट्रिकची परीक्षा ऊत्तम रीतीने पास झाले. त्यावेळचे त्यांचे सहाध्यायी महामहोपाध्याय पोतदार, श्री. ह.वी. तुळपुळे व सरदार मेहेंदळे इत्यादि होते. बॅ. मेहेंदळे यांचा विशेष परिचय झाल्याने कै. तात्यासाहेब मेहेंदळे यांच्याबरोबर इतिहास संशोधनाचे बाबतीत बरेच मार्गदर्शन झाले.
मॅट्रिकनंतर १९२७ साली ते विलायतेस बॅ. मेहेंदळे यांच्यासह जाऊन सन १९२९ साली बॅरिस्टर झाले व १९३० पासून ते मुंबई हायकोर्टात काम करू लागले. विलायतेत असतांना इण्डिया ऑफिस मधील रॅंग्लर परांजपे यांच्या सहाय्याने ईस्ट इण्डिया कंपनीच्या दप्तरातील ऐतिहासिक कागदपत्र मिळवून ते "English Records on Shivaji" म्हणून प्रसिध्द करण्यास मदत केली.
सन १९२३ सालापासून श्रीदादामहाराज सातारकर यांचा सहवास त्यांना लाभला, व त्यामुळे मूळच्या ऐतिहासिक संशोधक दृष्टीचा ओघ श्रीतुकोबारायांच्या वाङ्मयाकडे वळला. या संशोधनात त्यांनी केसरी, प्रेमबोध आदि नियतकालिकांत अनेक लेख लिहिले.
पहाटे ५ वाजतां उठून श्रीतुकाराम महाराजांचे अभंग वाचीत बसणे हा त्यांचा नित्यक्रम गेली २० वर्षे तरी चालू होता. त्यांची प्रकृति अतिशय निरोगी असे त्यामुळे त्यांना हे देवाघरचे आकस्मिक बोलावणे येईल अशी कोणालाच कल्पना नव्हती. बॅ. परांजपे हे राजकारणात लोकमान्य टिळक यांचे अनुयायी होते. त्यांचा स्वभाव फारच प्रेमळ व हळवा होता. त्यांचे निर्याण ता. २१ डिसेंबर १९५३ रोजी मुंबईस झाले.
प्रेमबोध, जानेवारी १९५४.
तुक्याची वीणा
बाबूराव बागूल
‘जेंव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाने ६०च्या दशकात खळबळ माजवणारे फुले, आंबेडकरी विचारवंत,विद्रोही साहित्यिक बाबूराव रामजी बागूल यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी नाशिक येथील विहित गाव येथे झाला.१९६० च्या दशकात मराठी साहित्यात दलित साहित्याचा प्रवास सुरू झाला.त्या प्रवाहाच्या जडणघडणीत बाबूरावांची भूमिका फार मोलाची आहे. बाबूरावांच्या साहित्यावर मार्क्सवादाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव होता. त्यांचे आयुष्य तसे कष्टातच गेले. पेट्रोलपंप, रेशन दुकानात, रेल्वेत कुली अशी कामे करत करत अखेर सुरतेत रेल्वे वर्कशॉपमध्ये नोकरी लागली खरी, पण जात आडवी आली.कारण त्यांना कोणी राहायला घरच देईना. अखेर जात चोरून सुरतेत काही दिवस राहिले. या अनुभवावरच ‘जेव्हा मी जात चोरली’ या कथासंग्रहाने खळबळ माजली. यानंतर ते लिहितच राहिले.

‘मरण स्वस्त आहे’ हा कथासंग्रह, 'आंबेडकर भारत १ आणि २' हे जातककथांच्या रूपात मांडलेले बाबासाहेबांचे चरित्र, सूड, अघोरी, पाषाण, अपूर्वा या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांच्या साहित्यातून बंडाची, नवनिर्माणतेची भाषा असते. ‘वेदा आधी तू होतास, वेदांच्या परमेश्वराआधी तू होतास’ या त्यांच्या कवितेनेही खळबळ माजवली. ‘हे माणसा’ ही त्यांची कविताही गाजली. त्यांच्या वाट्याला इतकी दु:खं आली तरीही ‘अरे ती माझी बंदूक तरी द्या, नाही तर तुक्याची वीणा तरी द्या, गावोगावी जाईन म्हणतो.....,या वीणेवर क्रांतीची कीर्तने गाईन म्हणतो.’ असे म्हणून मुंबई सोडली ती कायमचीच. अनेक मानसन्मान त्यांना मिळाले, तरीही कोणाची हांजी हांजी करणे हा त्यांचा स्वभाव नसल्याने त्यांचे म्हणावे तसे कौतुक झाले नाही. त्यांच्या निधनाने एक युगप्रवर्तक साहित्यिक हरपला. २६ मार्च २००८ रोजी त्यांचे निधन झाले. - संजय शा. वझरेकर.
तुक्याची वीणा
मी हाका मारतोय तुला
हे अदृश्य
उकळते माझे अंत:करण
आणि होताहेत आतमध्ये स्फोट
अरे स्वातंत्र्य,जवळ तरी ये,
हे महारवाडे बघ, हे दैन्य बघ,
हे दास्य बघ, हे दु:ख बघ
पण स्वातंत्र्य अदृश्यच !
अरे ती माझी बंदूक तरी द्या
नाही तर तुक्याची वीणा तरी द्या
गावोगावी जाईन म्हणतो.....
या वीणेवर क्रांतीची कीर्तने
गाईन म्हणतो.
हे माझे हात युगायुगाचे बंदिस्त
तरीही भारताचे भाग्य विधाते आहेत
तुक्याच्या साऱ्या हाका आणि आक्रोश
आणि महाकवीच्या साऱ्या स्वप्नांचे
माझे हात उद्गाते आहेत.
हे माझे प्रज्ञावंत, प्रलयकारी हात,
हे स्वातंत्र्या तू क्रियाशील कर
आणि युगयुगाच्या तृष्णा दूर कर.
वरील कविता ‘दलित साहित्य, आजचे क्रांतिविज्ञान’ या अंकातील लेख ‘बाबूराव बागूल - दलित जीवनाचा क्रांतदर्शी भाष्यकार’ मध्ये बाबूराव बागूल यांची प्र.श्री. नेरुरकरांनी घेतलेली मुलाखतीत समाविष्ट आहे.
वामांगी
अरुण कोलटकर
आपल्या आधुनिकतेची पाळेमुळे भक्ती परंपरेत शोधणारे मर्ढेकरोत्तर पिढीतले महत्त्वाचे कवी अरुण कोलटकर (१९३२-२००४) यांचा जेजुरी इंग्रजी कविता संग्रह अमेरिकेतील प्रतिष्ठित प्रकाशन संस्था द न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्सतर्फे त्यांच्या अभिजात साहित्य मालेत प्रकाशित झाला आहे. या मालेत डांटे, हेनरी जेम्स, चेकॉव व पुशकिन आहेत.
वैश्विक पातळीवर जाणाऱ्या मराठीतल्या मोजक्या कवींमध्ये कोलटकर होते. प्रवाही व विचारपूर्वक मांडणी हा त्यांचा स्थायी भाव होता. त्यातून प्रसवणारी कविता एक संपूर्ण भावचित्राचे दर्शन घडविते. त्यामूळे त्यांची कविता विश्लेषक बुध्दीला अधिक भिडणारी आहे.

Poetry India १९६६ च्या अंकात त्यांचे तुकाराम - ९, मुक्ताई -३ व जनाबाई - १ यांचे अभंगाचे अनुवाद आहेत. पुढे १९९५ मध्ये डच भाषेत 'Een Tuiltje Tukaram' या पुस्तिकेत लिओ व्हॅन दर झाल्म या कवीने कोलटकरांनी केलेले तुकारामांचे अनुवाद डच भाषेत आणले.
कोलटकरांवर तुकारामांचा प्रभाव होता.अशोक शहाणेंशी बोलता बोलता कोलटकर म्हणाले होते, “विठोबाची न् आपली डायरेक्ट ओळख नाही, तुकारामाची न् आपली आहे, अन् तुकाराम विठोबाला ओळखत होता.” त्यांच आणखी एक विधान मोठ मार्मिक होत “मरण पुढ उभ ठाकलेल असताना माणसान मोठ्ठ्यान हसाव अशी तुकारामांची कविता आहे.” अशोक शहाणे म्हणतात “हे कुणा समीक्षकाला सुचण दुरापास्त आहे. तिथ जातिवंत कवीच हवा.अरुणन तुकारामांचा रोखठोकपणा लावून धरला. इतका, की अरुणच्या बहुतेक कविता प्रत्यक्ष घटनांवर किंवा प्रत्यक्ष माणसांवर रचलेल्या आढळतात.”
मराठी संस्कृतीचे अभ्यासक जर्मनीचे गुंथर सोन्थायमर (१९३४-१९९२) यांनी हेन्निंग स्टेगम्यूलर यांच्या सहकार्याने त्यांनी निर्मित केलेल्या 'वारी'(१९८९) या लघुपटात कोलटकरांचे तुकारामांचे दोन अनुवादित अभंग घेतले आहेत. सोन्थायमर यांनी अतिशय मौलिक विवेचन केलेल आहे. ते म्हणतात “मराठी संस्कृती असेपर्यंत तुकारामांची मराठी भाषा असणार आहे. आजही अरूण कोलटकर सारखे कवी मराठीत आहेत.त्यामुळे काळजीच कारण नाही.” - दिलीप धोंडे.
वामांगी
देवळात गेलो होतो मधे
तिथ विठ्ठल काही दिसेना
रखमाय शेजारी
नुसती वीट
मी म्हणालो ऱ्हायल
रखमाय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोक ठेवायच
पायावर ठेवलेल डोक
काढून घेतल
आपल्यालाच पुढ माग
लागेल म्हणून
आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठ गेला
दिसत नाही
रख्माय म्हणाली
कुठ गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यल
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथ
कोणीही नाही
म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूच मला जरा
कमीच दिसत
दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकड जरा
होत नाही
कधी येतो कधी जातो
कुठ जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही
खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले
आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कस कुणी
सांगितल नाही
आज एकदमच मला
भेटायला धावून आल
अठ्ठावीस युगांच
एकटेपण
कवितसंग्रह - चिरीमिरी
सौजन्य : प्रास प्रकाशन
प्रकाशित काव्यसंग्रह :
मराठी:
अरूण कोलटकरच्या कविता (१९७७)
चिरीमिरी (२००४)
भिजकी वही (२००४)
द्रोण (२००४)
इंग्रजी:
Jejuri
Kala Ghoda Poems
Sarpasatra
The Boatride
पुरस्कार:
साहित्य अकादमी पुरस्कार २००५,
भिजकी वही काव्यसंग्रहासाठी.
मराठवाडा सहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार.
बहिणाबाई पुरस्कार.
राष्ट्रकुल काव्य पुरस्कार १९७६.
तुको बादशहा - श्रीकृष्ण राऊत
बाबूराव बागूल
श्रीकृष्ण राऊत यांनी मराठी कवितेत देशीय जीवन-जाणिवांच्या अंगाने काही प्रयोग केले आहेत. कवितेच्या अभिव्यक्तीचे निरनिराळे छंद, वृत्ते हाताळली. मुक्तछंदातही प्रयोगशीलता दाखविली. महाराष्ट्रात मराठी कवितेच्या छंदवृत्ती अंगांचा आणि काव्यनिर्मितीच्या अंगांचा खोलवर अभ्यास असणारे जे मोजके कवी आहेत, त्यात श्रीकृष्ण राऊतांचा समावेश करावा लागतो. कवितेची मांडणी आणि कवितेची निर्मिती ह्यांचा जाणीवपूर्वक विचार करणारा हा कवी सलगपणे काव्यनिर्मिती करूनही मराठी काव्यक्षितिजावर ठळकपणे उमटला नाही. कारण कोणत्याही एका विशिष्ट साच्यात या कवीने आपली कविता ओतली नाही. आशय, मांडणी आणि विचारसरणीच्या कोणत्याही गटाचे सदस्यत्व धारण केले नाही. विविध छंदाचे प्रयोग करून, आजच्या काळाला जिवंत करण्याचा ह्या कवीचा ध्यास, कवितेविषयी सजग नसलेल्या मराठी बाण्याने, कधी लक्षात घेण्याचा प्रयत्नच केला नाही.तुकोबांच्या देशीय काव्य परंपरेशी भिडण्याचा आजवर अनेक मराठी आणि मराठी भाषेतर कवींनी प्रयत्न केला. मधुकर केचे, दिलीप चित्रे आणि श्रीकृष्ण राऊत अशी मराठी भाषेतील कवींची उदाहरणे देता येतील. श्रीकृष्ण राऊतांची कविता म्हणजे तुकोबांच्या काव्याभिव्यक्तीचे आधुनिक काळातील पुनरूज्जीवन होय. कोणत्याही पद्घतीने स्थिरत्व न पावलेला हा कवी ताकदीचा असूनही दुर्लक्षित राहिला. 'तुको बादशहा' ही कविता, तुकोबा परंपरेत काव्यनिर्मिती करण्याचा मूलभूत प्रेरणा-स्त्रोत म्हणून ह्या कवितेकडे पाहता येते.

तुकोबांच्या वाट्याला आयुष्यभर मंबाजींसारख्यांचा-विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी-छळ आणि दु:खाचा भोगवटा आला. कविता हा शुद्घ आणि निखळ वाङ्मय प्रकार असून कवितेच्या निर्मितीचे लक्षण हे दु:खमूळ असल्याचा आजवरचा इतिहास आहे. वाल्मिकी पासून तर तुकोबांच्या काव्यनिर्मितीची साक्ष देता येते. कवी तुकोबांच्या दु:खमुळांशी भिडला आहे. तुकोबा हे संतकवी आणि महाकवी होते, म्हणून जगाच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले. समाजाच्या कळवळ्याचे अनुभवामृत असलेल्या शब्दकळेचा स्वीकार करून, मराठीत श्रीकृष्ण राऊतांची कविता तुकोबांच्या अभंगशैलीचे अनुसरण करून, 'तुको बादशहा' संग्रहातून प्रकटली आहे. - डॉ. किशोर सानप.
तुको बादशाह - श्रीकृष्ण राऊत
मंबाजी,
तुमचे आभार मानावे
तेवढे थोडेच.
तुमच्या वाकड्या सहाणेने
लावली शब्दांना अभंग धार
नि
वीणेला दिला
तुमच्या तेढ्या खुंटीने आधार.
तुमच्या दगडी भिंतीशिवाय
एवढा उसळलाच नसता
‘त्रिगुणांचा चेंडू’.
तुमच्या विज्ञानाने तर
कमालच केली मंबाजी,
पूर्वी त्यान
भिंतीला मोटार काय लावलीन्
रेड्याच्या मुखी स्पीकर काय बसवला.
अन्
आता
बनवलं
खास विमान
तुक्याचा देह उडवण्यासाठी.
तुम्ही असे टाचा उंचावून
त्याच्या शेजारी उभे राहिले
की तो आकाशाहूनही मोठा वाटतो.
साध्यासुध्या गावक-यांच्या
हृदय-सिंहासनावर
त्याला विराजित करण्यात
तुमचा वाटा आहे सिंहाचा
आणि
तोच आहे
तुमच्या मुक्तीचा मार्ग
मिळवा
तुमचा सानुनासिक स्वर
त्यांच्या घोषात-
बोऽल
तुकोऽबादशाहऽऽकीऽ
जयऽऽ!
*****
तुको बादशहा । देई शब्ददान ॥
करी धनवान । लेखणीला ॥
अगा शब्दराजा । होई कृपावंत ॥
ओत आशयात । पंचप्राण ॥
नामयाने तुज । सांगितले गुज ॥
पेर तेच बीज । अप्रतिम ॥
परम अर्थाची । पायाखाली वीट ॥
बसवावी नीट ।घडवोनी ॥
श्लील - अश्लीलाचा । करी तू निवाडा ॥
भाषेच्या कवाडा । उघडोनी ॥
*****
तुका झालासे प्रसन्न ।
माग म्हणे वरदान ॥
काय मागू मी बापडा ।
शब्द माझ्या कामी पाडा ॥
नको गरुडविमान ।
नको संतत्वाचा मान ॥
मोक्ष, मुक्ती घेई कोण ।
ज्यासी हुंगे ना तो श्वान ॥
आकाशीचा स्वर्गवास ।
खाऊ कशा संगे त्यास ॥
असे नको काहीबाही ।
घाल विठोबाचे पायी ॥
तुकाराम बोल्होबा आंबिले
अमोल बागूल
फुटून याव्यांत रक्तात, लालजर्द सांयकाळी । तुझ्या अभंग ओळी ॥
गाभुळल्या दुखण्याची गच्च काळोखी दुपार। तुझा बुडाला व्यापार ॥
पांगुळल्या देहभोगी तुझ्या हाती माझे बोट। दिसे प्रकाशाचे बेट ॥
हज्जारदा त्यांनी तुला मनसोक्त बुडवावं । दरवेळी मात्र मीही इंद्रायणीचा डोह व्हावं ॥

इंद्रायणीचा डोह
चकोर
माझी तहान सरेना
गेली कोठे चंद्रकोर
एका अक्षराच्यासाठी
माझी कविता चकोर
तुकयाच्या पुढे माझे
थिटे युध्दाचे प्रसंग
इंद्रायणीच्या गाळात
माझे रुतले अभंग
दुरावली मायबोली
जीव कासावीस झाला
अमृताशी पैजा घेत
माझा व्यापार बुडाला
************
डॉ. राजा दीक्षित,
२, भालचंद्र हाइट्स,
८४७ सदाशिव पेठ,
पुणे ४११०३०
दूरध्वनी : २४४७७८३७

‘एवढे दे पांडुरंगा’
सुरेश श्रीधर भट
कवी, पत्रकार. गझल हा वाङ्मयप्रकार मराठीत लोकप्रिय करणारे कवी. सुरवातीला काही काळ शिक्षक. नंतर पत्रकार. कविवर्य सुरेश भट ह्यांच्या लेखणीतून सिध्द झालेले साहित्य : ‘आपुलिया बळें...’, ‘रूपगंधा’, ‘एल्गार - कैफियत’, ‘रंग माझा वेगळा’, ‘गझलेची बाराखडी’ आणि ‘माझ्या कवितेचा प्रवास’. गडचिरोली येथील विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
.bmp)
जन्म : १५ एप्रिल, १९३२.
मृत्यू : १४ मार्च, २००३.
‘एवढे दे पांडुरंगा’
माझिया गीतांत वेडे
दुःख संतांचे भिनावे
वाळल्या वेलीस माझ्या
अमृताचे फूल यावे !
आशयाच्या अंबरांनी
टंच माझा शब्द व्हावा;
कोरडा माझा उमाळा
रोज माधुर्यात न्हावा !
स्पंदने ज्ञानेश्वराची
माझिया वक्षात व्हावी;
इंद्रियांवाचून मीही
इंद्रिये भोगून घ्यावी !
एकनाथाने मलाही
बैसवावे पंगतीला
नामयाहाती बनावे
हे जिणे गोपाळकाला !
माझियासाठी जगाचे
रोज जाते घर्घरावे
मात्र मी सोशीन जे जे
ते जनाईचे असावे !
मी तुकयाच्या लोचनांनी
गांजल्यांसाठी रडावे;
चोख व्यवहारात माझ्या
मी मला वाटून द्यावे !
ह्याविना काही नको रे
एवढे दे पांडुरंगा !
ह्याचसाठी मांडिला हा
मी तुझ्या दारात दंगा !
‘एवढे दे पांडुरंगा’
सुरेश श्रीधर भट
कवी, पत्रकार. गझल हा वाङ्मयप्रकार मराठीत लोकप्रिय करणारे कवी. सुरवातीला काही काळ शिक्षक. नंतर पत्रकार. कविवर्य सुरेश भट ह्यांच्या लेखणीतून सिध्द झालेले साहित्य : ‘आपुलिया बळें...’, ‘रूपगंधा’, ‘एल्गार - कैफियत’, ‘रंग माझा वेगळा’, ‘गझलेची बाराखडी’ आणि ‘माझ्या कवितेचा प्रवास’. गडचिरोली येथील विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
.bmp)
जन्म : १५ एप्रिल, १९३२.
मृत्यू : १४ मार्च, २००३.
‘तुकारामाला’
तुझे दुःख तुझे नाही !
तुझे दुःख आमचे आहे !
अजून त्याच्या डोळियांनी
आम्ही प्रत्यय पारखत आहोत !
अजून त्याच्या प्रकाशात
आम्ही शब्द वेचत आहोत !
अजून त्याच्या सोबतीने
आम्ही वाट चालत आहोत !
तुझे दुःख तुझे नाही ...
००१ चाले हे शरीर कोणाचिये सत्ते ।
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते ।
कोण बोलविते हरीविन ॥१॥
देखवी ऐकवी एक नारायण ।
तयाचे भजन चुको नको ॥ध्रु.॥
माणसाची देव चालवी अहंता ।
मीची एक कर्ता म्हणो नये ॥२॥
देखवी ऐकवी एक नारायण ।
तयाचे भजन चुको नको ॥ध्रु.॥
वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता ।
राहिली अहंता मग कोठे ॥३॥
देखवी ऐकवी एक नारायण ।
तयाचे भजन चुको नको ॥ध्रु.॥
तुका म्हणे विठो भरला सबाह्य ।
उणे काय आहे चराचरी ॥४॥
देखवी ऐकवी एक नारायण ।
तयाचे भजन चुको नको ॥ध्रु.॥
निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ : अहंता - अहंकार.
सबाह्य - अंतर्बाह्य.
अर्थ :
हे शरीर कुणाच्या सत्तेवर चालत आहे ? श्रीहरीशिवाय त्याला कोण बोलवीत आहे ? ॥१॥
सर्वांना डोळ्यांनी पाहविणारा व कानांनी ऐकविणारा हा एक नारायणच आहे. त्याचे भजन करण्यास तुम्ही कधी चुकू नका.॥ध्रु॥
माणसाचा अहंकारही चालविणारा हाच देव आहे. म्हणून मीच एक कर्ता आहे असे अभिमानाने म्हणू नये.॥२॥
वृक्षाचे साधे पानही त्याच्याच सत्तेने हालत असते. असे असल्याने मग आपला अहंकार तरी कुठे राहिला ? ॥३॥
तुकोबा म्हणतात, हा विठोबा सर्व चराचर जगतात अंतर्बाह्य भरून राहिलेला आहे. त्याच्यावाचून कोणता पदार्थ राहिलेला दिसतो.॥४॥
००२ विश्वास तो देव ।
विश्वास तो देव ।
म्हूण धरियेला भाव ॥१॥
माझी वदवितो वाणी ।
जेणेे धरिली धरणी ॥ध्रु॥
जोडिली अक्षरे ।
नव्हती बुद्धीच्या विचारे ॥२॥
माझी वदवितो वाणी ।
जेणेे धरिली धरणी ॥ध्रु॥
नाही केली आटी ।
काही मानदंभासाटी ॥३॥
माझी वदवितो वाणी ।
जेणेे धरिली धरणी ॥ध्रु॥
कोणी भाग्यवंत ।
तया कळे हे उचित ॥४॥
माझी वदवितो वाणी ।
जेणेे धरिली धरणी ॥ध्रु॥
तुका म्हणे झरा ।
आहे मुळीचाची खरा ॥५॥
माझी वदवितो वाणी ।
जेणेे धरिली धरणी ॥ध्रु॥
निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ : धरणी-पृथ्वी.
अर्थ :
हा देव आहे अशा विश्वासानेच मी मनात भाव धारण केला आहे.॥१॥
ज्याने ही पृथ्वी धारण केली आहे तोच माझ्याकडून हे शब्द बोलवीत आहे.॥ध्रु.॥
मी माझ्या बुद्धीच्या सामर्थ्याने काही ही अक्षरांची जोडाजोड केलेली नाही.॥२॥
लोकात मानसन्मान मिळावा म्हणून काही मी ही खटपट केलेली नाही.॥३॥
मी हे केले आहे, ते उचित की अनुचित, ते जे कुणी भाग्यवंत आहेत त्यांनाच समजेल.॥४॥
तुकोबा म्हणतात, माझ्या ठिकाणी हा कृपेचा झरा मूळचाच खऱ्या स्वरूपाचा आहे.॥५॥
००३ नव्हे हे गुरुत्व मेघवृष्टी वाणी ।
मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष शुद्ध ११,शके १९३९.
नव्हे हे गुरुत्व मेघवृष्टी वाणी । ऐकावी कानी संतजनी ॥१॥ आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ध्रु.॥
देह पिंडदान दिला एकसरे । मुळीचे ते खरे टांकसाळ ॥२॥ आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ध्रु.॥
तुका म्हणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥३॥ आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ध्रु.॥
निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ : गुरुत्व - मोठेपणा.
आरुष - बोबडा.
धाय - तृप्त.
अर्थ :
काही एक मोठेपणा अंगी घेऊन आम्ही हा उपदेश करीत आहोत असे नव्हे. आमचा हा उपदेश मेघवृष्टीप्रमाणे सहजच असा आहे. तो तुम्ही संतसज्जनांनी ऐकावा.॥१॥
माझा हा शब्द बोबडा असला तरी तो देवाचा प्रसाद आहे. त्याने जसे बोलते केले तसे मी बोलतो.॥ध्रु.॥
मी आपल्या देहाचे दान एकदाच त्या श्रीहरीस केले. या मूळ श्रीहरीच्या टांकसाळी मधून माझ्या शब्दाचे खरे नाणे आता बाहेर पडत आहे.॥२॥
तुकोबा म्हणतात, श्रीहरिकृपेणे लाभलेला हा नवनीताचा झरा सेवन केल्याने तुम्ही तृप्त व्हाल.॥३॥
००४ नव्हे हे कवित्व टांकसाळी नाणे ।
नव्हे हे कवित्व टांकसाळी नाणे । घेती भले जन भले लोक ॥१॥ लागलासे झरा पूर्ण नवनीते । सेविलिया हित फार होय ॥२॥ तुका म्हणे देवा केला बलात्कार । अंगा आलें फार महंतपण ॥३॥
निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :नवनीत-लोणी.
अर्थ :
हे माझे कवित्व काही टांकसाळीतील नाण्याप्रमाणे कृत्रिम नाही याचा आदर चांगले चांगले लोक करीत आहेत.॥१॥
जणू नवनीताला पूर्ण झराच लागलेला आहे याचे सेवन केल्याने तुमचे फार हित होईल.॥२॥
तुकोबा म्हणतात, या देवाने बलात्कार केल्यामुळे माझ्या अंगी महंतपण मोठेच आले आहे.॥३॥
००५ आनंदाचा थारा ।
आनंदाचा थारा ।
सुखे मोहरला झरा ॥१॥
ऐसी प्रभुची ज्या कळा ।
त्याच्या कोण पाहे बाळा ॥ध्रु.॥
अंकिता ऐसिया ।
होईल पावविले ठाया ॥
ऐसी प्रभुची ज्या कळा ॥२॥
त्याच्या कोण पाहे बाळा ॥ध्रु.॥
तुका म्हणे ऐसे ।
दिले आभंड प्रकाशे ॥३॥
ऐसी प्रभुची ज्या कळा ॥२॥
त्याच्या कोण पाहे बाळा ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
थारा - आश्रय.
मोहरला - प्रकट झाला.
अंकिता-सेवकांना, स्वाधीन झालेल्यांना.
आभंड-पुष्कळ.
अर्थ :
माझ्या ठिकाणी आनंदाचा आश्रय झालेला असल्याने सुखाचा झराच जणू प्रकटलेला आहे.॥१॥
ज्या प्रभूचे असे ऐश्वर्य आहे त्याच्या बळाचे मोजमाप कोण करणार आहे ? ॥ध्रु.॥
आमच्या सारख्या सेवकांना तो पाहिजे त्या ठिकाणी पोचवून देईल.॥२॥
तुकोबा म्हणतात, अशा प्रकारची देणगी आम्हास या देवाने पुष्कळच दिलेली आहे.॥३॥
००६ नव्हती ही माझी जायाची भूषणे ।
नव्हती ही माझी जायाची भूषणे ।
असे नारायणे उचित केले ॥१॥
शब्दांच्या वोवणी रत्नाचिंया माळा ।
मुळीचा जिव्हाळा झरवणी ॥ध्रु॥
अर्थांतरी असे अनुभव सेवन ।
परिपाकी मन साक्षी तेथे ॥२॥
शब्दांच्या वोवणी रत्नाचिंया माळा ।
मुळीचा जिव्हाळा झरवणी ॥ध्रु॥
तुका म्हणे मज आरते परते ।
हे नाही अनंते उरो दिले ॥३॥
शब्दांच्या वोवणी रत्नाचिंया माळा ।
मुळीचा जिव्हाळा झरवणी ॥ध्रु॥
निरूपण : बाबाजी गणेश परांजपे (१८८९-१९५३).
शब्दार्थ :
झरवणी - झरा.
आरते - ऐलथडी.
परते - पैलथडी.
अर्थ :
ही माझी भूषणे(अभंग) जावयाची नव्हती - फुकट जाऊ नये असे नारायणाने, उचित योग्य ते केले.॥१॥
हे अभंग म्हणजे शब्द (रत्नें) ओवणीत ओवलेल्या रत्नमाला आहेत. यात मुळीचा जिव्हाळा झरवणी सारखा वाहत आहे.॥ध्रु॥
यांच्या अर्थांतराचे सेवन अनुभवाने करावयाचे असते व त्या अनुभवाचा मनात परिपाक होईल तेव्हा या वचनांची साक्ष पटेल.॥२॥
तुकोबा म्हणतात, अनंताने मला आता आरते-परते ऐलथडी-पैलथडी असे काही ठेवले नाही.॥३॥
००७ बोलाल त्या आता आपुल्या पुरते ।
बोलाल त्या आता आपुल्या पुरते ।
मज या अनंते गोवियेले ॥१॥
झाडिला न सोडी हातीचा पालव ।
वेधी वेधे जीव वेधियेला ॥ध्रु.॥
तुमचे ते शब्द कोरडिया गोष्टी ।
मज सवे मिठी अंगसंगे ॥२॥
झाडिला न सोडी हातीचा पालव ।
वेधी वेधे जीव वेधियेला ॥ध्रु.॥
तुका म्हणे तुम्हा होईल हे परी ।
अनुभवांतरी येईल मग ॥३॥
झाडिला न सोडी हातीचा पालव ।
वेधी वेधे जीव वेधियेला ॥ध्रु.॥
निरूपण : बाबाजी गणेश परांजपे (१८८९-१९५३)
शब्दार्थ :
पालव - पदर.
परी - स्थिती.
अर्थ:-
तुम्हांस जे बोलावयाचे आहे ते आपल्या पुरतेच बोला. मला या अनंताने आपल्यांत गुरफटून घेतले आहे.॥१॥
माझा पदर जो त्याने धरला आहे तो त्यास झाडून टाकला तरी सोडीत नाही. त्याने आपल्या वेधाने माझा जीव वेधला आहे.॥ध्रु.॥
तुमचे शब्द हे कोरड्या गोष्टी आहेत. मजसवे मिठी अंगसंगे आहे.॥२॥
तुकोबा म्हणतात, मी काय सांगत आहे, हे तुम्हास अशी स्थिती आल्यावर अनुभवाने कळेल, एरव्ही कळणार नाही.॥३॥
००८ अनुभवे आले अंगा।
अनुभवे आले अंगा।
ते या जगा देतसे ॥१॥
नव्हती हाततुके बोल ।
मूळ ओल अंतरिची ॥ध्रु.॥
उतरून दिले कसी ।
शद्ध रसी सरते ॥२॥
नव्हती हाततुके बोल ।
मूळ ओल अंतरिची ॥ध्रु.॥
तुका म्हणे दुसरे नाही ।
ऐसी ग्वाही गुजरली ॥३॥
नव्हती हाततुके बोल ।
मूळ ओल अंतरिची ॥ध्रु.॥
शब्दार्थ व टीपा
हाततुके–पोकळ, व्यर्थ
अर्थः जे माझ्या अंगी अनुभवाने आले तेच मी सर्व जगास देत आहे सांगत आहे ॥१॥
हे माझे शब्द व्यर्थ व पोकळ आहेत असे नव्हे, त्यांत अंतःकरणामधील खच्या प्रीतीची ओल आहे ॥२॥
तुम्हांला मी हे शब्द कसोटीला लावून शुद्ध व रसभरीत आहेत असे सिद्ध करून दिले आहेत ॥३॥
तुकाराम महाराज म्हणतात, आता मला दुसरे काही करणे नाही, अशी साक्ष देऊन मी हे शब्द तुम्हांस दिले आहेत ॥४॥
००९ वचनाचा अनुभव हाती ।
वचनाचा अनुभव हाती ।
बोलविती देव मज ॥१॥
परि हे न कळे अभाविका ।
जडलोका जिवांसी ॥ध्रु.॥
अश्रुत हे प्रासादिक ।
कृपा भीक स्वामीची ॥२॥
परि हे न कळे अभाविका ।
जडलोका जिवांसी ॥ध्रु.॥
तुका म्हणे वरावरी ।
जातो तरी सांगत ॥३॥
परि हे न कळे अभाविका ।
जडलोका जिवांसी ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :-
अभाविका - जे भाविक नाहीत त्यांना.
अश्रुत - पूर्वी न ऐकलेली.
वरावरी - वरचेवर. एकसारख.
अर्थ :-
लोकहो, जी वचने माझ्या मुखातून निघतात त्यांचा अनुभव माझ्या हाती आलेला असतो. कारण प्रत्यक्ष देवच मला बोलते करीत असतो.॥१॥
पण जे जड व अभाविक, अश्रद्ध लोक त्यांना हे समजत नाही.॥ध्रु.॥
पूर्वी कधी कुणी ऐकलेली नाही अशा प्रकारची कृपेची भीक मला माझ्या स्वामींनी घातलेली आहे.॥२॥
तुकोबा म्हणतात, तरी मी हे वरचेवर सांगतच असतो.॥३॥
०१० वदे साक्षत्वेसी वाणी ।
वदे साक्षत्वेसी वाणी ।
नारायणी मिश्रित ॥१॥
न लगे काही चाचपावे ।
जातो भावे पेरीत ॥ध्रु.॥
भांडार त्या दातियाचे ।
मी कैंचे ये ठायी ॥२॥
न लगे काही चाचपावे ।
जातो भावे पेरीत ॥ध्रु.॥
सादावीत गेला तुका ।
येथे एकाएकी तो ॥३॥
न लगे काही चाचपावे ।
जातो भावे पेरीत ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :-
साक्षत्वेसी - अनुभवाने.
पेरीत - उपदेश करीत.
सादावीत - सावध करीत.
अर्थ :
माझी वाणी ईश्वराच्या अनुभवाने व नारायणाच्या कृपेने मिश्रित अशी आहे.॥१॥
त्यामुळे चाचपत जाण्याचे अथवा भीती बाळगण्याचे कुणास कारण नाही. मी भक्तीचा भावार्थ पेरीत चाललो आहे.॥ध्रु.॥
हे सर्व वैभव त्या दात्या ईश्वराचे असून, मी या ठिकाणी निमित्त मात्र आहे.॥२॥
तुकोबा म्हणतात, मी एकटा सर्व लोकांना सावध करीत चाललो आहे.॥३॥
विवरण :
तुकोबा आपल्या वाणीविषयी व कर्तुत्वाविषयी जी यथार्थ जाणीव होती; ती या अभंगात प्रकट झाली आहे. आपली वाणी व आपले कार्य हे ईश्वराच्या कृपेने मिश्रित आहे. आपण केवळ त्या परमेश्वराच्या कृपेने बलवान झालो आहोत असा भाव त्यांनी अनेक अभंगांतून व्यक्त केला आहे. आपण जे बोलतो ते आपले बोलणे नसून त्यापाठीमागे श्रीविठ्ठलाची प्रेरणा आहे. विठ्ठलच आपल्या मुखातून बोलत आहे, असे त्यांनी वारंवार सांगितले आहे. 'नव्हती माझे बोल बोले पांडुरंग', 'बोलवती देव मज', 'आपुलिया बळेनाहीं मीं बोलत' अशा वचनांतून तुकोबांनी आपली वाणी 'नारायणी मिश्रीत ' कशी आहे ते दर्शविले आहे. त्या दात्याचे भांडारच आपण लुटीत आहोत, हा भावही अनेक ठिकाणी त्यांनी प्रकट केला आहे. धन्याचे भांडार फोडून आपण फक्त हमालाचे काम करीत आहोत, असे एका अभंगात बुवा म्हणताना दिसतात.
०११ उजळाया आलो वाटा ।
उजळाया आलो वाटा ।
खरा खोटा निवाड ॥१॥
बोलविले बोल बोल ।
धनी विठ्ठल सन्निध ॥ध्रु.॥
तरी मनी नाही शंका ।
बळे एका स्वामीच्या ॥२॥
बोलविले बोल बोल ।
धनी विठ्ठल सन्निध ॥ध्रु.॥
तुका म्हणे नये आम्हा ।
पुढे कामा गबाळ ॥३॥
बोलविले बोल बोल ।
धनी विठ्ठल सन्निध ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
उजळाया - स्वच्छ करण्यासाठी.
अर्थ :
भक्तिमार्गाच्या वाटा स्वच्छ करण्यासाठी, त्यांच्यावर प्रकाश टाकण्यासाठीच मी येथे आलो आहे. मला खऱ्याखोट्याचा निवाडा करावयाचा आहे. ॥१॥
ईश्वर, विठ्ठल हा माझा धनी आहे. तो ज्याप्रमाणे बोलवील त्याप्रमाणे मी बोलतो.॥ध्रु.॥
त्या माझ्या स्वामीच्या पाठबळामुळे मी बोलत असल्याने मला कसलीच शंका नसते.॥२॥
तुकोबा म्हणतात, आमच्यापुढे गबाळ्यासारखे काम कधीच चालणार नाही.॥३॥
विवरण:
या एका लहानशा अभंगात बुवा आपल्या आयुष्याचा हेतू स्पष्टपणे सांगत आहेत. आपण जे बोलत आहोत तो देवाचाच निरोप आहे अशी भावना त्यांची नेहमीच होती. भांडार फोडून तो धन्याचा माल । आपण भारवाहीप्रमाणे वाहतो अशी त्यांची श्रद्धा होती. जो कृपावंत सखा पांडुरंग तोच बोलविता असून आपली , वाणी त्याचीच आहे असे ते वारंवार सांगतात. 'नव्हती माझे बोल बोले पांडुरंग ।।' अशी त्यांची निष्ठा होती. आपण भक्तिमार्गाचा प्रसार करण्यास आलो आहोत, संतांचा मार्ग स्वच्छ करावयास आलो आहोत, जग सर्व आडरानात सापडले असून त्याच्या वाटा स्वच्छ करण्यासाठी आपण आहोत असेही ते अनेकदा बोलतात.
०१२ खेळतो ते खेळ पायांच्या प्रसादे ।
खेळतो ते खेळ पायांच्या प्रसादे ।
नव्हती ही छंदे नासिवंते ॥१॥
माझा मायबाप उभा विटेवरी ।
कवतुके करी कृपादान ॥ध्रु.॥
प्रसादाची वाणी वदे ती उत्तरे ।
नाही मतांतरे जोडियेली ॥२॥
माझा मायबाप उभा विटेवरी ।
कवतुके करी कृपादान ॥ध्रु.॥
तुका म्हणे रस वाढती या अंगे ।
छाया पांडुरंगे केली वरी ॥३॥
माझा मायबाप उभा विटेवरी ।
कवतुके करी कृपादान ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
नासिवंते - नाशवंत, नाहीसे होणारे.
अर्थ :-
मी जे काही खेळ खेळत आहे ते श्रीहरीच्या पायांच्या प्रसादानेच खेळतो. हे माझे छंद काही नाहीसे होणारे नाहीत.॥१॥
माझा मायबाप विटेवर उभा असून मोठ्या कौतुकाने कृपेचे दान करीत आहे.॥ध्रु.॥
माझ्या मुखातून प्रकट होणारे सर्व शब्द प्रासादिक आहेत. त्यात मी माझ्या बुद्धीने काही मतमतांतरे जोडून दिलेली नाहीत.॥२॥
तुकोबा म्हणतात, हा माझ्या शब्दांतील रस वाढत्या अंगाने असून माझ्यावर या पांडुरंगाची कृपा छाया आहे.
०१३ आपुलिया बळे नाही मी बोलत ।
आपुलिया बळे नाही मी बोलत ।
सखा भगवंत वाचा त्याची ॥१॥
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी ।
शिकविता धनी वेगळाची ॥२॥
काय म्या पामरे बोलावी उत्तरे ।
परि त्या विश्वंभरे बोलविले ॥३॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा ।
चालवी पांगळा पायांविण ॥४॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
धनी - स्वामी, मालक.
कळा - कोडकौतुक.
अर्थ :
मी आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने बोलत आहे असे नाही. तो माझा सखा भगवंत आहे, त्याचीच ही वाणी आहे. त्याची ही कृपा आहे.॥१॥
साळुंकी अतिशय गोड गोड शब्द करीत असते; पण तिला असे कर्णमधुर स्वर काढायला लावणारा तिचा धनी वेगळाच असतो.॥२॥
एऱ्हवी मी पामराने कोणते शब्द उच्चारावेत? पण त्या विश्वंभर प्रभूने मला बोलते केले आहे.॥३॥
तुकोबा म्हणतात, त्या प्रभूचे कोडकौतुक कोण जाणणार? तो श्रीहरी पायांशिवाय जो पांगळा असतो त्यास ही चालता करतो.॥४॥
विवरण :-
वर सांगितल्या प्रमाणे देहभाव नष्ट झाल्यावर जे जे काही घडते त्याच्या मागची प्रेरणा प्रभूची ठरते. तुकोबांना आपल्या पांडुरंगमिश्रित वाणीची यथार्थ जाणीव होती. भावारूढ झालेल्या अवस्थेत तुकोबांच्या मुखातून जे स्रवले ते अभंगरूपाने कायम झाले, अमर झाले. कारण वरवर दिसणाऱ्या देहाची ती क्रिया नव्हती. साळुंकी मंजूळ स्वरांनी बोलत असली तरी तिला हे बोल शिकविणारा धनी कुणी वेगळाच असतो. त्याचप्रमाणे तुकोबांच्या मुखातून विश्वाला भरून राहाणारा श्रीहरी बोलत राहात असे. तुका म्हणे मज बोलवितो देव असे एका अभंगात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. कवित्व आपण स्वतःच्या बळावर करतो ही भावना बुवांची नव्हती. आपल्या युक्तीचा हा प्रकार नसून मज विश्वंभर बोलवितो अशीच त्यांची निष्ठा व्यक्त झालेली आहे. वदवी गोविंद तेची वदे असे त्यांनी आपल्या बोलण्यामागचे रहस्य स्पष्ट केले आहे.
०१४ नव्हे शब्द एकदेशी ।
नव्हे शब्द एकदेशी ।
सांडी गवशी कोणाला ॥१॥
जाली माझी वैखरी ।
विश्वंभरी व्यापक ॥ध्रु.॥
मोकलिले जावे बाणे ।
भाता जेणे वाईले ॥२॥
जाली माझी वैखरी ।
विश्वंभरी व्यापक ॥ध्रु.॥
आता येथे कैंचा तुका ।
बोले सिक्का स्वामीचा ॥३॥
जाली माझी वैखरी ।
विश्वंभरी व्यापक ॥ध्रु.॥
निरूपण :
विष्णुबुवा जोग (१८६७-१९२०)
शब्दार्थ:
गवशी - सापडून देणारा.
सिक्का - शिक्का.
अर्थ :-
माझा शब्द हा एखाद्या अर्थाला सुचविणारा अगर टाकणारा असा एकदेशी नाही.॥१॥
तर माझी वैखरी विश्वंभराचे ठाई व्यापलेली आहे म्हणजे ती विश्वंभराला सुचवित आहे.॥ध्रु.॥
ज्याने आपल्या भात्यामध्ये बाण ठेविले आहेत, तो ते बाण धनुष्यास लावून जिकडे सोडील तिकडे ते बाण जातात.॥२॥
तुकोबा म्हणतात आता ह्या न्यायाने मी बोलत नसून जी काही माझ्या मुखातून अक्षरें निघतात ती सर्व देवाचा शिक्का आहे.॥३॥
०१५ कोण सांगायास । गेले होते देशोदेश ॥
कोण सांगायास ।
गेले होते देशोदेश ॥१॥
नेले वाया हाती माप ।
समर्थ तो माझा बाप ॥ध्रु.॥
कोणाची हे सत्ता ।
जाली वाचा वदविता ॥२॥
नेले वाया हाती माप ।
समर्थ तो माझा बाप ॥ध्रु.॥
तुका म्हणे या निश्चये ।
माझे निरसले भय ॥३॥
नेले वाया हाती माप ।
समर्थ तो माझा बाप ॥ध्रु.॥
निरूपण :
विष्णुबुवा जोग (१८६७-१९२०)
शब्दार्थ :
निरसले - संपले.
अर्थ :-
देशोदेशी सांगण्यासाठी कोण गेले होते?॥१॥
माझा मायबाप जो विठ्ठल, त्याच्याच कृपेने वाऱ्याबरोबरच कवित्व सर्व देशभर पसरले.॥ध्रु.॥
माझी वाणी कवित्व करीत आहे, ती तरी कुणाच्या सत्तेवर?॥२॥
तुकोबा म्हणतात, याच निश्चयामुळे माझे भय दूर झाले आहे.॥३॥
०१६ कृपेचे उत्तर देवाचा प्रसाद
कृपेचे उत्तर देवाचा प्रसाद ।
आनंदी आनंद वाढवावा ॥१॥
बहुतांच्या भाग्ये लागले जाहाज ।
येथे आता काज लवलाहो ॥ध्रु.॥
अलभ्य ते आले दारावरी फुका ।
येथे आता चुका न पाहिजे ॥२॥
बहुतांच्या भाग्ये लागले जाहाज ।
येथे आता काज लवलाहो ॥ध्रु.॥
तुका म्हणे जिव्हा श्रवणाच्या द्वारे ।
माप भरा बरे सिगेवरी ॥३॥
बहुतांच्या भाग्ये लागले जाहाज ।
येथे आता काज लवलाहो ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
काज - कार्य.
अर्थ :
देवाच्या कृपेने मी बोलतो आहे, हाच देवाचा प्रसाद समजा आणि याचा आनंद सर्वत्र वाढवावा.॥१॥
पुष्कळ लोकांच्या भाग्याने परमार्थाचे हे जहाज आपल्या जवळ आले आहे. आता आपले कार्य साधून घेण्याची तुम्ही त्वरा करावी.॥२॥
जे मिळण्यास कठीण आहे, ते फुकटाफुकटी दारावर आले आहे, आता त्याचे सेवन न करण्याची चूक तुम्ही करू नका.॥ध्रु॥
तुकोबा म्हणतात, आता वाणी व कान यांच्या साहाय्याने भक्तीचे माप शिगोशीग भरून घ्या.॥३॥
०१७ सकळिकांच्या पाया माझी विनवणी
सकळिकांच्या पाया माझी विनवणी ।
मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन ।
बरे पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥
फोडिले भांडार धन्याचा हा माल।
मी तव हामाल भारवाही ॥२॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन ।
बरे पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥
तुका म्हणे चाली जाली चहू देशी।
उतरला कसी खरा माल ॥३॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन ।
बरे पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
चाली-चलती.
अर्थ :
सगळ्यांच्या पायांशी माझी ही एक विनंती मस्तक चरणांवर ठेवून करीत आहे.॥१॥
अहो श्रोतेहो, व वक्त्यांनो, सर्व लोकहो, कोणतीही गोष्ट नीट पारखून घ्या व आपल्या संग्रही ठेवा.॥२॥
मी परमार्थ विचारांचे हे भांडार खुले केले आहे; पण हा सर्व माल त्या परमेश्वराचा असून मी फक्त ओझे वाहणारा हमाल आहे.॥२॥
तुकोबा म्हणतात,या मालाची चांगली चलती झाल्यामुळे, याची प्रसिद्धी चारी देशांना होऊन हा ईश्वराच्या नामरूपाचा माल चांगला कसास उतरला आहे.॥३॥
विवरण :-
तुकोबांचा हा एक अतिशय प्रसिद्ध अभंग असून, त्यातील मी देवाचा केवळ भारवाही हमाल आहे, हे परमार्थ विचाराचे धन त्याचेच असून मी फक्त भांडार चालविणारा सेवक आहे, ही भावना त्यांच्या इतर अभंगांतूनही प्रकट झाली आहे. तुकोबा स्वतः वाण्याचा व्यवसाय करीत असल्यामुळे भांडार फोडणे, माल वाहून नेणे, तो कसास उतरणे, या शब्दप्रयोगांची त्यांना चागलीच अनुभूती आहे. ईश्वराच्या घरचे, श्रेष्ठ तत्त्वाचे भांडार आपल्या हाती आले, याचा सार्थ अभिमान कधी कधी त्यांनी प्रकट केला आहे.
भांडाराची किल्ली माझे हाती आहे ।
पाहिजे तो पाहे वाण तेथे ॥
असे बुवांनी आणखी एका ठिकाणी म्हटले आहे.
०१८ नव्हती माझे बोल ।
नव्हती माझे बोल ।
अवघे करितो विठ्ठल ॥१॥
काही न धरावी खंती ।
हित होइल धरा चित्ती ॥ध्रु.॥
खोटी ते अहंता ।
वाट टाकिली सांगता ॥२॥
काही न धरावी खंती ।
हित होइल धरा चित्ती ॥ध्रु.॥
ज्याचे तोची जाणे ।
मी मापाडे तुका म्हणे ॥३॥
काही न धरावी खंती ।
हित होइल धरा चित्ती ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
खंती - चिंता.
मापाडे-माप टाकणारा.
अर्थ :-
मी हे जे बोलत आहे, ते काही माझे नव्हेच, ते सर्व त्या विठ्ठलाकडूनच बोलले जात आहे.॥१॥
याविषयी तुम्ही कसलीही चिंता करू नये. यात तुमचे हितच होईल, हे चित्तात नीट धारण करावे.॥ध्रु.॥
कोणी सांगितलेली सरळ वाट टाकील तर तो अहंकार खोटा आहे.॥२॥
तुकोबा म्हणतात, मजकडून बोलविणारा जो विठ्ठल तो खरे काय तो जाणतो, मी केवळ माप टाकणारा मापाडी आहे.॥३॥
०१९ बोलविसी माझे मुख
बोलविसी माझे मुख ।
परी या जना वाटे दुःख ॥१॥
जया जयाची आवडी ।
तया लागी ते चरफडी ॥ध्रु.॥
कठीण देता काढा ।
जल्पे रोगी मेळवी दाढा ॥२॥
जया जयाची आवडी ।
तया लागी ते चरफडी ॥ध्रु.॥
खाऊ नये तेची मागे ।
निवारिता रडो लागे ॥३॥
जया जयाची आवडी ।
तया लागी ते चरफडी ॥ध्रु.॥
वैद्या भीड काय ।
अतित्याई जीवे जाय ॥४॥
जया जयाची आवडी ।
तया लागी ते चरफडी ॥ध्रु.॥
नये भिडा सांगो आन ।
पथ्य औषधा कारण ॥५॥
जया जयाची आवडी ।
तया लागी ते चरफडी ॥ध्रु.॥
धन माया पुत्र दारा ।
हे तो आवडी नरका थारा ॥६॥
जया जयाची आवडी ।
तया लागी ते चरफडी ॥ध्रु.॥
तुका म्हणे यात ।
आवडे ते करा मात ॥७॥
जया जयाची आवडी ।
तया लागी ते चरफडी ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
जल्पे - तिटकारा करून.
मेळवी दाढा - तोंड बंद करतो.
अतित्याई - आतताई मनुष्य.
भिडा - भिडेने.
दारा - पत्नी.
थारा - आश्रय प्राप्ती.
मात - गोष्ट, वागणूक.
अर्थ :-
देवा, तू माझ्या मुखाने उपदेशात्मक शब्द बोलवितोस; पण या लोकांना ते फार दुःखाचे वाटतात.॥१॥
ज्याला जे आवडते त्याच्यासाठी तो तडफडत असतो.॥ध्रु.॥
रोगी माणसास कडू काढा दिला तर तो त्याचा तिटकारा करून आपले तोंड मिटून घेतो.॥२॥
वैद्याने जे खाऊ नये असे त्याला सांगितले असते तेच तो खात असतो. मग ते निस्तरण्याची पाळी आली की रडायला लागतो.॥३॥
वैद्याला कसली आली आहे भीड? तो खरे तेच सांगणार; पण येथे आतताई मनुष्य जीव घालवूनच बसेल.॥४॥
रोगी माणसाच्या भिडेने त्यास कधी भलते सलते खायला सांगू नये औषध घेतल्याचे सार्थक पथ्यामुळेच होत असते.॥५॥
धनदौलत, मायाममता, पुत्र व पत्नी यांचे प्रेम यांच्या लोभाने नरकाची मात्र प्राप्ती होईल.॥६॥
तुकोबा म्हणतात, असे मी तुम्हाला अनेक उपाय सांगितले आहेत, त्यातील जे आवडतील त्याप्रमाणे तुमची वागणूक असू द्यावी.॥७॥
०२० मी तो काबाडाचा धनी
बोलविले जेणे ।
तोची याचे गुह्य जाणे ॥१॥
मी तो काबाडाचा धनी ।
जेवू मागावे थिंकोनी ॥ध्रु.॥
मजुराच्या हाते ।
माप जाले गेले रिते ॥२॥
मी तो काबाडाचा धनी ।
जेवू मागावे थिंकोनी ॥ध्रु.॥
जाला पुरविता ।
पांडुरंग माझा पिता ॥३॥
मी तो काबाडाचा धनी ।
जेवू मागावे थिंकोनी ॥ध्रु.॥
मायबापासवे ।
बाळे कौतुके खेळावे ॥४॥
मी तो काबाडाचा धनी ।
जेवू मागावे थिंकोनी ॥ध्रु.॥
जैसा करिती धंदा ।
तैसा पडोनिया छंदा ॥५॥
मी तो काबाडाचा धनी ।
जेवू मागावे थिंकोनी ॥ध्रु.॥
त्याच्या साच गाई म्हैसी ।
येणे खेळावे मातीशी ॥६॥
मी तो काबाडाचा धनी ।
जेवू मागावे थिंकोनी ॥ध्रु.॥
तुका म्हणे बोल ।
माझा बोलतो विठ्ठल ॥७॥
मी तो काबाडाचा धनी ।
जेवू मागावे थिंकोनी ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
गुह्य - मर्म.
काबाडाचा - श्रमाचा, कष्टाचा.
थिंकोनी - रडून.
रिते - रिकामे.
साच - खऱ्या.
अर्थ :
ज्या विठ्ठलाने मला बोलाविले अथवा बोलते केले तोच त्यातील मर्म जाणतो.॥१॥
मी केवळ श्रमाचाच धनी असून रडून भाकून आईबापाजवळ जेवायला मागावे एवढेच मला समजते.॥ध्रु.॥
मजुराच्या हाताने धान्याचे माप घातले तरी शेवटी माप रिकामे झाल्यावर मजूर ही रिकामाच राहतो.॥२॥
माझा बाप पांडुरंग माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो.॥३॥
आईबापा बरोबर मूल कौतुकाने खेळत असते.॥४॥
ते जसा धंदा करतील तसाच छंद आम्हांत जडून आम्ही त्याचे अनुकरण करतो.॥५॥
आईबापाच्या गाई म्हशी खऱ्याखुऱ्या असतात, पण मुले मात्र मातीच्या गाई म्हशी करून त्यात रमतात.॥६॥
तुकोबा म्हणतात, माझे सर्व बोल तो विठ्ठलच बोलवितो.॥७॥
०२१ न कळता कोणी मोडियेले व्रत
न कळता कोणी मोडियेले व्रत ।
तया प्रायश्चित चाले काही ॥१॥
जाणतियां वज्त्रलेप जाले थोर ।
तयांस अघोर कुंभपाक ॥२॥
आता जरी कोणी नाइके सांगता ।
तया शिकविता तेची पाप ॥३॥
काय करू मज देवे बोलविले ।
माझे खोळंबले काय होते ॥४॥
तुका म्हणे जना पाहा विचारुनी ।
सुख वाटे मनी तेची करा ॥५॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
कुंभपाक - भीषण नर्क.
विचारुनी - विचार करून.
अर्थ :-
एकादशीसारख्या व्रताचा भंग नकळत झाला तर त्याला काही प्रायश्चित्त आहे.॥१॥
पण जाणून बुजून त्या व्रताचा भंग करणारे जर कुणी असतील तर ते त्यांचे पाप वज्रलेपासारखे होऊन शेवटी त्यांना कुंभपाकाचा नर्क भोगावा लागेल.॥२॥
अशा या वाटेने कुणी जात असताना त्यास सांगितले तरी तो कधी ऐकतच नाही. अशा माणसास काही शिकविले तरी शिकविणारासच पाप लागणार.॥३॥
हे सर्व सांगण्यासाठी देवानेच मला बोलते केले. नाही तर माझे काय खोळंबले होते?॥४॥
तुकोबा म्हणतात, म्हणून लोकहो, नीट विचार करून ज्या योगे तुमच्या मनास सुख वाटेल तेच करा.॥५॥
विवरण :
ज्या माणसास तपाचे, व्रताचे महत्त्व समजत नाही, त्याला शिकवून काय उपयोग ? उलट शिकविणारास पाप लागायचे. अशा माणसास कुणी काही न शिकवावे हेच बरे. 'इ दं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन । न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति।' हे गुह्य ज्ञान, ज्याला तप नाही, भक्ती नाही, व ऐकण्याची इच्छाही नाही, जो माझी नेहमी निंदा करतो त्याला कधीही सांगू नकोस अशी स्पष्ट सूचना भगवद्गीतेत शेवटी भगवंतांनी दिलेली आहे.
या अभंगात आपणास देवाने बोलते केले आहे. नाही तर आपले काय खोळंबले होते? अशा एक नेहमीचा विचार तुकारामबुवांनी व्यक्त केला आहेच.
नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंग व्यापुनिया॥
वचनाचा अनुभव हाती। बोलविती देव मज॥
आपुलिया बळे नाहीं मी बोलत...
परि त्या विश्वंभरे बोलविले।
तुका म्हणे मज बोलवितो देव।
मज विश्वंभर बोलवितो।
इत्यादी वचनांची आठवण या ठिकाणी होण्यासारखी आहे.
०२२ बोलावे म्हूण बोलतो उपाय
बोलावे म्हूण बोलतो उपाय ।
प्रवाहे हे जाय गंगाजळ ॥१॥
भाग्य योगे कोणा घडेल सेवन ।
कैंचे येथे जन अधिकारी ॥ध्रु.॥
मुखी देता घास पळविती तोंडे ।
अंगीचिया भांडे असुकाने ॥२॥
भाग्य योगे कोणा घडेल सेवन ।
कैंचे येथे जन अधिकारी ॥ध्रु.॥
तुका म्हणे पूजा करितो देवाची ।
आपुलिया रुची मनाचिये ॥३॥
भाग्य योगे कोणा घडेल सेवन ।
कैंचे येथे जन अधिकारी ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
भांड-भांडखोर लोक.
अर्थ :
गंगेचे पाणी जसे आपल्या ओघानेच जात असते, तसेच हे उपाय सहज बोलावे म्हणूनच बोलतो.॥१॥
जे कुणी भाग्यवान असतील त्यांनाच याचे सेवन घडेल. या ठिकाणी काय सर्व लोक अधिकारी आहेत?॥ध्रु.॥
जे कुणी मूळचेच भांडखोर आहेत, त्यांना याचा बळजबरीने जरी घास देऊ केला तरी ते कष्टाने, दुःखाने आपले तोंड लपवितात.॥२॥
तुकोबा म्हणतात, मी आपल्या आवडी प्रमाणे माझ्या देवाची पूजा करीत असतो.
०२३ नव्हती माझे बोल जाणा हा निर्धार
नव्हती माझे बोल जाणा हा निर्धार ।
मी आहे मजूर विठोबाचा ॥१॥
निर्धारा वचन सोडविले माझ्या।
कृपाळुवे लज्जा राखियेली ॥२॥
निर्भर मानसी जालो आनंदाचा ।
गोडावली वाचा नामघोषे ॥३॥
आता भय माझे नासले संसारी ।
जालोसे यावरी गगनाचा ॥४॥
तुका म्हणे हा तो संताचा प्रसाद ।
लाधलो आनंद प्रेमसुख ॥५॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
निर्भर - परिपूर्णता, भरपूर.
अर्थ :
मी जे बोलतो ते माझे बोल नाहीत असे तुम्ही निश्चयाने समजा. मी तर या विठोबाचा मजूर आहे.॥१॥
माझ्या निश्चयास या कृपाळू देवाने साथ देऊन माझी लाज राखली आहे.॥२॥
मी आनंदाने परिपूर्ण झालो आहे. कारण माझी वाणी हरिनामाच्या घोषामुळे गोडावून गेली आहे. ॥३॥
आता या संसारातील माझे भय नाहीसे झाले आहे. मी आता यापुढे गगनाकार परमेश्वराशी एकरूप झालो आहे. ॥४॥
तुकोबा म्हणतात, हा सर्व प्रसाद संतांचा असून त्यांच्या मुळेच मला प्रेमसुखाचा आनंद प्राप्त झालेला आहे.॥५॥
०२४ तुझ्यात माझ्यात नाही भेद
तुज मज नाही भेद ।
केला सहज विनोद ॥ध्रु.॥
तू माझा आकार ।
मी तो तूच निर्धार ॥१॥
तुज मज नाही भेद ।
केला सहज विनोद ॥ध्रु.॥
मी तुजमाजी देवा ।
घेसी माझ्या अंगे सेवा ॥२॥
तुज मज नाही भेद ।
केला सहज विनोद ॥ध्रु.॥
मी तुजमाजी अचळ ।
मजमाजी तू सबळ ॥३॥
तुज मज नाही भेद ।
केला सहज विनोद ॥ध्रु.॥
तू बोलसी माझ्या मुखे ।
मी तो तुजमाजी सुखे ॥४॥
तुज मज नाही भेद ।
केला सहज विनोद ॥ध्रु.॥
तुका म्हणे देवा।
विपरीत ठायी नावा ॥५॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
अचळ-स्थिर.
अर्थ :
देवा, तुझ्यात व माझ्यात तसा काही भेद नाही, पूर्वी कधी भेदभावाचे बोलणे केले असेल तर तो सहज घडलेला विनोद समजावा.॥ध्रु.॥
देवा, माझा सर्व आकार तूच असून मी जो आहे तो तूच आहेस असा माझा निर्धार आहे.॥१॥
देवा, मी सर्व दृष्टींनी तुझ्यामध्येच आहे. तू माझ्याकडून सेवा घेतोस.॥२॥
देवा, मी तुझ्या ठिकाणी स्थिर असून माझ्यामध्ये असलेले सर्व बळ तुझेच आहे.॥३॥
देवा, तूच माझ्या मुखातून बोलतोस आणि त्यामुळे मी तुझ्यामध्ये मोठ्या सुखाने वास्तव्य करून आहे.॥४॥
तुकोबा म्हणतात, देवा, तुमच्यामाझ्यातील नामरूपाचा हा विपरीत भेद वरवरचाच आहे.॥५॥
विवरण :-
या एका महत्त्वाच्या अभंगात तुकोबांनी देव-भक्ताच्या अभेदत्वाचे फार समर्पक रीतीने वर्णन केले आहे. देव व त्याचा भक्त ही नावे जरी वेगळीच असली तरी तत्त्वरूपाने दोघेही एकच आहेत. देव भक्ताच्या हृदयात आहे. आणि देवाच्या हृदयात भक्त आहे. सर्व भूतमात्रांत ईश्वर समत्वाने एकवटलेला आहे.
समोऽहं सर्वभूतेषु
सर्व भूतमात्रांत मी समत्वाने आहे अशी साक्ष भगवंतांनीही गीतेत दिलेली आहे.
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्
जे माझे भक्त भक्तीने भजन करतात ते माझ्या ठिकाणी आणि मीही त्यांच्या ठिकाणी असतो.
गीतेच्या या देव-भक्तीतील ऐक्याच्या कल्पनेवरील श्रीज्ञानेश्वरांचे भाष्य मोठे बहारदार व समर्पक आहे. देवभक्तांचे ऐक्य वर्णन करताना त्यांनी म्हटले आहे,
ते वर्तत दिसती देहीं ।
परि ते देहीं ना माझ्या ठायी ।
आणि मी तयांच्या हृदयीं ।
समग्र असें ॥
माझे भक्त देहाने निराळे दिसत असले तरी ते वस्तुतः तसे नसतात, तर ते माझ्याच ठिकाणी सर्वस्व समर्पण करून असतात व मीही त्यांच्या ठिकाणी निवास करतो. या एकत्वास सुरेख दृष्टान्त देताना श्रीज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, सविस्तर वटत्व जैसें ।
बीजकणिकेमाजी असे ।
आणि बीजकणु वसे वटी जेवीं ॥
तेवीं आम्हां तयां परस्परें ।
बाहेर नामाचींचि अंतरें ।
वांचूनि आंतुवर वस्तुविचारे ।
मी तेचि ते ॥
वडाच्या झाडाचे बीज लहान असले तरी त्या कणातच वटवृक्षाचा सर्व विस्तार असतो आणि तो बीजकणच वृक्षाच्या विस्तारात असतो. त्याप्रमाणे देव व भक्त ही नावे जरी भिन्न असली तरी त्यांच्यांत तसा भेद नसतो.
०२५ आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा
आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा ।
आता करू सेवा कोणाची मी ॥१॥
सूत्रधारी जैसा हालवितो कळा ।
तैसा तो पुतळा नाचे छंदे ॥ध्रु.॥
बोलतसे जैसे बोलवितो देव ।
मज हा संदेह कासयाचा ॥२॥
सूत्रधारी जैसा हालवितो कळा ।
तैसा तो पुतळा नाचे छंदे ॥ध्रु.॥
पाप पुण्य ज्याचे तोची जाणे काही ।
संबंध हा नाही आम्हा सवे ॥३॥
सूत्रधारी जैसा हालवितो कळा ।
तैसा तो पुतळा नाचे छंदे ॥ध्रु.॥
तुका म्हणे तुम्ही आइका हो मात ।
आम्ही या अतीत देहाहुनी ॥४॥
सूत्रधारी जैसा हालवितो कळा ।
तैसा तो पुतळा नाचे छंदे ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
संदेह - संशय.
कासयाचा - काय म्हणून?
मात - गोष्ट, हकीकत.
अतीत - वेगळे, पलीकडचे.
अर्थ :
जेव्हा आम्ही आमचा देह या देवास समर्पण केला तेव्हाच आम्ही लौकिक दृष्टीने मरण पावलेली आहोत. आता आम्ही सेवा तरी कुणाची करावी?॥१॥
सर्व जगाचे व्यवहार करणारा हा सूत्रधारी देव ज्याप्रमाणे सूत्र हालवून क्रीडा करवून घेईल त्याप्रमाणे आमच्या या देहाचा पुतळा नाचत राहील.॥ध्रु.॥
ज्याप्रमाणे मला देव बोलवील त्याप्रमाणे मी बोलत असतो. मग मला संशय कशाचा ?॥२॥
पाप घडते, की पुण्य घडते, हे त्याच सूत्रचालकाने जाणावे. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही.॥३॥
तुकोबा म्हणतात, आम्ही या शरीराहून वेगळे आहोत हे वृत्त तुम्ही ऐका.॥४॥
विवरणः
आत्मनिवेदनपर अशा या एका महत्त्वाच्या अभंगात तुकोबांनी दोन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. एक म्हणजे आपण या शरीराने वर्तत असलो तरी आपण आता त्याच्या व्यापाराहून वेगळे आहोत आणि दुसरी म्हणजे या शरीराकडून होणाऱ्या साऱ्या क्रिया सर्वसत्तात्मक प्रभूकडून होत असतात ही होय. या दोन्ही वृत्तींची छाप तुकोबांच्या अनेक अभंगांवरून दिसून येते. आपला देह आपण प्रभूस समर्पण केला, तो आता त्याचा झाला आहे, त्यामुळे त्याच्याकडून होणाऱ्या पापपुण्यात्मक क्रियांचा संबंध आता आपणाकडे नाही, हा विचार तुकोबांनी अनेकदां व्यक्त केलेला आहे.
देह तुझ्या पायी ।
ठेवुनी जालो उतराई ॥
देह नव्हे मी हे सरे ।
उरला उरे विठ्ठल ॥
देहभाव आम्ही राहिलो ठेवुनी ।
निवांत चरणी विठोबाच्या ॥
इत्यादी वचनांतून देह व देहभावसमर्पणाचे उल्लेख स्पष्ट आहेत. देहबुद्धीचे हे समर्पण म्हणजे एक प्रकारचा मृत्यूच होय. हा एक पुनर्जन्मच मानतात:
मीच मज व्यालो ।
पोटी आपुलिया आलो ॥
असे एके ठिकाणी तुकोबांनी म्हटले आहे. या पुनर्जन्मानंतर आपलेच मरण अापल्या डोळ्यांनी अनुभविल्यानंतर सर्व संशय दूर होतात. कुणाची सेवा करण्याचा प्रसंग उरत नाही. पापपुण्याचे बंधन उरत नाही. कारण सर्व काही देवच बोलवितो, करवितो हा अनुभव आलेला असतो.
पापपुण्या ठायी नाही सुख दुःखा । हानी लाभ शंका नासलिया ॥
असा एकदा अनुभव आल्यावर मग जे काही सर्व घडत राहील ते त्याच्याच सत्तेतून, इच्छेतून. आपले या ठिकाणी सर्वस्व संपून जाते.
जिता मरण आले आपपर गेले ।
मूळ हे छेदिले संसाराचे ॥
अशा मनस्थितीचे मोठे मूलगामी व अनुभवसंपन्न वर्णन करताना तुकोबांनी म्हटले आहे:
तुका म्हणे देह वाहिला विठ्ठली । तेव्हाच घडली सर्वपूजा ॥
०२६ आनंदाचा कंद गाइयेला गीती
आनंदाचा कंद गाइयेला गीती।
पाहियेला चित्ती देवराव ॥१॥
देवराव तो ही आहे निश्चयेसी ।
अखंड नामासी बोलवितो ॥२॥
बोलवितो मज कृपा तो करुनी ।
तुका म्हणे मनी धरा भाव ॥३॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
कंद-साठा, ठेवा.
अर्थ :
मी हा आनंदाचा ठेवा माझ्या गीतांनी गाइला आहे या देवरावास मी माझ्या चित्तात पाहिला आहे.॥१॥
हा देवराव निर्धार करून अखंडपणे माझ्याकडून नाम वदवून घेतो.॥२॥
तुकोबा म्हणतात, तो माझ्यावर कृपा करून मला बोलते करतो, त्याच्या विषयी मनात तुम्ही शुद्ध भाव धरा.॥३॥
दाम यमक:
दाम म्हणजे दावे, कासरा, माळ. त्यांच्यात ज्याप्रमाणे एक पदर संपला की दुसरा सुरू होतो त्याप्रमाणे, म्हणजे एका कडव्याचा अंत्य व दुसर्या कडव्याचा आरंभ यांतील यमक.
आनंदाचा कंद गाइयेला गीती।
पाहियेला चित्ती देवराव ॥१॥
देवराव तो ही आहे निश्चयेसी ।
अखंड नामासी बोलवितो ॥२॥
बोलवितो मज कृपा तो करुनी ।
तुका म्हणे मनी धरा भाव ॥३॥
०२७ सर्वपक्षी हरि साह्य सखा जाला
सर्वपक्षी हरि साह्य सखा जाला ।
ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥१॥
सहज चाली चालता पायवाटे ।
चितांमणी समान होती गोटे ॥२॥
तुका तरी सहज बोले वाणी ।
त्याचे घरी वेदांत वाहे पाणी ॥३॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
साह्यसखा - साह्य, मदत करणारा मित्र.
गोटे - दगडधोंडे.
अर्थ :
ज्याला सर्व बाजूंनी साह्य करणारा श्रीहरी आहे त्याच्या अंगणातील ओलसर मातीत उगवणाऱ्या वेलीही त्याला कल्पलतेप्रमाणे फळ देतात.॥१॥
असा हा मनुष्य सहज वाटेने चालू लागला तरी त्याच्या वाटेतील दगडगोट्यांना त्याच्या पायांच्या स्पर्शाने चिंतामणीरत्नासारखे वैभव प्राप्त होते.॥२॥
तुकोबा म्हणतात, याच प्रमाणे याच्या कृपेने मी जे शब्द सहज रीतीने बोलतो, त्यांतून वेदान्ताचा अर्थ प्रकटपणे बाहेर येतो.॥३॥
०२८ नव्हे खळवादी मताच पुरता
नव्हे खळवादी मताच पुरता ।
सत्याची हे सत्ता उपदेश ॥१॥
साक्षत्वेसी मना आणावी उतरे ।
परिपाकी खरे खोटे कळे ॥ध्रु.॥
नव्हे एकदेशी शब्द हा उखता ।
ब्रह्मांडापुरता घेईल त्यासी ॥२॥
साक्षत्वेसी मना आणावी उतरे ।
परिपाकी खरे खोटे कळे ॥ध्रु.॥
तुका विनवणी करी जाणतिया ।
बहुमते वाया श्रमो नये ॥३॥
साक्षत्वेसी मना आणावी उतरे ।
परिपाकी खरे खोटे कळे ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
खळवादी - दुष्ट मतांचा प्रसार करणारे.
परिपाकी - शेवटी, परिणामी.
एकदेशी - एकमार्गी.
उखता - मोजका.
अर्थ :
जे कुणी दुष्ट मतांचा पुरस्कार करणारे आहेत, ते आपल्या मताच्या सिध्दीसाठीच खटाटोप करतात, पण मी मात्र तसा नाही. माझा उपदेश खरेपणाच्या सत्तेवरचा असतो.॥१॥
खळवादी लोकांचा उपदेश व माझा उपदेश या दोहींची मनाची साक्ष ठेवून परीक्षा करावी, म्हणजे शेवटी खरे कोणते; खोटे कोणते; याचा निवाडा सहज होईल.॥ध्रु.॥
माझा हा शब्द काही एकमार्गी नाही, किंवा संकुचित म्हणजे मोजकाही नाही; जो त्याचा अर्थ मनापासून पाहील त्याला तो सारे ब्रह्मांड व्यापून राहिला आहे असे समजेल.॥२॥
तुकोबा म्हणतात, म्हणून माझी जाणत्यांना विनंती आहे की, अनेक खलमतवाद्यांच्या नादी लागून लोकांनी विनाकारण श्रम करू नयेत.॥३॥
०२९ भूती भगवंत
भूती भगवंत ।
हा तो जाणतो संकेत ॥१॥
भारी मोकलितो बाण ।
ज्याचा त्यासी कळे गुण ॥ध्रु.॥
करावा उपदेश ।
निवडोनी तरी दोष ॥२॥
भारी मोकलितो बाण ।
ज्याचा त्यासी कळे गुण ॥ध्रु.॥
तुका म्हणे वाटे ।
चुकता आडराने कांटे ॥३॥
भारी मोकलितो बाण ।
ज्याचा त्यासी कळे गुण ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
मोकलितो - सोडतो.
अर्थ :
सर्व भूतमात्रांमध्ये भगवंताचाच अंश भरून राहिला आहे, हे तर मी जाणतो.॥१॥
म्हणूनच मी शब्दरूपांचे तीक्ष्ण बाण सोडीत असतो. या बाणांचा गुण ज्याचा त्यास बरोबर समजतो.॥ध्रु.॥
दोष वगळून योग्य तो उपदेश करावा, हेच मी जाणतो.॥२॥
तुकोबा म्हणतात, नीट सरळ मार्ग सोडून जर आडवाटेने गेलात तर पायांना काटे टोचतील मात्र.॥३॥
०३० आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत
आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत ।
करावे फजीत चुकती ते ॥१॥
कासयाचा बाध एकाच्या निरोपे ।
काय व्हावे कोपे जगाचिया ॥ध्रु.॥
अविद्येचा येथे कोठे पराश्रम ।
रामकृष्ण नाम ऐसे बाण ॥२॥
कासयाचा बाध एकाच्या निरोपे ।
काय व्हावे कोपे जगाचिया ॥ध्रु.॥
तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा ।
न सरती येरा खोट्या परी ॥३॥
कासयाचा बाध एकाच्या निरोपे ।
काय व्हावे कोपे जगाचिया ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
नीत - नीतीचा विचार.
विकरा - विक्री.
पराश्रम - परकियांना प्रवेश.
अर्थ :-
वाट चुकलेल्या जगास काही नीतिविचार सांगावा, हेच आम्हांस कौतुकाचे आहे. जे कुणी वागायला चुकतील, त्यांची फजिती करावी हेच आम्ही पाहतो.॥१॥
त्या एका देवाचा निरोप नीटपणे लोकांना सांगितला तर त्यात कसली बाधा आहे? यासाठी लोक कितीही रागावले तरी काय होणार आहे?॥ध्रु.॥
या आमच्या भक्तिमार्गात रामनामाचे बाण सुटत असल्यामुळे येथे अविद्येस प्रवेशच मिळत नाही.॥२॥
तुकोबा म्हणतात, येथे खराखुरा उपदेश असेल त्याचीच विक्री होत असून, खोटे प्रकार येथे खपले जाणार नाहीत.॥३॥
०३१ नव्हती हे उसणे बोल
नव्हती हे उसणे बोल ।
आहाच फोल रंजवण ॥१॥
अनुभव तो वरावरी ।
नाही दुरी वेगळा ॥ध्रु.॥
पाहिजे ते आले रुची ।
काचाकुची काशाची ॥२॥
अनुभव तो वरावरी ।
नाही दुरी वेगळा ॥ध्रु.॥
तुका म्हणे लाजे आड ।
त्याची चाड कोणासी ॥३॥
अनुभव तो वरावरी ।
नाही दुरी वेगळा ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
आहाच - व्यर्थ, उगाच.
काचाकुची - संकोच, संयम.
चाड - इच्छा.
अर्थ :-
लोकांचे मनरंजन करणारे हे काही उगाच उसणे बोल नाहीत.॥१॥
सर्वांपेक्षा वेगळा असणारा हा अनुभव काही वरवरचा नाही.॥ध्रु.॥
जे पाहिजे ते जर रुचीस आले असेल तर मग उगाच संकोच कशासाठी?॥२॥
तुकोबा म्हणतात, येथे लाज आड येत नाही कारण तिची आम्ही चाड करत नाही.॥३॥
०३२ अनुभवाचे रस देऊ आर्त्तभूता
अनुभवाचे रस देऊ आर्त्तभूता ।
सोडू चोजविता पुढे पोती ॥१॥
देवाचा प्रसाद रत्नांच्या ओवणी ।
शोभतील गुणी आपुलिया ॥ध्रु.॥
आधी भाव सार शुद्ध ते भूमिका ।
बीज आणि पिका चिंता नाही ॥२॥
देवाचा प्रसाद रत्नांच्या ओवणी ।
शोभतील गुणी आपुलिया ॥ध्रु.॥
तुका म्हणे ज्याचे नाम गुणवंत ।
ते नाही लागत पसरावे ॥३॥
देवाचा प्रसाद रत्नांच्या ओवणी ।
शोभतील गुणी आपुलिया ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
आर्तभूता - गरजू लोकांना, इच्छुक.
चोजविता - शोध घेतल्यास.
अर्थ :-
जे कुणी गरजू लोक आहेत त्यांना आम्ही अनुभवाचे सार देऊ. आत्मज्ञानाविषयी जे कुणी शोध घेणारे आहेत त्यांच्यापुढे आम्ही अध्यात्मज्ञानाचे पोते मोकळे करू.॥१॥
देवाचा प्रसाद ही एक रत्नांची ओवलेली माळ आहे. ती आपल्या गुणांनी शोभून दिसते.॥ध्रु.॥
आत्मसुखाच्या मार्गात शुद्ध भूमिका असणे हेच एक सार आहे. मग आत्मविचारांच्या बीजाची पेरणी केल्यावर भरघोस पिकाला काही चिंता नाही.॥२॥
तुकोबा म्हणतात, ज्याचे नावच गुणवंत आहे तो तसाच असतो. त्याचे नाव मुद्दाम घेऊन काही प्रसृत करावे लागत नाही.॥३॥
०३३ मथने भोगे सार
मथने भोगे सार ।
ताके घडे उपकार ॥१॥
बरवी सायासांची जोडी ।
अनुभविया ठावी गोडी ॥ध्रु.॥
पाक आणि रुची ।
जेथे तेथे ते कईची ॥२॥
बरवी सायासांची जोडी ।
अनुभविया ठावी गोडी ॥ध्रु.॥
वाढितो पंगती ।
तुका आवडी संगती ॥३॥
बरवी सायासांची जोडी ।
अनुभविया ठावी गोडी ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
मथने - ताक घुसळल्याने.
बरवी - चांगली.
कईची - कोणती.
अर्थ:-
ताक घुसळल्याने लोण्याचा उपभोग स्वतःसाठी घेता येतो आणि ताक दुसऱ्यास दिल्यान उपकारही घडतो.॥१॥
अशा प्रकारे श्रम करून लाभ घेणे हे बरे. हा अनुभव घेणारासच खरी रुची समजते.॥ध्रु.॥
पाकसिद्धी केल्याशिवाय त्या ठिकाणची रुची कशी प्राप्त होईल?॥२॥
तुकोबा म्हणतात, पंगतीस बसलेल्यांची जशी आवड असेल त्याप्रमाणे मी त्यांना वाढत असतो.॥३॥
०३४ सत्य आम्हा मनी
सत्य आम्हा मनी ।
नव्हो गाबाळाचे धनी ॥१॥
ऐसे जाणा रे सकळ ।
भरा शुद्ध टाका मळ ॥ध्रु.॥
देतो तीक्ष्ण उतरे ।
पुढे व्हावयासी बरे ॥२॥
ऐसे जाणा रे सकळ ।
भरा शुद्ध टाका मळ ॥ध्रु.॥
तुका म्हणे बरे घडे ।
देशोदेशी चाले कोडे ॥३॥
ऐसे जाणा रे सकळ ।
भरा शुद्ध टाका मळ ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
गाबाळचे - वरवरचा केरकचरा.
कोडे - कोडकौतुक.
अर्थ:-
सत्यस्वरूपाचा परमेश्वरच आमच्या मनात आहे. आम्ही वरवरच्या केरकचऱ्याचे धनी कधीच होणार नाही.॥१॥
सर्व लोकहो, तुम्ही हे सर्व जाणून असा. शुद्ध स्वरूपाचा माल भरा व मनातील कुविचारांचा मळ काढून टाका.॥ध्रु.॥
पुढे तुमचे नीट बरे व्हावे म्हणून मी कठीण शब्दांनी आज तुम्हांस बोलत आहे.॥२॥
तुकोबा म्हणतात, चांगले घडल्यानंतर देशामध्ये सर्वत्र तुमचेच कोडकौतुक होईल.॥३॥
०३५ काळाचे ही काळ
काळाचे ही काळ ।
आम्ही विठोबाचे लडिवाळ ॥१॥
करू सत्ता सर्वा ठायी ।
वसो निकटवास पायी ॥ध्रु.॥
ऐसी कोणाची वैखरी ।
वदे आमचे समोरी ॥२॥
करू सत्ता सर्वा ठायी ।
वसो निकटवास पायी ॥ध्रु.॥
तुका म्हणे बाण ।
हाती हरिनाम तीक्ष्ण ॥३॥
करू सत्ता सर्वा ठायी ।
वसो निकटवास पायी ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
वैखरी-वाणी.
अर्थ:-
आम्ही या विठ्ठलाचे लडिवाळ भक्त असल्यामुळे काळाचेही काळ झालो आहोत.॥१॥
आम्ही सर्व ठिकाणी सत्ता दाखवू. त्याच्या पायांशी निकटत्वाने निवास करू.॥ध्रु.॥
आता आमच्या विरुद्ध कुणाची वाणी बोलणार आहे? आमच्या समोर आता कोण बोलणार?॥२॥
तुकोबा म्हणतात, हरिनाम हेच तीक्ष्ण असे बाण हातात धरून मी उभा आहे.॥३॥
०३६ धर्माचे पाळण
धर्माचे पाळण ।
करणे पाषांड खंडण ॥१॥
हेची आम्हा करणे काम ।
बीज वाढवावे नाम ॥ध्रु.॥
तीक्ष्ण उतरे ।
हाती घेउनी बाण फिरे ॥२॥
हेची आम्हा करणे काम ।
बीज वाढवावे नाम ॥ध्रु.॥
नाही भीड भार ।
तुका म्हणे साना थोर ॥३॥
हेची आम्हा करणे काम ।
बीज वाढवावे नाम ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
पाषांड - नास्तिक मत.
अर्थ:-
सद्धर्माचे पालन करावे, नास्तिक मताचे खंडण करावे.॥१॥
हेच काम आम्हाला करायचे आहे. सर्व धर्माचे बीजभूत असलेले प्रभुनाम वाढविण्याचे काम आमचे आहे.॥ध्रु.॥
यासाठी तीक्ष्ण शब्दांची उत्तरे हेच बाण हाती घेऊन आम्ही नेहमी फिरत असतो.॥२॥
तुकोबा म्हणतात, या कामात आम्ही कुणाही, लहान थोराची कधीच भीडभाड ठेवीत नाही.॥३॥
विवरण-:
आपल्या सामर्थ्यायाविषयीची यथार्थ जाणीव तुकोबांनी या अभंगात प्रकट केली आहे. ढोंग, दंभ, दुराचार यांचा नायनाट करून नामसंकीर्तनाचा व प्रभुप्रेमाचा मार्ग स्थापित व्हावा म्हणून तुकोबांचा अवतार होता. नाना धर्ममते, नाना पाखंड विचार, नाना भेद, यांच्यावर तुकोबांना कठोरपणे प्रहार करावे लागले. मेणाहून मऊ असणारा हा विष्णूदास प्रसंग पडताच वज्रापेक्षाही कठीण होत राही. आपले सर्व जीवनच ईश्वरकृपेने भरलेले असल्याने त्याच बळावर आता आपणास लोकधर्माची मांडामांड करायची आहे अशी यथार्थ जाणीव बुवांना होती.
नाम विठोबाचे घेईन मी वाचे ।
बीज कल्पांतीचे तुका म्हणे ॥
याप्रमाणे तुकोबांना हरिनामाचे बीज हस्तगत झाले असल्याने याच बीजाचा प्रसार करण्याचे कार्य त्यांना करायचे होते. नारायणाच्या कृपेने आपली वाणी मिश्रित झाली आहे, आपण आता केवळ उपकारापुरते उरलो आहोत, अशी भूमिका तुकोबांची बनली होती. फार पूर्वीपासूनही आपण असेच धर्मप्रसाराचे काम करीत असल्याचे तुकोबांनी एका अभंगात म्हटले आहे.
मागे बहुता जन्मी ।
हेची करित आलो आम्ही ॥
आपण श्रीहरीचे जुनेच संवगडी असून रामकृष्ण नारायण असे प्रभुनामाचे चिंतनात रमतो असे ही एका अभंगात त्यानी म्हटले आहे. शुकाने समाधी लाविली तेव्हा आपण तिथे होतो असे त्यांनी आणखी एका अभंगात म्हटले आहे. खऱ्या खोट्याचा निवाडा करण्यासाठी आपण आहोत असे तुकारामबुवांनीं
उजळावया आलो वाटा ।
खरा खोटा निवाडा॥
या ओळीत म्हटले आहे.
धर्मसंस्थापनेच्या कार्यात साह्य करण्यासाठी, भक्तीचा डांगोरा पिटण्यासाठी आपला अवतार आहे अशी योग्य जाणीव तुकोबांना होती;
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणांसी
हा अभंग तुकोबांची भूमिका स्पष्ट करण्यास समर्थ आहे.
०३७ धर्म रक्षावया साठी
धर्म रक्षावया साठी ।
करणे आटी आम्हासी ॥१॥
वाचा बोलो वेदनीती ।
करू संती केले ते ॥ध्रु.॥
न बाणता स्थिति अंगी ।
कर्म त्यागी लंड तो ॥२॥
वाचा बोलो वेदनीती ।
करू संती केले ते ॥ध्रु.॥
तुका म्हणे अधम त्यासी ।
भक्ती दूषी हरीची ॥३॥
वाचा बोलो वेदनीती ।
करू संती केले ते ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
आटी - खटपट, श्रम.
लंड - नास्तिक.
अर्थ:-
आपल्या कार्याचे स्वरूप सांगताना या प्रसिद्ध अभंगात बुवांनी सांगितले आहे, धर्माचे रक्षण करण्यासाठीच आम्हास अशा प्रकारचे परिश्रम करावे लागतात.॥१॥
वेदांनी सांगितलेली नीती आम्ही आमच्या वाणीने लोकांना सांगू व संतांनी जसे आचरण केले तसेच आम्हीही करू.॥ध्रु.॥
अंगी आत्मस्थिती बाणली नसताना जो कर्म सोडून देतो तो एक नास्तिकच म्हणावा लागेल.॥२॥
तुकोबा म्हणतात, जो हरीच्या भक्तीला दूषण लावतो तो अधमच होय.॥३॥
०३८ खरे भांडवल सांपडले गांठी
खरे भांडवल सांपडले गांठी ।
जेणे नये तुटी उदमासी ॥१॥
सवंगाचे केणे सापडले घरी ।
भरुनी वैखरी साटविले ॥२॥
घेता देता लाभ होतसे सकळा ।
सदैवा दुर्बळा भाव तैसा ॥३॥
फडा आलिया तो न वजे निरास ।
जरी काही त्यास न कळता ॥४॥
तुका म्हणे आता जालीसे निश्चिंती ।
आणीक ते चित्ती न धरू दुजे ॥५॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
उदमासी - व्यापारास.
केणे - जिन्नस, माल.
फडा - वारकरी कीर्तनाचे ठिकाण.
अर्थ :
या विठ्ठलाच्या रूपाने खरेखुरे भांडवल आमच्या हाती आले असल्यामुळे याला काही आमच्या व्यापारात तूट येणार नाही.॥१॥
अतिशय स्वस्त असलेला असा विठ्ठलरूपी माल आमच्या घरीच सापडला असून त्याला आम्ही आमच्या वाणीतून साठवून ठेविला आहे.॥२॥
याचा लाभ सर्वांना देताना व घेताना होत असून सुदैवी असो, अथवा दुर्बल असो, सर्वांना त्यांच्या त्यांच्या भावाप्रमाणे हा प्राप्त होतो.॥३॥
एकदा विठ्ठलभक्तांच्या मंडळीत, मेळाव्यात तो अाला म्हणजे, मग निराश होत नाही. मग त्यास कीर्तन पूर्णपणे आकलन जरी नाही झाले, तरी कीर्तनाची गोडी लागल्याने काळांतराने आत्मिक आनंद प्राप्त होतो.॥४॥
तुकोबा म्हणतात, आता मात्र माझी निश्चिती झाली असून या विठ्ठलनामरूपी भांडवलाखेरीज आता चित्तात दुसरे काहीच धरणार नाही.॥५॥
०३९ बाहिर पडिलो आपुल्या कर्तव्ये
बाहिर पडिलो आपुल्या कर्तव्ये ।
संसारासी जीवे वेटाळिलो ॥१॥
एकामध्ये एक नाही मिळो येत ।
ताक नवनीत निवडिले ॥ध्रु.॥
जालो दोनी नामे एकाची मथनी ।
दुसरिया गुणी वेगळाली ॥२॥
एकामध्ये एक नाही मिळो येत ।
ताक नवनीत निवडिले ॥ध्रु.॥
तुका म्हणे दाखविल्या मुक्ताफळी ।
शिंपलेची स्वस्थळी खुंटलिया ॥३॥
एकामध्ये एक नाही मिळो येत ।
ताक नवनीत निवडिले ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
वेटाळिलों-गुंतलो होतो.
अर्थ :-
या बाह्य संसारात मी गुंतून गेलो होतो. पण मी आपल्या कर्तव्याच्या जोरावर सुखरूपपणे बाहेर पडलो.॥१॥
आता पुनः संसारात गुंतणार नाही. ताकातून एकदा लोणी बाहेर काढले की, ते परत काही त्याच्यात मिसळत नाही. तशी माझी अवस्था झाली अाहे.॥ध्रु.॥
ताक व लोणी ही दोन्ही नावे एकाच मंथनातून झाली, किंवा सार व असार असा भेदही एकाच्याच मुळे झाला असला, तरी वरवरच्या गुणांमुळे दोन वेगळी दिसतात.॥२॥
तुकोबा म्हणतात शिंपल्यातून एकदा मोती वेगळे काढून दाखविल्यावर मग शिंपला जरी जन्मठिकाण असले तरी तो मोती काही त्याच्याशी पहिल्यासारखा जडला जात नाही. तसे संसाराशी माझे नाते पुन: काही जडणार नाही.॥३॥
०४० निवडुनि दिले नवनीत
निवडुनि दिले नवनीत ।
संचित ते भोगीते ॥१॥
आता पुढे भावसार ।
जीवना थार राहावया ॥ध्रु.॥
पारखियांचे पडिले हाती ।
चाचपती आंधळीं ॥२॥
आता पुढे भावसार ।
जीवना थार राहावया ॥ध्रु.॥
तुका म्हणे सेवन घडे ।
त्यासी जोडे लाभ हा ॥३॥
आता पुढे भावसार ।
जीवना थार राहावया ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
संचित - नशिबात.
अर्थ :
आम्ही आता श्रीहरीच्या नामाचे नवनीत सर्वांना निवडून दिले आहे ज्याने त्याने आपल्या नशिबाप्रमाणे त्याचा आस्वाद घ्यावा.॥१॥
आता यापुढे जीवनाला काही आधार शोधायचा असेल तर, हरी विषय हा एकच आधार होय.॥ध्रु.॥
जे कोणी परीक्षा करणारे डोळस असतील, त्यांच्या हाती हे हरिनामाचे नवनीत पडेल व जे देहादिकांच्या बुद्धीने आंधळे बनलेले असतील, ते मात्र उगाच चाचपडत राहतील.॥२॥
तुकोबा म्हणतात, जो कोणी याचे मनोभावे सेवन करील, त्या हा लाभ निश्चित होईल.॥३॥
रंगभूमी
Anandowari
Click here to read
- About the Play
- Anandowari Script
- Curtain Raiser
- Review
- Articles
- Anandowari Revisited
- Existentialism of Tukaram
- Kishor Kadam



आनंदओवरी
वाचण्यासाठी येथे Click करा.
- नाटकाविषयी
- आनंद ओवरी - संहिता
- परीक्षण
- १. वेगळी अनुभूती जागवणारी कलाकृती
- २. तुकोबांचे वेधक दर्शन
- ३. अंतर्मुख करणारी आनंदओवरी
- ४. शोध तुकयाचा...
- ५. तुकाराम नावाचा माणूस
- लेख
- जगण्यातल्या विविध वाटांचा शोध
https://tukaram.com (तुकाराम डॉट कॉम)
https://tukaram.com (तुकाराम डॉट कॉम) हे कविश्रेष्ठ तुकाराम यांच्या साहित्याला वाहिलेले संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर देहू येथील श्री तुकाराम महाराज संस्थानच्या सौजन्याने तुकाराम गाथेची देहू प्रत डाऊनलोड करिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुकाराम डॉट कॉम या संकेतस्थळाचे उद्घाटन १७ फेब्रुवारी २००२ रोजी झाले. दिलीप धोंडे हे या संकेतस्थळाचे प्रकल्प समन्वयक असून डॉ. सदानंद मोरे, व दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र बर्हाटे, गिरीश गांधी, देवेन राक्षे , सतीश पंडिलवार आणि त्यांच्या सहकाऱयांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. दिवंगत बॅरिस्टर बाबाजी गणेश परांजपे यांना हे संकेतस्थळ समर्पित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर मराठीत अभंगरूपीचित्र, चरित्र, लेख, विश्व कोश, पुस्तक, भजन श्रवण, पालखी, बाळगोपाळांसाठी, तुकाराम बीज, देहू दर्शन, रंगभूमी, कला दालन, छत्रपती शिवाजी, महात्मा गांधी आणि बाबाजी परांजपे हे सदर आहेत.लेख विभागात राम बापट, सदानंद मोरे, दिलीप धोंडगे व पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांचे लेख आहेत.
राजस्थानी विभागात यांनी डॉ. सत्यनारायण स्वामी यांनी अनुवादीत केलेले चरित्र आहे. तुकोबांच्या निवडक अभंगांचे निरुपण त्यांनी केलेले आहे. डॉ. सत्यनारायण स्वामी यांनी या पूर्वी शिवाजी सावंत यांची साहित्यकृती "मृत्युंजय" राजस्थानी मध्ये अनुवादीत केली आहे.
गुजराती विभागात निळकंठ पंचभाई यांनी तुकोबांचे अनुवादीत केलेले ८०० अभंग आहेत.केदारनाथ यांनी लिहिलेले संक्षिप्त चरित्र आहे.लहान मुलांकरिता चित्ररुपी अभंग आहे.कलादालन आहे.
कोंकणी मध्ये पद्मश्री सुरेश आमोणकर यांनी लिहिलेले संक्षिप्त चरित्र आहे.लहान मुलांकरिता चित्ररुपी अभंग आहे. तुकोबांचे अभंगरुपी लघु कथा आहेत.
सिंधी विभागात लछमन हर्दवाणी यांनी अनुवादीत केलेले चरित्र आहे.तुकोबांच्या १५१ अभंगांचे निरुपण त्यांनी केलेले आहे. तुकोबांचे सिंधीत ब्रेल चरित्र डॉउनलोड करता उपलब्ध आहे.अभंगरुपी चित्र आहे.
तेलुगु मध्ये भालचंद्र आपटे यांनी अनुवादीत केलेले चरित्र आहे.
कन्नड मध्ये विरुपाक्ष कुळकर्णी यांनी लिहिलेले संक्षिप्त चरित्र आहे.लहान मुलांकरिता चित्ररुपी अभंग आहे. तुकोबांचे अभंगरुपी लघु कथा आहेत. बहेणाबाई यांचे अभंग आहेत.
मलयाळम मध्ये विश्वनाथ अय्यर यांनी अनुवादीत केलेले चरित्र आहे.
तमिळ मध्ये शास्तागोपाल यांनी अनुवादीत केलेले चरित्र आहे.
कोंकणी, तमिळ, राजस्थानी आणि कन्नड मध्ये अनुवादीत केलेले चरित्र श्रीधर महाराज देहूकर यांनी लिहिलेले आहे.
ओडिआ मध्ये खगेश्वर महापात्रा यांनी अनुवादीत केलेले चरित्र आहे.
तेलुगु, ओडिआ आणि मलयाळम मध्ये अनुवादीत केलेले चरित्र भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य अकादमी करिता लिहिलेल चरित्र आहे.
बांग्ला मध्ये रविन्द्रनाथ ठाकुर यांनी अनुवादीत केलेले अभंग आहेत. तुकाराम आणि बंगाल अनुबंधावर लेख आहे. सत्यजीत रे आणि नन्दलाल बोस यांनी रेखाटलेले तुकाराम आहेत.
हिन्दीत महात्मा गांधी यांची राष्ट्रगाथेला लिहिलेली प्रस्तावना आहे. श्रीराम शिकारखाने व आनंदप्रकाश दीक्षित यांचे अनुवाद आहेत. बाळगोपाळांसाठी चित्ररुपी अभंग आहे.
संकेतस्थळावर इंग्रजीत - उदय गोखले, एसप्रांतो- अनिरुध्द बनहट्टी, जर्मन - दिलीप चित्रे व पद्मश्री लोथार लुत्से, फ्रेंच - गी प्वॉत्व्हँ , स्पॅनिश - एल्सा क्रॉस, डच - लिओ व्हॅन दर झाल्म आणि रशियन - इरिना ग्लुशकोव्हा, अनघा भट व सिरगेइ सेरेयानी यांचे तुकोबांचे अनुवाद आहेत.
तुकाराम महाराज संक्षिप्त चरित्र
श्रीधर देहूकर ( १९१६-२००४)
“ये तु धर्म्यामृतमिदम्” गीता १२.२०
“ते हे गोष्टी रम्य । अमृतधाराधर्म्य ।
करिती प्रतीति गम्य । ऐकोनि जे ॥ ” ज्ञानदेवी १२.२३०

देवाच्या चरित्राला परमामृत म्हटले जाते आणि भक्ताच्या चरित्राला धर्म्यामृत म्हटले जाते. देवाची चरित्रे संतांनी गायिली, सांगितली पण संतांची चरित्रे आम्ही सांगणे हे कठीण काम आहे. कारण संत जसे असतात तसे दिसत नाहीत आणि जसे दिसतात तसे असत नाहीत. शिवाय आमची जी शब्दसृष्टी आहे, तीही मर्यादित आहे.
आमुते करावया गोठी । ते झालीच नाही वाग्सृष्टि । आम्हालागी दिठी । ते दिठीच नोहे ॥ (अमृतानुभव)
आपण जर त्यांना विचाराल, आपण कोण? कोठले? कोठून आलात? कोठे जावयाचे? आपल नाव काय? रूप काय? तर ते सांगतील “ काही नाही ”.
काहीच मी नव्हे कोणिये गावीचा । येकटु ठायीच्या ठायी एकु ॥१॥
नाही जात कोठे येत फिरोनिया । अवघेचि वायावीण बोल ॥२॥
तुका म्हणे नाव रूप नाही आम्हा । वेगळा त्या कर्मा अकर्माशी ॥३॥
अशा परिस्थितीत तुकोबांचे (तुकाराम महाराज) चरित्राचा अल्प भाग देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
अनुक्रमणिका
१. जन्म व पूर्वज
२. राजकीय, धार्मिक आणि सामाजिक स्थिती
३. प्रेमळ मातापित्यांचा वियोग
४. साक्षात्कार
५. कवित्वाची स्फूर्ती आणि जलदिव्य
६. तुकोबा आणि दोन संन्याशी
७. धरणेकरी
८. छत्रपती शिवाजी आणि तुकोबा
९. तुकोबांचा बोध उपदेश शिकवण
१०. तुकोबांचे ध्रृपदे, टाळकरी, अनुयायी व शिष्य
११. प्रयाण
११. तुकोबांच्या पश्चात्
१. जन्म व पूर्वज
धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥
तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंग देवतेमुळे. हे जागृत स्थान आहे.
इंद्रायणी नदीच्या शोभायमान तीरावर पांडुरंग देवाचे देवालय आहे. कटेवर कर ठेवून विश्वाचा जनिता उभा आहे. वामांगी माता रखुमाई आहे. समोर अश्वत्थ वृक्ष आहे. पारावर गरुड हात जोडून उभा आहे. द्वारात विघ्नराज आहेत. बाहेर भैरव आणि हनुमानजी आहेत. दक्षिणेला हरेश्वराचे देवालय आहे. जवळच बल्लाळाचे वन आहे. त्यात सिध्देश्वराचे अधिष्ठान आहे. क्षेत्रवासी धन्य होते, ते दैववान आहेत, वाचेने देवाचा नामघोष करीत आहेत. तुकाराम तुकोबांचे वेळचें हे देहू गावचे वर्णन आहे.
तुकोबांपासून सुमारे तीनशे वर्षांपूर्वी तुकोबांचे पूर्वज विश्वंभरबाबा हे देहू गावी राहात होते. या घराण्याचे कुलदैवत विठोबा होते. घराण्यात आषाढी-कार्तिकीची वारी विश्वंभरबाबाचे वाडवडिलांपासून चालत आली होती. पंढरीची वारी वाडवडिलाप्रमाणे नियमाने चालविण्यास बाबांच्या मातोश्रीने विश्वंभरबाबांच्या या निकट सेवेने देव पंढरपुराहून देहूस धावत आले. जसे पुंडलीकरायाच्या निकट सेवेनें देव वैकुंठाहून पंढरपूरला धांवत आले.
पुंडलिकांचे निकट सेवे । कैसा धांवे बराडी ॥१॥
मूळ पुरुष विश्वंभर । विठ्ठलाचा भक्त थोर ॥१॥
त्याचे भक्तीने पंढरी । सांडूनी आले देहू हरी ॥२॥
आषाढ शुध्द दशमीच्या दिवशी देवाने विश्वंभरबाबांना स्वप्नात भेट देऊन मी तुमचे गावी आलो असल्याचे सांगून देव आंबीयाचे वनात निद्रिस्त झाले. सकाळी विश्वंभरबाबा गावकऱ्यांचे समवेत आंबीयाचे वनात गेले. तेथे त्यांना श्री विठ्ठल रखुमाईच्या स्वयंभू मूर्ती मिळाल्या. मूर्तीची स्थापना बाबांनी आपल्या वाडयांतील देवघरात केली. पंचक्रोशीतील लोकही दर्शनास येऊ लागले. देवाचा प्रतिवर्षी महोत्सव होऊ लागला. महोत्सवाचे खर्चाकरिता शेत इनाम मिळाले. शुध्द एकादशीस वारी भरू लागली. विश्वंभरबाबाचा काळ झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव हरी आणि मुकुंद देवाची सेवा सोडून मूळच्या क्षात्र वृत्तीकडे वळले. कुटुंबियांना घेऊन राजाश्रयास गेले. तेथे त्यांना सैन्यामध्ये अधिकाराच्या जागा मिळाल्या. त्यांचे हे कृत्य त्यांच्या आई आमाबाई यांना आवडले नाही. देवालाही पसंत पडले नाही. देवांनी आमाबाईंना स्वप्नात येऊन सांगितले की, तुमच्याकरिता मी पंढरपूर सोडून देहूस आलो आणि तुम्ही मला सोडून येथे राजाश्रयास आलात हे बरे नव्हे. तुम्ही देहूला परत चला. आमाबाईंनी मुलांना स्वप्नातील वृत्तांत निवेदन केला व देहूस परत जाण्याबद्दल परोपरीने सांगितले. मुलांनीं त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. पुढे लवकरच राज्यावर परचक्र आले. उभयता बंधू रणांगणावर शत्रूशी लढता लढता धारातीर्थी पडले. मुकुंदाची पत्नी सती गेली, हरिची पत्नी गरोदर होती. तिला घेऊन आमाबाई देहूस आल्या. सुनेला माहेरी बाळंतपणाकरिता पाठविले आणि आपण देवाची सेवा करू लागल्या. हरिच्या पत्नीला मुलगा झाला त्याचे नाव विठ्ठल ठेवले. विठ्ठलाचा पुत्र पदाजी, पदाजीचा शंकर, शंकराचा पुत्र कान्होबा आणि कान्होबाचे बोल्होबा. बोल्होबा यांना पुत्र तीन. वडील सावजी, मधले तुकाराम आणि धाकटे कान्होबाराय.
तुकोबांचा ज्या कुळात जन्म झाला ते कुळ पवित्र होते.
पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ॥१॥
ते कूळ क्षत्रियाचे होते. पूर्वजांनी रणांगणावर शत्रूशी लढता लढता देह ठेवले होते. घराणे सुसंस्कृत होते, धार्मिक होते. घरात पिढयान् पिढया विठ्ठलाची उपासना चालू होती. पंढरीची वारी होती. महाजनकीचे वतन होते. शेतीवाडी होती, साव-सावकारकी, व्यापारधंदा होता. दोन वाडे होते. एक राहण्याचा व दुसरा बाजारपेठेतील महाजनकीचा. गावात चांगली मानमान्यता होती. पंचक्रोशीत प्रतिष्ठा होती. शेती करीत होते म्हणून त्यांना कुणबी म्हणत, व्यापार धंदा करीत होते म्हणून वाणी म्हणत. आणि तुकोबांनी या सगळयांचीच उपेक्षा केली म्हणून त्यांना गोसावी म्हणू लागले.
गोसावी हे काही या कुळाचे आडनाव नव्हे. आडनाव मोरे- आणि गोसावी ही पदवी (इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी ) गीता काली वैश्याची गणना शूद्रांत होऊ लागली होती.
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपि यांति - परां गतिम् ॥ गीता ९.३२
श्रीज्ञानदेव तुकोबांच्या काळात क्षत्रियांचीही गणना शूद्रात होऊ लागली.
तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यजादि इया ॥ ज्ञानेदेवी ९. ४६०.
दोनच वर्ण राहिले होते. ब्राह्मण आणि शूद्र म्हणून तुकोबांना शूद्र म्हणू लागले.
२. राजकीय, धार्मिक आणि सामाजिक स्थिती
दक्षिणेत त्यावेळी मुसलमानी सत्तेचा अंमल होता. गोव्यात पोर्तुगीज होते. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही या राज्य करणाऱ्या तीन मुसलमानी सत्ता एकमेकांशी लढत होत्या, गावे बेचिराख होत होती, लुटली जात होती, राजे विलासात दंग असत. ते प्रजेला पीडित. “ब्राह्मणांनी आपले आचार सोडले होते. क्षत्रिय वैश्यांना नाडीत होते, सक्तीने धर्मांतर चालू होते.” महाराजांनी म्हटले.
सांडिले आचार । द्विज चाहाड झाले चोर ॥
राजा प्रजा पिडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥
वैश्यशूद्रादिक । हे तो सहज नीच लोक ॥
वैश्य आणि शूद्र यांच्या संबंधी तर बोलावयास नको. धर्माचा लोप झाला होता. अधर्म माजला होता.
ऐसे अधर्माचे बळ । लोक झकविले सकळ ।।
लोक अधर्मालाच धर्म म्हणूं लागले. संतांना मान राहिला नव्हता.
संतां नाही मान । देव मानी मुसलमान ॥१॥
समाज नाना देव-देवतांच्या मागें लागून विस्कळीत झाला होता. धर्मात आकर्षण राहिले नव्हते. अज्ञानाचा अंधकार पसरलेला होता. लोक प्रकाश देणाऱ्या सूर्याच्या उदयाची वाट पाहात होते. अशा परिस्थितीत देहू गावी चित् सूर्यांचा उदय झाला.
संतगृह मेळी । जगत् अंध्या गिळी । पैल उदयाचळी । भानु तुका ॥३॥
(रामेश्वरभट्ट अभंग)
महान भगवत् भक्त बोल्होबा आणि माता कनकाई यांचे उदरी शके १५३० ( इ.स. १६०९ )मध्ये तुकोबांचा जन्म झाला. घरची श्रीमंती असल्यामुळे बालपण मोठया कोडकौतुकात आणि खेळण्यात गेल. प्राथमिक शिक्षण पंतोजीकडून मिळाले. पंतोजी हातांत पाटी घेऊन मुलांचा हात धरून मुलांना शिकवीत.
अर्भकाचे साठी । पंते हाते धरिली पाटी ॥१॥
मुले खडे मांडून मुळाक्षरे काढीत.
ओनाम्याच्या काळे । खडे मांडियेले बाळे ॥१॥
व्यवहारचे आणि परमार्थाचे शिक्षण तुकोबांना वडील बोल्होबा यांचेकडून मिळाले.वडील बंधू सावजी यांनी धंदा-व्यापारात लक्ष घालण्याचे नाकारल्यावर बोल्होबांनी तुकोबांना धंदा-व्यापार,सावसावकारकी पाहाण्यास सांगितली. बाजारपेठेतील महाजनकीचे वाडयात बोल्होबांच्या हाताखाली काम करता-करता व्यवसायाचे धडे मिळत गेले. वयाचे तेराव्या वर्षी तुकोबांच्या गळ्यात संसार पडला. तुकोबा लौकरच स्वतंत्रपणे व्यवसाय पाहू लागले. सावकारकीत, व्यापारधंद्यांत तुकोबांनी चांगलाच जम बसविला. लोकांकडून शाबासकी मिळू लागली. सर्वजण प्रशंसा करू लागले. राहात्या घरातील सोज्वळ सात्त्विक वातावरण तुकोबांनी बाजारपेठेतील-घरात-व्यवसायात आणले. तिन्ही भावांची लग्नकार्ये झाली. तुकोबांची प्रथम पत्नी दम्याने नेहमी आजारी म्हणून तुकोबांचा दुसरा विवाह पुण्यांतील सुप्रसिध्द सावकार आप्पाजी गुळवे यांची कन्या सौ. जिजाबाई उर्फ आवली यांच्याशी झाला. एका श्रीमंत घराण्याचा दुसऱ्या श्रीमंत घराण्याशी संबंध होता. हे ऐहिक ऐश्वर्य पराकोटीला पोहोचलं होतं. घरात धन-धान्य विपुल होते. प्रेमळ माता - पिता, सज्जन बंधू, आरोग्यसंपन्न शरीर होतं. कोणत्याही गोष्टीची काही उणीव नव्हती.
माता पिता बंधू सज्जन । घरीं उदंड धन धान्य ।
शरिरी आरोग्य लोकांत मान । एकहि उणे असेना ॥१॥
(महिपतीबाबा चरित्र)
हे सुखाचे समाधानाचे ऐश्वर्याचे दिवस केव्हा गेले, कसे गेले हे थोड-सुध्दा समजले नाही. या नंतर सुखापुढे येतसे दुःख। या भविष्याला सुरुवात झाली.
३. प्रेमळ मातापित्यांचा वियोग
वयाच्या सतराव्या वर्षी कर्तबगार प्रेमळ पिताश्री बोल्होबा मृत्यू पावले. ज्यांनी तुकोबांना मिराशीचे धनी केले.
बाप करी जोडी लेकराचे ओढी । आपली करवंडी वाळवोनी ॥१॥
एकाएकीं केला मिराशीचा धनी । कडीये वाहुनि भार खांदी ॥२॥
मिराशी-महाजनकी आणि देवाची सेवा.ज्यांच्यामुळे संसारतापाची झळ लागत नव्हती, तेच छत्र हारपले.
बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ॥१॥
(न कळता म्हणजे एकाकी माझे पश्चात) तुकोबांना असह्य दुःख झाल. हे दुःख कोठे ओसरते न ओसरते तोच पुढील वर्षी प्रेमळ माता कनकाई तुकोबांच्या देखत मृत्यु पावल्या.
माता मेली मज देखता ॥४॥
तुकोबांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. मातेने तुकोबांकरिता काय केल नाही सर्व काही केल.
काय नाही माता गौरवीत बाळा । काय नाही लळा पाळीत ती ॥१॥
काय नाही त्याची करीते सेवा । काय नाही जीवा गोमटेते ॥२॥
अमंगळपणे कांटाळा न धरी । उचलोनि करी धरी कंठी ॥३॥
यापुढे वयाच्या अठराव्या वर्षी वडील बंधू सावजींची पत्नी निधन पावली. आधीच सावजीचे प्रपंचाकडे लक्ष नव्हते, त्यात पत्नीचा मृत्यू. ते घरदार सोडून तीर्थयात्रेला जे गेले ते गेलेच. कुटुंबातील चार माणसांचा वियोग झाला. ज्या संसारात एकही उणे नव्हते त्यात आता एक एक उण होऊ लागल. तुकोबांनी धीर खचू दिला नाही. औदासीन्य आवरून विसावे वर्षी प्रपंच नेटका करण्याची हाव धरली. पण हाय ! एकविसाव्यात विपरीत काळ आला. दक्षिणेत मोठा दुष्काळ पडला. महाभयंकर दुष्काळ होता तो. इ. स. १६२९ त (शके १५५०-५१) पाऊस उशिरा पडला. शेवटी अती वृष्टीने पिके गेली. लोकांना अजून आशा होती. इ.स. १६३० मध्ये पाऊस अजिबात पडला नाही. सर्वत्र हाहाकार उडाला. धान्याचे भाव कडाडले. चाऱ्याच्या अभावी शेकडो गुरे मेली. अन्नावाचून शेकडो माणसे मेली. सधन कुटुंबे धुळीस मिळाली. अजून दुर्दशा संपली नव्हती. इ.स. १६३१ मध्ये त्या दैवी आपत्तीचा कडेलोट झाला. अती वृष्टीमुळे पिके गेली. महापुराने भयंकर नासाडी झाली. हा दुष्काळ ही दैवी आपत्ती तीन वर्षे टिकली. दुष्काळाच्या ह्या चढत्या दुर्दशेसंबंधी महीपतीबाबा लिहितात -
ती पुढे बरग पडले कठीण । दो पायल्याची झाली धारण ।
पर्जन्य निःशेष गेला तेणे । चाऱ्यावीण बैल मेले ॥१॥
पुढे दुष्काळाच स्वरुप भयंकरच वाढले.
महाकाळ पडीला पूर्ण । जाहाली धारण शेराची ।
ते ही न मिळे कोणा प्रती । प्राणी मृत्यूसदनी जाती ॥१॥
पायलीभर रत्नास पायलीभर उडद मिळेनात.
दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान ।
या दुष्काळामध्ये तुकोबांच्या प्रपंचाची संपूर्ण वाताहात झाली. गुरे ढोरे मेली. साव-सावकारकी बुडाली. व्यापार धंदा बसला. लोकातील मानमान्यता गेली. प्रथम कुटुंब रखुमाबाई आणि एकुलता एक लाडका मुलगा संतोबा यांचा दुष्काळाने बळी घेतला. सावकार आणि व्यापारी यांना दुष्काळी परिस्थिती म्हणजे सुवर्णसंधी. कृत्रीम दुष्काळ टंचाई निर्माण करून शेकडो रुपयांचा फायदा उठविणारे महाभाग आपण हल्ली पाहातोच की, लोकांच्याकडील येण दुष्काळी परिस्थितीत वसूल करणारे तुकोबा कठोर हृदयाचे नव्हते. उलट आपली दुर्दशा आपत्ती दुःख विसरून, बाजूला ठेवून - दुष्काळात गांजलेल्या पीडलेल्या लोकांना तुकोबांनीं सढळ हाताने मदत केली.
सहज सरले होते काही । द्रव्य थोडे बहु ते ही ।
त्याग केला नाही । दिलें द्विजां याचकां ॥३॥
काही द्रव्य सहज सरून गेल होत आणि थोडबहुत जे राहिल होत ते ब्राह्मणांना, भिकाऱ्यांना, गरजूंना सढळ हाताने दिलं. (यावरून तुकोबांचे दिवाळ निघाल होत असा शब्दशः अर्थ घ्यावयाचा नाही.)
संसाराच्या नावे घालोनिया शून्य । वाढता हा पुण्यधर्म केला ॥९॥
मायबाप, पुत्र कलत्रादि कौटुंबिकाचे मृत्यु, दुष्काळाने प्रपंचाची झालेली वाताहात, जनामधील दुर्दशा, सखे-सोयरे यांनी केलेली निंदानालस्ती, या सर्व आपत्तींना तुकोबांनी धैर्याने तोंड दिले. ते दुर्दशेला आपत्तीला सन्मुख झाले. पळून गेले नाहीत. ते पलायनवादी नव्हते. त्यांना संसार जिंकावयाचा होता. या रणांगणावर माघार घ्यावयाची नव्हती. या असारातून सार काढावयाचे होते. दुष्काळामुळे, दैवी आपत्तीमुळे, मानवी देह, देहसंबंधी - माता,पिता, पुत्र आणि संपत्ति यांचे मूल्यमापन झाले होते. अशाश्वता पटली होती. ते शाश्वत मूल्याचा शोध करूं लागले. आपण या उद्वेगातून पार कसे पडू? पैलतीर कसे गाठू. याचा विचार करू लागले.
४. साक्षात्कार
विचारले आधी आपुले मानसी । वाचो येथे कैसी कोण्यापरी ॥१॥
ते सत्याच्या शोधार्थ निघाले, त्या निश्चयाने ते भामनाथांच्या पर्वतावर गेले. चिरंतन सत्याचा साक्षात्कार झाला तरच परत फिरायच नाहीतर नाही. त्यांनी निर्वाण मांडले. तुकोबांच्या अंगावर मुंग्या, विंचू, सर्प चढले, ते अंगाला झोंबले व पीडा देऊ लागले. वाघाने झेप घातली. मात्र तुकोबांचा निश्चय ढळला नाही. पंधराव्या दिवशी सत्याचा साक्षात्कार झाला.
भामगिरी पाठारी वस्ती जाण केली । वृत्ती स्थिरावली परब्रह्मी ॥१॥
सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले । पिडू जे लागले सकळीक ॥२॥
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला । विठोबा भेटला निराकार ॥३॥
निराकार परमात्मा भेटला. देवाने भक्ताला ‘चिरंजीव भव’ आशिर्वाद दिला. दिलासा दिला.
तंव साह्य झाला हृदय निवासीं । बुध्दि दिली ऐशी नाश नाही ॥२॥
तुकोबांनी घर सोडल्यापासून तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबा त्यांच्या शोधार्थ देहू गावचे परिसरातील डोंगर, दऱ्या-खोऱ्या, जंगले धुंडाळत होते. शोधता शोधता ते भामनाथ पर्वतावरील गुहेत येऊन पोहोचले आणि आश्चर्यचकित झाले. काय दृश्य त्यांना दिसल ? तुकोबांच्या अंगावर मुंगळे, सर्प, विंचू चढलेले आहेत, वाघांनी झेप घेतलेली आहे. परमात्मा प्रगट झालेला आहे, सोनियाचा दिवस तो. कान्होबांच्या नेत्रांचे पारणे फिटले. जन्माचे सार्थक झाले. उभयता बंधूंची भेट झाली. ज्या स्थळी देव तुकोबांना भेटले, त्या पवित्र स्थळाचे पावित्र्य आणि स्मृती अखंड राहण्याकरिता त्या ठिकाणी कान्होबांनी काही दगड रचले. त्या पवित्र भूमीला वंदन करून उभयता बंधू तेथून निघून सरळ इंद्रायणीच्या संगमावर आले. संगमात स्नान करून पंधरा दिवसाच्या उपवासाचे पारणे सोडले. तुकोबांनी कान्होबांकडून खते पत्रे आणून घेतली. यांचे लोकांकडे जे येणे होते त्या त्या लोकांकडून लिहून घेतलेली खते होती. त्याच्या वाटण्या केल्या. निम्मी खते कान्होबाला दिली आणि स्वतःच्या वाटयाची निम्मी खते तुकोबांनी इंद्रायणीच्या डोहात बुडविली. या धनकोने ऋणकोकडून येण असलेल्या रकमा दुष्काळानंतर येनकेन प्रकारेण वसूल करून आपल्या विस्कटलेल्या संसाराची घडी बसविण्याऐवजी खते गंगार्पण करून ऋणकोंना कर्जमुक्त केले आणि आपण सावकारकीकडे पाठ फिरवून विन्मुख झाल्याचे जगाला दाखवून दिल. याला म्हणतात सच्चा समाजवाद.
देवाचे देऊळ होते जे भंगले । चित्ती ते आले करावे ते ॥१॥
जसे खते पत्रे इंद्रायणीच्या डोहांत बुडवून सावकारशाहीला विन्मुख झाल्याचे विलक्षण रीत्या दाखवून दिले तसेच दुष्काळानंतर भंगलेला संसार न सांधता, देवाच्या भंगलेल्या देवळाचा जीर्णोध्दार करून देवाला - परमार्थाला सन्मुख झाल्याचे तुकोबांनी जग जाहीर केले. पिताश्री बोल्होबांच्या कारकिर्दीत वाढत्या यात्रेला देवघर अपुरे पडू लागले म्हणून इंद्रायणीच्या रम्य तीरावर बोल्होबांनी देवाचे देवालय बांधले व राहत्या वाडयाच्या देवघरातील मूर्तीची स्थापना या नव्या देवालयात केली. तुकोबांच्या वेळी देऊळ भंगले होते. म्हणून दुष्काळानंतर सर्वप्रथम तुकोबांनी देवालयाचा जीर्णोध्दार केला.
श्रीमूर्तींचे होते देवालय भंगले । पाहाता स्फुरले चित्ती ऐसे ॥१॥
म्हणे हे देवालय करावयाचे आता । करावया कथा जागरण ॥२॥
देवालयाचा जीर्णोध्दार केला तो देऊळ बांधण्याने होणाऱ्या पुण्यप्राप्तीरिता नव्हे तर भजन, कीर्तन, कथा, जागरण करण्याकरिता. हरीजागरण, श्रवण, कीर्तन, मनन, सहज साक्षात्कार आणि मग पांडुरंग कृपा - देवालयाने या अशक्य गोष्टीची सहज साध्यता-प्राप्ती झाली.
काही पाठ केली संतांची उत्तरे । विश्वासे आदरे करोनिया ॥१॥
कीर्तन करण्यास उभे राहण्याकरिता देवालय बांधले. आणि कीर्तन करण्यास लागणाऱ्या पाठ-पाठांतराकरिता तुकोबा रोज भंडारा डोंगरावर एकांतात जाऊन अभ्यास करूं लागले. प्रातःकाळी स्नान करून कूळ दैवत श्रीविठ्ठल-रखुमाई यांची स्वहस्ते पूजा अर्चा करावयाची व भंडारा डोंगर गाठावयाचा.
कीर्तन संपूर्ण यावयासी हाता । अभ्यास करिता झाला तुका ॥५॥
अभ्यास तुकया करीतसे ऐसा । सरितासी जैसा पात्र सिंधु ॥६॥
तैसे जे ऐके ते राहे अंतरी । ग्रंथ याहीवरी वाचीयेले ॥७॥
ज्ञानदेव महाराजांची - ज्ञानदेवी, अमृतानुभव, एकनाथ महाराजांची भागवतावरील टीका, भावार्थ रामायण, स्वात्मानुभव, नामदेवरायांचे अभंग, कबीरांची पदे यांचे तुकोबांनी परीशीलन केले. ज्ञानदेव महाराज, नाथ महाराज, नामदेवराय आणि कबीर या थोर भक्तिमार्गीय संतांची काही वचने त्यांनी पाठ केली.
करू तैसे पाठांतर । करुणाकार भाषण ॥१॥
जिही केला मूर्तिमंत । ऐसा संतप्रसाद ॥२॥
निर्गुण निराकार परमात्म्याला ज्यांनी सगुण साकार केला. अमूर्ताला ज्यांनी मूर्तिमंत केला असा हा संत प्रसाद सेवन केला. तुकोबांनी पुराणे पाहिली, शास्त्राचा धांडोळा घेतला.
पाहिलीं पुराणे । धांडोळिली दरूषणे ॥१॥
पुराणीचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥
तुकोबांना हा एकांतवास फार आवडत असे. या एकांतात त्यांना सखेसोयरे भेटले होते. अर्थात् ते एकांतांतील सख्यासोयऱ्यांपेक्षा निराळे होते. कोण होते ते ? वृक्ष होते, वेली होत्या ! वनचरे होती. पक्षीराज मधुर, मंजुळ सुरात कुजन करीत होते. देवाला आवळीत होते.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीये सुस्वरे आळविती ॥१॥
येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ॥
आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथे मन क्रीडा करू ॥३॥
येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ॥
तुकोबांच्या पत्नी सौ. जिजाबाई रोज घरचा कामधंदा आटोपून स्वयंपाक उरकून तुकोबांचे जेवण घेऊन भंडाऱ्यावर जात असत. तुकोबांना जेऊ घातल्यानंतर आपण जेवत असत, तुकोबा परमार्थ साधनेत निमग्न असता - विदेह स्थितीत असता त्यांची सर्व काळजी सौ. जिजाबाई घेत असत. तुकोबांच्या परमार्थात जिजाबाईंचा फार मोठा वाटा होता. शरीर कष्टवून परोपकार, संत वचनाचे पाठ- पाठांतर, वाचणे विठ्ठलाचे नामस्मरण आणि चित्ताने विठोबाचे ध्यान - अशी साधना अखंड चालू असता तुकोबांच्या स्वप्नात श्रीपंढरीराय नामदेवरायांना घेऊन आले. त्यांनी तुकोबांना जागे केले आणि जगत् उध्दाराकरितां कवित्व करण्याचे काम सांगितले.
५. कवित्वाची स्फूर्ती आणि जलदिव्य
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे । सवे पांडुरंगे येऊनिया ॥१॥
सांगितले काम करावे कवित्व । वाउगे निमित्य बोलो नको ॥धृ॥
माप टाकी सळ धरिली विठ्ठले । थापटोनि केले सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटी लावी तुका ॥३॥
द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥
आवडीचा ठाव आलोंसे टाकून । आतां उदासीन न धरावे ॥धृ॥
सेवटील स्थळ निंच माझी वृत्ति । आधारे विश्रांती पावईन ॥२॥
नामदेवापायी तुक्या स्वप्नी भेटी । प्रसाद हा पोटी राहिलासे ॥३॥
तुकोबांचा स्वतःचा उध्दार झाला होता.आता त्यांना लोकोध्दार करावयाचा होता. त्यांना लाभलेला प्रसाद लोकांना वाटावयाचा होता. परमात्म्याचा संदेश, निरोप त्यांना घरोघर पोहोचावयाचा होता.
तुका म्हणे मज धाडिले निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥
तुकोबांना कवित्वाची स्फूर्ती झाली.
यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती । पाय धरिले चित्ती विठोबाचे ॥
आणि तुकोबांचे मुखातून अभंगगंगा वाहू लागली. सभाग्यश्रोते श्रवण करू लागले.
बोलावे म्हणून बोलतो उपाय । प्रवाहेचि जाये गंगाजळ ॥१॥
भाग्य योगे कोणा घडेल श्रवण । कैचे तेथे जन अधिकारी ॥२॥
तुकोबांच्या अभंगातून श्रुतीशास्त्राचे मथित, महाकाव्य फलार्थ निघू लागला. आळंदीत श्रीज्ञानदेव महाराजांच्या महाद्वारात तुकोबा कीर्तन करीत असता, ही प्रासादिक अभंगवाणी महापंडित रामेश्वरभट्टजी यांच्या कानावर जाऊन आदळली. त्यांना धक्काच बसला. ही गीताची किं मूर्तीमंत, किं नेणो श्रीमत् भागवत ॥ - ही प्रत्यक्ष वेदवाणीच आणि ती प्राकृतातून आणि ती तुकोबाच्या मुखातून !
तुकयाचे कवित्व ऐकून कानी । अर्थ शोधूनि पाहाता मनी ।
म्हणे प्रत्यक्ष हे वेदवाणी । त्याचे मुखे कानी न ऐकावी ॥
तरी यासी निषेधावे । सर्वथा भय न धरावे ॥
रामेश्वरशास्त्रींनी निषेध केला ते म्हणाले - “तुम्ही शूद्र आहात? तुमच्या अभंगवाणीतून वेदार्थ प्रगट होत आहे, तुमचा तो अधिकार नाही. तुमच्या मुखाने तो ऐकणे हा अधर्म आहे. तुम्हाला हा उद्योग कोणी सांगितला.” तुकोबा म्हणाले, “ही माझी वाणी नव्हे, ही देववाणी आहे.”
करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥१॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥२॥
नेणे अर्थ काही नव्हती माझे बोल । विनवितो कोपाल संत झणी ॥१॥
नव्हती माझे बोल, बोले पांडुरंग । असे अंग संग व्यापुनिया ॥२॥
नामदेवराय आणि पंढरीराय स्वप्नात येऊन त्यांनी कवित्व करावयाची आज्ञा केली.
विप्र म्हणे आज्ञा कारण । श्रीची कैसे जाणेल जन ।
यालागी कवित्व बुडवून । टाकी नेऊन उदकात ॥१॥
तेथे साक्षात नारायण । आपे रक्षील जरी आपण ।
तरी सहजचि वेदाहून । मान्य होईल सर्वाशीं ॥१६॥
तुमचे कवित्व बुडवून टाका. देववाणी असेल तर देव तीच पाण्यात रक्षील. गावच्या पाटलाला रामेश्वरशास्त्रींनी तुकोबाच्या या अधर्माबद्दल कळविले. गावचा पाटील रागावला. लोक खवळले.
काय खावे आता कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥१॥
कोपला पाटील गावचे हे लोक । आता घाली भीक कोण मज ॥धृ॥
तुकोबांनी अभंगाच्या सर्व वह्या घेतल्या. दगड बांधून त्या इंद्रायणीच्या डोहात स्वहस्ते बुडविल्या. पूर्वी खत-पत्रे प्रपंच बुडविला, आता अभंगाच्या वह्या-परमार्थ बुडविला.
बुडविल्या वह्या बैसिलो धरणे ॥
तुकोबांना असह्य दुःख झाल. लोक निंदा करू लागले. कसला दृष्टांत आणि कसला प्रसाद ! सगळ थोतांड. कसला देव आणि कसला धर्म ! तुकोबा महाद्वारात असलेल्या शिळेवर देवासमोर धरणे धरून बसले. प्राण पणाला लावला. निर्वाण मांडले. तेरा दिवस झाले. देव काही पावेना.
तेरा दिवस झाले निश्चक्र करिता । न पवसी अनंता मायबापा ॥
तुजवरी आता प्राण मी त्यजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा॥
तुका म्हणे आता मांडिले निर्वाण । प्राण हा सांडीन तुज वरी ॥
इकडे रामेश्वरशास्त्री तुकोबांचा निषेध करून आळंदीहून निघाले ते नागझरीच्या उगमाजवळील पंचवटापाशी आले. ते तेथे असलेल्या सरोवरात स्नानाकरिता उतरले. स्नान करीत असता त्या सरोवरातील पाणी नेण्याकरिता अनगड सिध्द फकीर आला. “आपण कोण ? कोठून आलात ?” म्हणून त्याने विचारले असता त्याला पाहाताच शास्त्रीबुवांनी कानात बोटे घालून बुडी मारली- (यावनी भाषा ऐकावयाची नाही म्हणून) या कृत्याने अनगड सिध्दास राग आला व त्यांनी शाप दिला. रामेश्वरशास्त्री पाण्यातून बाहेर निघताच त्यांच्या अंगाचा दाह होऊं लागला. अंगाला ओले कपडे गुंडाळून फकिराच्या शापातून मुक्त होण्याकरिता शिष्या समवेत शास्त्री आळंदीला परतले व अजान वृक्षाखाली अनुष्ठान करीत बसले.
तो इकडे देहूस तेरावे रात्री भगवंताने सगुण बाळवेष धारण करून तुकोबांना भेटले. आणि सांगितले की, “आपल्या वह्यांचे मी पाण्यांत अठरा दिवस अहोरात्र उभे राहून रक्षण केले आहे. त्या उद्या पाण्यावरती येतील.” याप्रमाणे देहू गावच्या भाविक भक्तानांही दृष्टांत झाले. दृष्टांताप्रमाणे ही सर्व भक्तमंडळी इंद्रायणीच्या डोहावर गेली. तो काय सर्व वह्या पाण्यावरती आल्या व तरंगू लागल्या. पोहोणारांनी उडया टाकून त्या ऐल तीरावर आणल्या. त्यांना पाण्याचा यत्किंचितही स्पर्श झाला नव्हता. सर्वांनी जयजयकार केला. देवाला आपण त्रास दिल्याबद्दल तुकोबांना फार खेद वाटला.
थोर अन्याय मी केला । तुझा अंत म्यां पाहिला ॥
जनाचिया बोलासाठी । चित्त क्षोभविले ॥१॥
उदकी राखीले कागद । चुकविला जनवाद ।
तुका म्हणे ब्रीद । साचे केलें आपुलें ॥
तिकडे आळंदीला रामेश्वरशास्त्रींना ज्ञानदेव महाराजांनी सांगितले की, “आपण तुकोबांची निंदानालस्ती केली त्याचे हे फळ आहे. तरी यावर आता एकच इलाज आपण तुकोबांकडे देहूला जा.” रामेश्वरशास्त्री देहूला निघाले, हे तुकोबांना समजले. तुकोबांनी आपल्या शिष्याजवळ शास्त्रीबुवाकरिता एक अभंग देऊन त्यास आळंदीला पाठविले तो अभंग रामेश्वरभटजींनी वाचताच त्यांचा दाह शांत झाला.
चित्त शुध्द तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥
दुःख तें देईल सर्व सुखफळ । होतील शितळ अग्निज्वाळा ॥
रामेश्वर भटजी यासंबंधी आपला अनुभव सांगतात.
काही द्वेष त्याचा करिता अंतरी । व्यथा हे शरीरी बहू झाली ॥
म्हणे रामेश्वर त्याच्या समागमें । झाले हे आराम देह माझे ॥
रामेश्वर भट तुकोबांच्या दर्शनास देहूस आले आणि कथा कीर्तने ऐकण्याकरिता देहूलाच राहिले. रामेश्वर भटांना शापमुक्त केल्याचे वर्तमान अनगडशाहाला कळले, त्याला विषाद वाटला. तो तुकोबांचा छळ करण्याकरिता देहूस आला. तुकोबांचे घरी गेला. कटोराभर भिक्षा मागितली. तुकोबांच्या कन्या हिने चिमूटभर पीठ कटोऱ्यात टाकताच तो पूर्ण भरून पीठ खाली सांडले. सिध्दाचे सामर्थ्य तुकोबांचे द्वारी लयाला गेले. अनगडशहा भक्तिभावाने तुकोबांना भेटले व तुकोबांचे जवळ भजन कीर्तन ऐकण्याकरिता राहिले. दार्शनिक ज्ञान, पांडित्य ऋद्धी व सिद्धी , हरिभक्तीला शरण आल्या. असो. वह्या तरल्याचे शुभवर्तमान देशोदेशी पसरले; वह्या तरल्याने लोकापवाद टळला. अभंगवाणी अविनाशी ठरली; परमात्म्याचे सगुण दर्शन झाले तुकोबांच्या कथा कीर्तनाचा मार्ग मोकळा झाला.
६. तुकोबा आणि दोन संन्याशी
अवघा झाला रामराम । कोणी कर्म आचरेन ॥१॥
तुकोबांची कीर्तने नव्या जोमाने व उत्साहाने सुरू झाली. तुकोबांचे लोकाध्दाराचे व जनता जागृतीचे साधन भजन कीर्तन.
तुका म्हणे केली साधना गाळणी । सुलभ कीर्तनी होऊनी ठेला ॥४॥
भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेचा पण प्रेमसुख लुटले, गोकुळच्या लोकांनी तुकोबांचा जन्म देहूचा पण भक्तीप्रेम सुख लुटले लोहगावच्या लोकांनी. लोहगाव तुकोबांचे आजोळ. तुकोबांची कीर्तने नेहमी लोहगावला होत असावियीची. एकदा दोन संन्याशी तुकोबांच्या कीर्तनाला येऊन बसले. त्यांना काय दिसले- स्त्री- पुरुष, कथा- कीर्तन मोठया तल्लीनतेने ऐकत आहेत. लहान-थोर, ब्राह्मण, शूद्र एकमेकांच्या पाया पडत आहेत. भेदभाव नाहीसा झालेला आहे. हे दृश्य पाहून त्यांनी तुकोबांची निंदा करून ब्राह्मणाची निर्भत्सना केली. तुम्ही कर्म भ्रष्ट झालात. कर्ममार्ग सोडून रामराम करत बसलात. ते तेथून निघाले. काखेतील मृगाजीन सावरत सावरत दाद मागण्याकरिता दादोजी कोंडदेवाकडे गेले.
काखे कडासन आड पडे । खडबड खडबड हुसकले ॥१॥
दाद करा दाद करा । फजीत खोरा लाज नाही ॥धृ॥
अवघा झाला रामराम । कोणी कर्म आचरेन ॥३॥
दाद करा दाद करा । फजीत खोरा लाज नाही ॥धृ॥
त्यांनी फिर्याद दिली की - “लोहगावच्या ब्राह्मणांनी ब्रह्मकर्म सोडून दिले आहे ते शूद्राचे चरणी लागले आहेत. आणि राम राम म्हणत आहेत. अधर्म माजलेला आहे. तरी आपण याचे परिपत्य केले पाहिजे.” दादोजींनी आपले सैनिक पाठवून ब्राह्मणांना १०० रुपये दंड केला. तुकोबांना आणि लोहगावच्या लोकांना यावयास सांगितले. तुकोबा लोहगावच्या लोकांसह पुण्यास संगमावर आले व कीर्तन आरंभिले. तुकोबा आल्याचे समजतांच संपूर्ण पुण्य नगरी तुकोबांचे दर्शनास व कीर्तनास लोटली. दादोजीही निघाले. दादोजी, तुकोबांचे कीर्तन ऐकत बसले. संन्याशीही बसले होते. त्यांना तुकोबा परमात्मा स्वरूप दिसू लागले. त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की, त्यांनी तुकोबांच्या चरणावर लोटांगण घातल. दादोजींने त्यांना त्यांच्या कृत्याचा जाब विचारला की, “ब्राह्मण शूद्राच्या पाया पडतात, अधर्म होतो अशी फिर्याद आपण देता आणि आपण पाया पडता हे काय?” ते म्हणाले, “आम्हाला कीर्तनात तुकोबांमध्ये नारायण दिसले. ” स्वतः दादोजीने तुकोबांचा सत्कार केला आणि संन्याशांची फटफजिती करून त्यांना शहराबाहेर हाकलून दिले.
७. धरणेकरी
बीड परगण्याचा देशपांडे उतारवयांत त्याला वाटू लागले की, आपण पंडित व्हावे. या वयात पाठपाठांतर अभ्यास करून पंडित होण अशक्य म्हणून तो आळंदीला ज्ञानदेव महाराजांच्या जवळ धरणे धरून बसला. ज्ञानदेव महाराजांनी त्याला सांगितले, “बाबा, तू देहूला तुकोबांकडे जा. कोर्ट सध्या तेथे आहे.” त्याप्रमाणे तो देहूस आला. ते समयी तुकोबांनी एकतीस अभंग केले. देवाचा धांवा अभंग सात आणि उपदेश अभंग अकरा तुकोबांचा बोध, विचारसरणी, उपदेशाची पध्दत आणि तत्त्वज्ञान यांतून अभंगाच्या गटात साकल्याने पाहावयास मिळते. तुकोबांनी प्रथम देवाकडे धाव घेतली. देवा तुम्हाला न सांगताहि अंतरातलं गुप्त कळू शकत. तेव्हा अभयदान देऊन आळीकराचे समाधान करा आणि आपली लाज आपण राखा.
न सांगता कळे अंतरीचे गुज । आता तुझी लाज तुज देवा ॥१॥
आळीकर त्यांचे करी समाधान । अभयाचे दान देऊनी ॥२॥
धरणेकऱ्यास उपदेश
पोथ्या, पुस्तक आणि ग्रंथ पाहण्याच्या भानगडीत आता पडू नको. ताबडतोब तू आता हेच एक कर. देवाकरिता देवाला आळव. म्हातारपण आलेले आहे तेव्हा आता उशीर किती करावयाचा ?
देवाचिये चाडे आळवावे देवा । वोस देहभाव पाडोनियां ॥१॥
तू मनाला गोविंदाचा छंद लाव मग तूच गोविंद होशील.
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥
मग गोविंद ते काया । भेद नाही देवा तया ॥१॥
सुखाने अन्न खा आणि परमात्म्याचे चिंतन कर. हरीकथा ही माउली आहे. आणि सुखाची समाधि आहे. शिणलेल्याची साऊली, विश्रांति स्थान आहे.
सुखाची समाधि हरीकथा माऊली । विश्रांति साऊली शिणलियांची ॥१॥
इतरांनी उपास करावा. विठ्ठलाचे दासाने चिंता झुगारून द्यावी- आमच्या अंगात सगळे बळ आले आहे. तुकोबांनी हा बहुमोल उपदेश त्या धरणेकऱ्यास केला - त्याने मूर्खपणाने काय केल-
देवाचे उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करोनि गेला ॥
८. छत्रपती शिवाजी आणि तुकोबा
तुकोबांची कीर्ती शिवाजी राजे यांच्या कानावर गेली. त्यांनी तुकोबांना दिवटया, छत्री घोडे आणि जडजवाहीर सेवकाबरोबर पाठवून दिले. तुकोबांनी त्याचा स्वीकार केला नाही. सोबत चार अभंगांचे पत्र देऊन तो नजराणा शिवाजी राजांकडे परत पाठविला. ते देवास म्हणाले,
नावडे जे चित्ता । ते तू होशी पुरविता ॥१॥
दिवटया, छत्री, घोडे ही काही मला फायद्यात पडणारी नाहीत (किंवा ह्यांच्यांत मी पडणारा नव्हे) देवा तूं मला यात कशाला गुंतवतोस? तुकोबांच्या ह्या निरपेक्षतेच शिवाजी राजे यांना आश्चर्य वाटलं व ते स्वतः तुकोबांचे भेटीला वस्त्रे, भूषणे, अलंकार, मोहरा घेऊन सेवकांसह लोहगावला आले, ते राजद्रव्य पाहून तुकोबा म्हणाले -
काय दिला ठेवा । आम्हा विठ्ठलचि व्हावा ॥१॥
तुम्ही कळले ती उदार । साठी परिसाची गार ॥२॥
तुका म्हणे धन । आम्हा गोमांसासमान ॥३॥
मुंगी आणि राव आम्हाला दोन्ही सारखेच आहे. त्याचप्रमाणे सोने आणि माती ही आम्हाला समानच वाटते.
मुंगी आणि राव । आम्हा समानचि जीव ॥१॥
सोने आणी माती । आम्हा समानचि चित्ती ॥२॥
आम्ही या गोष्टीने सुखी होणार नाहीत तर आपण देवाचे नाव घ्या. श्रीहरीचे सेवक म्हणवा.
आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ॥१॥
म्हणवा हरिचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥२॥
तुकोबांच्या उपदेशांनी प्रभावित होऊन राजांनी राज्यच सोडून दिले आणि तुकोबांचे भजन कीर्तन श्रवण करू लागले, तेव्हा तुकोबांनी त्यांना आणि त्यांच्या सेवकांना क्षात्र धर्म सांगीतला :
आम्ही जगाला उपदेश करावा । आपण क्षात्रधर्म सांभाळावा ॥
भांडण पडले असता सेवकांनी स्वामीच्या पुढे व्हावे ।
स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण ॥
गोळया, बाण यांचा वर्षाव होत असतां सैनिकांनी तो सहन करावा. आपले संरक्षण करून शत्रूला फसवावे. आणि त्याचे सगळे हिरून घ्यावे. शत्रूला आपला माग लागूं देऊ नये. आपण स्वामीकरिता जीवावर उदार असावे, असे ज्याचे सैनिक- सेवक आहेत तोच त्रैलोक्यांतील सामर्थ्यवान राजा होय.
तुकोबांनी शिवाजी राजे यांना आशीर्वाद देऊन निरोप दिला. राजे आणि सैनिक यांनी तुकोबांचा उपदेश चित्तात धरला, प्रत्यक्ष कृतीत उतरवला. तुकोबांच्या आशीर्वादाने ते सामर्थ्य संपन्न महाराजे झाले.
९. तुकोबांचा बोध उपदेश शिकवण
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव । आपणचि देव होय गुरु ॥१॥
ज्ञानमार्गात गुरुची महती विशेष भक्तिमार्गात तितकी नाही.
मेघवृष्टीने करावा उपदेश । परि गुरुने न करावा शिष्य ॥
या विचारसरणीचे तुकोबा. अद्वैत शास्त्राची तुकोबांना मुळीच आवड नसे.
अद्वैताची वाणी । नाही ऐकत मी कानी ॥१॥
तुकोबांचे सगुणावर प्रेम विशेष. यामुळे महाराज श्रीगुरूस शरण गेले नाहीत.
अद्वैतशास्त्र नावडे यासी । यास्तव शरण न जाय सद्गुरुशी ॥
पुढे वाट पडेल ऐसी । गुरु भक्तीशी अवरोध ॥
एक श्रेष्ठ आचरला जैसे । जन पाहोनि वर्तती तैसे ॥
तरी आपण धरूनि विप्रवेश । द्यावा तुकयासी अनुग्रह ॥
स्वप्नामध्ये तुकोबा इंद्रायणीचे स्नान करून देवळात जात असता त्यांनी रस्त्यात एक ब्राह्यण पाहिला व त्याला नमस्कार केला. ब्राह्मणाने संतुष्ट होऊन तुकोबांच्या मस्तकावर हात ठेवला व ‘रामकृष्ण हरि’ मंत्र दिला. आपली परंपरा सांगितली. माघ शुध्द दशमीस गुरूवारी ही घटना घडली.
सापडविले वाटे जात गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥२॥
राघव चैतन्य केशव चैतन्य । सांगितली खुण मालिकेची ॥४॥
बाबाजी आपुले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्ण हरि ॥५॥
माघ शुध्द दशमी पाहोनि गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥६॥
तुकोबांनी स्वतः कोणापाशी मंत्राची याचना केली नाही. ते म्हणतात
नाही म्या वंचिला मत्र कोणापाशी । राहिलो जिवाशी धरोनिया ॥१॥
तुकोबा म्हणतात, मला कान फुंकण्याचे माहीत नाही व मजजवळ एकांतीचे ज्ञान नाही. पण जो देव कोणी डोळयांनी पाहिला नाही तो आम्ही दाखवू.
नेणो फुंको कान । नाही एकांतीचे ज्ञान ॥२॥
नाही देखिला तो डोळा । देव दाखवू ते कळा ॥३॥
प्रपंचामध्ये प्रभूचे अधिष्ठान असल्याखेरीज देव आपलासा केल्याखेरीज जीवांना सुख होणार नाही.
आपुला तो एक देव करोनी घ्यावा । तेणे विन जीवा सुख नोहे ॥२॥
तुम्ही माझा अनुभव पाहा
माझा पहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥
बोलवले तेची द्यावे । उत्तर व्हावे ते काळी ॥२॥
हा अनुभव कशाचा म्हणाल तर-
हा गे माझा अनुभव । भक्तीभाव भाग्याचा ॥१॥
ऋणी केला नारायण । नोहे क्षण वेगळा ॥२॥
दैवाच्या लीलेने तुकोबांचा संसार रसातळाला नेला.देवाच्या लीलेने तुकोबांनी गौरीशंकर गाठल. दैव अनिर्बंध आहे त्याला कशाचेही बंधन नाही. देवाला बंधन आहे कशाच ? तर प्रेमाच.
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातो हरी ॥१॥
ते प्रभू प्रेम स्मरणाने मिळते.
आम्ही घ्यावे तुझे नाम । तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ॥
संताच्या गावीही प्रेमाचा सुकाळ असतो.
संताचिये गावी प्रेमाचा सुकाळ । नाही तळमळ दुःख लेश ॥१॥
संताच्या व्यापारात, उपदेशाच्या पेठेत प्रेमसुखाची देवाण- घेवाण चाललेली असते.
संतांचा व्यापार उपदेशाची पेठ । प्रेमसुखासाठी देती घेती ॥
येऱ्हवी हे भक्ती प्रेमसुख काय आहे, हे पंडितांना, ज्ञानियांना, मुक्तांना माहितही नाही आणि कळत नाही.
भक्ति प्रेम सुख नेणवे आणिका । पंडिता वाचका ज्ञानियासी ॥
या प्रेमाने समाज सांधला जाईल. प्रेमाच्या बंधनाने समाज बांधला जातो. प्रेमात सर्व भेद-आपपरभाव नाहीसे होतात. प्रेमानें जीवन सुखी समृध्द होतें. असें हें दिव्य दैवी प्रेम प्रभुस्मरणानें मिळेल. संताचे सान्निध्यात मिळेल.प्रेमात दुःखाचे रूपांतर सुखांत होईल. मनुष्य जीवन संपूर्ण पालटून जाईल.
उपदेश
उपदेश तो भलत्या हाती । झाला किती धरावा ॥
आता तरी पुढे हाची उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥
मोलाचे आयुष्य जाते हातोहात । विचारी पाहात लवलाही ॥
गात जातो तुका । हाचि उपदेश लोका ॥
तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिये ॥
कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्वि । तयाचा हरीख वाटे देवा ॥
गीता भागवत करीती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे ॥
हित ते करावे देवाचे चिंतन । करोनियां मन शुध्द भावे ॥
तुका म्हणे फार । थोडा तरी उपकार ॥
संतसंग
संग न करावा दुर्जनांचा । करी संतांचा सायास ॥
पतन उध्दार संतांचा महिमा । त्यजावे अधमा संत सेवी ॥
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदासे विचारे वेच करी ॥
तुकोबांची शिकवण सुविचाराची, सदाचाराची आणि समतेची होती. प्राणिमात्राचे कल्याण होण्याकरिता ते कोणाची भीडभाड ठेवीत नसत.
नाही भिडभाड । तुका म्हणे सानाथोर ॥
तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊनि बाण फिरे ॥
तुका म्हणे लासू फासू देऊ डाव । सुखाचा उपाय पुढे आहे ॥
१०. तुकोबांचे ध्रृपदे, टाळकरी, अनुयायी व शिष्य
तुकोबांचे मुख्य धृपदे टाळकरी १४ होते म्हणून महीपतीबाबाने त्याचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तुकोबांचे कीर्तनात हे ध्रृपद धरीत.
१. महादजीपंत कुलकर्णी देहू गावचे कुलकर्णी - याचा उल्लेख बहिणाबाईचे गाथेतही
आलेला आहे - देवालयाच्या बांधकामावर यांची देखरेख होती.
२. गंगाधरबाबा मवाळ - (तळेगाव), अभंग लेखक, हे तुकोबांचे सेवेस लागल्याचा
कागदोपत्री उल्लेख आहे.
३. संताजी तेली जगनाडे - (चाकणकर) - तुकोबाचे अभंग लेखक.
४. तुकया बंधू कान्होबा.
५. मालजी गाडे, (येलवाडी) - तुकोबांचे जामात.
६. कोंडोपंत लोहकरे - लोहगाव.
७. गवार शेट वाणी - सुदुंबरे.
८. मल्हारपंत कुलकर्णी - चिखली.
९. आबाजीपंत लोहगावकर.
१०.रामेश्वरभट्ट बहुळकर.
११.कोंडपाटील, लोहगाव.
१२.नावजी माळी - लोहगाव.
१३.शिवबा कासार - लोहगाव.
१४.सोनबा ठाकूर - कीर्तनांत मृदंग वाजवीत असत.
तुकोबांची शिष्या बहिणाबाई यांना तुकोबांचा स्वप्नात उपदेश झाला. त्या देहूस दर्शनाकरिता आल्या, कवित्वस्फूर्ती बाईंना देहूस झाली. बहिणाबाईंनी तुकोबाची कथा कीर्तने प्रत्यक्षांत ऐकली. मंबाजीकडून यांना बराच त्रास पोहोचला. बहिणाबाईंची योग्यता अधिकार तुकोबांचे खालोखाल होता. बहिणाबाईंची अभंगाची गाथा एकदा तरी वाचून पाहावीच.
११. प्रयाण
कार्तिक वद्य एकादशीला आळंदीस ज्ञानदेव महाराजांचे पुढे तुकोबाचे कीर्तन चालले होते. यात्रा अपार होती. कीर्तनाचा अभंग होता.
भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनू ॥१॥
शरीर कोठे ब्रह्म होईल काय? कोणी केले आहे काय? असे आत्मानात्म विचारकर्ते, ज्ञानी जे श्रोते होते त्यांनी तुकोबाला विचारले. तुकोबा म्हणाले, ‘मी करून दाखवीन.’
घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्याहाती । मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ॥
ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी । भाग्य तरी ऋणी देवा ऐसा ॥
लोहगावला तुकोबांचे कीर्तन चालू असताना परचक्र येऊन लोहगाव लुटले. तुकोबांनी देवाचा धावा केला.
न देखवे डोळा ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होते ॥१॥
देव ताबडतोब पावले नाहीत. तुकोबांनी देवाला सांगितले.
तुज भक्ताची आण देवा । जरी तुका येथे ठेवा ॥१॥
तिसरी गोष्ट - ज्ञानदेव महाराजांनी तुकोबांची अपार सेवा केली त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरिता ज्ञानदेव महाराज जिजाईचे पोटी आले. तुकोबाने ओळखले की, देव सेवा करू पाहातात हे बरें नव्हे आपणच येऊन जावे सर्वाची विचारपूस केली, सर्वाना सांगितले, ‘आम्ही वैकुंठाला जात आहोत. तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला’ कोणी तयार झाले नाही. महाराज सर्वासमवेत इंद्रायणीच्या काठी आले तेथे नांदुरुखीचे वृक्षाखाली कीर्तनास आरंभ केला. १४ टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिले तुकोबांचे चिरंजीव महादेव विठोबा पुढे आले त्यांनी तुकोबांना नमस्कार केला. तुकोबांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. जिजाबाईकडे कौतुकाने पाहिले. सगळयांना सांगितले-
सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावे तुम्ही ॥
वाढवेळ झाला उभा पांडुरंगा । वैकुंठा श्रीरंग बोलावतो ॥
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥
अंतःकाळी विठो आम्हांसी पावला । कुडीसहित झाला गुप्त तुका ॥२॥
भगवत्कथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले. याचा उल्लेख राज्याभिषेक शके ३० च्या सनदेत आहे. श्री तुकोबा गोसावी सत्पुरुष हे मौजे देहू ता. हवेली , जि. पुणे येथे भागवत कथा करीत असता अदृश्य झाले हे गोष्ट विख्यात आहे.रा.तुकोबा गोसावी हे बहुत थोर सत्पुरुष होते. इ.स.१७०४ च्या देहूगावची सनद. सनद रामचंद्र नीळकंठ अमात्यांचे हातची आहे.रामचंद्र पंत छत्रपती शिवाजी राजे यांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदावरील एक प्रधान होते.
शके पंधराशे एकाहत्तरी । विरोधी नाम संवत्सरी ।
फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारी । प्रथम प्रहरि प्रयाण केले ॥२॥
“तुकोबा गोसावी वैकुंठास गेले. स्वदेहीनिशी गेले. ” बाळोजी तेली जगनाडे वही, पृ. २१६, संताजींच्या वहीची नक्कल. संताजी प्रयाण समयी प्रत्यक्ष हजर होते.
तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेश्वरशास्त्रींनी निर्णय दिला. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. सर्वानी स्नाने उरकली. तुकोबांची मुले, बंधू कान्होबा देवाशी भांडले. ‘देवा तू माझ्या बंधूला आणून दे. वैकुंठाला नेऊ नकोस.’ देवाने कान्होबाचे समाधान केले.
१२. तुकोबांच्या पश्चात्
तुकोबा देहासह वैकुंठास गेल्याचे वर्तमान ऐकून शिवाजीराजे विस्मय पावले. तेव्हा त्यांनी देहू येथील जानोजी भोसले याच्याजवळ तुकोबांच्या कुटुंबियांची विचारपूस केली व तुकोबांचे वडील पुत्र महादेवबुवा यांना भेटी घेऊन येण्याविषयीची आज्ञा केली. जानोजी भोसले महादेव बाबास घेऊन शिवाजी राजे यांचेकडे गेले. शिवाजी राजे यांनी महादेवबाबास वर्षासन “एक खंडी धान्य व लुगडयाकरितां एक होनाची सनद करून दिली.” संभाजी राजे यांनी हे वर्षासन पुढे चालू ठेवले.
तुकोबांचे वैकुंठ गमनानंतर नारायण महाराजांचा जन्म झाला. नारायण महाराज ज्ञानदेव महाराजांचे अवतार असल्यामुळे दोघे वडील बंधू महादेवबुवा विठोबा नारायणरावांच्या आज्ञेत असत. मातोश्री असेपर्यत एकत्र होते. मातोश्रीचा काल जाहल्यावर विठ्ठलबुवा, नारायणबुवा, जिजाबाईंच्या अस्थी घेऊन महायात्रेला गेले. महादेवबुवा श्री विठ्ठलदेवाची पूजाअर्चा नित्य नियम सांभाळून होते. महादेवबाबांनी तुकोबांचे अभंग लिहिले आहेत. नारायणबाबा प्रथम सरंजामी - सरदारी थाटाने राहू लागले. त्यांचे भेटीस संताजी पवार आले. त्यांनीं नारायणबाबास धिःकारले. बाबांनी घर ब्राह्मणाकडून लुटविले. तपश्चर्या केली. अरण्यवास पत्करला. विठोबाचें भव्य देऊळ बांधलें.
तुकाराम तो आधीच गेले होते वैकुंठा ।बहु दिवसांनी मग वैराग्य झालें नीळकंठा ॥१॥
तुकयाचा नंदन मागे नारायणबाबा ।दर्शन त्याचे घेऊनि म्हणती सुसंग लाभावा ॥२॥
निळोबा गोसावी पिंपळनेरकर बाबांच्या दर्शनास आले. बाबांनी त्यांना साद्यंत तुकोबांचे चरित्र सांगितलें निळोबांना घेऊन ते तीर्थयात्रेला गेले. निळोबांनी तुकोबांचे भेटीकरिता ४२ दिवसाचे निर्वाण मांडले. तुकोबा भेटले.
येऊनियां कृपावंते । तुकया स्वामी सदगुरूनाथें ॥१॥
हात ठेविला मस्तकीं । देऊनी प्रसाद केले सुखी ॥२॥
निळोबांना कवित्वाची स्फूर्ती झाली. त्यांनीही अनेक अभंग केलेत. नारायणबाबा थोर तपस्वी हरिभक्त म्हणून सनदा पत्रात उल्लेख आढळतो. बाबांच्या दर्शनास तडीतापडी संन्याशी, यात्री येऊ लागले. बीजेचा महोत्सव होऊं लागला. त्यांना बाबांना अन्नदान करावे लागे. त्याकरिता इ. स. १६९१ मध्ये छत्रपति राजाराम महाराजांनी नारायणबाबांना येलवाडी गांव इनाम दिला. पुढे देहू किन्हई ही गांवे देवाच्या महोत्सवाकरिता पूजा-अर्चा, अन्नछत्राकरितां बाबांना छत्रपती दुसरे शिवाजी आणि शाहू महाराज यांचेकडून मिळाली. शाहू महाराज आणि राणी सरवारबाई बाबांना गुरूचे ठिकाणी मानीत असत. नारायण महाराजांनी तुकोबांची पालखी सोहळा आषाढी वारीस सुरू केला. बाबांनीं देवस्थान नांवारूपास आणले. सांप्रदाय वाढविला. औरंगजेबाचा तळ महाराष्ट्रात पडला असता पंढरपूरच्या आणि शिंगणापूरच्या यात्रेकरूना होणारा उपद्रव थांबविला. बाबा शके १६४५ श्रावण शुध्द चतुर्थीस वैकुंठवासी झाले. त्यांच्या अस्थी घेऊन महादेवबाबांचे चिरंजीव आबाजी बाबा काशीयात्रेस गेले.
गंगोदकाची कावड घेऊन आबाजीबाबा देहूस आले. दरम्यान विठ्ठलबाबांचे चिरंजीव उध्दवबाबा हे या समयी शाहू तुकोबांच्याजवळ होते. ते देहूस आले. त्यांनी देवस्थान संस्थानचा कारभार हाती घेतला. आबाजीबाबांचे ताब्यात देवस्थाने ते देईनात. आबाजी बाबा हेही वैराग्यसंपन्न तपस्वी हरिभक्ती रत होते. आबाजीबाबा नंतर त्यांचे चिरंजीव महादेवबाबा हेहि देवस्थान संस्थानाकरितां भांडले. भांडण वडीलपणाच, देवाकरिता होत, संस्थानाकरिता नव्हत. सरकारने विशेष लक्ष घातले नाही. तेव्हा महादेवबाबा देहू सोडून देवाकरिता संप्रदायाकरिता पंढरपूरला येऊन राहिले. भक्त देवाकडे आले. यांनी तुकोबांच्या अभंगांचे संकलन करून गाथा तयार केली, देहूकरांच्या फडाची परंपरा चालविली. त्यांचे चिरंजीव वासुदेव महाराज देहूकर यांनी पंढरीच्या ठिकाणी वारकरी सांप्रदायाचे कार्य भरीव असे केले व त्यांचेंच वेळी अनेक लहानमोठे फड नांवारूपास आले व वारकरी पंथाची परंपरा अधिकाधिक वाढू लागली. कर्नाटकापर्यंत संप्रदाय वाढविला. त्यांचे चिरंजीव वासुदेवबाबा यांनी फड नावारूपास आणला तुकोबाचे पणतू गोपाळबुवा हेहि साक्षात्कारी होते.
तुकोबांचें चरित्र लिहिले, हे त्यांचे महान कार्य होय. देहू संस्थानने घराण्याची आषाढी कार्तिकीची पंढरपूरच्या वारीचा पालखी सोहळा आजतागायत अखंड चालू ठेवला. देहूकर मंडळीनी गावोगावी कथा, कीर्तने करून वारकरी संप्रदाय वाढविला. संप्रदायाची व कुलदेवतेची अमोल सेवा केली. आजही सर्वजण,
अमृताची फळे अमृताचे वेली । तेची पुढे चाली बीजाचिहि ॥१॥
हे तुकोबांचे वचन सार्थ करून दाखवीत आहेत.
श्रीधर देहूकर
श्रीतुकाराम जन्मस्थान,
श्रीक्षेत्र देहू ४१२१०९.
श्रीधर महाराज मोरे
दिलीप पुरुषोत्तम चित्रे
अण्णा , म्हणजे श्रीधर महाराज मोरे , हे तुकोबांचे मधले पुत्र विठ्ठल महाराज यांचे थेट वंशज . तुकोबांची पालखी त्यांचे धाकटे पुत्र नारायण महाराजांनी सुरु केली आणि तिचा इतिहास श्रीधर महाराज आणि त्यांचे थोरले पुत्र डॉ. सदानंद मोरे यांनी यांनी एका पुस्तिकेत नोंदून ठेवलेला आहे. अण्णा माझे मित्र सदानंद मोरे यांचे वडील म्हणून मी त्यांना "अण्णा" आणि त्यांच्या पत्नींना "आई" म्हणून संबोधू लागलो. त्यांच्या तीन मुली मुक्ता, प्रज्ञा आणि श्रुती आणि धाकटा मुलगा विवेकानंद या सर्वांशीच आमचे कौटुंबिक संबम्ध जुळले.

"पुन्हा तुकाराम" आणि "सेज तुका " ह्या माझ्या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचा शेवटचा खर्डा लिहीत असताना मी वारंवार देहू गावाला जाऊन अण्णांशी चर्चा करु लागलो कारण अण्णा हे वारकरी परम्परेचा बोलता-चालता इतिहास आहेत असे सदानंदकडून मला कळले होते.पुरुषोत्तम मंगेश लाड, बा.ग. परांजपे, भालचंद्र पंढरीनाथ बहिरट, वा.सी. बेंद्रे अशा अनेक अभ्यासकांनी श्रीधरबुवा मोरे नावाच्या कोशाचा उपयोग केला होता. अण्णा प्रसिध्दीपराङ्मुख होते . ते मितभाषी होते पण तुकोबांचा आणि वारकरी सांप्रदायाचा उल्लेख होताच ते बोलके होत.
तुकोबांचे जन्मक्षेत्र आणि कार्यक्षेत्र देहू गाव. अण्णांचे एक पूर्वज नारायण महाराज यांनी तेथे तुकोबांचे वृंदावन आणि विठ्ठल मंदिर बांधले ; त्या मंदिराचा सभामंडपही बांधला. पुढे देवळाभोवतीची भिंत , दरवाजे, राम मंदिर वगैरे बांधकाम तुकोबांचे भक्त सरदार इंगळे पाटील यांनी करवून घेतले . देऊळवाड्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला जी चढण आहे, ती " तुकाराम महाराजांचे राहाते घर" अशी पाटी असलेल्या इमारतीपाशी थांबते. ही इमारत जरी विसाव्या शतकाच्या सुरवातीला बांधलेली असली तरी त्याच जागेवर सतराव्या शतकांतले तुकोबांचे मूळ घर होते. ह्याच घरात अण्णा आजन्म राहिले. येथेच त्यांनी संसार केला. राहात्या घराचा पुढील भाग एक ओवरी आणि मंडप आहे, आणि त्यात तुकोबांची पूर्णाकृती मूर्ती आहे. ही मूर्ती जणुकाय विठोबाचेच प्रतिबिंब आहे.
त्यांच्या हयातीत अण्णा ’तुकाराम महाराजांच्या राहात्या घराचे’च नव्हे तर देहू गाव आणि त्याच्या परिसराचा एक केंद्र बिंदु होते. आपल्या वंश परंपरेचा कोठलाही गैरफायदा न घेता त्यांनी ती आपल्या काळात जिवंत आणि जागरुक ठेवली. सदानंद मोरे यांच्या संशोधनात आणि लेखनात प्रेरणेचा भाग अण्णांकडून आला, तर शिक्षण आणि विद्येच्या महत्वाकांक्षेचा भाग त्यांच्या आईच्या काळे घराण्यातल्या सत्यशोधक चळवळीच्या संस्कारांमधून, असा माझा कयास आहे. परिणामी अण्णांनी जी पुस्तके लिहिली नाहीत, पण ज्यांच्या पाठीशी त्यांच्या परंपरेवरील अढळ श्रध्दा होती , ती सदानंदकरवी लिहिली गेली. बाप-लेकांचे इतके दृढ नाते क्वचितच पहायला मिळते.
अण्णांचे देहू गावावर अपरिमित प्रेम होते. देऊळवाडा, गोपाळपुरा, इंद्रायणीचा डोह, भैरवनाथाचे मंदिर, चोखोबंचे मंदिर, येलवाडी, भंडारा डोंगर, भामचंद्राचा डोंगर ह्या स्थळांची अण्णांनीच मला महती सांगितली. भंडारा डोंगराच्या उतारावर तुकोबांचे ’कपाट’ आहे. ह्या बौध्द विहारात तुकोबांनी चिंतन , मनन आणि अभंगलेखन केले. मी वारंवार तिथे जात असे. परतीच्या वाटेवर अण्णांच्या घरी आईंच्या हातचा चहा पीत असे. प्रत्येक वेळी अण्णा मला ’कपाटा’ची नवी माहिती व तपशील सांगत . तुकोबांचा दिनक्रम आणि चरित्रपटच ते माझ्या डोळ्यांपुढे उभा करत.
अण्णा थकत चालले होते. अखेरचे काही दिवस ते अंथरुणावर पडून असत. नामस्मरणावर सर्व लक्ष्य केंद्रित करून असत. ते आता लवकरच जाणार याची चाहूल आम्हाला लागली होती. अखेर अण्णा गेल्याची बातमी कळली. पुण्यातले त्यांचे सगे सोयरे, स्नेही , संबंधी देहू गावाकडे रवाना झाले. त्यात आम्ही पती-पत्नी होतो. सदानंद रडवेले झाले होते. आई विठ्ठलनामाचा जप करत अंगणात उभ्या होत्या. सगळा देहू गाव आणि बाहेरगावची पुष्कळ मंडळी जमली होती.मोरेंच्या घरापासून इंद्रायणीचा घाट लांब नाही. अण्णांची अंत्ययात्रा तिथे पोहचल्यावर मी एकदा सदानंदच्या पाठीवर हात ठेवून, "धीराने घ्या " असे पुटपुटलो.
क्षेत्री जन्म, क्षेत्री जीवन, क्षेत्री मरण याचा पारंपरिक महिमा आम्हा आधुनिकांना कळत नाही. आम्हाला श्रध्देची देणगी मिळालेली नसते. ’पुन्हा तुकाराम’ आणि ’ सेज तुका’ ह्या पुस्तकांच्या प्रती अण्णांच्या चरणी ठेवण्यासाठी मी देहू गावी गेलो होतो. मला अण्णांनी आशिर्वाद दिला तो तुकोबांचा एक अभंग म्हणून. नंतर ते म्हणाले, " तुकोबांचे खरे वंशज तुम्ही. तुम्ही त्यांचा झेंडा जगभर फडकावला." ही अतिशयोक्ती ऐकून मी लज्जित झालो. तरीही अण्णांच्या त्या अभिप्रायाचा मला आजतागायत अभिमान वाटतो.
चरित्रातले अभंग
परिशिष्ट १
१
काहिच मी नव्हे कोणिये गावीचा । एकट ठायीचा ठायी एक ।।१।।
नाही जात कोठे येत फिरोनिया । अवघेचि वायाविण बोले ।।२।।
नाही मज कोणी आपुले दुसरे । कोणाचा मी खरे काही नव्हे ।।३।।
नाही आम्हा ज्यावे मरावे लागत । आहो अखंडित जैसे तैसे ।।४।।
तुका म्हणे नावरूप नाही आम्हा । वेगळा ह्या कर्मा अकर्मासी ।।५।।
२
धन्य देहू गाव पुण्य भूमि ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥
धन्य क्षेत्रवासी लोक दैवाचे । उच्चारिती वाचे नाम घोष ॥धृ॥
कर कटी उभा विश्वाचा जनिता । वामांगी ते माता रखुमादेवी॥२॥
गरूड पारी उभा जोडूनिया कर । अश्वत्थ समोर उत्तरामुख ॥३॥
दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥४॥
लक्ष्मीनारायण बल्लाळाचे वन । तेथे अधिष्ठान सिद्धेश्वर ॥५॥
विघ्नराज द्वारी बहिरव बाहेरी । हनुमंत शेजारी सहित दोघे ॥६॥
तेथे दास तुका करितो कीर्तन । ह्रुदयी चरण विठोबाचे॥७॥
३.
पवित्र ते कूळ पावन तो देश । जेथे हरिचे दास घेती जन्म ॥१॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
वर्ण अभिमाने कोण जाले पावन । ऐसे द्या सागून मजपाशी ॥२॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
अंत्यजादि योनी तरल्या हरिभजने । तयाची पुराणे भाट जाली ॥३॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥४॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
कबीर मोमीन लतीब मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥५॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
कणोपात्र खोदु पिंजारी तो दादू । भजनी अभेदू हरीचे पायी ॥६॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
चोखामेळा बंका जातीचा महार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥७॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरिराव तियेसवे ॥८॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
मैराळा जनक कोण कुळ त्याचे । महिमान तयाचे काय सागों ॥९॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
यातायातीधर्म नाही विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥१०॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतीत नेणों किती ॥११॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
४अ.
हाती होन दावी बेना । करिती लेकीच्या धारणा ॥१॥
ऐसे धर्म जाले कळी । पुण्य रंक पाप बळी ॥धृ॥
साडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर ॥२॥
टिळे लपविती पातडी । लेती विजारा कातडी ॥३॥
बैसोनिया तक्तां । अन्नेवीण पिडीती लोका ॥४॥
मुदबख लिहिणे । तेलतुपावरी जिणे ॥५॥
नीचाचे चाकर । चुकलिया खाती भार ॥६॥
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥
वैश्यशूद्रादिक । हे तो सहज नीच लोक ॥८॥
अवघे बाह्य रंग । आंत हिरवे वरी सोग ॥९॥
तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥१०॥
४ब
पाहा हो कलिचे महिमान । असत्त्यासी रिझले जन ।
पापा देती अनुमोदन । करिती हेळण संताचे ॥१॥
ऐसे अधर्माचे बळ । लोक झकविले सकळ ।
केले धर्माचे निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥धृ॥
थोर या युगाचे आश्चर्य । ब्रम्हकर्म उत्तम सार ।
साडुनिया द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥२॥
ऐसे यथार्थाचे अनर्थ । जाला बुडाला परमार्थ ।
नाही जाली ऐसी नीत । हा हा भूत पातले ॥३॥
शांति क्षमा दया । भावभक्ति सत्क्रिया ।
ठाव नाही सागावया । सत्त्व धैर्य भंगिले ॥४॥
राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरिती कर्म ।
म्हणविता रामराम । श्रम महा मानिती ॥५॥
थेर भोरपाचे विशी । धावती भूते आविसा तैसी ।
कथा पुराण म्हणता सिसी । तिडीक उठी नकऱ्याचे ॥६॥
विषय लोभासाटी । सर्वार्थेंसी प्राण साटी ।
परमार्थी पीठ मुठी । मागता उठती सुनीसी ॥७॥
धनाढ्य़ देखोनि अनामिक । तयाते मानिती आवश्यक ।
अपमानिले वेदपाठक । सात्विक शास्त्रद्न्य संपन्न ॥८॥
पुत्र ते पितियापाशी । सेवा घेती सेवका ऐसी ।
सुनांचिया दासी । सासा जाल्या आंदण्या ॥९॥
खोटें जाले आली विंवसी। केली मर्यादा नाहिंसी।
भ्रतारे ती भार्यासी । रंक तैसी मानिती ॥१०॥
नमस्कारावया हरिदासा । लाजती धरिती काही गर्वसा ।
पोटासाठी खौसा । वंदिती मलिंछाच्या ॥११॥
बहुत पाप जाले उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ ।
अभक्ष भक्षिती विटाळ । कोणी न धरी कोणाचा ॥१२॥
कैसे जाले नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न ।
विडे घेऊनि ब्राम्हण । अविंदवाणी वदताती ॥१३॥
कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदने दासिंची चुंबिती।
सोवळ्याच्या स्फ़िती । जगीं मिरविती पवित्रता ॥१४॥
मद्यपानाची सुराणी । नवनीता नपुसे कोणी ।
केळवती व्यभिचारिणी । दैन्यवाणी पतिव्रता ॥१५॥
केवढी दोषाची सबळता । जाली पाहा हो भगवंता ।
पुण्य धुडावोनी संता । तीर्था हरी आणिती ॥१६॥
भेणे मंद जाल्या मेघवृष्टि । आकातली कापे सृष्टि ।
देव रिगाले कपाटी । आटाआटी प्रवर्तली ॥१७॥
अपीक धान्ये दिवसे दिवसे । गाई म्हैसी चेवल्या गोरसे ।
नगरे दिसती उध्वंसे । पिकली बहुवसे पाखांडे ॥१८॥
होम हरपली हवने । यद्न्ययाग अनुष्ठाने ।
जपतपादि साधने । आचरणे भ्रष्टली ॥१९॥
अठरा यातीचे व्यापार । करिती तस्कराई विप्र ।
साडोनिया शुद्ध शुभ्र । वस्त्रें निळी पांघरती ॥२०॥
गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्री ।
अष्वाचिया परि । कुमारी विकिती वेदवक्ते ॥२१॥
वेदाध्ययनसंहितारुचि । भकाद्या करिती तयाची ।
आवडी पंडिताची । मुसाफ़ावरी बैसली ॥२२॥
मुख्य सर्वोत्तम साधने । ती उच्छेदूनिं केली दीने ।
कुडी कापटें महा मोहने । मिरविताती दुर्जन ॥२३॥
कळाकुशळता चतुराई । तर्कवादी भेद निंदे ठायी ।
विधिनिषेधाचा वाही । एक ही ऐसी नाडली ॥२४॥
जे संन्यासी तापसी ब्रम्हचारी । होता बैरागी दिगांबर निस्पृही
वैराग्यकारी। कामक्रोधे व्यापिले भारी। इच्छाकरी न सुटती ॥२५॥
कैसे विनाशकाळाचे कौतुक । राजे जाले प्रजांचे अंतक ।
पिते पुत्र सहोदर । एकाएक शत्रुघाते वर्तती ॥२६॥
केवढी ये राडेची अंगवण । भ्रमविले अवघें जन ।
याती अठरा चारी वर्ण । कर्दम करुनी विटाळले ॥२७॥
पूवाअहोते भविष्य केले । संती ते यथार्थ जाले ।
ऐकत होतो ते देखिले । प्रत्यक्ष लोचनी ॥२८॥
आता असो हे आघवे । गति नव्हे कळीमध्येवागवरावे ।
देवासी भाकोनि करुणावे । वेगे स्मरावे अंतरी ॥२९॥
अगा ये वैकुंठनायका । काय पाहतोसि या कौतुका ।
धांव कलीने गांजिले लोका । देतो हाका सेवक तुकयाचा ॥३०॥
५अ.
संता नाही मान । देव मानी मुसलमान ॥१॥
ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥धृ॥
घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥२॥
तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम ॥३॥
५ब.
भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भूत चराचरी ।
ऐसिया अनंतामाजी तू अनंत । लीलावेश होता जगत्राता ॥१॥
ब्रह्मानंद तुकें तुळे आल तुका । तो हा विश्वसंख्या क्रीडे जनी ॥धृ॥
शास्त्रा श्रेष्ठाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियेली ।
देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिवीण योगेशी ब्रह्मार्पण ॥२॥
संत ग्रहमेळी जगधंद्या गिळी । पैल उदयाचळी भानु तुका ।
संत वृंदे तीर्थ गौतमी हरिकथा । तुकया नर सिंहस्ता भेटों आली॥३॥
शांति पतिव्रते जाले परिनयन । कामसंतर्पण निष्कामता ।
क्षमा क्षमापणे प्रसिद्ध प्रथा जगीं । ते तो तुझ्या अंगीं मूर्तीमंत ॥४॥
दया दीनानाथा तुव जीवविली । विश्वीं विस्तारली कीर्ती तुझी ।
वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्वभूते ॥५॥
अधर्म क्षयव्याधी धर्माशी स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभक्ति ।
ब्रम्ह ऐक्यभावे भक्ति विस्तारिली । वाक्यें सपळ केली वेदविहिते ॥६॥
देहबुद्धि जात्या अभिमाने वंचलो । तो मी उपेक्षलो न पाहिजे ।
न घडो याचे पायी बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥७॥
६.
अर्भकाचे साटी । पंते हाती धरिली पाटी ॥१॥
तैसे संत जगीं । क्रिया करुनि दाविती अंगीं ॥ धृ॥
बालकाचे चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥२॥
तुका म्हणे नांव । जनांसाठीं उदकीं ठाव ॥३॥
७.
ओनाम्याच्या काळे । खडे मांडविले बाळे ॥१॥
तोचि पुढे पुढे काई । मग लागलिया सोई ॥धृ॥
रज्जु सर्प होता । तोवरी चि न कळता ॥२॥
तुका म्हणे साचे । भय नाही बागुलाचे ॥३॥
८.
बाप करी जोडी लेकराचे ओढी । आपुली करवंडी वाळवूनि ॥१॥
एकाएकीं केलो मिरासीचा धनी । काडिये वागवूनी भार खांदी ॥धृ॥
लेवऊनि पाहे डोळा अळंकार । ठेवा दावी थोर करुनिया ॥२॥
तुका म्हणे नेदी गांजू आणिकासी । उदार जीवासी आपुलिया ॥३॥
९.
बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ॥१॥
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥धृ॥
बाईल मेली मुक्त जाली । देवे माया सोडविली ॥२॥
पोर मेले बरे जाले । देवे मायाविरहित केले ॥३॥
माता मेली मजदेखता । तुका म्हणे हरली चिंता ॥४॥
१०.
काय नाही माता गौरवीत बाळा । काय नाही लळा पाळीत ते ॥१॥
काय नाही त्याची करीत ते सेवा । काय नाही जीवा गोमटें ते ॥२॥
अमंगळपणे कंटाळा न धरी । उचलोनि करी कंठीं लावी ॥३॥
लेववी आपुले अंगे अळंकार । संतोषाये फार देखोनिया ॥४॥
तुका म्हणे स्तुति योग्य नाही परी । तुम्म्म्हां लाज थोरी अंकिताची ॥५॥
११.
याति शूद्र वैश्य केला वेवसाव । आदि तो हा देव कूळपूज्य ॥१॥
नयें बोलो परि पाळिले वचन । केलियाचा प्रश्न तुम्ही संती ॥धृ॥
संवसारे जालो अतिदु़खे दुखी । मायबाप सेखी कर्मलिया ॥२॥
दुष्काळे आटिले द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली।३॥
लज्जा वाटें जीवा त्रासलो या दु:खे । वेवसाय देख तुटी येता ॥४॥
देवाचे देऊळ होते ते भंगले । चित्तासी जे आले करावेसे ॥५॥
आरंभी कीर्तन करी एकादशी । नव्हते अभ्यासी चित्त आधीं ।
काही पाठ केली संताची उत्तरे । विश्वासे आदरे करोनिया ॥७॥
गाती पुढे त्यांचे धरावे धृपद । भावे चित्त शुद्ध करोनिया ॥८॥
संताचे सेविले तीर्थ पायवणी । लाज नाही मनी येऊ दिली॥९॥
टाकला तो काही केला उपकार । केले हे शरीर कष्टवूनि ॥१०॥
वचन मानिले नाही सहुदांचे । समूळ प्रपंचे वीट आला ॥११॥
सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियेले नाही बहुमता ॥१२॥
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामी ॥१३॥
यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्ती विठोबाचे ॥१४॥
निषेधाचा कंही पडिला आघात । तेणे मध्यें चित्त दुखविले ॥१५॥
बुडविल्या वह्या बैसलो धरणे । केले नारायणे समाधान ॥१६॥
विस्तारी सागता बहुत प्रकार । होईल उशीर आता पुरे ॥१७॥
आता आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥
भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आले ॥१९॥
तुका म्हणे माझे सर्व भांडवल । बोलविले पांडुरंगे ॥२०॥
१२.
ऐका वचन हे संत । मी तो आगळा पतित ।
काय काजे प्रीत । करितसा आदरे ॥१॥
माझे चित्त मज ग्वाही । सत्त्य तरलो मी नाही ।
एकाचिये वांही । एक देखी मानिती ॥धृ॥
बहू पीडिलो संसारे । मोडी पुसे पिटी ढोरे ।
न पडता पुरे । या विचारे राहिलो ॥२॥
सहज सरले होते काही । द्रव्य थोडे बहु ते ही ।
त्याग केला नाही दिले द्विजां याचका ॥३॥
प्रियापुत्रबंधु । याचा तोडिला संबंधु ।
सहज जालो मंदु । भाग्यहीन करंटा ॥४॥
तोड न दाखवे जनां । शिरे सादी भरे राणा ।
एकात तो जाणा । तयासाटी लागाला ॥५॥
पोटें पिटिलो काहारे । दया नाही या विचारे ।
बोलविता बरे । सहज म्हणे यासाटी ॥६॥
सहज वडिला होती सेवा । म्हणोनि पूजितो या देवा ।
तुका म्हणे भावा । साटी झणी घ्या कोणी ॥७॥
१३.
संसाराच्या नावे घालूनिया शून्य । वाढता हा पुण्य केला धर्म ॥१॥
हरिभजने हे धवळिले जग । चुकविला लाग कळिकाळाचा ॥धृ॥
कोणा ही नलगे साधनांचा पांग । करणे केला त्याग देहबुद्धी ॥२॥
तुका म्हणे सुख समाधि हरिकथा । नेणे भाववेथा गाईल तो ॥३॥
१४.
विचारिले आधी आपुल्या मानसी । वाचो येथे कैसी कोण्या द्वारे ॥१॥
तंव जाला साह्य हृदयनिवासी । बुद्धि दिली ऐसी नास नाही ॥धृ॥
उद्वेगाचे होतो पदिलो समुद्रीं । कोण रीती तरी पाविजेल ॥२॥
तुका म्हणे दु:खे आल आयुर्भाव । जाला बहू जीव कासावीस ॥३॥
१५.
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार जाला । विठोबा भेटला निराकार ॥१॥
भंबगिरीपाठारी वस्ती जाण केली । वृत्ती थिरावली परब्रम्ही ॥धृ॥
निर्वाण जाणोनि आसन घातले । ध्यान आरंभिले देवाजीचे ॥२॥
सर्प विन्चू व्याघ्र आंगासी झोंबले । पीडूं जे लागले सकळिक ॥३॥
दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । तैसा देह जाला तुका म्हणे ॥४॥
१६.
करू तैसे पाठांतर । करुणाकर भाषण ॥१॥
जिही केला मूर्तीमंत । ऐसे संत प्रसाद ॥धृ॥
सोज्ज्वळ केल्या वाटा । आइत्या नीटां मागीलां ॥२॥
तुका म्हणे घेऊ धांवा । करू हांवा ते जोडी ॥३॥
१७.
तुजवीण कोणा । शरण जाऊ नारायणा ॥१॥
ऐसा न देखे मी कोणी । तुजा तिही त्रिभुवनी ॥धृ॥
पाहिली पुराणे । धांडोळिली दरुषणे ॥२॥
तुका म्हणे ठायी । जडून ठेलो तुझ्या पायी ॥३॥
१८.
पुराणीचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥
नव्हती हे आहाच बोल । मोकळे फोल कवित्व ॥धृ॥
भावे घ्या रे भावे घ्या रे । एकदा जा रे पंढ्रिये ॥२॥
भाग्यें आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥३॥
पापपुण्या करील झाडा । जाईल पीडा जन्माची ॥४॥
घ्यावी हाती टाळदिंडी । गावे तोडी गुणवाद ॥५॥
तुका म्हणे घटापटा । न लागे वाटा शोधाव्या ॥६॥
१९.
वृक्ष वल्लीं आम्हा सोयरी वनचरे । पक्षी ही सुस्वरे आळविती ॥१॥
येणे सुखे रुचे एकाताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ॥
आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथे मन क्रीडा करी ॥२॥
कथाकुमंडलु देह उपचारा। जाण्वितो वारा अवश्वरू॥३॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥४॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणासी ॥५॥
२०.
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे । सावे पांडुरंगे येऊनिया ॥१॥
सागितकें काम करावे कवित्व । वाउगे निमित्त बोलू नको ॥धृ ॥
माप टाकी सल धरिला विठ्ठले थापटोनि केले सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सागे शतकोटी । उरले शेवटी लावी तुका॥३॥
२१.
द्याल ठाव तरी राहेन संगती । संताचे पंगती पायापाशी ॥१॥
आवडीचा ठाव आलोसे टाकून । आता उदासीन न धरावे ॥धृ॥
सेवतील स्थळ निंच माझी वृत्ती । आधारे विश्रंती पावईन ॥२॥
नामदेवापायी तुक्या स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटी राहिलासे ॥३॥
२२.
सेविता रस तो वाटितो आणिका । घ्या रे होवू नका राणभरी ॥१॥
विटेवरी ज्याची पाऊले समान । तो चि एक दानशूर दाता ॥धृ॥
मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायी ॥२॥
तुका म्हणे मज धाडिले निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥
२३.
बोलावे म्हूण हे बोलतो उपाय । प्रवाहे हे जाय गंगाजळ ॥१॥
भाग्ययोगे कोणा घडेल सेवन । कैचे येथे जन अधिकारी ॥धृ॥
मुखी देता घांस पळविती तोडे । अंगीचिया भांडे असुकाने ॥२॥
तुका म्हणे पूजा करितो देवाची । आपुलिया रुची मनाचियें ॥३॥
२४.
करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥१॥
माझियें युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥धृ॥
काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तेचि वदे ॥२॥
निमित्त मापासी बैसविलो आहे । मी तो काही नव्हे स्वामीसत्ता ॥३॥
तुका म्हणे आहे पाईक मी खरा । वागवितो मुद्रा नमाची हे ॥४॥
२५.
नेणे अर्थ काही नव्हती माझे बोल । विनवितो कोपाल संत झणी ॥१॥
नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगे व्यापूनिया ॥धृ॥
मज मूढा शक्ति कैचा हा विचार । निगमादिका पार बोलावया ॥२॥
राम कृष्ण हरि मुकुंद मुरारि । बोबडा उत्तरी हे चि ध्यान ॥३॥
तुका म्हणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगे भार घेतला माझा ॥४॥
२६.
काय खावे आता कोणीकडे जावे । गावांत राहावे कोण्या बळे ॥१॥
कोपला पाटील गांवचे हे लोक । आता घाली भीक कोण मज ॥धृ॥
आता येणे चवी साडिली म्हणती । निवाडा करिती दिवाणात ॥२॥
भल्या लोकीं यास सागितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥३॥
तुका म्हणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठ्ला जाऊ आता ॥४॥
२७.
तेरा दिवस जाले निश्चक्र करिता । न पवसी अनंता मायबापा ॥१॥ पाषाणाची खोळ घेऊनि बैसलासी । काय हृषिकेशी जाले तूज ॥धृ॥ तुजवरी आता प्राण मी तजीन । हत्त्या मी घालीन पांडुरंगा ॥२॥ फार विठाबाई धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥३॥ तुका म्हणे आता मांडिले निर्वाण । प्राण हा साडिन तुजवरी ॥४॥
२८.
थोर अन्याय मी केला तुझा अंत म्या पाहिला | जनाचिया बोलासाटी चित्त क्षोभविले ॥१॥
भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलो ॥धृ॥
अवघें घालुनिया कोडे तानभुकेचे साकडे । योग क्षेम पुढे तुज करणे लागेल ॥२॥
उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले ॥३॥
२९
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥१॥
विष ते अमृत अघाते हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥धृ॥
दु:ख ते देइल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्निज्वाळा ॥२॥
आवडेल जीवां जीवांचे परी । सकळा आंतरी एक भाव ॥३॥
तुका म्हणे कृपा केली नारायणे । जाणियेते येणे अनुभवे ॥४॥
३०.
काखे कडासन आज पडे । खडबड खडबडे हुसकले ॥१॥
दादकरा दादकरा । फजितखोरा लाज नाही ॥धृ॥
अवघा जाला राम राम । कोणी कर्म आचरे ना ॥२॥
हरिदासाच्या पडती पाया । म्हणती तया नागवावे ॥३॥
दोहिं ठायी फजीत जाले । पारणे केले अवकळा ॥४॥
तुका म्हणे नाश केला । विटंबिला वेश जिही ॥५॥
३१.
अविट हे क्षीर हरिकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनी ॥१॥
अमृत राहिले लाजुन माघारे । येणे रसे थोरे ब्रह्मानंदे ॥धृ॥
पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥२॥
सर्व सुखे तया मोहोरती ठाया । जेथे वाटणी या वैष्णवांची ॥३॥
निर्गुण हे सोग धरिले गुणवंत । धरूनिया प्रीत गाये नाचे ॥४॥
तुका म्हणे केली साधने गाळणी । सुलभ कीर्तनी होवोनि ठेला ॥५॥
३२.
श्रीपंढरीशा पतित पावना । एक विज्ञापना पायापाशी ॥१॥
अनाथां जीवांचा तू काजकैवारी । ऐसी चराचरी ब्रिदावळी ॥धृ॥
न संगता कळे अंतरीचे गूज । आता तुझी लाज तुज देवा ॥२॥
आळिकर ज्याचे करिसी समाधान । अभयाचे दान देऊनिया ॥३॥
तुका म्हणे तू चि खेळे दोही ठायी । नसेल तो देइ धीर मना ॥४॥
३३.
नको काही पडों ग्रंथांचे भरी । शीघ व्रत करी हे चि एक ॥१॥
देवाचियें चाडे आळवावे देवा । ओस देहभावा पाडोनिया ॥धृ ॥
साधने घालिती काळाचिये मुखी । गर्भवास सेकी न चुकती ॥२॥
उधाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा । पतनासि इच्छा आवश्यक ॥३॥
रोकडी घातला अंगसंगे जरा । आता उजगरा कोठवरि ॥४॥
तुका म्हणे घाली नामासाठी उडी । पांडुरंग थडी पाववील ॥५॥
३४.
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥
मग गोविंद तो काया । भेद नाही देवा तया ॥धृ॥
आनंदले मन । प्रेमे पझरती लोचन ॥२॥
तुका म्हणे आळी । जेवी नुरे चि वेगळी ॥३॥
३५.
बहुता छंदाचे बहु वसे जन । नये वांटू मन त्यांच्या संगे ॥१॥
करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥धृ॥
सुखाची समाधी हरिकथा माउली । विश्रांती साउली सिणलियाची ॥२॥
तुका म्हणे बुडे बांधोनि दगड । तेथे काय कोड धांवायाचे ॥३॥
३६.
तुम्ही येथे पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते ॥१॥
आता काय पुढे वाढवुनि विस्तार । जाला समाचार आइका तो ॥धृ॥
देवाचे उचित एकदश अभंग । महाफळ त्याग करुनि गेला ॥२॥
तुका म्हणे सेवा समर्पूनि पायी । जालो उतराई ठावे असो ॥३॥
३७.
नावडे जे चित्ता । ते चि होसिपुरविता ॥१॥
का रे पुरविली पाठी । माझी केली जीवेसाटी ॥धृ॥
न करावा संग । वाटें दुरावावे जग ॥२॥
सेवावा एकात । वाटे न बोलावी मात ॥३॥
जन धन तन । वाटें लेखावे वमन ॥४॥
तुका म्हणे सत्ता । हाती तुझ्या पंढरिनाथा ॥५॥
३८.
काय दिला ठेवा । आम्हा विठ्ठलचि व्हावा ॥१॥
तुम्ही कळलेती उदार । साटी परिसाची गार ॥धृ॥
जीव दिला तरी । वचना माझ्या न ये सरी ॥२॥
तुका म्हणे धन । आम्हा गोमांसा समान ॥३॥
३९.
मुंगी आणि राव । आम्हा सारखाची जीव ॥धॄ॥
गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ॥धृ॥
सोने आणि माती । आम्हा समान हे चित्ती ॥२॥
तुका म्हणे आले । घरा वैकुंठ सगळे ॥३॥
४०.
आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी॥१॥
तुमचे येर वित्त धन । ते मज मृत्तिकेसमान ॥धृ॥
कंटी मिरवा तुळसी । व्रत करा एकादशी ॥२॥
म्हणवा हरिचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥३॥
४१.
पाइकीचे सुख पाइकासी ठावे । म्हणोनिया जीवे केली साटी ॥१॥
येता गोळ्या बाण साहिले भडमार । वर्षता अपार वृष्टी वरी ॥धृ॥
स्वामीपुढे व्हावे पडता भांडण । मग त्या मंडन शोभा दावी॥२॥
पाइकानी सुख भोगिले अपार । शुद्ध आणि धीर अंतर्बाही ॥३॥
तुका म्हणे या सिध्दांताच्या खुणा । जाणे तो शहाणा करी तो भोगी ॥४॥
४२.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणची देव होय गुरू ॥१॥
पढिये देहभावे पुरवितो वासना । अती ते आपणापाशी न्यावे ॥धृ॥
मागे पुढे उभा राहे साभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥
योग क्षेम जाणे जड भारी । वाट दावी करी धरूनिया ॥३॥
तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी । पाहावे पुराणी विचारूनी ॥४॥
४३.
मेघवृष्टीने करावा उपदेश परि गुरुने न करावा शिष्य | वाटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा ॥१॥
द्रव्य वेचावे अन्नसत्रीं भूती द्यावे सर्वत्र । नेदावा हा पुत्र उत्तमयाती पोसना ॥धृ॥
बीज न पेरावे खडकीं ओल नाही ज्याचे बुडखी । थीता ठके सेखी पाठी लागे दिवाण ॥२॥
गुज बोलावे संताशी पत्नी राखावी जैसी दासी । लाड देता तियेसी वाटा पावे कर्माचा ॥३॥
शुद्ध कसूनि पाहावे वरि रंगा न भुलावे । तुका म्हणे घ्यावे जया नये तुटी ते ॥४॥
४४.
याजसाठी वनांतरा । जातो साडुनिया घरा ॥१॥
माझे दिठावेल प्रेम । बुद्धी होइल निष्काम ॥धृ॥
अद्वैताची वाणी । नाही ऐकत मी कानी ॥२॥
तुका म्हणे अहंब्रम्ह । आड येऊ नेदीं भ्रम ॥३॥
४५.
सद्गुरुरायें कृपा मज केली। परि नाही घडली सेवा काही ॥१॥
सापडविले वाटे जाता गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥धृ॥
भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥३॥
काही कळहे उपजला अंतराय । म्हणोनिया काय त्वरा जाली ॥४॥
राघवचैतन्य केशवचैतन्य सागितली खूण माळिकेची ॥५॥
बाबाजी आपले सागितले नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥६॥
माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगिकार तुका म्हणे ॥७॥
४६.
नाही म्या वंचिला मंत्र कोणापाशी । राहिलो जिवासी धरुनि तो ॥१॥
विटेवरी भाव ठेवियले मन । पाउले समान चिंतीतसे ॥धृ॥
पावविला पार धरिला विश्वास । घालूनिया कास बळकट ॥२॥
तुका म्हणे मागे पावले उद्धार । तिही हा आधार ठेविलासे ॥३॥
४७.
नेणे फुकों कान । नाही एकांतीचे ज्ञान ॥१॥
तुम्ही आइका हो संत । माझा सादर वृत्तांत ॥धृ॥
नाही देखिला तो डोळा । देव दाखवू सकळा ॥२॥
चिंतनाच्या सुखे । तुका म्हणे नेणे दु:खे ॥३॥
४८.
आपला यो एक देव करुनी घ्यावा । तेणे विण जीवा सुख नव्हे ॥१॥
ते ती माइकें दु:खाची जनिती । नाही आदिअंती अवसान ॥धृ॥
अविनाश करी आपुलिया ऐसे । लावी मना पिसे गोविंदाच्या ॥२॥
तुका म्हणे एका मरणे चि सरे । उत्तम चि उरे कीर्ती मागे ॥३॥
४९.
माझा पहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥
बोलविले ते चि द्यावे । उत्तर व्हावे ते काळी ॥धृ॥
सोडिलिया जग निंद्य । मग गोविंद म्हणियारा ॥२॥
तुका म्हणे धीर केला । तेणे याला गोविले ॥३॥
५०.
हा गे माझा अनुभव । भक्तिभाव भाग्याचा ॥१॥
केला ऋणी नारायण । नव्हे क्षण वेगळा ॥धृ॥
घालोनिया भार माथा । अवघी चिंता वारली ॥२॥
तुका म्हणे वचन साटी । नाम कंठीं धरोनि ॥३॥
५१.
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातो हरि ॥१॥
मने सहित वाचा काया । अवघे दिले पंढरीराया ॥धृ॥
सत्ता सकळ तया हाती । माझी कींव काकुलती ॥२॥
तुका म्हणे ठेवी तैसे । आम्ही राहों त्याचे इच्छें ॥३॥
५२.
आम्ही घ्यावे तुझे नाम । तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ॥१॥
ऐसे निवडिले मुळी । संती बैसोनि सकळी ॥धृ॥
माझी डोई पायावरी । तुम्ही न धरावी दुरे ॥२॥
तुका म्हणे केला । खंड दोघांचा विठ्ठला ॥३॥
५३.
संताचिये गांवी प्रेमाचा सुकाळ । नाही तळमळ दु:ख लेश ॥१॥
तेथे मी राहीन होवोनि याचक । घालितील भीक ते चि मज ॥धृ॥
संताचिये गांवी वरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥२॥
संताचे भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥३॥
संताचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साटी घेती देती ॥४॥
तुका म्हणे तेथे आणिक नाही परी । म्हणोनि भिकारी जालो त्यांचा ॥५॥
५४.
भक्तिप्रेमसुख नेणवे आणिका । पंडित वाचका ज्ञानियासी ॥१॥
आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ति सुख दुर्लभ त्यां ॥धृ॥
तुका म्हणे कृपा करील नारायण । तरीच हे वर्म पडे ठायी ॥२॥
५५.
उपदेश तो भलत्या हाती । जाला चित्ती धरावा ॥१॥
नयें जाऊ पात्रावरी । कवटी सारी नारळे ॥धृ॥
स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥२॥
तुका म्हणे रत्नसार । परि उपकार चिंधीचे ॥३॥
५६.
आता तरी पुढे हा चि उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥१॥
सकळाच्या पाया माझे दंड्वत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥धृ॥
हित ते करावे देवाचे चिंतन । करूनिया मन एकविध ॥२॥
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥३॥
५७.
काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एक भावे ॥१॥
निघोनि आयुष्य जाते हातोहात । विचारी पा हीत लवलाही ॥२॥
तुका म्हणे भावभक्ति हे कारण । नागवी भूषण दंभ तो चि ॥३॥
५८.
उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी ॥१॥
बरे सेवन उपकारा । द्यावे द्यावे या उत्तरा ॥धृ॥
सरळ आणि मृद । कथा पाहावी ते ऊर्ध ॥२॥
गात जात तुका । हा चि उपदेश आइका ॥३॥
५९.
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥धृ॥
गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचे ॥२॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाही ॥३॥
६०.
भावे गावे गीत । शुद्ध करूनिया चित्त ॥१॥
तुज व्हावा आहे देव । तरी हा सुलभ उपाव ॥धृ॥
आणिकाचे कानी । गुण दोष मना नाणी ॥२॥
मस्तक ठेंगणा । करी संताच्या चरणा ॥३॥
वेची ते वचन । जेणे राहे समाधान ॥४॥
तुका म्हणे फार । थोडा तरी पर उपकार ॥५॥
६१.
इतुले करी भलत्या परी । परद्रव्य परनारी ।
संडुनि अभिलाष अंतरी । वर्ते वेव्हारी सुखरूप ॥१॥
न करी दंभाचा सायास । शंती राहे बहुवस ।
जिव्हे सेवी सुगंधरस । न करी आळ्स रामनामी ॥२॥
जनमित्र होई सकळाचा । अशुभ न बोलावी वाचा ।
संग न धरावा दुर्जनांचा । करी संताचा सायास ॥३॥
करिसी देवाविण आस । अवघी होईल निरास ।
तृष्णा अडविसी बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥४॥
धरुनि विश्वास करी धीर । करिता देव हा चि निर्धार ।
तयाचा वाहे योगक्षेमभार । नाही अंतर तुका म्हणे ॥५॥
६२.
जावे बाहेरी हा नाठवे विचार । नाही समाचार ठावा काही ॥१॥
काही न कळे ते कळों आले देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥
कवतुकासाठी भक्त देहावरि । आणिताहे ह्री बोलावया ॥३॥
यासि नाव रूप नाही हा आकार । कळला साचार भक्त्त मुखे ॥४॥
मुखे भक्त्तांचिया बोलतो आपण । अम्गसंगे भिन्न नाही दोघां ॥५॥
दोघे वेगळाले लेखिल जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥६॥
तयासी घडली सकळ ही पापें । भक्तांचिया कोपें निंदा द्वेषें ॥७॥
द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेवी प्राणा नाश करी ॥८॥
करिता आइके निंदा या संताची । तया होती ते चि अध:पात ॥९॥
पतन उद्धर संगाचा महिमा । त्यजावे अधमा संत सेवी ॥१०॥
संतसेवी जोडे महालाभरासी । तुका म्हणे यासि नाश नाही ॥११॥
६३.
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे । उदास विचारे वेच करी ॥१॥
उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥धृ॥
पर उपकारी नेणे परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ॥२॥
हूतदया गायी पशूचे पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी ॥३॥
शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्व वडिलांचे ॥४॥
तुका म्हणे हे चि आश्रमाचे फळ । परमपद बळ वैराग्याचे ॥५॥
६४.
धर्माचे पाळण । करणे पाषांड खंडण ॥१॥
हे चि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ॥धृ॥
तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊनि बाण फिरे ॥२॥
नाही भीड भार । तुका म्हणे साना थोर ॥३॥
६५.
नव्हों वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले । भलते द्यावे पाले भलत्यासी ॥१॥
कुपथ्य करुनी विटंबावे रोगी । का हे सलगी भीड त्याची ॥धृ॥
तुका म्हणे लासूं फांसूं देऊ डाव । सुखाचा उपाव पुढे आहे ॥२॥
६६.
भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रम्ही भोग ब्रम्ह तनु ॥१॥
देहाच्या निरसने पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥धृ॥
उदक अग्नि धान्य जाल्या घडे पाक । एकविण एक कामा नये ॥२॥
तुका म्हणे मज केले ते चाचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥३॥
६७.
घोटवीन लाळ ब्रम्हज्ञान्या हाती । मुक्तां आत्मस्थिती सांडवीन ॥१॥
ब्रम्हभूत होते कायाच कीर्तनी । भाग्य तरी ऋणी देवा ऐसा ॥धृ॥
तीर्थ भ्रमकासी आणीन आळस । कडू स्वर्गवास करिन भोग ॥२॥
साडवीन तपोनिधा अभिमान । यद्न्य आणि दान लाजवीन ॥३॥
भक्तिभाग्यप्रेमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा ॥४॥
धान्य म्हणवीन येहे लोकीं लोका । भाग्य आम्ही तुका देखियेला ॥५॥
६८.
न देखवे डोळा ऐसा हा आकात । परपीडे चित्त दु:खी होते ॥१॥
काय तुम्ही येथे नसालसे जाले । आम्ही न देखिले पाहिजे हे ॥धृ॥
परचक्र कोठें हरिदासाच्या वासे । न देखिजेत देशें राहातिया ॥२॥
तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणे देवा जिणे जाले ॥३॥
६९.
बोलतो निकुरे । नव्हेत सलगीची उत्तरे ॥१॥
माझे संतापले मन । परपीडा ऐकोन ॥धृ॥
अंगावरी आले । तोवरी जाईल सोसिले ॥२॥
तुज भक्तांची आण देवा । जरि तुका येथे ठेवा ॥३॥
७०.
सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावे तुम्ही ॥१॥
कर्म धर्में तुम्हा असावे कल्याण । घ्या माझे वचन आशीर्वाद ॥धृ॥
वाढ्वुनि दिला एकाचियें हाती । सकळ निश्चिंती जाली तेथे ॥२॥
आता मज जाणे प्राणेश्वरासवे । माझिया भावे अनुसरलो ॥३॥
वढविता लोभ होईल उसीर । अवघीच स्थीर करा ठायी ॥४॥
धर्म अर्थ काम जाला एकें ठायी । मेळविला जिही हाता हात ॥५॥
तुका म्हणे आता जाली हेवि भेती । उरल्या त्या गोष्टीं बोलावया ॥६॥
७१.
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा संगावी विनंती माझी ॥१॥
वाडवेळ जाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलवितो॥२॥
अंतकाळी विठो आम्हासि पावला । कुडीसहित जाला गुप्त तुका ॥३॥
७२.
अमृताची फळे अमृताची वेली । ते चि पुढे चाली बीजाची ही ॥१॥
ऐसियाचा संग देई नारायणा । बोलावा वचन जयाचिया ॥धृ॥
उत्तम सेवन सितळ कंठासी । पुश्टी काती तैसी दिसे वरी ॥२॥
तुका म्हणे तैसे होइजेत संगे । वास लागे अंगे चंदनाच्या ॥३॥
परिशिष्ट २
रामेश्वरभट याचे अभंग
७३. (१०७९}
भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरी ।
ऐसिय़ा अनंतामाजी तू अनंत । लीला वेश होत जगत्राता ॥१॥ ॥धृ॥
ब्रह्मानंद तुके तुळे आलातुका । तो हा विश्वसखा क्रीडे जनी ॥ऽ॥
शाखा शिष्ताचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियली।
देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविण योगेशी ब्रह्मार्पण ॥२॥
संत ग्रहमेळि जगधंद्यागिळी । पैल उदयाचळी भानु तुका ।
सत वृंदे तीर्थ गौतमी हरिकथा ।तुकयानर सिंहस्ता भेटों आली ॥३॥
शाती पतिव्रते जाले परि नयन । काम संतर्पण निष्कामता ।
क्ष्मा क्षमापणे प्रसिद्ध प्रथा जगीं । ते तो तुझ्या अंगी मूर्तीमंत ॥४॥
दया दीनानाथा तुवा जीवविली । विश्वीं विस्तारली कीर्ती तुझी ।
वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्व भूते ॥५॥
अधर्म क्षयव्याधि धर्माशी स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभक्ति ।
ब्रम्ह ऐक्यभावे भक्ति विस्तारली । वाक्यें सपळ केली वेदविहिते ॥६॥
देहबुद्धी जात्या अभिमाने वंचलो । ते मी उपेक्षिलो न पाहिजे ।
न घडों याचे पायी बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥७॥
७४. (१०८०)
पंडित वैदिक अथवा दशग्रंथी । परि सरी न पवती तुकयाची ।
शास्त्र ही पुराणे गीता नित्य नेम । वाचिताती वर्म न कळे त्यासी ॥१॥।धृ॥
कर्म अभिमाने वर्ण अभिमाने । नादले ब्राम्हण कलियुगीं ॥ऽ॥
तैसा नव्हे तुका वाणी व्यवसाई । भाव त्याचा पायी विठोबाचॆं ।
अमृताची वाणी वरुषला शुद्ध । करी त्या अशुद्ध ऐसा कोण॥२॥
चहूं वेदांचे हे केले विवरण अर्थ हि गहन करुनिया ।
उत्तम मध्यम कनिष्ट वेगळे। करुनि निराळे ठेविले ते ॥३॥
भक्तिज्ञाने आणि वैराग्यॆं आगळा । ऐसा नाही डोळा देखियेला ।
जप तप यद्न्य लाजविली दाने । हरिनाम कीर्तने करुनिया ॥४॥
मागे कवीश्वर जाले थोर थोर । नेले कलिवर कोणे सागा ।
म्हणे रामेश्वर सकळा पसोनि । गेला तो विमानि बैसोनिया ॥५॥
७५. (१०८१)
माझी मज आली रोकडी प्रचित । होऊनि फजित दु:ख पावे ॥१॥ ॥धृ॥
काही द्वेष त्यांचा करिता अंतरी । व्यथा या शरीरी बहुत जाली ॥ऽ॥
ज्ञानेश्वरे मज केला उपकार । स्वप्नीं सविस्तर सागितले ॥२॥
तुका सर्वां श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर । का जे अवतार नामयाचा ॥३॥
त्याची तुज काही घडली रे निंदा । म्हणोनि हे बाधा घडली तुज ॥४॥
आता एक करी सागेन ते तुला । शरण जाई त्याला निश्चयेशी ॥५॥
दर्शने चि तुझ्या दोषा परिहार । होय तो विचार सागितला ॥६॥
तो चि हा विश्वास धरूनि मानसी । जाय कीर्तनासी नित्य काळ ॥७॥
म्हणे रामेश्वर त्याच्या समागमॆं । जाले हे आराम देह माझे ॥८॥
७६. (१०८२)
वैष्णवांची याती वाणी जो आपण । भोगी तो पतन कुंभपाकी ॥१॥ ॥धृ॥
ऐशी वेद श्रुति बोलती पुराणे । नाही ते दुषण हरिभक्ता ॥ऽ॥
उंच निंच वर्ण न म्हणावा कोणी । जे का नारायणी प्रिय जाले ॥२॥
चहूं वर्णासी हा असे अधिकार । करिता नमस्कार दोष नाही ॥३॥
जैसा शालिग्राम न म्हणावा पाषाण । होय पूज्यमान सर्वत्रासी ॥४॥
गुरु परब्रम्ह देवांचा तो देव । त्यासी तो मानव म्हणूं नये ॥५॥
म्हणे रामेश्वर नामिं जे रंगले । स्वयें चि ते जाले देवरूप ॥६॥
००१ बाप मेला न कळता ।
बाप मेला न कळता ।
नव्हती संसाराची चिंता॥१॥
विठो तुझे माझे राज्य ।
नाही दुसऱ्याचे काज ॥ध्रु.॥
बाईल मेली मुक्त जाली ।
देवे माया सोडवली ॥२॥
विठो तुझे माझे राज्य ।
नाही दुसऱ्याचे काज ॥ध्रु.॥
पोर मेले बरे जाले ।
देवे मायेविरहित केले ॥३॥
विठो तुझे माझे राज्य ।
नाही दुसऱ्याचे काज ॥ध्रु.॥
माता मेली मज देखता ।
तुका म्हणे हरली चिता ॥४॥
विठो तुझे माझे राज्य ।
नाही दुसऱ्याचे काज ॥ध्रु.॥
निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ : बाईल - बायको.
काज - काम.
अर्थ :
जेव्हा मला कळत नव्हत व संसाराची काळजी नव्हती तेव्हा बाप गेला.॥१॥
आता विठ्ठला, तुझे व माझेच असे राज्य असून यात दुसऱ्याचे काही काम नाही.॥ध्रु.॥
देवा, बायको मरण पावली, बरे झाले, मुक्त होऊन गेली. देवाने मला मायेतून सोडविले.॥२॥
पोरग मरून गेले, तरी बरे झाले. देवाने याही पाशातून मुक्त केले.॥३॥
तुकोबा म्हणतात, माझी आई माझ्या समक्ष गेली.माझी चिंता माझी दूर झाली.॥४॥
००२ संते गुरुराये कृपा मज केली ।
संते गुरुराये कृपा मज केली ।
परि नाही घडली सेवा काही ॥१॥
सापडविले वाटे जाता गंगास्नाना ।
मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥२॥
भोजना मागती तूप पाउशेर ।
पडिला विसर स्वप्नामाजी ॥३॥
काही कळहे उपजला अंतराय ।
म्हणुनी काय त्वरा जाली ॥४॥
राघवचैतन्य केशवचैतन्य ।
सांगितली खूण माळिकेची ॥५॥
बाबाजी आपुले सांगितले नाम ।
मंत्र दिला राम कृष्ण हरी ॥६॥
माहो शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार ।
केला अंगीकार तुका म्हणे ॥७॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
अंतराय-अंतर.
कळह-तंटा.
राघव चैतन्य-चैतन्य संप्रदायाचे प्रवर्तक.
केशव चैतन्य-राघव चैतन्यांचे शिष्य.
माळिकेची-परंपरेची.
बाबाजी-केशव चैतन्यांचे शिष्य.
अंगीकार-स्वीकार.
माहो-माघ.
अर्थ :
संतजन गुरुरायांची मजवर कृपा झाली, परंतु माझ्याकडून त्यांची काही सेवा घडली नाही ॥१॥
मी गंगेस स्नानासाठी जात असतानाच मला वाटेत भेटले व माझ्या मस्तकावर आपला हात ठेविला ॥२॥
त्यांनी भोजनासाठी माझ्याजवळ पाउशेर तुप मागितले परंतु मला त्याचा विसर पडला; हे सर्व स्वप्नात घडले.॥३॥
सेवेत काही तंट्यामुळे अंतर पडले, म्हणून त्वरा करून गुरू गेले.॥४॥
राघव चैतन्य, केशव चैतन्य अशी आपल्या परंपरेची खूण त्यांनी मला सांगितली.॥५॥
स्वतःचे नाव बाबाजी चैतन्य असे सांगून त्यांनी मला राम कृष्ण हरी हा सोपा मंत्र दिला.॥६॥
माघ शुद्ध दशमीच्या गुरुवारी त्यांनी माझा स्वीकार केला असे तुकोबा म्हणतात.॥७॥
००३ माझिये मनीचा जाणोनिया भाव ।
माझिये मनीचा जाणोनिया भाव ।
तो करी उपाव गुरुराव ॥१॥
आवडीचा मंत्र सांगितला सोपा ।
जेणे नव्हे गुंपा काही कोठे ॥२॥
जाती पुढे एक उतरले पार ।
हा भवसागर साधुसंत ॥३॥
जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी ।
उतार सांगडी तापे पेटी ॥४॥
तुका म्हणे मज दावियेला तारू ।
कृपेचा सागरु पांडुरंग ॥५॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
उपाव-उपाय.
गुंपा-गुंतागुंत.
सांगडी-नौका.
तापे-ताफा.
पेटी-नदीतून तरून जाण्याचे साधन.
अर्थ:
सद्गुरूने माझ्या चित्तातील भाव जाणून मला हा मार्ग सांगितला.॥१॥
माझ्या आवडीचा सोपा मंत्र राम कृष्ण हरी असा सांगितला त्यात कसलीही गुंतागुंत नाही.॥२॥
या सोप्या मंत्राच्या साह्याने अनेक साधुसंत यापूर्वी भवसागर तरून गेले आहेत.॥३॥
हा मंत्र सर्वांना सुलभ असा आहे. जाणत्यांना किंवा नेणत्यांना आपापल्या आवडीप्रमाणे याचा लाभ घेता येतो. साधकांना हा मंत्र म्हणजे एकप्रकारची भवसागर तरून जाणारी नौकाच आहे. भवनदी तरून जाण्यास हे एक महत्त्वाचे साधन आहे.॥४॥
तुकोबा म्हणतात, या पांडुरंगाने, या कृपेच्या सागराने भवसागरातून तरून जाणाऱ्या तारूचेच, नावेचेच साह्य मला दिले आहे.॥५॥
००४ नामदेवे केले स्वप्नामाजी जागे ।
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे ।
सवे पांडुरंगे येऊनिया ॥१॥
सांगितले काम करावे कवित्व ।
वाउगे निमित्य बोलो नको ॥ध्रु.॥
माप टाकी सळे धरिली विठ्ठले ।
थापटोनी केले सावधान ॥२॥
सांगितले काम करावे कवित्व ।
वाउगे निमित्य बोलो नको ॥ध्रु.॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी ।
उरले शेवटी लावी तुका ॥३॥
सांगितले काम करावे कवित्व ।
वाउगे निमित्य बोलो नको ॥ध्रु.॥
शब्दार्थ :
सवे - बरोबर.
वाउगे - उगाच, व्यर्थ.
निमित्य - कारण.
सळे - मापण्याचे साधन.
अर्थ :
पांडुरंगास बरोबर घेऊन नामदेवांनी स्वप्नामध्ये येऊन मला जागे केले. १
तू कवित्व करावेस, उगाच व्यर्थ काही बडबड करू नयेस, असे म्हणून त्यांनी मला कविता करण्याचे काम सांगितले. २
मापण्याचे साधन विठ्ठलाने धरले आहे. तू अभंगाचे माप पुरेपूर टाक, असे त्यांनी मला थोपटून सावध केले. ३
तुकाराम महाराज म्हणतात, नामदेव म्हणाले की, मी शंभर कोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली होती, त्यांपैकी जे उरले ते तू पूर्ण कर. ४
विवरण :
तुकाराम महाराजांच्या कवित्वाच्या प्रेरणेसंबंधी हा एक महत्त्वाचा अभंग आहे. नामदेवांची अपुरी राहिलेली शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी नामदेवांनीच विठ्ठलासहित तुकारामबुवांना स्वप्नात प्रेरणा दिली. वाणी उगाच व्यर्थ खर्च करण्याऐवजी कवित्वाच्या कारणी लागावी म्हणून नामदेवांनी तुकाराम महाराजांना थोपटून सावध केले. याप्रमाणे तुकोबांच्या अभंगरचनेस नामदेवांची प्रत्यक्ष प्रेरणा आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांची परंपरा एकच आहे. भागवत धर्माच्या इमारतीचे कार्य यांच्याच कर्तृत्वाने उभे राहिले. ज्ञानेश्वरांच्या कार्याचा, तत्त्वज्ञानाचा विस्तार पडत्या काळात ज्ञानेश्वरीचा पुनरुद्धार करून एकनाथांनी केला; व नामदेवांच्या भवभक्तीचा आणखी प्रसार तुकोबांनी केला. अशी श्रद्धा वारकरी पंथात आहे ती इतिहासाशीही सुसंगत दिसते. 'नाम्याचा तुका व ज्ञान्याचा एका' या सांप्रदायिक म्हणीतही हा संकेत स्पष्ट झालेला दिसतो. नामदेव व तुकाराम यांच्या कवित्वातील अनेक बाबतींतील साम्य पाहून या समजास बळकटी येते. दोघांचे प्रापंचिक जीवन, भक्तिप्रवणता, सगुणाचा ओढा, देवाविषयी लडिवाळ तळमळ व हृदयाचा ठाव घेणारी आर्तता पाहून नामदेवांचे कार्य तुकारामबुवांनी पुढे चालविले व तेही नामदेवांच्याच प्रेरणेवरून हे सहज पटण्यासारखे आहे.
या एका अभंगात दोनतीन गोष्टी प्रामुख्याने ध्यानात ठेवण्यासारख्या आहेत. 'माप टाकी सळ धरिली विठ्ठले' म्हणजे नेमके काय? पुष्कळांनी सळ म्हणजे अभिमान, सामर्थ्य असा अर्थ केला आहे. तू कवित्वाचे माप पूर्ण करावेस असा आग्रह किंवा अभिमान श्रीविठ्ठलाने धरला आहे, अशा प्रकारचा अर्थ अनेक ठिकाणी दिलेला दिसतो. परंतु यापेक्षा सळे म्हणजे धान्य मापण्याचे एखादे साधन असा अर्थ अधिक युक्त दिसतो. तू कविता करून नामदेवांची प्रतिज्ञा पूर्ण कर. ते माप पुरे कर. त्या मापाची मापणी करण्याचे काम सळे धरून विठ्ठलाने पत्करले आहे. असा अर्थ जास्त बरोबर वाटतो.
दुसरे असे की, शतकोटी अभंगरचना करण्याची प्रतिज्ञा नामदेवांनी केली होती काय? ती अपुरी का राहिली? त्यांनी किती अभंग रचले? प्रतिज्ञेपैकी उरले किती? तुकारामबुवांनी किती अभंग करून प्रतिज्ञा पूर्ण केली? असे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. एक तर शंभर कोटी अभंग हा आकडा अतिशयोक्तीचा तर नाही? ईश्वराची संपूर्ण कृपा आणि मानवी मनाचे सामर्थ्य पूर्णपणे जमेस धरूनही शंभर कोटी अभंग पूर्ण होणे एकदोन जन्मांत तरी शक्य आहे काय? अगदी ईश्वरी प्रसादाचा अदभुत चमत्कार मानला तरी शंभर कोटी अभंगांचा हिशोब कसा लावायचा? का ही एक आपली बोलण्याची पद्धत आहे? खूप अभंग नामदेवांनी तुकारामांनी रचले एवढाच अर्थ यातून काढायचा काय? नामदेवांचे व तुकोबांचे आठ ते दहा हजारच अभंग उपलब्ध आज असताना त्यांच्या शतकोटी अभंगांचे कोडे कसे उलगडायचे?
संतचरित्रकार महिपतीबुवा यांनी भक्तीलीलामृताच्या बत्तीसाव्या अध्यायात शतकोटी अभंगांचा हिशोब देताना म्हटले आहे की, नामदेवांनी ९४ कोटी व ४० लक्ष अभंग रचून शेवटी ९ लक्ष लळिताचे अभंग केले आणि बाकीचे ५ कोटी ५१ लक्ष अभंग तुकोबांना रचण्यास सांगितले. या सांप्रदायिक हिशोबाची आणखीही फोड करता येण्यासारखी आहे. वेदांचे अभंग केले 'श्रुतिपर' या एका अभंगात नामदेवांचे १ कोटी अभंग भक्तिपर, १ कोटी ज्ञानपर, एक कोटी अनुभवपर, ७५ लक्ष वैराग्यपर, ७५ लक्ष नामपर; असा ४॥ कोटी अभंगांचा तपशील त्यात असून ६० हजार उपदेशपर, ६० हजार रूपवर्णनाचे, आणखी काही इतर विषयांवरचे. असा सुमारे ५ कोटी ७० लक्षांचा हिशोब लागतो. परंतु या सर्व अतिशयोक्तीच्या उक्तींना फारसे महत्त्व न देता नामदेव तुकारामांनी पुष्कळच अभंगरचना केली, एवढाच मथितार्थ त्यातून स्पष्ट व्हावा. या संतश्रेष्ठांच्या अभंगांतील श्रेष्ठ अनुभूती, ईश्वराविषयी प्रेम, तळमळ, समाजाविषयी आस्था यांना असलेले महत्त्व जाणावे. संख्येचा प्रश्न गौण समजला गेला तरी हरकत नाही.
शतकोटी अभंग रचण्याची प्रेरणा नामदेवांना भक्तमंडळीत आत्मचर्चा करीत असताना वाल्मीकींनी शतकोटी ग्रंथरचना केल्याचा उल्लेख आला त्यातून मिळाली. वाल्मीकींनी शंभर कोटी ग्रंथरचना करून आपल्या आयुष्याचे सार्थक केले; आपण मात्र आपले आयुष्य उगाच वाया घालवीत आहोत, अशा भावनेच्या जाणिवेने नामदेवांनी विठ्ठलापाशी करुणा भाकली. विठ्ठलाने त्यांची समजूत घातली. आयुष्य थोडे असल्याने संकल्प कसा काय पूर्ण होणार? अशी शंका विठ्ठलानेच उपस्थित केली. त्यावर 'जरी न होती संपूर्ण । जिव्हा उतरून ठेवीन मी' असे रोखठोक उत्तर नामदेवांनी दिले. मग नामदेवांचे आपल्यावरील भक्तीचे ऋण फेडण्यासाठी सरस्वतीलाच त्यांच्या जिव्हेवर निवास करण्यास सांगितले. तिची एकदा कृपा झाल्यावर नामदेवांची प्रतिज्ञा पूर्ण होण्यास फारशी अडचण पडणार नाही अशी खात्री; आणि या विश्वासावर गोणाई, राजाई या सासुसुना, दामा नामा हे बापलेक, नारा, म्हादा, गोंदा, विठा, हे चार पुत्र, लाडाई, गोडाई, येसाई, साकराई या चार सुना, निंबाई लेक, नाऊबाई बहीण, जनी इतुक्यांही जण अभंग आरंभिले। देखें पूर्ण केले नामा म्हणे' म्हणजे या सर्वांनी अभंगांची प्रतिज्ञा पूर्ण केली.
००५ द्याल ठाव तरी राहेन संगती ।
द्याल ठाव तरी राहेन संगती ।
संतांचे पंगती पायांपाशी ॥१॥
आवडीचा ठाव आलोसे टाकून ।
आता उदासीन न धरावे ॥ध्रु.॥
सेवटील स्थळ नीच माझी वृत्ती ।
आधारे विश्रांती पावईन ॥२॥
आवडीचा ठाव आलोसे टाकून ।
आता उदासीन न धरावे ॥ध्रु.॥
नामदेवापायी तुक्या स्वप्नी भेटी ।
प्रसाद हा पोटी राहिलासे ॥३॥
आवडीचा ठाव आलोसे टाकून ।
आता उदासीन न धरावे ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
ठाव - आश्रय.
स्थळ - स्थान.
वृत्ती - धंदा, निर्वाहाचे साधन.
अर्थ :
मागील अभंगात नामदेवे केले स्वप्नामाजी जागे । सांगितल्याप्रमाणे तुकोबांना नामदेवांची व विठ्ठलाची प्रेरणा मिळाल्यावर बुवांनी सांगितले, तुम्ही जर मला आश्रय द्याल तर मी तुमच्याच संगतीने राहीन. संतांच्या पंगतीस मी त्यांच्या पायांशी बसूनच राहीन.॥१॥
केवळ तुमच्या प्रेमासाठीच मी माझे आवडीचे ठिकाण सोडून येथे आलो आहे. आता तुम्ही उदासीन असू नये.॥ध्रु.॥
माझे स्थान शेवटचे असून माझा धंदाही हलक्या प्रकारचा आहे. परंतु आता आपल्या पायांची विश्रांती मला मिळेल.॥२॥
तुकोबा म्हणतात, नामदेवरायांची भेट मला तुकारामाला स्वप्नामध्ये झाली असल्यामुळे हा कवित्वाचा प्रसाद माझ्या हृदयात भरून राहिलेला आहे.॥३॥
००६ पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार जाला ।
पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार जाला ।
विठोबा भेटला निराकार ॥१॥
भांबगिरिपाठारी वस्ती जाण केली ।
वृत्ती थिरावली परब्रह्मी ॥२॥
निर्वाण जाणोनी आसन घातले ।
ध्यान आरंभिले देवाजीचे ॥३॥
सर्प विंचू व्याघ्र अंगासी झोंबले ।
पीडू जे लागले सकळीक ॥४॥
दीपक कर्पूर कैसा तो विराला ।
तैसा देह जाला तुका म्हणे ॥५॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
भांबगिरीपाठारी - भामनाथ नावाच्या डोंगराच्या सपाटीवर.
दीपक - दिव्यात.
विराला - नाहीसा झाला.
अर्थ :
पंधरा दिवसात मला साक्षात्कार झाला. निराकार स्वरूपाचा विठोबा मला भेटला.॥१॥
भामनाथ डोंगराच्या सपाटीवर मी वसती करून राहिलो हे जाणा, त्याच ठिकाणी माझी वृत्ती परब्रह्मी स्थिरावून राहिली.॥२॥
मी निर्वाणाचे म्हणून तेथेच आसन घातले आणि श्रीहरीचे ध्यान आरंभिले.॥३॥
यानंतर माझ्या अंगास सर्प, विंचू, वाघ झोंबू लागले या सर्वांची पीडा मला होऊ लागली.॥४॥
तुकोबा म्हणतात, दिव्यात जसा कापूर विरून जातो त्याप्रमाणे माझा देह ब्रह्मत्वात समरस झाला.॥५॥
००७ अज्ञान हा देह स्वरूपी मीनला ।
अज्ञान हा देह स्वरूपी मीनला ।
सर्व वोसावला देहपात ॥१॥
ज्ञानस्वरूपाची सांगड मिळाली ।
अंतरीं पाहिली ज्ञानज्योती ॥२॥
तुका म्हणे चित्त स्वरूप राहिले ।
देह विसावले तुझ्या पायी ॥३॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
वोसावला - नाहीसा झाला.
अर्थ :
अज्ञानरूपी हा देह स्वरूपात विरून गेला. देहपाताची भीती यामुळे सर्व नाहीशी झाली.॥१॥
स्वरूप ज्ञानाची सांगड मिळून अंतरंगातील ज्ञानज्योत पाहाण्याचा अनुभव आला.॥२॥
तुकोबा म्हणतात, माझे चित्त देवा, तुमच्या स्वरूपात राहिले आणि तुमच्या पायावर माझा देह विसावून गेला आहे.॥३॥
००८ अंतरींची ज्योती प्रकाशली दीप्ती ।
अंतरींची ज्योती प्रकाशली दीप्ती ।
मुळीची जे होती आच्छादिली ॥१॥
तेथीचा आनंद ब्रह्मांडी न माये ।
उपमेशी काये देऊ सुखा ॥ध्रु.॥
भावाचे मथिले निर्गुण संचले ।
ते हे उभे केले विटेवरी ॥२॥
तेथीचा आनंद ब्रह्मांडी न माये ।
उपमेशी काये देऊ सुखा ॥ध्रु.॥
तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी ।
प्रेमाची जे थोरी सांठवण ॥३॥
तेथीचा आनंद ब्रह्मांडी न माये ।
उपमेशी काये देऊ सुखा ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
संचले - साठलेले.
अर्थ :
श्रीहरीच्या कृपेची अंतःकरणात ज्योत प्रकाशित झाली आहे. मुळात ती अज्ञानामुळे आच्छादिलेली होती.॥१॥
यामुळे आता माझा आनंद ब्रह्मांडातही मावेनासा झाला आहे. या माझ्या आत्मसुखास दुसरी कुठली उपमा देऊ?॥ध्रु.॥
जे निर्गुणपणे साठलेले होते ते मी माझ्या भावभक्तीने मंथन करून या सगुण व सुंदर रूपात विटेवर उभे केले आहे.॥२॥
तुकोबा म्हणतात पंढरी हेच आम्हास ब्रह्मांड असून, या ठिकाणी प्रेमाचा फार मोठा साठा झालेला आहे.॥३॥
००९ एका वेळे केले रिते कलिवर ।
एका वेळे केले रिते कलिवर।
आत दिली थार पांडुरंगा ॥१॥
पाळण पोषण लागले ते सोई।
देहाचे ते काई सर्व भावे ॥ध्रु.॥
माझिया मरणे जाली हे वसती ।
लागली ते ज्योती अविनाश ॥२॥
पाळण पोषण लागले ते सोई।
देहाचे ते काई सर्व भावे ॥ध्रु.॥
जाला ऐसा एका घाये येथे नाही ।
तुका म्हणे काही बोलो नये ॥३॥
पाळण पोषण लागले ते सोई।
देहाचे ते काई सर्व भावे ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
कलिवर – शरीर.
थार – आश्रय.
अर्थ :
एकाच वेळेस सर्व विकार नाहीसे करून मी माझे शरीर रिकामे केले व त्या ठिकाणी या पांडुरंगास आश्रयाला जागा करून दिली॥१॥
याखेरीज आणखी काही या देहसंबंधीचे पालनपोषण करण्याचे कारण मला दिसत नाही.॥ध्रु.॥
मी व माझेपणा यांच्या मरणामुळे या श्रीहरीची वसती माझ्यात झाली आणि अविनाशी प्रकाशाचे रूप माझ्यात प्रकटले॥२॥
तुकोबा म्हणतात, मी एका घावानेच देहात्मबुद्धीचा घात केला. आता काही बोलो नये ॥३॥
०१० स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण ।
स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण ।
अंतरीची खूण पावूनिया ॥१॥
पुंजाळले नेत्र जाले अर्धोन्मीलित ।
कंठ सद्गदित रोमांच आले ॥२॥
चित्त चाकाटले स्वरूपा माझारी ।
न निघे बाहेरी सुखावलो ॥३॥
सुनीळ प्रकाश उदैजला दिन ।
अमृताचे पान जीवनकळा ॥४॥
शशिसूर्या जाली जीवे ओवाळणी ।
आनंदा दाटणी आनंदाची ॥५॥
तुका म्हणे सुखे प्रेमासी डुलत ।
वीरालो निश्चित निश्चितीने ॥६॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४).
शब्दार्थ:
पांगुळला – लीन, नम्र झाला.
पुंजाळले – प्रज्ज्वलित झाले.
अर्धोन्मीलित – अर्धवट उघडलेले.
रोमांच – काटा.
चाकाटले – चकित झाले.
अर्थ :
अंतरंगाची खूण मला पावल्यामुळे माझ्या वृत्ती स्थिर झाल्या, प्राण विनम्र झाला.॥१॥
माझे डोळे प्रज्वलित झाले, अर्धवट उघडले गेले. कंठ दाटून आला आणि अंगावर रोमांच उभे राहिले.॥२॥
तुझ्या स्वरूपात शिरकाव झाल्यामुळे माझे चित्त चकित झाले आहे, ते आता बाहेर निघतच नाही कारण ते आतल्या सुखात रमले आहे.॥३॥
सुंदर निळसर प्रकाशाचा एक नवा दिवस उजाडल्यासारखा वाटतो. जीवनकलेच्या अमृताचे पान केल्यामुळे हा दिव्य अनुभव आला.॥४॥
चंद्र आणि सूर्य या माझ्या जीवाच्या ओवाळणीत सहभागी झाले आणि आनंदाचा झरा ओसंडून गेला.॥५॥
तुकोबा म्हणतात, या आनंदात मी प्रेमात डुलतो आहे. निश्चितच मी परमेश्वराच्या स्वरूपात समरस झालो आहे.॥६॥
०११ आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंदची अंग आनंदाचें ॥१॥
काय सांगो जाले काहीचियाबाही ।
पुढे चाली नाही आवडीने ॥ध्रु.॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥
काय सांगो जाले काहीचियाबाही ।
पुढे चाली नाही आवडीने ॥ध्रु.॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥
काय सांगो जाले काहीचियाबाही ।
पुढे चाली नाही आवडीने ॥ध्रु.॥
निरूपण :
शशांक पुरंदरे
शब्दार्थ:
डोही – सरोवर/जलाशय
बिंबे – प्रतिबिंब
डोहळा – गर्भवती मातेच्या खाण्याच्या इच्छा
ठसा – छाप, अनुभवरुप ओळख
अर्थ :
तुकोबा म्हणतात, माझ्या अंतरंगात आणि बहिरंगात एकच आनंद भरून राहिलेला आहे – जणू आनंदाच्या सागरात आनंदाच्या लाटा उसळत आहेत. प्रत्येक अंगा-अंगात तो आनंद झिरपत आहे.॥१॥
हा अनुभव इतका अनोखा आहे की तो काही शब्दांनी सांगणे अशक्य आहे – आणि सांगून उपयोगही नाही. कारण यापुढे कुठेही जाण्याची, काही साध्य करण्याची इच्छा उरलेलीच नाही.॥ध्रु.॥
हा अनुभव म्हणजे गर्भ आणि मातेसारखा एकरुप जिव्हाळा आहे – गर्भाला जशी आवड होते आणि ती मातेच्या डोहळ्यातून प्रगट होते, तशी भक्ताची आवड परमेश्वर अनुभवतो आणि देतो.॥२॥
तुकोबा म्हणतात, हाच ठसा (अनुभव) माझ्या अंतरात्म्यावर उमटला आहे आणि तो अनुभव माझ्या मुखातून शब्दरूपाने बाहेर प्रगट झाला आहे.॥३॥
०१२ अनुभव अवघाची साधिला ।
अनुभवे अनुभव अवघाची साधिला ।
तरी स्छिरावला मनु ठायी ॥१॥
पिटूनिया मुसे आला अळंकार ।
दग्ध ते असार होऊनिया ॥ध्रु.॥
एकची उरले काया वाचा मना ।
आनंद भुवनामाजी त्रयीं ॥२॥
पिटूनिया मुसे आला अळंकार ।
दग्ध ते असार होऊनिया ॥ध्रु.॥
तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार ।
होउनी किंकर विठोबाचे ॥३॥
पिटूनिया मुसे आला अळंकार ।
दग्ध ते असार होऊनिया ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ:
स्छिरावला – स्थिर झाला
मनु – मन
ठायी – ईश्वराच्या ठिकाणी
पिटूनिया – वितळवून/आटवून
मुसे – घालणारे साचे
अळंकार – अलंकार
असार – निरर्थक, हिणकस
किंकर – सेवक, दास
अर्थ :
अनुभवावर अनुभव घेत घेत अखेरीस मी संपूर्ण आत्मबोध मिळविला. त्या अनुभवाच्या योगे माझे चंचल मन आता विठोबाच्या चरणी स्थिर झाले आहे.॥१॥
जसे सोनं वितळवून त्यातील सगळी अपवित्रता काढून टाकल्यावर शुद्ध स्वरूपात अलंकार घडतो, तसंच माझ्या जीवनातील निरर्थकता जळून गेली आहे आणि आता उरला आहे केवळ शुद्ध आत्मा.॥ध्रु.॥
आता काय, वाणी आणि मन – हे सर्व एकात्म झाले असून, माझ्या कर्तृत्वात आणि भावनांमध्ये केवळ त्रिभुवन व्यापणारा आनंदच उरला आहे.॥२॥
तुकोबा म्हणतात, आम्ही आता विठोबाचे दास झालो असून, त्या भगवद्भक्तीमुळेच आम्ही संसाररूपी मोहजाळावर मात केली आहे.॥३॥
०१३ ऐसिया संपत्ती आम्हा संवसारी
ऐसिया संपत्ती आम्हा संवसारी ।
भोगाचिया परी काय सांगो ॥१॥
काम तो कामना भोगीतसे देवा ।
आळिंगणे हेवा चरण चुंबी ॥ध्रु.॥
शांतीच्या संयोगे निरसला ताप ।
दुसरे ते पाप भेद बुद्धी ॥२॥
काम तो कामना भोगीतसे देवा ।
आळिंगणे हेवा चरण चुंबी ॥ध्रु.॥
तुका म्हणे पाहे तिकडे सारिखे ।
आपुले पारिखे निरसले ॥३॥
काम तो कामना भोगीतसे देवा ।
आळिंगणे हेवा चरण चुंबी ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
संवसारी – संसारात राहणारे
परी – प्रकार
काम – इच्छा
हेवा – हाव, आसक्ती
निरसला – नाहीसा झाला
आपुले पारिखे – आपले-परके असा भेद
अर्थ :
या संसारात असूनही आम्हाला श्रीहरीची जी सान्निध्याची संपत्ती लाभली आहे, ती इतकी विविध आणि अद्भुत आहे की, तिचे सारे प्रकार सांगणेही कठीण आहे. ॥१॥
आमच्या सर्व कामना, सर्व भोगत्या इच्छांचे केंद्रच विठोबा झाला आहे. त्याला आलिंगन देण्याची ओढ, आणि त्याच्या चरणांचा स्पर्श व चुंबन हेच आता आमचं एकमेव प्रेमरूप काम आहे. ॥ध्रु.॥
त्या शांतीस्वरूप, अद्वैतपूर्ण अनुभवामुळे आतला सर्व ताप नाहीसा झाला आहे. आता भेदभाव निर्माण करणारी बुद्धी – तीच खऱ्या अर्थाने पाप ठरते. ॥२॥
तुकाराम महाराज म्हणतात, जिकडे पाहतो तिकडे फक्त तोच – विठोबा – सर्वत्र व्यापून आहे. आता ‘आपण’ आणि ‘दुसरे’ असा कोणताही भेद उरलेला नाही. ॥३॥
०१४ आता येणेवीण नाही आम्हा चाड
आता येणेवीण नाही आम्हा चाड ।
कोण बडबड करी वाया ॥१॥
सुख तेची दुःख पुण्यपाप खरे ।
हे तो आम्हा बरे कळो आले ॥२॥
तुका म्हणे वाचा वाहिली अनंता ।
बोलायाचे आता काम नाही ॥३॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
येणेवीण – तुझ्या नामाशिवाय
वाया – विनाकारण
अर्थ :
आता या पांडुरंगाच्या नामाशिवाय दुसऱ्या कशाचीही आम्हाला गरज उरलेली नाही. म्हणूनच बाकी काही बडबड करणे ही फक्त फाजील वाया गेलेली ऊर्जा आहे. ॥१॥
आम्हाला आता अगदी स्पष्ट समजून आलं आहे की, ज्याला लोक सुख समजतात तेच खरं दुःख आहे, आणि पुण्य वाटणाऱ्या गोष्टींचंही मूळ पापातच असतं – म्हणूनच ह्यापलीकडे काही साधायचं राहिलं नाही. ॥२॥
तुकोबा म्हणतात, आमची वाणी आता त्या अनंतात वाहून गेली आहे. त्याच्या अस्तित्वात विलीन झाली आहे. म्हणून आता काही बोलण्यासारखं उरलेलं नाहीच. ॥३॥
०१५ बोलो अबोलणे मरोनिया जिणे
बोलो अबोलणे मरोनिया जिणे ।
असोनी नसणे जनी आम्हा ॥१॥
भोगी त्याग जाला संगीच असंग ।
तोडियेले लाग माग दोन्ही ॥२॥
तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा ।
पुसणे ते पुसा पांडुरंगा ॥३॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
लाग – संबंध
पुसणे – विचारणे
अर्थ :
जे बोलायचे नाही तेच आम्ही बोलतो आहोत, कारण आता आमचं जीवन 'देहबुद्धीने मेल्यावरचं जगणं' झालं आहे. म्हणजेच अहंभाव शून्य होऊन आत्मभावाने जगतो. ॥१॥
भोगात राहून त्याग साधला आहे, संगाच्या सान्निध्यात असंग साधला आहे. कारण आतून पूर्णतः दोन्हींचा — भोग आणि त्याग — अतिक्रम झाला आहे. आता मागेपुढे काहीच लागत नाही. ॥२॥
तुकोबा म्हणतात, वरवर जसा दिसतो तसा मी नाहीये. माझ्या वास्तविक स्वरूपाविषयी जाणून घ्यायचं असेल तर स्वतः पांडुरंगालाच विचारा. कारण मी त्याच्यात इतका एकरूप झालो आहे. ॥३॥
०१६ अधिकार तैसा दावियेले मार्ग
अधिकार तैसा दावियेले मार्ग ।
चालता हे मग कळो येते ॥१॥
जाळू नये गाव पावलेनी पार ।
मागील आधार बहुतांचा ॥२॥
तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी ।
नाही करी जगी उपकार ॥३॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
पार – पलीकडे
अर्थ :
प्रत्येक साधकाच्या (ज्याच्यात साधना करण्याची पात्रता आहे त्याच्या) आधीच्या संस्कारांनुसार त्याला जसा योग्य तो मार्ग दाखवला गेला आहे. तो मार्ग चालताना (अनुभवाने) त्याला हळूहळू सगळं कळून येतं. ॥१॥
आपण जर आधीच पार पोहोचलो असलो तरी आपण चालून आलेला मार्ग (नाव) जाळून टाकू नये, कारण मागून येणाऱ्यांसाठी तोच आधार ठरतो. ॥२॥
तुकोबा म्हणतात, वैद्य स्वतः निरोगी असतो, पण तो रोग नसतानाही औषध घेऊन बसत नाही. तरीही त्याच्या जवळ असलेली औषधं इतरांवर उपकार करत असतात — तसंच ज्ञान ठेवणाऱ्यांनी, अनुभव गाठलेल्यांनी इतरांसाठी तो मार्ग खुला ठेवावा. ॥३॥
०१७ संवसार तिही केला पाठमोरा
संवसार तिही केला पाठमोरा ।
नाही द्रव्य दारा जया चित्ती ॥१॥
शुभाशुभ नाही हर्षामर्ष अंगी ।
जनार्दन जगी होउनी ठेला ॥२॥
तुका म्हणे देहे दिला एकसरे ।
जयासी दुसरे नाही मग ॥३॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
तिही - त्यांनी
दारा - स्त्री
हर्षामर्ष - सुखदुःख
अर्थ :
ज्याच्या मनात द्रव्य (संपत्ती) आणि स्त्री या मोहांचा आसक्तीचा दुवा नाही, त्याने संसाराचा पाठमोरा — म्हणजे संसाराच्या बंधनांचा पूर्णपणे तुटलेला आहे असे मानावे. ॥१॥
ज्याला शुभ-अशुभ, सुख-दुःख या द्वैतांची भावना नाही, तो या जगात प्रत्यक्ष जनार्दन (परमेश्वर)स्वरूप झाला आहे असे मानावे. ॥२॥
तुकाराम म्हणतात, जो आपला देह एकसंधपणे (पूर्णतः) परमेश्वराला अर्पण केला आहे, त्याला या जगात काहीही दुसरे बाकी राहत नाही. ॥३॥
०१८ देहबुद्धी वसे लोभ जया चित्ती
देहबुद्धी वसे लोभ जया चित्ती ।
आपुले जाणती परावे जे ॥१॥
तयासी चालता पाहिजे शिदोरी ।
दुःख पावे करी असत्य तो ॥२॥
तुका म्हणे धर्म रक्षाया कारणे ।
छाया इच्छी उन्हे तापला तो ॥३॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
परावे – दुसऱ्याचे.
अर्थ :
ज्याच्या मनातून देहबुद्धी अजून निघाली नाही, आणि त्याच्या चित्तात लोभ वसलेला आहे, तो स्वतःचे (आपुले) आणि दुसऱ्याचे (परावे) यांचा भेद करतो. ॥१॥
अशा माणसाला जन्माच्या वाटचालीसाठी पुण्याचा (सकारात्मक) आधार म्हणजे शिदोरी घेणे गरजेचे आहे. जो असत्य कर्म करतो त्याला दुःख मिळतेच. ॥२॥
तुकोबा म्हणतात, ज्याने सूर्यप्रमाणे तापलेला असेल, त्याला छायेसारखी शीतलता हवीच असते; धर्म रक्षणासाठी असा प्रयत्न आवश्यक आहे. ॥३॥
०१९ काळे खादला हा अवघा आकार
काळे खादला हा अवघा आकार ।
उत्पत्ती संहार घडमोडी ॥१॥
बीज तो अंकुर आच्छादिला पोटी ।
अनंता सेवटी एकाचिया ॥२॥
तुका म्हणे शब्दे व्यापिले आकाश ।
गुढार हे तैसे कळो नये ॥३॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
उत्पत्ति – निर्मिती.
संहार – शेवट.
अनंता शेवटी – कल्पान्ताच्या शेवटी.
गुढार – गुह्य.
अर्थ :
जगाची निर्मिती आणि संहार यांच्या घडामोडीत जगास आलेला हा आकार काळ एकसारखा खात असतो. ॥१॥
जसे बीजाच्या पोटी अंकुर तयार होतो, तसेच कल्पान्ताच्या शेवटी सर्व चराचर विश्व त्या एकाच पोटी विलीन होणार आहे. ॥२॥
तुकोबा म्हणतात, हे सगळं काही शब्दांच्या आकाशाने व्यापलेलं आहे, पण हे गुह्य सहज कसे कळणार? ॥३॥
०२० पुण्य पापा ठाव नाही सुख दुःखा
पुण्य पापा ठाव नाही सुख दुःखा।
हानी लाभ शंका नासलिया ॥१॥
जिता मरण आले आप पर गेले ।
मूळ छेदियेले संसाराचे ॥ध्रु.॥
अधिकार जाती वर्ण धर्म याती ।
ठाव नाही सत्य असत्याशी ॥२॥
जिता मरण आले आप पर गेले ।
मूळ छेदियेले संसाराचे ॥ध्रु.॥
जन वन भिन्न अचेत चळण ।
नाही दुजेपण ठाव यासी ॥३॥
जिता मरण आले आप पर गेले ।
मूळ छेदियेले संसाराचे ॥ध्रु.॥
तुका म्हणे देह वाहिला विठ्ठली ।
तेव्हाच घडली सर्व पूजा ॥४॥
जिता मरण आले आप पर गेले ।
मूळ छेदियेले संसाराचे ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
ठाव – ठिकाण, स्थान.
अचेत – अचेतन.
चळण – सचेतन.
अर्थ :
आता माझ्यात पाप पुण्यास अथवा सुख दुःखास स्थान नाही, असे झाले आहे. आता माझ्यातील हानी लाभ विषयीची शंकाही नाहीशी झाली आहे. ॥१॥
मला जणू जिवंतपणीच मरण आले असून, माझ्यातील आपपरभाव गेलेला आहे. मी संसाराचे मूळच छेदून टाकले आहे. ॥ध्रु.॥
आता माझ्या ठिकाणी सत्य-असत्याचा संबंध उरलेला नाही त्यामुळे वर्ण, धर्म, जाती यांचाही अधिकार संपलेला आहे. ॥२॥
आता जन व वन, सचेतन व अचेतन अशा दुजेपणास स्थान माझ्या ठिकाणी राहिलेले नाही. ॥३॥
तुकोबा म्हणतात, आम्ही हा आमचा देह जेव्हा विठ्ठलाला वाहिला, तेव्हाच त्याची सर्व प्रकारची पूजा घडली. ॥४॥
०२१ बीज भाजुनी केली लाही
बीज भाजुनी केली लाही ।
आम्हा जन्ममरण नाही ॥१॥
आकाराशी कैंचा ठाव ।
देह प्रत्यक्ष जाला देव ॥ध्रु.॥
साकरेचा नव्हे उस ।
आम्हा कैंचा गर्भवास ॥२॥
आकाराशी कैंचा ठाव ।
देह प्रत्यक्ष जाला देव ॥ध्रु.॥
तुका म्हणे औघा जोग ।
सर्वा घटी पांडुरंग ॥३॥
आकाराशी कैंचा ठाव ।
देह प्रत्यक्ष जाला देव ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
सांडुनी – सोडून.
वाव – व्यर्थ.
जोग – चित्तवृत्ती निरोध, समाधी.
सर्वा घटी – सर्व वेळ.
अर्थ :
आम्ही आमचे जन्मबीज भाजून त्याची लाही केली असल्याने आता आम्हाला जन्म-मरण उरलेलेच नाही. ॥१॥
जिथे प्रत्यक्ष देहच देव झाला आहे, तिथे आकाराला (शरीराला) कसले स्थान आहे? ॥ध्रु.॥
साखरेपासून पुन्हा ऊस तयार होत नाही, त्याप्रमाणे आम्हाला आता पुन्हा गर्भवास कसा येईल? ॥२॥
तुकोबा म्हणतात, आम्ही चित्तवृत्तीचा निरोध (समाधी) करून, सतत पांडुरंगाचे ध्यान करतो. ॥३॥
०२२ अणुरेणुया थोकडा
अणुरेणुया थोकडा ।
तुका आकाशा एवढा ॥१॥
गिळुनि सांडिले कळिवर ।
भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥
सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटी ॥२॥
गिळुनि सांडिले कळिवर ।
भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥
तुका म्हणे आता ।
उरलो उपकारापुरता ॥३॥
गिळुनि सांडिले कळिवर ।
भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
अणुरेणुया – अणुरेणू पेक्षाही सूक्ष्म.
थोकडा – स्थूलतेचा लवलेशही नसलेला.
त्रिपुटी – ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान यांचा समूह.
अर्थ :
मी तुकाराम, प्रत्यक्ष पाहता अणुरेणू पेक्षाही सूक्ष्म आहे, पण अनुभूतीमध्ये मी आकाशाएवढा व्यापक झालो आहे. ॥१॥
मी देह, अहंकार आणि प्रपंचरूपी भ्रमाचा आकार गिळून टाकून सोडून दिला आहे. ॥ध्रु.॥
ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान या त्रिपुटीचा त्याग केला असून, आता माझ्या घटामध्ये आत्मज्ञानाचा दीप उजळून गेला आहे. ॥२॥
तुकोबा म्हणतात, आता मी या जगात केवळ दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठीच उरलेलो आहे. ॥३॥
विवरण :
या प्रसिद्ध अभंगात तुकोबांनी आत्मा किती सूक्ष्म आणि किती व्यापक असतो, हे आपल्या अनुभवावरून सांगितले आहे. कठोपनिषदातील "अणोरणीयान् महतो महीयान्" या सूत्राचा अनुवादच जणू या अभंगात दिसतो. आत्मसाक्षात्कारानंतर ‘मी’पणा गळून पडतो, त्रिपुटी नष्ट होते, देहाची भान विसरले जाते. अशा अवस्थेत तुकोबा स्वतःला आता केवळ इतर जीवांवर उपकार करण्यासाठी जगात उरल्याचे सांगतात. हा परोपकार बुद्धीचा उत्कट आविष्कार आहे — जणू मेघांप्रमाणे सतत वृष्टी करत राहणं.
यातील:
◆ "गिळुनि सांडिले कळिवर" – म्हणजे देहाभिमान नष्ट झाला.
◆ "सांडिली त्रिपुटी" – म्हणजे अद्वैत ज्ञान झाले.
◆ "उरलो उपकारापुरता" – म्हणजे स्वतःच्या मुक्तीसाठी नव्हे, तर जगासाठी जीवन.
०२३ आमचा स्वदेश
आमचा स्वदेश ।
भुवनत्रयामध्ये वास ॥१॥
मायबापाची लाडकी ।
कळो आले हे लौकिकी ॥ध्रु.॥
नाही निपराध ।
कोण आम्हा मध्ये भेद ॥२॥
मायबापाची लाडकी ।
कळो आले हे लौकिकी ॥ध्रु.॥
तुका म्हणे नाम ।
अवघे आमचे हे धाम ॥३॥
मायबापाची लाडकी ।
कळो आले हे लौकिकी ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
लौकिकी – सर्व लोकांना माहीत.
निपराध – नीच, पातकी, दुष्ट.
अर्थ :
आमचा खरा देश म्हणजे त्रिभुवन, कारण आम्ही सर्वत्र व्यापून असलेल्या परमेश्वराशी एकरूप झालो आहोत. ॥१॥
आम्ही त्या श्रीहरी मायबापाची लाडकी लेकरे आहोत – हे आता सर्वांनाच ज्ञात झाले आहे. ॥ध्रु.॥
आमच्यात कोणी पातकी नाही, आमच्यात कोणी श्रेष्ठ-कनिष्ठ नाही, भेदभाव नाही. ॥२॥
तुकोबा म्हणतात, श्रीहरीचे नामस्मरणच आमचे अंतिम विश्रांतीस्थान, आमचे खरे धाम आहे. ॥३॥
०२४ स्मशानी आम्हा न्याहालीचे सुख
स्मशानी आम्हा न्याहालीचे सुख ।
या नावे कौतुक तुमची कृपा ॥१॥
नाही तरी वाया अवघेची निर्फळ ।
शब्द ते पोकळ बडबडेचे ॥ध्रु.॥
झाडे झुडे जीव सोइरे पाषाण ।
होती तई दान तुम्ही केले ॥२॥
नाही तरी वाया अवघेची निर्फळ ।
शब्द ते पोकळ बडबडेचे ॥ध्रु.॥
तुका म्हणे आता पाहेन अनुभव ।
घेउनी हाती जीव पांडुरंगा ॥३॥
नाही तरी वाया अवघेची निर्फळ ।
शब्द ते पोकळ बडबडेचे ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
न्याहालीचे – गाद्यागिद्यचे, गोड आरामाचे सुख.
सोइरे – स्नेही, आप्त.
पोकळ बडबड – अर्थहीन बोलणे.
अर्थ :
देवा, तुझी कृपा झाली तर आम्ही स्मशानात असलो तरी तेथेही आमच्यासाठी आराम, सुख वाटेल. तो अनुभवही आनंददायक वाटेल. ॥१॥
पण जर तुझी कृपा नसेल, तर मग आमचे बोलणे, नामस्मरण, साधना – हे सर्व पोकळ आणि निर्थक बडबड ठरेल. ॥ध्रु.॥
तुझी कृपा होईल तेव्हा झाडे, प्राणी, दगडसुद्धा आमच्या स्नेही वाटतील – सृष्टीत एकत्व वाटेल. सर्व तुझ्या कृपेमुळे साध्य होईल. ॥२॥
तुकोबा म्हणतात, हे खरे आहे का, हे पाहण्यासाठी मी आता अनुभव घेणार आहे – स्वतःचा जीव घेऊन प्रत्यक्ष अनुभव घेईन. ॥३॥
०२५ वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे।
पक्षी ही सुस्वरे आळविती ॥१॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास।
नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
आकाश मंडप धरणी आसन।
रमे तेथे मन क्रीडा करू ॥२॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास।
नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
कंथा कुमंडल देह उपचारा।
जाणवितो वारा अवस्वरु ॥३॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास।
नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
हरिनामे भोजन परवडी विस्तार।
करुनी प्रकार सेवू रुची ॥४॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास।
नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
तुका म्हणे होय मनासी संवाद।
आपुलाची वाद आपल्यासी ॥५॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास।
नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
वनचरे – वनात वावरणारे प्राणी
कंथा – जाडसर वस्त्र
कुमंडल – पाण्याचे भांडे
परवडी – आवडीचा पदार्थ, पसंतीचा प्रकार
अर्थ :
वनातील वृक्ष, वेली, झाडे, वनचर प्राणी आणि सुस्वराने भगवंताचे नाम घेणारे पक्षी हेच आता आमचे सगे-सोयरे झाले आहेत. ॥१॥
या एकांताच्या वासातच आम्हाला खरे सुख सापडले आहे. आता कोणताही गुण किंवा दोष आमच्या अंगाला लागूच शकत नाही. ॥ध्रु.॥
आकाश हे आमचे मंडप असून पृथ्वी हे आसन आहे. अशा व्यापक वातावरणात आमचे मन रमते आणि तिथेच आम्ही खेळतो, समाधानाने जगतो. ॥२॥
कंथा आणि कुमंडल एवढेच शरीरासाठी लागणारे उपचार आहेत. आणि वेळेचे भानही केवळ वाऱ्याच्या हलक्याशा स्पर्शातून येते. ॥३॥
हरिनाम हेच आमचे भोजन आहे, त्यात विविध प्रकार करून आम्ही प्रेमाने तेच सेवन करतो. ॥४॥
तुकाराम महाराज म्हणतात, आता मी स्वतःच स्वतःशी संवाद करतो, आपल्याच मनाशी वाद घालतो – तोच माझा संवाद आहे. ॥५॥
वर्णन :
या अभंगात तुकाराम महाराजांची **अद्वैत अनुभूती**, **निसर्गप्रेम**, आणि **एकांतवासाची गोडी** प्रकट होते. संसाराची तुटलेली नाळ, हरिनामाची आसक्ती, आणि वृक्ष-वेलींपासून पक्ष्यांपर्यंत सर्व सृष्टीला आपले मानण्याची वृत्ती इथे पाहायला मिळते. तुकोबांना एकांतातही अपार सौख्य मिळते कारण ते आता आपल्या **मनेशीच संवाद** करतात. हीच अवस्था "ज्ञानी माणसाची" असून, गीतेत जसे सांगितले – "अरतिर्जनसंसदि" – तशीच संतांचीही वृत्ती असते.
०२६ सोन्याचे पर्वत करवती पाषाण
सोन्याचे पर्वत करवती पाषाण ।
अवघे रानोरान कल्पतरु ॥१॥
परि या दुर्लभ विठोबाचे पाय ।
तेथे हे उपाय न सरती ॥ध्रु.॥
अमृतें सागर भरवती गंगा ।
म्हणवेल उगा राहे काळा ॥२॥
परि या दुर्लभ विठोबाचे पाय ।
तेथे हे उपाय न सरती ॥ध्रु.॥
भूत भविष्य कळो येईल वर्तमान ।
करवती प्रसन्न रिद्धिसिद्धी ॥३॥
परि या दुर्लभ विठोबाचे पाय ।
तेथे हे उपाय न सरती ॥ध्रु.॥
स्छाने माने कळो येती योगमुद्रा।
नेववेल वारा ब्रह्मांडासी ॥४॥
परि या दुर्लभ विठोबाचे पाय ।
तेथे हे उपाय न सरती ॥ध्रु.॥
तुका म्हणे मोक्ष राहे अलीकडे ।
इतर बापुडे काय तेथे ॥५॥
परि या दुर्लभ विठोबाचे पाय ।
तेथे हे उपाय न सरती ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
करवती – बनवता येतील
न सरती – उपयोगी पडत नाहीत
स्छान – स्थान
अर्थ :
सिद्धीच्या सहाय्याने सुवर्ण पर्वत, कल्पतरु, अमृतसागर, भूत-भविष्याचे ज्ञान, ब्रह्मांडापर्यंत पोहोचणारा योगवायू इ. सर्व काही मिळवता येईल; पण पांडुरंगाच्या पायांच्या प्राप्तीसाठी हे उपाय अपुरे आहेत. ॥१–४॥
तुकोबा म्हणतात, पांडुरंगाच्या पायांपासून मोक्षही अगदी जवळ आहे, तर मग इतर गोष्टींची काय किंमत उरली? ॥५॥
वर्णन :
या अभंगात तुकाराम महाराज रिद्धी-सिद्धी, योगशक्ती, अमरत्व, ज्ञानप्राप्ती इत्यादी साधनांचा ईश्वरप्राप्तीसाठी उपयोग नाही, हे स्पष्ट करतात.
माणसाला आयुष्यात सर्वसामान्यतः हवे असते: धन, दीर्घायुष्य, अलौकिक शक्ती, भूत-भविष्याचे ज्ञान, कामधेनू, कल्पतरू, अमृत, स्वर्गीय सुखे — पण या सर्व गोष्टींच्या पारही एक अद्वितीय गोष्ट आहे — ती म्हणजे ईश्वराची कृपा आणि त्याचे चरण.
हेच चरण तुकोबांना ‘दुर्लभ’ वाटतात, कारण ते केवळ बाह्य योगसाधनेने नाही तर *नामस्मरण*, *भक्ती*, आणि *निःस्वार्थ प्रेमाने*च मिळतात.
त्यामुळेच ते सांगतात — "हे सर्व उपाय विठोबाचे पाय मिळवण्यासाठी अपुरे आहेत."
संत एकनाथ महाराजांच्याही भागवताच्या पंधराव्या अध्यायात हेच तत्त्वज्ञान आहे की, सिद्धींच्या पाठिशी लागलो तर ईश्वर दुरावतो.
म्हणूनच संत मार्ग हा सुलभ, सरळ आणि प्रेममय असतो. भक्तीनेच मोक्ष मिळतो, बाकी सर्व ‘बापुडे’ उपाय व्यर्थ!
०२७ सोलीव जे सुख अतिसुखाहुनी
सोलीव जे सुख अतिसुखाहुनी ।
उभे हैं। अंगणीं वैष्णवांच्या ॥१॥
वृंदावन सडे चौक रंग माळा ।
नाचे तो सोहोळा देखोनिया ॥२॥
भूषणमंडित सदा सर्वकाळ ।
मुद्रा आणि माळ तुळसी कंठी ॥३॥
नामओघ मुखी अमृताचे सार ।
मस्तक पवित्र सहित रजे ॥४॥
तुका म्हणे मोक्ष भक्ताचिया मना ।
नये हा वासना त्याची करी ॥५॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
सोलीव – अस्सल, मूळ, गाभ्याचे
अंगणीं – अंगणात
सडे – सडा (शुभ प्रसंगी घालणारा शुद्ध गंध)
चौक – रांगोळीने सजवलेला भाग
माळा – हार
मुद्रा – वैष्णवचिन्ह
ओघ – सततचा प्रवाह
रज – धूळ (पादरज)
अर्थ :
जे अस्सल आणि अत्युच्च सुख आहे ते वैष्णवांच्या अंगणात सहज उभं आहे. ॥१॥
तिथे तुळशीवृंदावन आहे, रंगीबेरंगी चौक भरले आहेत, आणि त्या पवित्र जागेचा सोहोळा पाहून देव आनंदाने नाचतो. ॥२॥
त्या भक्ताचे सर्वकाळ भूषण म्हणजे वैष्णव मुद्रा व गळ्यात तुळशीमाळा असते. ॥३॥
त्याच्या मुखात सतत नामाचा ओघ असतो, आणि त्याचे मस्तक भक्तपायांच्या धुळीने पवित्र झालेलं असतं. ॥४॥
तुका म्हणतात, अशा भक्ताच्या मनात मोक्षाची इच्छाही नसते, उलट मोक्षच त्याला प्राप्त होण्याची वाट पाहतो. ॥५॥
वर्णन :
या अभंगात संत तुकाराम महाराज *वैष्णव जीवनशैलीतील अस्सल आनंद* आणि *नामस्मरणाची महती* स्पष्ट करतात.
साधा भक्त जो आपल्या अंगणात तुळशीवृंदावन, रांगोळी, व्रतवैकल्य, आणि हरिनामात रमलेला असतो — त्याच्या अंगणातच खरे ‘सोलीव’ म्हणजेच **मूलभूत, शाश्वत सुख** वसते.
भोग, योग, मोक्षसाधन, सिद्धी यांपेक्षा वैष्णवाचे साधे जीवन अधिक श्रेष्ठ आहे, कारण त्या घरात देव स्वतःच नाचतो!
अशा भक्ताच्या गळ्यात तुळशीची माळ, भाळी वैष्णव मुद्रा, मुखात सतत नाम आणि मनात अहंकारशून्यता — या गोष्टी म्हणजेच मुक्तीच्या पुढची अवस्था आहे.
*तुका म्हणे मोक्ष भक्ताचिया मना नये* — ही ओळ अत्यंत महत्त्वाची आहे. भक्ताला मोक्षाचीही इच्छा नसते, कारण तो स्वतःच आनंदस्वरूप झाला असतो. उलट मोक्षच त्याच्या वाटेकडे पाहत असतो.
ही संतांची उंची तत्त्वदृष्टी *गीतेच्या* या विधानाशी मिळती-जुळती आहे:
"ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति।" — भगवद्गीता १८.५४
तुकोबांची ही भूमिका म्हणजे भक्तीयोगाची अंतिम अवस्था — परमसंतोष आणि देहभानशून्यता!
०२८ आनंदे एकांती प्रेमे वोसंडत
आनंदे एकांती प्रेमे वोसंडत ।
घेऊ अगणित प्रेमसुख ॥१॥
गोप्य धन नये वारा लागो यास ।
पाहो नेदू वास दुर्जनासी ॥ध्रु.॥
झणी दृष्टि लागे आवडीच्या रसा ।
सेवू जिरे तैसा आपणासी ॥२॥
तुका म्हणे हे बहु सकुमार ।
न साहावे भार वचनाचा ॥३॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
गोप्य – गुप्त, रहस्यपूर्ण
नये – नको
वारा लागो – बाधा होऊ नये
वास – दृष्टी, उपस्थिती
दुर्जन – वाईट मनोवृत्तीचा माणूस
झणी – नको, मुळीच नको
सकुमार – कोवळं, अत्यंत नाजूक
अर्थ :
मी एकांतात आनंदाने, प्रेमाने ओसंडून वाहणारे श्रीहरीचे अगणित प्रेमसुख अनुभवतो. ॥१॥
हे प्रेम म्हणजे गुप्त धन आहे – त्याला कसलीही बाधा होऊ नये, दुष्टांचे लक्षही त्यावर पडू नये, अशी माझी काळजी आहे. ॥ध्रु.॥
म्हणून मी हे आवडते प्रेमसुख जणू औषधासारखं सावधपणे घेतो – ज्यामुळे कुणाचं वाईट लक्ष यावर पडणार नाही. ॥२॥
तुकोबा म्हणतात, हे सुख इतकं कोमल आहे की त्यावर कुणाच्याही शब्दांचाही भार सहन होत नाही. ॥३॥
वर्णन :
संत तुकाराम महाराज यांनी या अभंगात अत्यंत सूक्ष्म भक्तिसंवेदना मांडल्या आहेत. ते हरिप्रेमाला *गुप्त धन* म्हणतात – कारण ते सर्वांसमोर उघडपणे मांडण्यासारखं नसतं. ते *एकांतात*च फुलतं आणि *प्रेमसुख* ही केवळ अंतर्मुख साधकाचीच अनुभूती असते.
हे प्रेम गुप्त आहे, अगदी वाऱ्यालाही त्याचा स्पर्श होऊ नये इतकं कोमल. दुष्टांच्या (किंवा अश्रद्धावानांच्या) नजरेपासून ते दूर ठेवण्याची जबाबदारी भक्त स्वतः घेतो. म्हणून तो एकांतातच हे प्रेमसुख घेतो.
तुकोबांनी शेवटी म्हटलं – *"हे बहु सकुमार, न साहावे भार वचनाचा"* – म्हणजे शब्दांचाही भार या प्रेमाला सहन होत नाही. इतकी ती भावना नाजूक आणि अंतःप्रेरणात्मक आहे.
या अभंगातून तुकारामांचा भावविश्वाशी असलेला सूक्ष्म संबंध आणि संतांचे अंतर्मुख जीवन किती खोलवर आहे, हे स्पष्ट होते. ही भक्ती आत्मानुभवातून आलेली आहे – वाचकाने ती समजून घेण्यासाठी स्वतःही अंतर्मुख व्हावं लागतं.
अशा प्रकारची भक्ती *सांगून* देता येत नाही, तिला *फक्त अनुभवता* येतं. म्हणून तुकाराम महाराजांनी तिचा अगदी मौनाने, जपून स्वीकार केलेला आहे.
०२९ मोक्षपदे तुच्छ केली या कारणे
मोक्षपदे तुच्छ केली या कारणे ।
आम्हा जन्म घेणे युगायुगी ॥१॥
विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस ।
पुढती पुढती आस सेवावे हे ॥ध्रु.॥
देवा हाती रूप धरविला आकार ।
नेदू निराकार होऊ त्यासी ॥२॥
विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस ।
पुढती पुढती आस सेवावे हे ॥ध्रु.॥
तुका म्हणे चित्त निवांत राहिले।
ध्याई ती पाउले विटेवरी ॥३॥
विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस ।
पुढती पुढती आस सेवावे हे ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
आस - आशा।
नेदू - देणार नाही.
अर्थः
मोक्षपदाची प्राप्ती आम्ही तुच्छ मानली आहे या श्रीहरीच्या भक्ती पुढे, आम्हांस त्या मोक्षाची पर्वा नाही. आम्ही या सुखासाठी पुनःपुनः जन्म घ्यायचा आहे. ॥१॥
या भक्तिरसाचे सुख कधीही न विटणारे असे आहे पुनः पुनः त्याचे सेवन करावे अशी आशा सारखी वाढत असते.॥ध्रु.॥
या देवाने आपल्याच हातांनी आपले सगुण साकार रूप निर्माण केले आहे आता पुनः त्याला निराकार होऊ देणार नाही.॥२॥
तुकोबा म्हणतात, त्या श्रीहरीची विटेवरची पावले वंदून माझे चित्त आता निवान्त झाले आहे.॥३॥
विवरणः
आपण मागे अनेकदा पाहिले आहे की, तुकोबांसारख्या साधुसंतांनी ईश्वराच्या संगतीसाठी, भक्तीसाठी, मोक्षासारखे सर्वोच्च ध्येयही कमी प्रतीचे मानले आहे. खरे म्हणजे माणसाच्या जन्मास आल्याचे सार्थक कोणते? तर मुक्ती किंवा मोक्ष मिळविणे, येथील यातनांतून मुक्त होणे, ईश्वराच्या स्वरूपात जाऊन विरणे. पुनः म्हणून जन्मास न येणे इत्यादी इच्छा पूर्ण करून घेण्यासाठीच सर्वांचा अट्टाहास असतो. या मुक्तीच्या वा मोक्षाच्या प्राप्तीसाठी नाना प्रकारची खडतर तपे व साधने लोक करतात परंतु त्यांच्या ध्यानात मोक्षाचे अथवा मुक्तीचे खरे रहस्य आलेले नसते. एका विशिष्ट अवस्थेवर गेल्यानंतर भक्तांना मुक्तीचे काहीच महत्त्व वाटेनासे होते.
आपण भक्त व देव, हा आपला जिवलग सखा, पिता, माता, बंधू, त्याच्यावर रागवावे, रुसावे, त्याचा धावा करावा, त्याचे रूप चित्तात भरून घ्यावे, मुखाने त्याच्या गुणांचे संकीर्तन करावे, कानांनी त्याची कीर्ती ऐकावी, संतसंगतीत त्याच्या भजनाचा लाभ घ्यावा, यांतील सौख्य कधीही कमी न होणारे आहे. तो भेटला नाही तरीही त्याच्या आठवणीत व विरहातही एक प्रकारचे सुख असते कारण तेथे अखंड अनुसंधान असते, चिंतन असते, जिव्हाळ्याची ओढ असते. हे सुख मुक्त झाल्यावर कोठून येणार? कोण कुणाचे ध्यान करणार? कोण कुणावर रुसणार? कोण कुणापुढे हट्ट धरणार?
ईश्वर व त्याचा भक्त हे एकच, असे नाते ज्ञानाच्या दृष्टीने ठीक असले तरी, भक्तीसाठी दुजेपण एकत्वावर आधारलेले अत्यावश्यक आहे. मोक्षाची, मुक्तीची कल्पना गौण अथवा कमी महत्त्वाची ठरते, याचे आणखी एक कारण असे की, मुक्त कशासाठी व्हायचे, बंधन तरी आहे कुठे? मुक्तीची इच्छाच नाही कारण बंधनाचीही कल्पना मनात नसते. बद्धता व मुक्तता या दोनही कल्पना वास्तविकपणे खऱ्या नाहीत. आपण ब्रह्मरूप आहोत, आनंदरूप आहोत; याची जाणीव विसरली की बद्धतेची कल्पना होते. अर्थात ही जाणीव महत्त्वाची आहे.
सुखाचे विषय बाह्य जगतात शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले की बद्धता वाटू लागते. आशा, संकोच, ब्रह्माहून जीव वेगळा मानणे, आत्मत्वाची आठवण न राहणे, मीपणा वाढणे व आत्मस्वरूपाचे ज्ञान नसणे, अशा विविध कारणांनी बद्धतेची कल्पना वाढते आणि मग या नसलेल्या अथवा खोट्या बंधनातून मुक्त होण्याची खटपट सुरू होते. केवळ बद्धत्वाची कल्पना असल्यामुळे मोक्षाच्या कल्पनेस स्थान मिळते. परंतु एकदा बंधनची नाही ठावे अशी भूमिका पत्करली की मग मुक्तीची कल्पना लटकी ठरते.
मोक्ष अथवा मुक्तीची अवस्था दूर कोठे तरी नसून आपल्या अंतःकरणातच आहे, हे जाणायला हवे. मोक्षासाठी उगाच व्यर्थ भ्रमंती न करता, स्वतःच्या अंतःकरणातील भगवंतास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.
श्रीशंकराचार्याचा एक श्लोक आहे:
'गभीरे कासारे विशति
विजने घोर विपिने ।
विशाले शैले च भ्रमति
कुसुमार्थ जडमतिः।
समर्थंक चेतः
सरसिजमुमानथ भवते ।
सुखेनैव प्राप्तुंजन इह
न जानाति किमहो।'
उमानाथा, शंकरा, जड बुद्धीचे पुरुष सुखाने तुझी प्राप्ती करून घेण्यास समर्थ असे आपले चित्तकमल तुला वाहण्याचे सोडून उगाच खोल तळ्यात, निर्जन अशा भयंकर अरण्यात अथवा मोठ्या पर्वतांवर तुझ्या पूजेसाठी फुले वेचण्यासाठी भ्रमण करतात. आपल्या जवळचे चित्तपुष्प भगवंतास अर्पण केल्याने त्याची प्राप्ती होते हे त्यांना कसे समजत नाही! या भक्तीच्या, नामसंकीर्तनाच्या संतसमागमातील सुखाच्या भूमिकेवरून साधुसंतांनी मुक्तीला गौणत्वाचे स्थान दिले.
या भक्तिसुखासाठी वारंवार जन्म घ्यावा लागला तरी त्यांना कधी वाईट वाटत नाही. आम्हां जन्म घेणे युगायुगी असे तुकोबांनी याच अभंगात म्हटले आहे.
गर्भवासा भीती ते आंधळे जन ।
मुक्तिसी कारण आम्हा नाही।
वारंवार जन्म घेऊ ।
परी पाहे पंढरपूर।
अशा शब्दांत एकनाथांनी पुनः पुनः जन्म घेण्याचे स्वागत केले आहे. गर्भवास झालिया संतसेवा घडती असे म्हणून त्यांनी गर्भवासाचे महत्त्व वर्णन केले आहे. ही संतसेवा अथवा भगवद्भक्ती मुक्त झाल्यावर कशी घडणार?
मुक्त झालिया न कळे भगवद्भक्ती अशी त्यांच्या भाषेत अवस्था असल्यामुळे भक्ताने मुक्तीची इच्छा मनात न ठेवणे हेचे युक्त होय असे सांगून एकनाथांनी म्हटले आहे.
आम्ही सुखें गर्भवास घेऊ देखा ।
मुक्तीचिया मस्तका पाय देऊ॥
या भूमिकेवरून साधुसंत मुक्तिपदास तुच्छ लेखतात
वैकुंठ, कैलास, अमरपद तिन्ही ।
तुच्छवत् मनी मानिताती ॥
कारण त्यांच्या घरीच सायुज्यता आपण होऊन येत असते. अशी स्थिती असूनही जे कुणी मुक्ती मागतील, त्यांना साधुसंत निर्भयपणे विचारतात, सांडोनि भजनाचा प्रेमा ।
मुक्ति मागसी अधमा ।
सांडोनिया संतसंग काय
मुक्ति ते अभंग?
कुणी फुकट मुक्तिपद दिले तरी ते घेऊ नये असे संतांना वाटते. तुकोबांनी संतसंगापुढे मुक्तीची पर्वा नाही.
तुका म्हणे मज नलगे सायुज्यता ।
राहेन या संतसमागमे॥
असे त्यांनी म्हटले आहे.
सांडूनि सुखाचा वाटा ।
मुक्ति मागे तो करंटा॥
असे त्यांनी म्हटले आहे. जन्मास का भ्यावे ? प्रभुप्रेमाचा दूधभात जन्मास येऊन घ्यावा.
का रे न घ्यावा जन्म ।
प्रेम लुटावे नाम ।
येथे मिळतो दहीभात ।
नाही वैकुंठी ते मात॥
अशी ग्वाही तुकोबांनी दिलेली आहे एका अभंगांत तर त्यांनी देवास विनविले आहे
मोक्ष तुमचा देवा ।
तुम्ही दुर्लभ तो ठेवा ।
मज भक्तीची आवडी ।
नाहीं अंतरी ते गोडी॥
पांडुरंगा मला कृपा करून मुक्त करू नका, अशी विनवणी तुकाराम महाराज ईश्वरास अनेकदा करताना दिसतात, तुकोबांची मग इच्छा तरी काय आहे? त्यांच्याच शब्दांत पाहा,
जन्मांतरें मज ऐसीं देई देवा ।
जेणे चरणसेवा घडे तुझी ।
तुका म्हणे आम्ही मृत्यूलोकी भले।
तुझेची अंकिले पांडुरंगा ॥
साधुसंतांची संगत आणि ईश्वराचे दृष्टी भरून प्रेमसुख यांसारखी श्रेष्ठ गोष्ट त्यांना कुठलीच वाटत नाही. या सुखासाठी ते पुनः पुनः जन्म घेण्यासाठी उत्सुक असतात,
नलगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता ।
सुख वाटे घेता जन्म ऐसे॥
असे त्यांनी म्हटले आहे.
या पंढरपूरपुढे, त्या वैकुंठनगरीची किंवा मोक्षाची काय किंमत? कारण
मोक्षसिद्धि तेथे हिंडे दारोदारी ।
होउनि कामारी दीनरूप॥
अशा प्रकारे पंढरपूरात विठ्ठलाच्या संगतीत मोक्षाची अथवा मुक्तीची पर्वा कुणालाच वाटत नाही.
०३० घेईन मी जन्म याजसाटी देवा
घेईन मी जन्म याजसाटी देवा ।
तुझी चरणसेवा साधावया ॥१॥
हरिनामकीर्तन संतांचे पूजन ।
घालू लोटांगण महाद्वारी ॥२॥
आनंदे निर्भर असो भलते ठायी ।
सुखदुःखे नाही चाड आम्हा ॥३॥
आणीक सायास न करी न धरी आस ।
होईन उदास सर्व भावे ॥४॥
मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी ।
होय सांगो तैसी तुका म्हणे ॥५॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
निर्भर - परिपूर्ण
चाड - इच्छा, पर्वा
सायास - प्रयत्न
कामारी - काम करणारा
अर्थः
देवा, तुझी चरणसेवा साधावी याचसाठी मी पुनः पुनः जन्म घेईन.॥१॥
हरिनामाचे कीर्तन व साधुसंतांचे पूजन करून मी तुमच्या महाद्वारी भक्तिभावाने लोटांगण घालीन.॥२॥
मी कुठेही असलो तरी आनंदाने परिपूर्ण राहीन. आम्हांला लौकिक सुखाची कसलीच पर्वा नाही.॥३॥
मी आता दुसऱ्या कुठल्याही प्रयत्नांत राहाणार नाही की दुसरी कसली आशाही धारण करणार नाही सर्व भावांनी मी उदास होऊन राहीन.॥४॥
तुकोबा म्हणतात, मोक्ष आमच्या घरी आम्ही सांगू ती कामे करणाया दासदासीप्रमाणे उत्सुक असतो.॥५॥
०३१ कोरडिया गोष्टी नावडती मना
कोरडिया गोष्टी नावडती मना ।
नाही ब्रह्मज्ञानावीण चाड ॥१॥
दाखवी आपुले सगुण रूपडे ।
वंदीन मी कोडे पाय तुझे ॥ध्रु.॥
ने लगे तो मोक्ष मज सायुज्यता ।
नावडे हे वार्ता शून्याकारी ॥२॥
दाखवी आपुले सगुण रूपडे ।
वंदीन मी कोडे पाय तुझे ॥ध्रु.॥
तुका म्हणे चाड धरीन श्रीमुखे ।
येशील कवतुके जवळीक ॥३॥
दाखवी आपुले सगुण रूपडे ।
वंदीन मी कोडे पाय तुझे ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
चाड - इच्छा, जरूरी
कोडे - कौतुकाने
अर्थः
देवा, माझ्या मनास कोरड्या गोष्टी आवडत नाहीत मला त्या ब्रह्मज्ञानाचीही तशी इच्छा नाही.॥१॥
तू एकदा आपले सगुण रूप दाखीव म्हणजे मी कौतुकाने तुझ्या पायांना वंदन करीन.॥ध्रु.॥
मला तुझा मोक्ष नको की सायुज्यतेची मुक्ती नको शून्यकारी अशी निर्गुण निराकारी वार्ता मला आवडत नाही.॥२॥
तुकोबा म्हणतात, तुझ्या मुखाची मात्र मी मनात इच्छा धरीन मग तू कौतुकाने माझ्याजवळ येशील.॥३॥
०३२ तुझे पाय माझे भाळ
तुझे पाय माझे भाळ ।
एकत्रता सर्वकाळ ॥१॥
हेची देई विठाबाई ।
पांडुरंगे माझे आई ॥ध्रु.॥
नाही मोक्ष मुक्ति चाड ।
तुझी सेवा लागे गोड ॥२॥
हेची देई विठाबाई ।
पांडुरंगे माझे आई ॥ध्रु.॥
सदा संग सज्जनांचा ।
नको वियोग पंढरीचा ॥३॥
हेची देई विठाबाई ।
पांडुरंगे माझे आई ॥ध्रु.॥
नित्य चंद्रभागे स्नान ।
करी क्षेत्रप्रदक्षण ॥४॥
हेची देई विठाबाई ।
पांडुरंगे माझे आई ॥ध्रु.॥
पुंडलीक पाहोन दृष्टी ।
हर्षे नाचो वाळवंटी ॥५॥
हेची देई विठाबाई ।
पांडुरंगे माझे आई ॥ध्रु.॥
तुका म्हणे पांडुरंगा ।
तुझे स्वरूप चंद्रभागा ॥६॥
हेची देई विठाबाई ।
पांडुरंगे माझे आई ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
भाळ - कपाळ
चाड - इच्छा
अर्थः
देवा, तुझे पाय व त्यावरील माझे कपाळ, अशी एकत्रता सर्वकाळ असावी.॥१॥
विठाबाई, पांडुरंगे, माझे आई, हेच एक देणे मला तू दे.॥ध्रु.॥
मला मोक्षाची अथवा मुक्तीची इच्छा नाही. तुझी सेवाच मला फार गोड वाटते.॥२॥
सतत सज्जनांची सोबत तू मला दे या पंढरीचा वियोग होऊ देऊ नकोस. नित्य, चंद्रभागेचे स्नान घडुन मी त्या क्षेत्राची प्रदक्षणा करावी.॥४॥
मी पुंडलीकाला डोळे भरून पाहीन व हर्षाने त्या वाळवंटात नाचेन.॥५॥
तुकोबा म्हणतात, पांडुरंगा, या चंद्रभागेचेही रूप तुझेच आहे.॥६॥
०३३ देवा ऐके हे विनंती
देवा ऐके हे विनंती ।
मज नको रे हे मुक्ति ।
तया इच्छा गति ।
हेची सुख आगळे ॥१॥
या वैष्णवांचे घरी ।
प्रेमसुख इच्छा करी।
रिद्धिसिद्धी द्वारी ।
कर जोडूनि उभ्या ॥ध्रु.॥
नको वैकुंठीचा वास ।
असे तया सुखा नास ।
अद्भुत हा रस ।
कथाकाळी नामाचा ॥२॥
या वैष्णवांचे घरी ।
प्रेमसुख इच्छा करी।
रिद्धिसिद्धी द्वारी ।
कर जोडूनि उभ्या ॥ध्रु.॥
तुझ्या नामाचा महिमा ।
तुज न कळे रे मेघश्यामा।
तुका म्हणे आम्हा ।
जन्म गोड यासाठी ॥३॥
या वैष्णवांचे घरी ।
प्रेमसुख इच्छा करी।
रिद्धिसिद्धी द्वारी ।
कर जोडूनि उभ्या ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
रिद्धीसिद् - धीसंपत्ती आणि परिपूर्णता दर्शविणाऱ्या गणपतीच्या दोन दासी.
कर - हात.
वास - निवास.
अर्थः
देवा, माझी एक विनंती ऐक, मला मुक्ती मुळीच देऊ नकोस अशा प्रकारच्या सद्गतीची मला मुळीच इच्छा नाही. भक्तिप्रेमाचे सुख खरोखरच अलौकिक आहे.॥१॥
या विष्णुदासांच्या घरी प्रेमसुख भोगण्याची इच्छा मला आहे. या ठिकाणी संपत्ती व ऐश्वर्य दर्शविणाऱ्या ऋद्धी व सिद्धी या गणपतीच्या दोन दासी हात जोडून नम्रतेने असतात.॥ध्रु.॥
मला वैकुंठवास नको, कारण त्या सुखाच्या प्राप्तीला शेवट आहे. परंतु कीर्तन सुखाचा अद्भुत रस, मात्र अवीट आहे. नामस्मरणाची गोडी मोठी आहे.॥२॥
देवा, तुमच्या नामाचा महिमा तुम्हास सुद्धा नीट समजत नाही. तुकोबा म्हणतात, यासाठी जन्म घेणे गोड वाटते.॥३॥
०३४ न पूजी आणिका देवा न करी त्यांची सेवा
न पूजी आणिका देवा न करी त्यांची सेवा ।
न मनी या केशवाविण दुजे ॥१॥
काय उणे जाले मज तयापायी ।
ते मी मागो काई कवणासी ॥ध्रु.॥
आणिकांची कीर्ती नाइके न बोले ।
चाड या विठ्ठलेवीण नाही ॥२॥
ते मी मागो काई कवणासी ॥ध्रु.॥
काय उणे जाले मज तयापायी ।
न पाहे लोचनी श्रीमुखावाचुनी ।
पंढरी सांडुनी न वजे कोठे ॥३॥
काय उणे जाले मज तयापायी ।
ते मी मागो काई कवणासी ॥ध्रु.॥
न करी काही आस मुक्तीचे सायास ।
न भे संसारास येता जाता ॥४॥
काय उणे जाले मज तयापायी ।
ते मी मागो काई कवणासी ॥ध्रु.॥
तुका म्हणे काही व्हावे ऐसे जीवा ।
नाही या केशवाविण दुजे ॥५॥
काय उणे जाले मज तयापायी ।
ते मी मागो काई कवणासी ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
आणिका - इतर.
मनी - मनामध्ये.
उणे - कमी.
चाड - इच्छा.
न वजे - जाणार नाही.
आस - इच्छा.
सायास - प्रयत्न.
न भे - भीत नाही.
दुजे - दुसरे.
अर्थः
मी दुसऱ्या कुठल्या देवाची पूजा करणार नाही, की त्याची सेवाही करणार नाही. या एका केशवावाचून मी कुणालाच मानणार नाही, अथवा याच्याशिवाय माझ्या मनात दुसरे कुणी नाही.॥१॥
या देवाच्या ठिकाणी मला काय कमी आहे? मग मी इतरांपाशी काय म्हणून मागावे?॥ध्रु.॥
मी याच्याशिवाय इतरांची कीर्ती ऐकणार नाही, तोंडाने गाणार नाही. एका विठ्ठलाशिवाय मला दुसरी कसलीच इच्छा नाही.॥२॥
मी याच्या मुखाखेरीज इतरत्र पाहाणार नाही, आणि पंढरपूर सोडून कुठे जाणार नाही.॥३॥
मी कधी मुक्तीची इच्छा वा ती मिळावी म्हणून काही प्रयत्नही करणार नाही. जन्ममरणाच्या खेपांची भीतीही मला नाही.॥४॥
तुकोबा म्हणतात, या केशवावाचून दुसरे काही या जीवास प्राप्त व्हावे असे वाटत नाही.॥५॥
विवरण :
या अभंगात भक्ताची अनन्यता किती तीव्रतेची असते, याचे वर्णन करण्यात आले आहे. एकदा जे उपास्यदैवत ठरले, ज्यावर जीव जडून राहिला, ज्याच्या पायी प्रीती मुरून राहिली, त्याच्याशिवाय इतरत्र वेगवेगळ्या निमित्तांनी जाणे या भक्तास मानवत नाही. भक्तीत ही अनन्यता महत्त्वाची आहे. गीतेत भगवंतानी स्पष्टपणे सांगितले आहे की, जो भक्त नेहमी माझे स्मरण अनन्यभावाने करतो त्यास माझी प्राप्ती सुलभ रीतीने होते.
अनन्यचेता: सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥
जे लोक अनन्यनिष्ठ राहून माझे चिंतन करतात त्यांचा योगक्षेम मी चालवितो।
एव्हढी ग्वाही परमेश्वर आपल्या अनन्यभक्तांना देत असल्याने भागवत संप्रदायातील साधुसंतांनी या एकनिष्ठतेची, अनन्यत्वाची महती पुनःपुनः वर्णन केली आहे. ईश्वराच्या अखंड अनुसंधानाला ही अनन्यभक्ती आवश्यक खरीच, पण तुकोबांनी आणखी एका हेतूने श्रीविठ्ठल या दैवताचा वारंवार एकनिष्ठेने पुरस्कार केला असावा. महाराष्ट्राच्या पडत्या काळात देवधर्म व परमार्थविचार यांची मोठीच पडझड होऊन क्षुद्र देवांचे व देवतांचे माहात्म्य माजले होते. हिंसाचारास, वेडगळ कल्पनांना नवसांना, इष्टकामनार्थ सिद्धींना, अघोरी मार्गाना ऊत आला होता. या सर्व फुटिर वृत्तींना व अधोगामी प्रवृत्तींना बांध घालून वात्सल्य, करुणा, एकनिष्ठा, इत्यादी भावांवर पुष्ट झालेली भक्ती संतांना वाढवावयाची होती.
०३५ गाऊ वाणू तुज तुझा करू अनुवाद
गाऊ वाणू तुज तुझा करू अनुवाद ।
जिकडे देखो तिकडे सर्वमय गोविंद ॥१॥
आनंद रे विठोबा जाला माझे मनी ।
देखिले लोचनी विटेसहित पाउले ॥ध्रु.॥
न करी काही तप रे मुक्तीचे सायास ।
हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस ॥२॥
आनंद रे विठोबा जाला माझे मनी ।
देखिले लोचनी विटेसहित पाउले ॥ध्रु.॥
तुका ह्मणे आम्हा प्रेमा उणे ते काई ।
पंढरीचा राणा साटविला हृदयी ॥३॥
आनंद रे विठोबा जाला माझे मनी ।
देखिले लोचनी विटेसहित पाउले ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
लोचनी - डोळ्यांनी
सायास - प्रयत्न
उणे - कमी
अर्थः
देवा, आम्ही आता तुझेच गुण गाऊ, त्यात तल्लीन होऊन नाचू. तुझ्याच गुणांचा अनुवाद करू, जिकडे पाहावे तिकडे मला सर्वत्र गोविंदच दिसत आहे.॥१॥
विठ्ठला, माझ्या मनात आता आनंदी आनंद भरून राहिला आहे. कारण मी माझ्या डोळ्यांनी तुझी विटेवरील पावले पाहिली आहेत.॥ध्रु.॥
मी आता यापुढे जपतपादी साधने किंवा मुक्तीचे प्रयत्न करणार नाही. त्यांची गरजच मला काही उरलेली नाही. जन्मोजन्मी भक्तीचा हा गोड रसच मी सेवन करीन.॥२॥
तुकोबा म्हणतात, आम्हांला आता प्रेमात काय कमी आहे? कारण आता आम्ही हा पंढरीचा राणा आमच्या हृदयात साठविलेला आहे.॥३॥
०३६ आम्हा अळंकार मुद्रांचे शृंगार
आम्हा अळंकार मुद्रांचे शृंगार।
तुळसीचे हार वाहों कंठीं ॥१॥
लाडिके डिंगर पंढरी रायाचे ।
निरंतर वाचे नामघोष ॥ध्रु.॥
आम्हा आणिकांची चाडची नाही ।
सर्व सुख पायी विठोबाच्या ॥२॥
लाडिके डिंगर पंढरी रायाचे ।
निरंतर वाचे नामघोष ॥ध्रु.॥
तुका म्हणे आम्ही नेघो या मुक्ती ।
एकावीण चित्ती नाही दुजे ॥३॥
लाडिके डिंगर पंढरी रायाचे ।
निरंतर वाचे नामघोष ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४).
शब्दार्थ :
डिंगर – सेवक
चाड – किंमत, महत्त्व
नेघो – घेणार नाहीत
अर्थः
अंगावर नाना प्रकारच्या मुद्रा लावणे व तुळशीचे हार गळ्यात घालणे हेच आमचे अलंकार व हाच आमचा शृंगार होय.॥१॥
आम्ही या पंढरी रायाचे लाडके सेवक आहोत; आमच्या वाणीत एकसारखा त्याचाच घोष असतो.॥ध्रु.॥
याच्यापुढे आम्हाला इतरांची काहीच किंमत नसते. या विठोबाच्या चरणांवरच आम्हाला सर्व सुखे दिसतात.॥२॥
तुकोबा म्हणतात, या श्रीहरीच्या शिवाय आमच्या मनात दुसरे काहीच नसल्यामुळे आम्हास मुक्तीची सुद्धा पर्वा नाही; तिची आम्ही कधीच इच्छा करीत नाही.॥३॥
०३७ मुनी मुक्त जाले भेणे गर्भवासा
मुनी मुक्त जाले भेणे गर्भवासा ।
आम्हा विष्णुदासा सुलभ तो ॥१॥
अवघाची संसार केला ब्रह्मरूप ।
विठ्ठलस्वरूप म्हणोनिया ॥ध्रु.॥
पुराणी उपदेश साधन उद्भट ।
आम्हा सोपी वाट वैकुंठीची ॥२॥
अवघाची संसार केला ब्रह्मरूप ।
विठ्ठलस्वरूप म्हणोनिया ॥ध्रु.॥
तुका म्हणे जना सकळांसहित ।
घेऊ अखंडित प्रेमसुख ॥३॥
अवघाची संसार केला ब्रह्मरूप ।
विठ्ठलस्वरूप म्हणोनिया ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४).
शब्दार्थ :
भेणे – भीतीने
उद्भट – कठीण
अर्थः
थोर ऋषिमुनी गर्भवासाच्या भीतीने मुक्तीच्या मार्गास लागले; परंतु हा गर्भवास आम्हा विष्णुदासांना मात्र अतिशय सुलभ वाटतो आहे.॥१॥
आम्ही सर्व संसारच ब्रह्मरूप मानल्यामुळे, आम्हांस संसाराचे अथवा जन्ममृत्यूचे भय राहिलेले नाही. आमचे सर्व विठ्ठलरूप झाले आहे.॥ध्रु.॥
पुराणांमध्ये ब्रह्मलोक वा वैकुंठप्राप्तीसाठी कठीण साधने सांगितली आहेत, पण भक्तांसाठी ही वाट फार सोपी झाली आहे.॥२॥
तुकोबा म्हणतात, आम्ही सर्व लोक एकत्र येऊन अखंड प्रेमसुखाचा अनुभव घेऊ.॥३॥
०३८ चित्त घेऊनिया तू काय देसी
चित्त घेऊनिया तू काय देसी ।
असे मजपासी सांग आधी ॥१॥
तरीच पंढरी राया करीन साटोवाटी ।
नेघे जया तुटी येईल ते ॥ध्रु.॥
रिद्धी सिद्धी काही दाविसी अभिलाष ।
नाही मज आस मुक्तीची ही ॥२॥
तरीच पंढरी राया करीन साटोवाटी ।
नेघे जया तुटी येईल ते ॥ध्रु.॥
तुका म्हणे तुझे माझे घडते ये ।
भक्ती भावे रे देणे घेणे ॥३॥
तरीच पंढरी राया करीन साटोवाटी ।
नेघे जया तुटी येईल ते ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४).
शब्दार्थ :
साटोवाटी – देवघेव
अभिलाष – लालसा, आशा
अर्थः
देवा, तू माझे चित्त घेणार असशील तर त्याबदल्यात तू मला काय देणार आहेस, हे आधी मला सांग.॥१॥
हे पंढरीनाथा, मी तुझ्याशी व्यवहार करीन, पण ज्यात मला तोटा होईल, अशी देवघेव मी करणार नाही.॥ध्रु.॥
तू मला रिद्धी-सिद्धी किंवा काही भौतिक आशा दाखवलीस, तर मला त्यात रस नाही. मुक्तीचीही मला इच्छा नाही.॥२॥
तुकोबा म्हणतात, तुझा आणि माझा व्यवहार असा असावा की, मी तुला माझे चित्त देईन आणि तू मला भक्तिभावाने भरलेले प्रेमसुख दे.॥३॥
०३९ तेथे सुखाची वसती
तेथे सुखाची वसती ।
गाती वैष्णव नाचती ।
दिंड्या पताका झळकती।
गर्जती हरिनामे ॥१॥
दोषा जाली घेघेमारी।
पळती भरले दिशा चारी ।
न येती माघारी ।
नाही उरी परताया ॥ध्रु.॥
विसरोनी देवपणा।
उभा पंढरीचा राणा ।
विटोनी निर्गुणा ।
रूप धरिले गोजिरे ॥२॥
दोषा जाली घेघेमारी।
पळती भरले दिशा चारी ।
न येती माघारी ।
नाही उरी परताया ॥ध्रु.॥
पोट सेविता न धाये।
भूक भुकेलीच राहे ।
तुका म्हणे पाहे ।
कोण आस मुक्तीची ॥३॥
दोषा जाली घेघेमारी।
पळती भरले दिशा चारी ।
न येती माघारी ।
नाही उरी परताया ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४).
शब्दार्थ :
घेघेमारी – मारामारी, दाणादाण
धाये – तृप्त होत
अर्थः
ज्या ठिकाणी वैष्णव भक्त हरिप्रेमाने गातात, नाचतात, दिंड्या आणि पताका झळकतात आणि हरिनामाचा घोष चाललेला असतो, तेथे खरे सुख वसलेले असते.॥१॥
त्या ठिकाणी सर्व दोषांचा पराभव होतो. ते त्रस्त होऊन चारही दिशांना पळतात. ते परत येत नाहीत, कारण परत येण्यासाठी काही उरतच नाही.॥ध्रु.॥
स्वतःचा निर्गुण देवपणा विसरून, हा पंढरीचा राणा सगुण रूपात उभा राहिलेला आहे. त्याला निर्गुण राहण्यात रस नाही म्हणून त्याने सुंदर साजिरं रूप घेतलं आहे.॥२॥
तुकोबा म्हणतात, वैष्णवांनी जरी पंढरीच्या राणाची सेवा कितीही केली तरी समाधान होत नाही, कारण या भक्तिरसाची भूक कधी भागत नाही. मग अशा भक्तीच्या सुखापुढे मुक्तीची इच्छा कुणाला राहील?॥३॥
०४० सिद्धीचा दास नव्हे
सिद्धीचा दास नव्हे श्रुतीचा अंकिला ।
होईन विठ्ठला सर्व तुझा ॥१॥
सर्वकाळ सुख आमच्या मानसी ।
राहिले जयासी नास नाही ॥ध्रु.॥
नेणे पुण्य पाप न पाहे लोचनी ।
आणिका वाचुनी पांडुरंगा ॥२॥
सर्वकाळ सुख आमच्या मानसी ।
राहिले जयासी नास नाही ॥ध्रु.॥
न करी आस मुक्तीचे सायास ।
भक्तिप्रेमरस सांडूनिया ॥३॥
सर्वकाळ सुख आमच्या मानसी ।
राहिले जयासी नास नाही ॥ध्रु.॥
गर्भवासी धाक नाही येता जाता ।
हृदयी राहता नाम तुझे ॥४॥
सर्वकाळ सुख आमच्या मानसी ।
राहिले जयासी नास नाही ॥ध्रु.॥
तुका म्हणे जालो तुझाची अंकिला ।
न भे मी विठ्ठला कळिकाळासी ॥५॥
सर्वकाळ सुख आमच्या मानसी ।
राहिले जयासी नास नाही ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४).
शब्दार्थ :
सिद्धीचा – अष्टमहासिद्धी (अणिमा, महिमा, इत्यादी)
अंकिला – स्वाधीन
आस – इच्छा
भे – भीती
अर्थः
मी सिद्धींचा (अष्टसिद्धी) दास नाही, आणि श्रुतींच्याही अधीन नाही. मी संपूर्णपणे केवळ विठ्ठलाचा आहे.॥१॥
माझ्या मनात जे सुख आहे, ते कायमचे राहिले आहे आणि त्याचा कधीच नाश होणार नाही.॥ध्रु.॥
मला पापपुण्याचे भान राहिलेले नाही. डोळे पांडुरंगाखेरीज दुसरे कुणालाही पाहात नाहीत.॥२॥
मुक्तीसाठी कोणताही प्रयत्न करणार नाही. भक्तिप्रेमरसच माझे सर्वस्व आहे.॥३॥
तुझे नाम हृदयात असताना, मला गर्भवासाचाही काही भीती वाटत नाही.॥४॥
तुकोबा म्हणतात, मी तुझाच स्वाधीन झालो आहे. आता मला कळिकाळाचेही भय नाही.॥५॥
विवरण :
या अभंगात तुकाराम महाराजांनी भक्तीचा सर्वोच्च महिमा वर्णिला आहे. भक्तीच्या मार्गात सिद्धी, मुक्ती यांचा आकर्षण नाही; उलट त्या अडथळा ठरतात. संतांचे लक्ष्य केवळ भगवंताशी अखंड प्रेमबंध साधणे हेच असते. सिद्धी प्राप्त झाल्यानंतर लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात, पण त्यामुळे आत्मविचार कमी होतो. म्हणूनच सिद्धी, मोक्ष यांना दूर ठेवत संत श्रीविठ्ठलाच्या भक्तीमध्ये रस घेतात.
एकनाथ महाराज, नाथसंप्रदाय व इतर संतांनीही हाच दृष्टिकोन ठेवला. त्यांच्यानुसार सिद्धी हे एक प्रकारचे चित्ताचे विक्षेप असून, खऱ्या साधकाने त्यांच्याकडे दुर्लक्षच करावे. जो निरपेक्ष आहे, त्यालाच सिद्धी स्वतःहून सेवा करण्यास तयार असतात.
यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात की "मी केवळ तुझाच आहे, मला ना सिद्धीची आस, ना मुक्तीची इच्छा — तुझ्या नामात, तुझ्या भक्तीतच माझे अखंड सुख सामावले आहे."
०४१ काय सांगो तुझ्या चरणांच्या सुखा
काय सांगो तुझ्या चरणांच्या सुखा।
अनुभव ठाउका नाही तुज ॥१॥
बोलता हे कैसे वाटे खरेपण ।
अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु.॥
आम्ही एकएका ग्वाही मायपुते ।
जाणो ते निरुते सुख दोघे ॥२॥
बोलता हे कैसे वाटे खरेपण ।
अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु.॥
तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कांटाळा ।
का तुम्ही गोपाळा नेणा ऐसे ॥३॥
बोलता हे कैसे वाटे खरेपण ।
अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४).
शब्दार्थ :
ग्वाही – साक्ष
मायपुते – मायलेकरांस
निरुते – खरे
अर्थः
देवा, तुमच्या चरणांच्या सुखासंबंधी काय सांगावे आम्ही? तो सुखाचा अनुभव तुम्हांस येणे शक्य नाही.॥१॥
तुमच्या चरणसुखाचे वर्णन तुम्हांस खरेही वाटणार नाही — अमृताचे गुण अमृतास कसे समजणार?॥ध्रु.॥
तुझ्या चरणामृताचे सुख किती अवर्णनीय आहे, याची साक्ष केवळ आमची आई श्रीलक्ष्मी किंवा रखुमाई व आम्ही तिची लेकरे यांनाच देता येण्यासारखी आहे. ते सुख आम्ही दोघेच जाणू शकतो.॥२॥
तुकोबा म्हणतात, देवा, आम्हांला तुमच्या त्या मोक्षाचा फार कंटाळा आहे आणि हे तुम्ही जाणीत का नाही?॥३॥
०४२ मोक्ष तुमचा देवा
मोक्ष तुमचा देवा ।
तुम्ही दुर्लभ तो ठेवा ॥१॥
मज भक्तीची आवडी ।
नाही अंतरी ते गोडी ॥ध्रु.॥
आपल्या प्रकारा ।
करा जतन दातारा ॥२॥
मज भक्तीची आवडी ।
नाही अंतरी ते गोडी ॥ध्रु.॥
तुका म्हणे भेटी ।
पुरे एकची शेवटी ॥३॥
मज भक्तीची आवडी ।
नाही अंतरी ते गोडी ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४).
शब्दार्थ :
आवडी – प्रेम
अर्थः
देवा, तुमचा जो मोक्षाचा दुर्लभ ठेवा असेल, तो तुमचा तुम्हांस ठेवा. मला त्याची इच्छा नाही.॥१॥
मला केवळ भक्तीचीच आवड आहे, आणि अंतःकरणात त्या मोक्षसुखाविषयी कोणतीही गोडी नाही.॥ध्रु.॥
देवा, तुझ्या जवळ असलेले मोक्ष, सिद्धी, मुक्ती असे जे काही प्रकार असतील, त्यांचे रक्षण तुम्ही स्वतः करा — मला त्यांची गरज नाही.॥२॥
तुकाराम महाराज म्हणतात, शेवटी फक्त तुझ्या भेटीचीच एक इच्छा आहे. ती एकदा पूर्ण झाली की सर्व काही पूर्ण झाले.॥३॥
०४३ नामपाठ मुक्ताफळांच्या ओवणी
नामपाठ मुक्ताफळांच्या ओवणी ।
हे सुख सगुणी अभिनव ॥१॥
तरी आम्ही जालो उदास निर्गुणा ।
भक्तांचिया मना मोक्ष नये ॥ध्रु.॥
द्यावे घ्यावे ऐसा येथे उरे भाव ।
काय ठाया ठाव पुसोनिया ॥२॥
तरी आम्ही जालो उदास निर्गुणा ।
भक्तांचिया मना मोक्ष नये ॥ध्रु.॥
तुका म्हणे आता अभयदान करा ।
म्हणा विश्वंभरा दिले ऐसे ॥३॥
तरी आम्ही जालो उदास निर्गुणा ।
भक्तांचिया मना मोक्ष नये ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४).
शब्दार्थ :
ओवणी – ओवलेली माळ
अर्थः
हरिनामाचे पाठ म्हणजे जणू मोत्यांची ओवलेली माळ आहे, आणि या नामस्मरणाचे सुख सगुण भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ व अभिनव आहे.॥१॥
म्हणूनच आम्ही निर्गुण विचारसरणीबद्दल उदासीन झालो आहोत, कारण भक्ताच्या मनात मोक्षाची इच्छा असतच नाही. भक्ताला फक्त नामभक्तीची तृप्ती असते.॥ध्रु.॥
या सगुण स्वरूपात प्रेमाचे "द्यावे-घ्यावे" असे भाव असतात. मग अशा ठिकाणी काय शोधायचे, काय विचारायचे, याचा काही अर्थ राहत नाही.॥२॥
तुकाराम महाराज म्हणतात – आता तरी देवा, अभयदान द्या. 'मी तुला अभय दिले आहे' असे एकदा तरी म्हणा, विश्वनिर्मात्या!॥३॥
०४४ मी तो बहु सुखी आनंदभरिता
मी तो बहु सुखी आनंदभरिता ।
आहे साधुसंता मेळी सदा ॥१॥
काही व्हावे ऐसे नाही माझ्या जीवा ।
आणिक केशवा तुजवीण ॥२॥
न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता ।
सुख वाटे घेता जन्म ऐसे ॥३॥
मृत्युलोकी कोण धरिल वासना ।
पावावया जनासवे दुःख ॥४॥
तुका म्हणे तुझा दास ऐसे लोका ।
काही सकळिका कळो यावे ॥५॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४).
शब्दार्थ :
सायुज्यता – ईश्वराशी तादात्म्य साधणारी चौथी मुक्ती; मोक्षाची एक अवस्था
अर्थः
साधुसंतांच्या संगतीत राहिल्यामुळे मी अत्यंत सुखी आणि आनंदाने भरलेलो आहे.॥१॥
केशवा, तुझ्याशिवाय माझ्या मनाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची इच्छा नाही.॥२॥
मला वैकुंठ नको, मोक्ष नको, आणि सायुज्यतेसारखी तादात्म्याची अवस्था देखील नको. मला तर तुझ्या भक्तीसाठी पुन्हा पुन्हा जन्म घेण्यातच खरे सुख वाटते.॥३॥
कारण अन्यथा मृत्युलोकात पुन्हा जन्म घेऊन इतर लोकांसोबत दुःख भोगण्याची इच्छा कोण ठेवेल?॥४॥
तुकाराम महाराज म्हणतात – मी तुझा दास आहे, हे सर्व लोकांना ठाऊक व्हावे, असे माझे मनापासून वाटते.॥५॥
०४५ वरुथिनी एकादशी : चैत्र वद्य ११, शके १९४५
मोक्षाचे आम्हासी नाही अवघड ।
तो असे उघड गांठोळीस ॥१॥
भक्तीचे सोहळे होतील जीवासी ।
नवल तेविशी पुरविता ॥ध्रु.॥
ज्याचे त्यासी देणे कोण ते उचित ।
मानूनिया हित घेतो सुखे ॥२॥
भक्तीचे सोहळे होतील जीवासी ।
नवल तेविशी पुरविता ॥ध्रु.॥
तुका म्हणे सुखे देई संवसार ।
आवडीसी थार करी माझे ॥३॥
भक्तीचे सोहळे होतील जीवासी ।
नवल तेविशी पुरविता ॥ध्रु.॥
निरूपण :
विष्णु नरसिंह जोग (१८६७–१९२०)
अर्थः
मोक्षप्राप्ती ही आमच्यासाठी अवघड नाही. जणू काही जवळ ठेवलेल्या गांठोड्यातील वस्तू जसजशा सहज उपलब्ध असतात, तसाच मोक्षही आमच्यासाठी उघड आणि सहजप्राप्य आहे.॥१॥
देवा, तुझ्या कृपेने भक्तीचे सोहळे जीवाला अनुभवता येतात — आणि हे आश्चर्य म्हणजे तूच ते सुख पुरवतोस, हीच खरी नवलाची गोष्ट आहे.॥ध्रु.॥
ज्याचे त्यास मिळणे हे योग्यच असते. मोक्ष हा आमच्याच स्वरूपात आहे, तरीही तू तो देतोस — हे आम्ही हित मानून सुखाने स्वीकारतो.॥२॥
तुकाराम महाराज म्हणतात — संसारातसुद्धा तू सुखाने जन्म दे, पण माझ्या आवडीनुसार माझ्या प्रीतीला तुझ्या चरणांचेच ठिकाण मिळू दे.॥३॥
०४६ नको विद्या वयसा आयुष्य फारसे
नको विद्या वयसा आयुष्य फारसे ।
नाही मज पिसे मुक्तीचे ही ॥१॥
रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण ।
हेची कृपादान मागतसे ॥२॥
नको धन मान न वाढो संतान ।
मुखी नारायण प्राण जावा ॥३॥
तुका म्हणे दीन काकुलती येतो ।
तुज निरवितो पांडुरंगा ॥४॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४).
शब्दार्थ :
पिसे – वेड
निरवितो – ताब्यात देतो
अर्थः
देवा, मला फार मोठी विद्या नको, फारच वाढलेले वय किंवा आयुष्य नको, आणि मुक्तीचे वेडही नाही.॥१॥
माझ्या मुखी "रामकृष्ण" हे नाम असताना, त्या नामस्मरणातच माझा प्राण जावा — हेच एक कृपादान मी तुझ्याकडे मागतो आहे.॥२॥
मला धन नको, मानमरातब नको, संततीही वाढू नये, पण मुखात तुझे "नारायण" नाम असताना प्राण सोडावा — हीच माझी इच्छा आहे.॥३॥
तुकाराम महाराज म्हणतात – हे पांडुरंगा, मी अगदी दीन होऊन तुझ्यापाशी काकुळतीस आलो आहे आणि माझे सर्वस्व तुझ्या स्वाधीन करतो आहे.॥४॥
०४७ सांडुनि सुखाचा वाटा
सांडुनि सुखाचा वाटा ।
मुक्ती मागे तो करंटा ॥१॥
का रे न घ्यावा जन्म।
प्रेम लुटावे नाम ॥ध्रु.॥
येथे मिळतो दही भात ।
वैकुंठी ते नाही मात ॥२॥
का रे न घ्यावा जन्म।
प्रेम लुटावे नाम ॥ध्रु.॥
तुका म्हणे आता ।
मज न लगे सायुज्यता ॥३॥
का रे न घ्यावा जन्म।
प्रेम लुटावे नाम ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
मात-गोष्ट, हकीगत.
सायुज्यता-एक प्रकारची मुक्ती.
अर्थः
श्रीहरीच्या प्रेमसुखाचा वाटा सोडून जो कुणी मुक्तीची इच्छा धरतो तो करंटाच होय.॥१॥
मुक्ती मिळवून काय होणार? त्यापेक्षा वारंवार जन्म घेणेच चांगले नाही का? जन्म घ्यावा आणि हरिनामाचे प्रेम लुटीत राहावे.॥ध्रु.॥
येथे श्रीहरीच्या प्रेमाचा, काल्याचा दहीभात मिळत असतो ही गोष्ट वैकुंठात मिळणार नाही॥२॥
तुकोबा म्हणतात, मला आता सायुज्यता नावाची मुक्ती नको वाटते.॥३॥
विवरणः
थोर साधुसंतांना मुक्तीची किंवा मोक्षाची पर्वा नसते. हा विषय मागे अनेकदा स्पष्ट केलेला आहे. मानवीजीविताचे एकमेव सार्थक म्हणजे मोक्षप्राप्ती सांगितली जाते. जेथून आपण आलो त्या मूलस्थानी म्हणजे परब्रह्मस्वरूपाशी येथील सर्व संबंधांतून मुक्त होऊन मिळणे म्हणजे मुक्ती अथवा मोक्ष. सर्व जीवांची यासाठी धडपड असते. या साठी सारा अट्टहास असतो मुक्तीचे चार प्रकार सांगितले आहेत सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. पैकी सायुज्यता ही शेवटची मुक्ती श्रेष्ठ प्रकारची मानली जाते. या प्रकारात ईश्वर व जीव यांचे संपूर्ण ऐक्य होऊन जाते अशी कल्पना आहे परंतु ब्रह्माशी अथवा परमेश्वराशीच संपूर्ण तादात्म्य अथवा ऐक्य साधुसंतांना मान्य नाही. सगुण प्रेमभक्तीत रंगलेले थोर अनुभवी संत सायुज्यता मुक्तीत समाधान मानीत नाहीत. ईश्वराला डोळे भरून पाहाणे, त्याच्या श्रीमुखाच्या दर्शनाने तृप्त होणे, साधुसंतांच्या संगतीत वावरणे, हरिनामाच्या गजरात तल्लीन होणे. श्रीहरीचे दर्शन होत नाहीसे पाहून त्याच्यावर रागावणे, रुसणे, थोडासा पण खोटा प्रेमकलह करणे, त्याच्या रूपाचे, गुणांचे चिंतन करणे. यातील अलौकिक आनंद सोडून जो मुक्तीची इच्छा धरील तो करंटाच मानावा असे तुकोबांना या ठिकाणी म्हणावयाचे आहे. श्रीहरीच्या प्रेमाचा भोग मुक्तीच्या अवस्थेत कुठून असणार? बहुतेक मुमुक्षु लोक जन्ममरणांच्या फेऱ्यांतून सुटण्याच्या प्रयत्नात असतात. पण साधुसंत म्हणतात, गर्भवासातही सुख आहे. प्रभूच्या प्रेमाचा अनुभव यालाही मानवी जन्मात संसारात असूनही घेता येतो, ही मुक्ती लाजवील असे येथील नामप्रेमाचे माहात्म्य आहे. प्रभूच्या बरोबर क्रीडाविलास केल्यानंतर काल्याच्या प्रसंगी जो दहीभात मिळतो त्याची गोडी प्रत्यक्ष वैकुंठातही कुठून येणार? या जन्मानंतर मोक्ष मिळविण्याची कल्पना संतांना मान्य नाही. मुक्तीलाही लाजविणारे जे काही सौख्य मिळवायचे असेल, ते याच जन्मी मिळवून घ्यावे मोक्ष मेल्यापाठी आम्हांसी होईल। ऐसे जे म्हणतील अति मूर्ख असे ज्ञानदेवांनी म्हणून स्पष्ट केले आहे की,
जववरी देह आहे तववरी साधना ।
करूनियां ज्ञान सिद्ध करा॥
या साधनासाठी तर हा मानवी देह आहे या जन्मी विठ्ठलाचे प्रेम संपादावे, संतसंग करावा, प्रभुनामात तल्लीन व्हावे, हीच खरी मुक्ती.
सांडुनि पंढरीची वारी । मोक्ष मागती ते भिकारी॥
असे नामदेवांनी म्हटले आहे. श्रीहरीचे पाय जेणे करून अंतरतील ती मुक्ती नामदेवांना नको आहे. त्यांच्या मनाची विश्रांती वेगळीच आहे.
झणी मुक्तिपत्र देसी पांडुरंगा । मग या संतसंगा पाहू कोठे॥
अशी धास्ती नामदेवरायांची आहे. हे मुक्तिपद दीनवाणे होऊन पंढरपूरच्या वाळवंटात हिंडत असते, असे त्यांचे म्हणणे आहे. श्रीहरीच्या भक्तांच्या संगतीचाच लोभ त्याला आहे. प्रभुप्रेम, संतसहवास या मानवी जन्मातच मिळत असल्याने त्याचे एवढे भय वाटण्याचे काय कारण?
गर्भवास भीती ते आंधळे जन । मुक्तीसी कारण नाहीं आम्हां॥
असा एकनाथ महाराजांचा अभिप्राय आहे त्यांनीच पुढे म्हटले आहे.
गर्भवास झालिया संतसेवा घडती । मुक्त झालिया न कळे भगवद्भक्ती ।
आम्ही सुखें गर्भवास घेऊ देखा । मुक्तीचिया मस्तकां पाय देऊ ॥
येथील भक्तिसुखासाठी पुनः पुनः जन्म घ्यावा लागला तर बिघडले कोठे?
वारंवार जन्म घेऊ । परी पाहू पंढरपुर॥
असे त्यांनीच म्हटले आहे. श्रीहरीचे प्रेम सोडून उगाच मुक्तीच्या मागे का लागावे? असे तुकोबांनाही वाटते त्यांनी एकदा स्पष्टपणे म्हटले आहे की,
मोक्षपदे तुच्छ केली या कारणें । आम्हा जन्म घेणे युगायुगी॥
आम्हा विष्णुदासांना मुक्तीची पर्वा बिलकुल नाही असे ते म्हणतात. म्हणून ते श्रीहरीस विनंती करतात:
देवा ऐक हे विनंती । मज नको हे मुक्ती ॥
मग तुकोबांना काय हवे ते सांगतात:
या वैष्णवांचे घरी । प्रेमसुख इच्छा करी ।
नको वैकुंठीचा वास । असे तया सुखा नास ।
अद्भुत हा रस । कथाकाळी नामाचा॥
या सुखासाठी जे संत उत्सुक आहेत त्यांना मुक्तीची अथवा वैकुंठपदाची मुळीच इच्छा नसते.
मी तो बहू सुखी आनंद भरिता । आहे साधुसंता मेळी सदा॥
अशी त्यांची भूमिका आहे.
जंववरी नाहीं देखिली पंढरी । तंववरी थोरी वैकुंठीची॥
असे तुकोबांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
नाही चाड मोक्षपदी भजनी आवड।
हे संतांच्या जीविताचे सार तुकोबांनी सांगितले आहे.
०४८ न लगे चंदना सांगावा परिमळ
न लगे चंदना सांगावा परिमळ ।
वनस्पती मेळ हाकारुनी ॥१॥
अंतरीचे धांवे स्वभावे बाहेरी।
धरिता ही परी आवरे ना ॥ध्रु.॥
सूर्य नाही जागे करीत या जना।
प्रकाश किरण कर म्हूण ॥२॥
अंतरीचे धांवे स्वभावे बाहेरी।
धरिता ही परी आवरे ना ॥ध्रु.॥
तुका म्हणे मेघ नाचवी मयूरे।
लपविता खरे येत नाही ॥३॥
अंतरीचे धांवे स्वभावे बाहेरी।
धरिता ही परी आवरे ना ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४).
शब्दार्थ :
परिमळ – सुवास
अंतरीचे – मनातील
म्हूण – म्हणून
मयूरे – मोर
अर्थ :
रानावनातील इतर झाडाझुडपांना आपल्या अंगच्या सुवासाबद्दल चंदनास सांगावे लागत नाही. तो आपोआपच प्रकट होत असतो.॥१॥
जे अंतरंगात म्हणजे मनात आहे ते स्वभावतःच बाहेर धावत असते, व्यक्त होत असते. त्याला आवरून धरले तरी ते आवरत नाही.॥ध्रु.॥
आपले प्रकाशकिरण तेजस्वी आहेत असे म्हणून लोकांना सूर्य स्वतः होऊन काही सांगायला जात नाही.॥२॥
तुकोबा म्हणतात, मेघ दिसताच मयूर आपोआप नाचू लागतात, त्यांनाही सांगावे लागत नाही. जे खरे आहे ते लपविता येत नाही.॥३॥
०४९ आठवो नेदी आवडी आणिक
आठवो नेदी आवडी आणिक ।
भरूनिया लोक तिन्ही राहे ॥१॥
मन धांवे तेथे तिचेची दुभते ।
संपूर्ण आइते सर्वकाळ ॥ध्रु.॥
न लगे वळावी इंद्रियें धांवता ।
ठाव नाही रिता उरो दिला ॥२॥
मन धांवे तेथे तिचेची दुभते ।
संपूर्ण आइते सर्वकाळ ॥ध्रु.॥
तुका म्हणे समपाउलाचा खुंट।
केला बळकट हालो नेदी ॥३॥
मन धांवे तेथे तिचेची दुभते ।
संपूर्ण आइते सर्वकाळ ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
ठाव – स्थान
रिता – मोकळा
अर्थ :
एकदा या श्रीहरीची आवड मनात निर्माण झाली की, मग दुसया कशाचीही आठवण होत नाही त्याचेच प्रेम तिन्ही लोकांत भरून राहिलेले असते.॥१॥
ज्या ज्या ठिकाणी माझे मन धावते, त्या त्या ठिकाणी त्याच्याच दुभते आयते व पूर्णपणे चाखायला मिळते.॥ध्रु.॥
त्याचे स्वरूप सर्वत्र इतके पसरलेले दिसते की, त्याने कुठे थोडीही जागा रिकामी ठेवलेली नाही त्यामुळे मला धावणारी इंद्रिये ताब्यात ठेवावी लागत नाहीत.॥२॥
तुकोबा म्हणतात, समचरणांचा असा हा देव पुनः हालणार नाही अशा रीतीने येथे बळकटपणे उभा केला आहे.॥३॥
०५० खुंटोनिया दोरी आपणियांपाशी
खुंटोनिया दोरी आपणियांपाशी ।
वावडी आकाशी मोकलिली ॥१॥
आपुलिया आहे मालासी जतन ।
गाहाणाचे ઋण बुडो नेणे ॥ध्रु.॥
बीज नेले तेथे येईल अंकुर ।
जतन ते सार करा याची ॥२॥
आपुलिया आहे मालासी जतन ।
गाहाणाचे ઋण बुडो नेणे ॥ध्रु.॥
तुका म्हणे माझी निश्चितीची सेवा ।
वेगळे नाही देवा उरो दिले ॥३॥
आपुलिया आहे मालासी जतन ।
गाहाणाचे ઋण बुडो नेणे ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
खुंटोनिया – पकडून
वावडी – पतंग
मोकलिली – मोकळी सोडली
जतन – संरक्षण
अर्थ :
कागदाचा लहान पतंग आकाशात मोकळेपणाने सोडून देऊन त्याची दोरी मात्र आपल्या हातात पकडून ठेविल्यावर तो आपल्याच ताब्यात राहातो.॥१॥
एखादी वस्तू गहाण ठेवून कर्ज दिल्यास कर्ज बुडण्याची भीती नसते कारण त्या वस्तूच्या रूपाने संरक्षण लाभलेले असते.॥ध्रु.॥
जमिनीत बीज नाहीसे झाल्यासारखे वाटले तरी त्याला एकदा अंकुर फुटला व त्यास खतपाणी घातले की त्याचे सार धान्याच्या रूपाने आपल्या पदरात पडते.॥२॥
तुकोबा म्हणतात याप्रमाणे देवा तुमची सेवा करणे हेच माझ्या निश्चिंतीचे कारण आहे याखेरीज काही वेगळी इच्छा मी उरू दिलेली नाही.॥३॥
०५१ निर्वाहा पुरते अन्न आच्छादन
निर्वाहा पुरते अन्न आच्छादन ।
आश्रमासी स्थान कोपी गुहा ॥१॥
कोठे ही चित्ता न व्हावे बंधन ।
हृदयी नारायण साठवावा ॥ध्रु.॥
नये बोलो फार बैसो जनामधीं ।
सावधान बुद्धी इंद्रिये दमी ॥२॥
कोठे ही चित्ता न व्हावे बंधन ।
हृदयी नारायण साठवावा ॥ध्रु.॥
तुका म्हणे घडी घडीने साधावी।
त्रिगुणांची गोवी उगवुनी ॥३॥
कोठे ही चित्ता न व्हावे बंधन ।
हृदयी नारायण साठवावा ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
दमी – दमन करावीत दडपून टाकावीत।
त्रिगुणांची – सत्त्व, रज, तम या तीन गुणांची।
गोवी – गुंतागुंत।
उगवुनी – सोडवून।
अर्थ :
उदरनिर्वाह होईल एवढे अन्न व शरीररक्षण होईल एवढे आच्छादन आपणांस असावे, गुहेत अगर खोपटात निवास करावा.॥१॥
कुठल्याही विषयासंबंधी आपल्या चित्तास मोह नसावा आपल्या हृदयात नेहमी नारायण साठवावा.॥ध्रु.॥
लोकांत फार बोलू नये, त्यांच्यांत फार बसू नये, बुद्धी सावधान ठेवून इंद्रियांचे दमन करावे.॥२॥
तुकोबा म्हणतात, सत्त्व, रज, तम या त्रिगुणांच्या गुंतागुंतीची सोडवणूक करून, एकएक क्षण ईश्वरचरणी अर्पण करून साधावा.॥३॥
विवरण:
या एका साध्या, सरळ व अर्थपूर्ण अभंगात मानवी जीवितातील अत्युच्च सुखाची कल्पना दिलेली आहे. आत्मिक समाधान हे सर्वात मोठे समाधान, हे सुख कशाने मिळेल? या प्रश्नाचा विचार सारे विचारवंत व तत्त्ववेत्ते आज करीत आहेत. भौतिक सृष्टीची वा सुखसोयींची वाढ पुष्कळ झाली की त्या प्रमाणात सुखवृद्धी वाढेल काय? जमीनजुमला, इमारती, खाण्यापिण्याची रेलचेल, दागदागिने, उंची कपडे यांच्या वाढीबरोबर मनाचे समाधान वाढते काय? भौतिक गरजा वाढवून त्यांच्या शमनाने मानवी मन सुखी झाले आहे काय? या प्रश्नांची उत्तरे शोधताना अनुभव मात्र निराळाच येत राहातो. गरजांच्या वाढीने चिंतांचे विषय वाढतात आणि मानवी मन अधिकाधिकच व्यग्र बनते सत्ता, स्पर्धा यांच्या वावटळीत ते नसत्या फंदांत गुरफटते. केवळ पैशाच्या, केवळ धनसंपादनाच्या, केवळ गरजा वाढवून आपण श्रीमंत असल्याची ऐट दाखविण्याच्या नादी ते लागते. ते अधिकच अस्वस्थ बनते त्याला नित्य नवे आजार मग होतात घरच्या संपत्तीच्या दिमाखात नव्या पिढीस काम करावेसे वाटत नाही खानदानीपणाची, ऐश्वर्याची ऐट उगाचच वाढत राहते. नातवाच्या नातवास पुरेल एवढी संपत्ती व संपत्तीच्या लोभापोटी चोरी, हिंसा, असत्य, दंभ, काम, क्रोध, गर्व, मद, भेद, वैर, अविश्वास, मद्यपान इत्यादी दोषांची निपज होते. बापलेकांत, भावाभावांत भांडणे होतात. तेव्हा अशा या धनलोभापासून दूर व्हावे, जरूरी पुरतेच त्याच्याकडे लक्ष द्यावे, निर्वाहा पुरतेच त्याचे संपादन करावे, त्याचा लोभ वाटूच नये या विचारास महत्त्व येते मानसिक व्यग्रता वाढविणाया गरजा वाढवू नयेत, मनास अनेक ठिकाणी गुंतवून ठेवू नये, अशी विचारसरणीतून अपरिग्रहाची कल्पना बलवान झालेली दिसते. कोणत्याही वस्तूचा जरूरी पेक्षा अधिक संग्रह न करणे, उपाधी लावून न घेणे, निर्धनता, अकिंचनत्व जाणूनबुजून पत्करणे इत्यादी तत्त्वांचा विकास होत राहिला. पंचमहायज्ञाची कल्पना निर्माण झाली. धन मिळवून त्याचा चांगला विनियोग करणे फार कठीण काम, म्हणून गरजा अगदीच कमी करून उपाधी रहित मन करून, ईश्वरचिंतनास मोकळे राहाणे, साधुसंतांना युक्त वाटले म्हणूनच अपरिग्रहतेला महत्त्वाचे स्थान साधुसंतांच्या चरित्रात मिळाले आहे. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन एवढे असले की मग इतर वस्तूंची त्यांना जरूरीच वाटत नाही.
साधकाची दशा उदास असावी ।
उपाधि नसावी अंतर्बाही॥
अशी त्यांची शिकवण आहे. प्रसंग पडला तर
झाडे वोरपोनि खाउनियां पाला।
आठवी विठ्ठला वेळोवेळा॥
अशी त्यांच्या मनाची वृत्ती होती.
नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य।
तो एक उद्वेग होय जीवा॥
असे तुकोबांनी कळवळून म्हटले आहे कारण
तुका म्हणे करी फकिराचे परी ।
रात्रंदिवस हरि येईल वाचे॥
फकिरी पत्करल्यानंतरच श्रीहरीची जवळीक वाढते असा त्यांचा अनुभव आहे. या फकिरी वृत्तीचे वर्णन व अपरिग्रही वृत्तीचे दर्शन या अभंगात आहे.
कोठेही चित्ता न व्हावे बंधन अशी अवस्था असेल तरच नारायणाला हृदयात साठविणे सुलभ होईल आणि अशी बंधनरहित अवस्था निर्वाहा पुरत्या अन्नवस्त्रापुरतीच इच्छा असेल तर निर्माण होईल. लोकांत फार बसू नये, बोलू नये, एकान्ताचे सेवन करावे हाही मोलाचा विचार या अभंगात आहे. अशा वृत्तीचा मनुष्यच नेहमी योगी माणसासारखा संतुष्ट राहतो.
वार्षियेवीण सागरु । जैसे जळें नित्य निर्भरु ।
तैसा निरुपचारु । संतोषी जो॥
असा ज्ञानदेवांनी या वृत्तीच्या माणसाचा संतोष निवेदन केला आहे.
जो यथालाभें न तोखे । अलाभें न पारुखे।
अशी त्याची वृत्ती बनते.
०५२ क्षेत्रींचे संन्यासी
आम्ही क्षेत्रींचे संन्यासी ।
देहभरित हृषीकेशी ।
नाही केली ऐशी।
आशा काम बोहरी ॥१॥
आले अयाचित अंगा।
सहज ते आम्हा भागा।
दाता पांडुरंगा ।
ऐसा करिता निश्चिंती ॥ध्रु.॥
दंड धरिला दंडायमान ।
मुळी मुंडिले मुंडण ।
बंदी बंद कौपीन ।
बहिरवास औठडे ॥२॥
आले अयाचित अंगा।
सहज ते आम्हा भागा।
दाता पांडुरंगा ।
ऐसा करिता निश्चिंती ॥ध्रु.॥
काळे साधियेला काळ ।
मन करूनि निश्चळ ।
लौकिकी विटाळ ।
धरुनी असो एकांत ॥३॥
आले अयाचित अंगा।
सहज ते आम्हा भागा।
दाता पांडुरंगा ।
ऐसा करिता निश्चिंती ॥ध्रु.॥
कार्यकारणाची चाली।
वाचा वाचत्वे नेमिली।
एका नेमे चाली।
स्वरूपीच राहाणे ॥४॥
आले अयाचित अंगा।
सहज ते आम्हा भागा।
दाता पांडुरंगा ।
ऐसा करिता निश्चिंती ॥ध्रु.॥
नव्हे वेषधारी ।
तुका आहाच वरवरी।
आहे तैसीं वरी ।
खडे निवडतो वेदांची ॥५॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
क्षेत्रीचे - देहरूपी क्षेत्रातील.
अयाचित - याचना न करता मिळेल तेवढ्यावर संतुष्ट राहाण्याची वृत्ती.
बंद - बंधत्रय.
औठडे - साडेतीन हातांचा देह.
आहाच - वरवर.
खंडे - विभाग.
अर्थ :
आम्ही देहरूपी क्षेत्रातील संन्यासी आहोत. आमच्या देहात श्रीहरी बोधरूपाने भरून राहिलेला आहे. आशा व कामना यांना आम्ही आमच्या मनातून बाहेर काढून टाकले आहे.॥१॥
या दात्या पांडुरंगाने कृपा केल्यामुळे आम्ही निश्चिंत झालो आहोत; आमच्या अंगी सहजच अयाचित वृत्ती आलेली आहे.॥ध्रु.॥
श्रीहरीच्या अनुसंधानाचा दंड आम्ही अखंड स्वरूपाचा धारण केलेला आहे. अज्ञानादी वृत्तींचे मळ आम्ही मुंडून टाकले आहेत. बंधत्रयाची लंगोटी नेसून, साडेतीन हाताच्या देहाच्या विचार बाहेर काढून टाकला आहे.॥२॥
आमचे मन निश्चळ झाले असल्याने, त्याने स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होण्याचा काळ साधला आहे. आम्हांस लौकिकाचा विटाळ असल्याने आम्ही एकान्तातच निवास करीत असतो.॥३॥
माझी वाणी ही वाच्यस्वरूपाच्या श्रीहरीशी एकरूप झाली आहे. तिची कार्यकारणस्वरूपाची चाल आता वरवरचीच राहिली आहे. आम्ही स्वरूपीच निवास केला असल्याने त्याच एका निश्चयाने आमची चाल होत आहे.॥४॥
तुकोबा म्हणतात, मी हा तुकाराम वरवरचा वेष धारण करणारा संन्यासी नाही. जे वेदांचे विभाग आहेत त्यांतीलच काही निवडून मी त्यांचे विवरण करीत असतो.॥५॥
विवरण :
संकल्पाचा त्याग म्हणजे संन्यास असे तुकोबांनी स्पष्ट केले आहे. या अभंगात तुकोबा स्वत:च्या संन्यस्त वृत्तीचे वर्णन मोठ्या अधिकारवाणीने करीत आहेत. एकदा संकल्पांचा, आशावासनांचा त्याग झाला म्हणजे अंगी सन्यस्त वृत्ती बाणते. परमहंसाचे सहज गुण अंगी उमटतात. तेथे याती धर्म कुळ नाही असे सांगण्यास तुकोबा विसरत नाहीत. तुकोबांची जात त्यांच्या संन्यस्तवृत्तीला आड येणार नाही. वेदांचा खरा अर्थ आम्हांसच माहीत असल्याचा यथार्थ अभिमान त्यांनी एके अभंगात प्रकट केला आहे.
विधिशास्त्राप्रमाणे तुकोबांनी संन्यास घेतलेला नव्हता, परंतु अंगी संन्यस्त वृत्ती पुरेपूर बाणली असल्यामुळे आपण क्षेत्रींचे संन्यासी कसे आहोत याचे रूपकाच्या आश्रयाने त्यांनी वर्णन केले आहे. तुकोबा देहू क्षेत्राचे राहाणारे म्हणून 'क्षेत्रींचे संन्यासी' खरेच; पण येथे क्षेत्र शब्दाचा आणखी एक महत्त्वाचा अर्थ अभिप्रेत आहे भगवद्गीतेतील तेराव्या अध्यायात पहिल्याच श्लोकात इंद शरीर कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते अर्जुना, या शरीरासच क्षेत्र असे म्हटले आहे, असे स्पष्ट केले आहे.
पंचमहाभूतांचे जे शरीर त्यासच क्षेत्र अशी पारिभाषिक संज्ञा आहे. पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृती, दहा सूक्ष्म इंद्रिये, एक मन, पाच इंद्रियांचे पाच विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात, चेतना व धैर्य अशा एकतीस तत्त्वांचा समुदाय म्हणजे क्षेत्र होय. या क्षेत्रीचे आपण संन्यासी आहोत असे तुकोबा म्हणतात. त्याचाही अर्थ समजावून घेण्यासारखा आहे.
हे क्षेत्र अथवा शरीर ज्या गुणधर्माचे व तत्त्वांचे बनले आहे त्यांत पंचविषय, अहंकार, द्वेष, इच्छा, सुखदुःखादी विकार, इत्यादींचा प्रभाव मोठा असतो. यांना अनुसरून संकल्प उभे राहतात या संकल्पांचा त्याग म्हणजे संन्यास असे तुकोबांनी म्हटले आहे.
आपल्या अंगातील कणाकणांतून व रोमरोमांतून प्रभुकृपा भरून राहिल्याने आणि आशा व कामना यांचे महत्त्वच नाहीसे झाले असल्याने आपण खऱ्या अर्थाने संन्यासी आहोत असे तुकोबा म्हणतात. तुकोबांच्या मनाची ही धारणा परंपरेस धरून आहे.
ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति। निर्द्वद्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते जो कशाचाही द्वेष करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही, तोच पुरुष नित्य संन्यासी समजावा जो सुखदुःखादी द्वंद्वांपासून मुक्त झाला तो आपोआपच इतर सर्व बंधनापासून मुक्त होतो तुकोबा या अर्थाने मुक्त झाले होते.
त्यांनी प्रत्यक्ष यतीधर्म स्वीकारला नसला तरी त्यांची वृत्ती खऱ्या अर्थाने संन्याशाची होती. वरवर ते प्रापंचिक असले, तरी ते वास्तविक दृष्टीने संन्यस्त वृत्तीचे होते. या संन्यस्त वृत्तीचे वर्णन श्रीज्ञानेश्वरांनी फारच समर्पक रीतीने केले आहे ते म्हणतात,
तरी गेलियाची से न करी ।
न पवतां चाड न धरी ।
जो सुनिश्चळु अंतरीं ।
मेरु जैसा ॥
आणि मी माझे ऐसी आठवण ।
विसरले जयाचें अंतःकरण ।
पार्था तो संन्यासी जाण ।
निरंतर ॥
जो मने ऐसा जाहला ।
संगीं तोचि सांडिला ।
म्हणोनि सुखें सुख पावला।
अखंडित ॥
आतां गुहादिक आघवें ।
तें कांहीं नलगे त्यजावें ।
जे घेते जाहले स्वभावें ।
निःसंगु म्हणऊनि ॥
देखें अग्नि विझोनि जाये।
मग ते राखोंडी केवळ होये ।
तै ते कापुसे गिवसू ये जियापरी ॥
तैसा असतेनि उपाधी ।
नाकळिजे तो कर्मबंधीं ।
जयाचिये बुद्धी ।
संकल्पु नाहीं ॥
म्हणोनि कल्पना जे सांडे।
तेचि गा संन्यास घडे ।
या कारणे दोनी सांगडे ।
संन्यासयोगु ॥
ज्ञानेश्वरांच्या या वर्णनाप्रमाणे तुकोबा क्षेत्रींचे संन्यासी खरोखरीच आहेत. देहभाव विसरला, कुणास काही मागण्याचे कारण उरले नाही, मी, माझे हे भाव नाहीसे झाले यापेक्षा संन्यास धर्म कोणता? तुकोबांनी या अभंगात आपण अयाचित, म्हणजे जे मिळेल त्यावर संतुष्ट कसे आहोत, आपल्या हातात दंड कोणता आहे, आपण संन्याशाप्रमाणे मुंडण कसे केले आहे, आपण कोपीन कोणती नेसली आहे; इत्यादी बाबींचे रूपकात्मक वर्णन फारच समर्पक रीतीने केलेले आहे.
अशा वृत्तीवर आल्यावर लौकिकाचा विटाळ धरून एकान्ताचे सेवन करणे अगत्याचे आहे असे त्यांनी येथे सांगितले आहे. जनसमुदायाचा वीट हे ज्ञानी माणसाचे एक लक्षणच गीतेने सांगितले आहे. एकान्तवासाशिवाय प्रभुचितनही नीट घडत नाही. म्हणूनच तुकोबा भामनाथ अथवा भंडारा डोंगरावर स्थिरावले. तेथील वृक्षवेलींच्या व वनचरांच्या सहवासात रममाण झाले.
पृथ्वीचे आसन, आकाशाचे पांघरूण, कंथाकमंडलूचा परिवार, हरिकथेच्या भोजनाचे विविध प्रकार आणि आपल्याच मनाशी आपला संवाद असा थाट या संन्यासी तुकोबांचा होता. येणें सुखे रुचे एकान्ताचा वास असा त्यांनी आपल्या एकान्तवासाचा हेतू स्पष्ट केला आहे.
०५३ कन्या सासुऱ्यासी जाये
कन्या सासुऱ्यासी जाये ।
मागे परतोनी पाहे ॥१॥
तैसे जाले माझ्या जीवा ।
केव्हा भेटसी केशवा ॥ध्रु.॥
चुकलिया माये ।
बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥
तैसे जाले माझ्या जीवा ।
केव्हा भेटसी केशवा ॥ध्रु.॥
जीवना वेगळी मासोळी ।
तैसा तुका तळमळी ॥३॥
तैसे जाले माझ्या जीवा ।
केव्हा भेटसी केशवा ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
जीवन-पाणी.
मासोळी-मासा.
अर्थ :
या एका सर्वप्रसिद्ध व गोड अभंगात आपण परमेश्वरासाठी कसे आतुर आहोत, कसे तळमळतो याचे फार सुबक व समर्थ असे वर्णन करताना तुकोबा म्हणतात, लग्न झाल्यावर लहान मुलगी सासरी निघताना तिला माहेर व माहेरची माणसे सोडताना जसे दुःख होते, ती पुनः पुनः मागे घराकडे वळून पाहते.॥१॥
त्याचप्रमाणे देवा, माझ्या जिवाची अवस्था झाली आहे. देवा, मला कधी भेट देशील?॥ध्रु.॥
आई चुकली किंवा दृष्टिआड झाली की लहान मूल चुकल्यासारखे होऊन टकमक पाहात असते ना?॥२॥
किंवा पाण्याबाहेर काढलेला मासा कसा तडफड तडफड करून तळमळतो; तशी माझ्या जिवाची अवस्था झाली आहे. मी एकसारखा तळमळत आहे देवा.॥३॥
विवरण :
भक्त ईश्वरासाठी किती व्याकुळ होतो याचा हा एक नमुना म्हणून उत्कृष्ट अभंग आहे. ईश्वराच्या मीलनांतील सुख, अद्वैतातील, एकरूपातील सुख अद्वितीय तर आहेच, पण हे प्राप्त करण्यासाठी जी मनाची तगमग होते, जी व्याकुळलेली अवस्था होते, करुणेने हृदय जे भरून येते त्यास तुलना कुठली? कित्येक वेळा भक्तास याच अवस्थेची गोडी अधिक लागते. अद्वैताच्याच भूमिकेवर पण द्वैतावर येऊन मीतूपणाचा थोडा भेद कल्पून साधुसंतांनी करुणेचे अनेक अभंग केले आहेत. त्यांच्या हृदयाची आर्त हाक, त्यांची तळमळ, त्यांच्या जिवाची कासावीस अवस्था, त्यांची तडफड, त्यांची व्याकुळलेली अवस्था इत्यादींची मोठी हृदयभेदक पण ईश्वरी प्रेमाने भारावलेली अशी अभंग संपदा मराठीत अमोल अशी आहे.
ईश्वराला, विठ्ठलाला आई कल्पून मराठी संतांनी जी करुणेने हाक मारली आहे तिच्यातून कित्येक अभंग स्फुरले आहेत. ही केवळ एक साधकाची साधनरूप अवस्था असेही नाही; तर केवळ भक्तीसुखासाठीही साधुसंत असा पुकारा करीत असतात.
नामदेव आणि तुकाराम या दोन संतांनी तर या करुण वाणीच्या आर्त उद्गारांनी मराठी वाङ्मयास एक तेजस्वी लेणेच चढविले आहे. *देशीपरदेशी झालों तुजविण*, *तुजविण आम्हां कोण हो पोशिता*, *मज कां मोकलिलें । कवणां निरविलें ?*, *धाव गा विठ्ठला, सोडवी अपुला दास*, इत्यादी ओळींतून नामदेवांनी परमेश्वरापाशी, विठ्ठलापाशी करुणा भाकली आहे. *येग येग विठाबाई,* *गंगा गेली सिंधूपाशी*, *तंजवाचूनि विठ्ठला । कोणी नाही रे मजला*, *पोट भरुनि व्यालासी । मज सांडुनी कोठे जासी ?*, *कां गा उशीर लाविला । माझा विसर पडला*, *येरे येरे माझ्या रामा । मनमोहन मेघःश्यामा* यांसारख्या ओळींतून जनाबाईने आपली करुण व्यथा व्यक्त केलेली आहे.
तुकोबांनी इतरत्र, *मायें मोकलिलें कोठे जावे बाळे ?*, *येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां*, *कोण आम्हां पुसे शिणले भागले*, *तुजलागीं माझा जीव झाला पिसा*, *न लगे मायेसीं बाळ निरवावें* इत्यादी ओळींतून आपल्या मनाची तळमळ समर्थपणे उभी केली आहे.
०५४ हातीं होन दावी बेना
हातीं होन दावी बेना ।
करिती लेकीच्या धारणा ॥१॥
ऐसे धर्म जाले कळी ।
पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
सांडिले आचार ।
द्विज चाहाड जाले चोर ॥२॥
ऐसे धर्म जाले कळी ।
पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
टिळे लपविती पातडी ।
लेती विजारा कातडी ॥३॥
ऐसे धर्म जाले कळी ।
पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
बैसोनिया तक्ता ।
अन्नेविण पिडिती लोका ॥४॥
ऐसे धर्म जाले कळी ।
पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
मुदबख लिहिणे ।
तेलतुपावरी जिणे ॥५॥
ऐसे धर्म जाले कळी ।
पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
नीचाचे चाकर।
चुकलिया खाती मार ॥६॥
ऐसे धर्म जाले कळी ।
पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
राजा प्रजा पीडी ।
क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥
ऐसे धर्म जाले कळी ।
पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
वैश्यशूद्रादिक ।
हे तो सहज नीच लोक ॥८॥
ऐसे धर्म जाले कळी ।
पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
अवघे बाह्य रंग ।
आंत हिरवे वरी सोंग ॥९॥
ऐसे धर्म जाले कळी ।
पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
तुका म्हणे देवा ।
काय निद्रा केली धावा ॥१०॥
ऐसे धर्म जाले कळी ।
पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
होन-नाणे.
बेना-स्वतःची मुलगी.
धारणा-भाव.
कळी-कलियुगांत.
रंक-गरीब.
द्विज-ब्राह्मण.
पातडी-पंचांग.
मुदबख-स्वयंपाकगृहातील जमाखर्च.
अर्थ :
समकालीन दुःस्थितीचे वर्णन करताना तुकोबा म्हणतात, लग्नाची झालेली मुलगी दुसऱ्यास देतांना लोक तिच्याबद्दल हातात सुवर्णाची नाणी घेऊन तिचा भाव ठरवितात.॥१॥
असे या कलीयुगात उलटे धर्म बनले आहेत. पुण्यवान आहेत ते गरीब बनले असून पापी बलिष्ठ झाले आहेत.॥ध्रु.॥
सर्वांनी आपापले आचार सोडले. ब्राह्मणांनी आपला धर्म सोडला आणि ते चहाडखोर व चोर बनले आहेत.॥२॥
आपले टिळे व पंचांग लपवून, सोडून देऊन ते कातड्याची विजार घालू लागले आहेत.॥३॥
न्यायाच्या किंवा राजाच्या सिंहासनावर बसतात व अन्नाशिवाय, प्रजेस पीडा देतात.॥४॥
स्वयंपाकगृहात राहून साधा जमाखर्च लिहितात व तेलतुपाचा हिशेब करून कसे तरी जिणे जगतात.॥५॥
नीच माणसांचे चाकर होऊन चुकले की वरिष्ठांकडून वारंवार मार खातात.॥६॥
राजे लोक प्रजेस पीडा फारच देतात. जमीनदार गरिबाला फार तोडून बोलतात.॥७॥
ब्राह्मण क्षत्रियांची ही दशा; मग वैश्यशूद्रांची काय वर्णन करावी? ते सहजच आणखी नीच अवस्थेस गेले.॥८॥
आत-बाहेर सर्वत्र बाह्य रंगाचा देखावा आहे; आतमात्र हिरवे कच्चेच आहेत सर्वजण.॥९॥
तुकोबा म्हणतात, देवा, तुम्ही झोपला आहात काय? समाजाची काय ही अवस्था! लौकर उद्धारासाठी धावून या ना.॥१०॥
०५५ साळंकृत कन्यादान
साळंकृत कन्यादान ।
करिता पृथ्वीसमान ॥१॥
परि ते न कळे या मूढा ।
येईल कळो भोग पुढा ॥ध्रु.॥
आचरता कर्म ।
भरे पोट राहे धर्म ॥२॥
परि ते न कळे या मूढा ।
येईल कळो भोग पुढा ॥ध्रु.॥
सत्या देव साहे ।
ऐसे करूनिया पाहे ॥३॥
परि ते न कळे या मूढा ।
येईल कळो भोग पुढा ॥ध्रु.॥
अन्न मान धन ।
हे तो प्रारब्धा आधीन ॥४॥
परि ते न कळे या मूढा ।
येईल कळो भोग पुढा ॥ध्रु.॥
तुका म्हणे सोस ।
दुःख आता पुढे नास ॥५॥
परि ते न कळे या मूढा ।
येईल कळो भोग पुढा ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
साळंकृत – अलंकारांसहित.
सोस – हव्यास.
नास – नाश.
अर्थ :
अलंकार घालून मुलीचे दान केले की ते कन्यादान पृथ्वीच्या दानाप्रमाणे होते.॥१॥
पण ते या मूर्खास समजत नाही. पुढे भोगावयास लागले म्हणजे कळेल मग सर्व.॥ध्रु.॥
ज्याचे त्याने आपले विहित कर्म केले की पोट भरून आनंद होईल एवढा धर्म होतो.॥२॥
सत्याला देवाचे नेहमी साहाय्य असते. सत्याने वागून तर पाहा.॥३॥
अन्न, मान, धन या गोष्टी आपल्या प्रारब्धाच्या आधीन आहेत.॥४॥
तुकोबा म्हणतात, कुठल्याही गोष्टीचा हव्यास धरलास की पुढे खचित नाश आहे असे समजावे; किंवा आता सुख वाटले तरी पुढे नाशच असतो.॥५॥
०५६ दिवट्या वाद्ये लावुनी खाणे
दिवट्या वाद्ये लावुनी खाणे ।
करुनी मंडण दिली हाती ॥१॥
नवरा नेई नवरी घरा।
पूजन वरा पाद्यांचे ॥२॥
गौरविली विहीण व्याही ।
घडिले काही ठेवू नका ॥३॥
करू द्यावे न्हावे बरे ।
ठायीचे का रे न कळेची ॥४॥
वऱ्हाडियांचे लागे पाठी ।
जैसी उठी कांतेली ॥५॥
तुका म्हणे जोडिला थुंका ।
पुढे नरका सामग्री ॥६॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
मंडण – सुशोभा, सजावट.
अर्थ :
लग्नाच्या वेळी घरात दिवे लावून, वाद्ये वाजवून, पक्वान्नांचे भोजन करून अलंकारांनी नटलेली नवरी मुलगी नवऱ्याच्या हातात देतात.॥१॥
मग नवरा तिला थाटामाटाने घरी नेतो. या वेळी नवऱ्याच्या पायांचे पूजन होते.॥२॥
व्याह्याला व विहिणीला पोशाख इ. देऊन त्यांचा गौरव होतो. जर काही कमी-जास्त घडले असेल तर “तेवढं ठेवून दे” असं म्हटलं जातं.॥३॥
नवऱ्याच्या न्हाण्याचे विधी इ. जे काही असतील ते करू द्यावेत, पण या सर्वाच्या पाठीमागची खरी समजूत लोकांना का कळत नाही?॥४॥
जशी उटी (उटणे) तेलात मिसळून जाते, तशी विहिण वऱ्हाडाच्या लोकांच्या पाठी लागते. पण मुलीच्या कडून पैसे घेणे हे चुकीचे आहे, हे कुणालाच पटत नाही.॥५॥
तुकोबा म्हणतात, अशा कर्मामुळे जणू तोंडावर थुंकण्यासारखे कृत्य केले आणि पुढील नरकसदृश परिणामासाठी स्वतःची तयारी करून ठेवली आहे.॥६॥
०५७ ब्रह्महत्या मारल्या गाई
ब्रह्महत्या मारल्या गाई ।
आणीक काई पाप केलें ॥१॥
ऐका जेणे विकिली कन्या ।
पवाडे त्या सुन्याचे ॥ध्रु.॥
नरमांस खादली भाडी ।
हाका हाडी म्हणोनि ॥२॥
अवघे पाप केले तेणे ।
जेणे सोने अभिळाषिले ॥३॥
उच्चारिता मज ते पाप ।
जिव्हे कांप सुटतसे ॥४॥
तुका म्हणे कोरान्न रांड ।
बेटा भांड मागे ना का ॥५॥
ऐका जेणे विकिली कन्या ।
पवाडे त्या सुन्याचे ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
सुन्याचे – कुत्र्याचे
भाडी – कुंटणखाना चालवून मिळवलेला पैसा
अभिळाषिले – इच्छिले
भांड – भांडखोर मनुष्य
अर्थ :
त्याच्या हातून ब्रह्महत्या झाली, त्याने जणू गाई मारल्या, इतकी पापे त्याने केली.॥१॥
कोण? ऐका – ज्याने आपल्या कन्येचा व्यवहार केला, त्या कुत्र्यासारख्या माणसाची कीर्ती नीट ऐका.॥ध्रु.॥
असा अधम मुलीच्या लग्नात पैसा घेऊन नरमांस खाण्याच्या तुल्य पाप करतो, वेश्या व्यवसायातील पैसा खातो.॥२॥
त्याने सर्व पापे केलीत, कारण त्याने मुलीला विकून केवळ सोन्याची इच्छा ठेवली होती.॥३॥
त्याचे पाप उच्चारतानाही माझ्या जिभेला कंप सुटतो.॥४॥
तुकोबा म्हणतात, असा व्यक्ती म्हणजे भिक्षा मागणारी रांड आणि भांडखोर बेटा – ते मागे का नाही जात? (अशा जीवनाला शेवट का नाही येत?)॥५॥
०५८ याचा कोणी कई पक्षी
याचा कोणी कई पक्षी ।
तो ही त्यासी समतुल्य ॥१॥
फुकासाठी पावे दुःखाचा विभाग ।
पूर्वजांसी लाग निरयदंडी ॥ध्रु.॥
ऐके राजा न करी दंड ।
जरी या लंड दुष्टासी ॥२॥
फुकासाठी पावे दुःखाचा विभाग ।
पूर्वजांसी लाग निरयदंडी ॥ध्रु.॥
तुका म्हणे त्याचे अन्न ।
मद्यपान भक्षिता ॥३॥
फुकासाठी पावे दुःखाचा विभाग ।
पूर्वजांसी लाग निरयदंडी ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
पक्षी – बाजू, समर्थन करणारा
निरयदंडी – नरकाची शिक्षा भोगणारा
अर्थ :
अशा प्रकारे कन्येची विक्री करून जे पैसे मिळविणारे असतील, त्यांची बाजू घेणारे जे असतील तेही त्याच गुन्हेगारासारखे समजावेत.॥१॥
त्याची बाजू घेतल्याने त्याला फुकट दुःख मात्र होते आणि तो स्वतःच्या पूर्वजांनाही नरकाच्या शिक्षेस पाठवितो.॥ध्रु.॥
जो राजा अशा दुष्टांना दंड करीत नाही, त्यास गुन्हेगारासारखे समजावे.॥२॥
त्या गुन्हेगाराचे अन्न खाल्यास ते मद्याचे सेवन आहे असे समजावे.॥३॥
०५९ गायत्री विकोन पोट जे जाळिती
गायत्री विकोन पोट जे जाळिती ।
तया होय गति यमलोकी ॥१॥
कन्येचा जे नर करिती विकत ।
ते जाती अघोरा नरकपाता ॥२॥
नाम गाऊनियां द्रव्य जे मागती ।
नेणो तया गती कैसी होय ॥३॥
आमुचा सांगाती आहे तो श्रीहरि ।
न लगे दुराचारी तुका म्हणे ॥४॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
गायत्री – येथे संदर्भ गाईचा किंवा पवित्र मंत्राचा आहे
अघोरा नरक – अत्यंत भयंकर नरक
सांगाती – सोबती
दुराचारी – दुष्ट वर्तन करणारा
अर्थ :
गाईची अथवा गायत्रीमंत्राची विक्री करून जे स्वतःचे पोट जाळतात त्यांना शेवटी यमलोकातच जावे लागते.॥१॥
जे कुणी आपल्या कन्येची विक्री करतात त्यांना अघोर असा नरकवास भोगावा लागतो.॥२॥
जे कुणी हरिनाम गाऊन त्याबद्दल द्रव्य मागतात त्यांची काय गती होणार हे काही समजून येत नाही.॥३॥
त्यांची काय गती होते तेच जाणोत. आम्हास त्यांची माणसाची संगत नको॥४॥
तुकोबा म्हणतात, आमचा सोबती हा श्रीहरी असल्याने आम्हांस दुराचारी माणसाची संगत नको.॥५॥
०६० कन्या गो करी कथेचा विकरा
कन्या गो करी कथेचा विकरा ।
चांडाळ तो खरा तया नावे ॥१॥
गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण ।
यातिशी कारण नाही देवा ॥२॥
आशाबद्ध नये करू ते करिती ।
तुका म्हणे जाती नरकामधी ॥३॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४–२००४)
शब्दार्थ :
गो – गाई
विकरा – विक्री करणारा
कारण – कर्तव्य
आशाबद्ध – आशेच्या लोभात अडकलेला
अर्थ :
स्वतःची मुलगी गाय किंवा कथा यांची विक्री पैसे घेऊन जो करतो तो खरोखरीच नावाने चांडाळच होय.॥१॥
माणसाचे गुण काय किंवा अवगुण काय हे त्याच्या ईश्वरनिष्ठेवरून ठरवायचे, जातीशी येथे काही कर्तव्य नाही. जातीवर काही अवलंबून नाही.॥२॥
आशेच्या लोभाने जे लोक करू नये ती कर्मे करतात ते नरकासच जातील असे तुकोबा म्हणतात.॥३॥
०६१ यथार्थ वाद सांडुनी उपचार
यथार्थ वाद सांडुनी उपचार ।
बोलती ते अधोर भोगितील ॥१॥
चोरा धरिता सांगे कुठोऱ्याचे नाव ।
दोघांचे ही पाव हात जाती ॥२॥
तुका म्हणे असे पुराणी निवाड ।
माझी हे बडबड नव्हे काही ॥३॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ :
यथार्थ-खरे.
अघोर-नर्क.
कुठोऱ्याचे-कोठारीचे मालकाचे.
अर्थ :
नीट खरे असेल ते यथार्थपणे न सांगता उगाच लोकांना आवडतील अशा वायफळ गोष्टी सांगतील ते महा भयानक अशा नर्कास जातील.॥१॥
एखाद्या चोराला धरल्यास तो आपल्याच मालकाचे किंवा प्रमुखाचे नाव सांगतो, मग दोघांनाही बंदिवासाची शिक्षा भोगावी लागते.॥२॥
तुकोबा म्हणतात, असा निवाडा पुराणांनीच केलेला आहे. ही काही केवळ माझीच अशी बडबड नाही.॥३॥
०६२ कथा करोनिया मोल ज्यापे घेती
कथा करोनिया मोल ज्यापे घेती ।
ते ही दोघे जाती नरकामध्ये ॥१॥
ब्रह्म पूर्ण करा ब्रह्म पूर्ण करा ।
अखंड स्मरा रामराम ॥ध्रु.॥
मधुर वाणीच्या नका पडो भरी ।
जाल यमपुरी भोगावया ॥२॥
ब्रह्म पूर्ण करा ब्रह्म पूर्ण करा ।
अखंड स्मरा रामराम ॥ध्रु.॥
तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे ।
हात पसरी जिणे धिग त्याचे ॥३॥
ब्रह्म पूर्ण करा ब्रह्म पूर्ण करा ।
अखंड स्मरा रामराम ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
ब्रह्मांड - सर्व जगत्.
अर्थ :
श्रीहरीची कथा करून जे लोक त्याबद्दल मोबदला घेतात, ते व त्यांना मोल देणारे असे दोघेही नरकास जातात.॥१॥
अखंड राम राम असे स्मरण करून पूर्ण ब्रह्माचा अनुभव घ्यावा.॥ध्रु.॥
या रामनामा खेरीज इतर मधुर वाणीच्या भरीस पडू नका, नाही तर यमलोकाची दारुण शिक्षा भोगावी लागेल॥२॥
तुकोबा म्हणतात, रामनामाच्या घोषाने सर्व जगत् ठेंगणे करून सोडावे. जो उगाच पोटासाठी हात पसरतो त्याचे जगणे धिक्कार करण्या जोगेच होय.॥३॥
०६३ कथा करोनिया द्रव्य घेती देती
कथा करोनिया द्रव्य घेती देती ।
तया अधोगती नरकवास ॥१॥
रवरव कुंभपाक भोगिती यातना ।
नये नारायणा करुणा त्यांची ॥ध्रु.॥
असिखड्गधारा छेदिती सर्वांग ।
तप्तभूमी अंग लोळविती ॥२॥
रवरव कुंभपाक भोगिती यातना ।
नये नारायणा करुणा त्यांची ॥ध्रु.॥
तुका म्हणे तया नरक न चुकती ।
सापडले हाती यमाचिया ॥३॥
रवरव कुंभपाक भोगिती यातना ।
नये नारायणा करुणा त्यांची ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
कुंभपाक - एक प्रकारचा भयानक नरक.
असिखड्गधारा - तरवारीच्या पात्याची धार.
अर्थ :
श्रीहरीची कथा करून जे द्रव्य घेतात, मोबदला मागतात, किंवा घेतात त्या दोघांनाही नरकाची प्राप्ती होऊन ते अधोगतीस जातात.॥१॥
रौरव कुंभपाकाच्या नरकाच्या यातना त्यांना भोगाव्या लागतात यांतून सोडविण्यासाठी भगवंतालाही दया येत नसते.॥ध्रु.॥
अशा लोकांचे अंग तरवारीच्या पात्याने छेदले जाते, आणि ते तप्त अशा भूमीवर लोळविले जाते.॥२॥
तुकोबा म्हणतात, अशा लोकांच्या वाट्यास आलेल्या नरकयातना कधी चुकत नाहीत ते प्रत्यक्ष यमाच्याच हाती अडकलेले असतात.॥३॥
विवरण :
कीर्तन हे प्रभूच्या गुणकीर्तिगायनाचे प्रमुख साधन. भागवत संप्रदायात या कीर्तनाला वा नामस्मरणाला मोठेच महत्त्व. अशा या एका सर्वोत्तम साधनाची परंपरा नारदापासून सुरू झालेली. महाराष्ट्रात नामदेवरायांनी तिचा प्रारंभ केला. परमार्थविचार, कथानिरूपण, नृत्य, वाद्य, संगीत, भजन इत्यादींचा सुरेख मेळ असलेले हे एक प्रभुकृपासंपादनाचे वा त्याच्या प्रेमात तल्लीन होण्याचे प्रमुख साधन. परंतु या ही साधनाचा दुरुपयोग धंदेवाईक व भोंदू कथाकार करीत राहिले. पोटासाठी कीर्तन करणाऱ्यांची संख्या वाढत राहिल्या कारणाने साधुसंतांना कीर्तनाच्या मर्यादा सांगणे अगत्याचे झाले. कीर्तनाच्या श्रोत्यांपेक्षा कीर्तनकारांवर बंधने अधिक आली. मुख्य म्हणजे कीर्तनकाराने आपल्या कथेचे मोल कधी मागू नये. जो मोल मागेल त्याची गती काय होईल हे तुकोबांनी या अभंगात आपल्या नेहमीच्या परखड पद्धतीने सांगितले आहे.
'माते परीस थोरी कथा ।
भाड घेतां न लाजे॥'
म्हणून दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी धिक्कार केला आहे -
'कथा करोनिया मोल ज्यापे घेती ।
तेही दोघे जाती नरकामध्ये॥'
असे त्यांनी आणखी एका अभंगात स्पष्टपणे सांगितले आहे.
'जेथे कीर्तन करावे ।
तेथे अन्न न सेवावें॥'
असा कडक दंडक सांप्रदायिकांना घालून दिलेला आहे.
'तट्टा वृषभासी दाणा ।
तृण मागो नये जाणा॥' हाही बारकावा ध्यानात ठेवण्यासारखा आहे.
०६४ जेथे कीर्तन करावे
जेथे कीर्तन करावे ।
तेथे अन्न न सेवावे ॥१॥
बुका लावू नये भाळा ।
माळ घालू नये गळा ॥२॥
तटा वृषभासी दाणा ।
तृण मागो नये जाणा ॥३॥
तुका म्हणे द्रव्य घेती ।
ते ही नर्का जाती ॥४॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
तटा वृषभासी - घोड्यासाठी किंवा बैलासाठी.
तृण - गवत.
अर्थः
ज्या ठिकाणी श्रीहरीचे कीर्तन करावे त्या ठिकाणी हरिदासाने अन्नाचे सेवन करू नये.॥१॥
तेथील कपाळाला बुका लावू नये, की तेथील फुलांची माळ गळ्यात घालू नये.॥२॥
त्या ठिकाणी हरिदासांनी आपल्या घोड्यास अथवा बैलास दाणे मागू नयेत, की गवताचा चाराही मागू नये, असे नीट समजावे.॥३॥
तुकोबा म्हणतात, कीर्तन करून जे कुणी द्रव्य घेतील ते घेणारे व देणारे दोघेही नरकास जातील.॥४॥
०६५ त्या हरिदासांची भेट घेता
त्या हरिदासांची भेट घेता ।
नर्का उभयतासी जाणे ॥१॥
माते परीस थोरी कथा ।
भाड घेतां न लाजे ॥ध्रु.॥
देता घेता नर्कवासी ।
उभयतांसी रवरव ॥२॥
माते परीस थोरी कथा ।
भाड घेता न लाजे ॥ध्रु.॥
तुका म्हणे नर्कगांवा ।
जाती हावा धरोनी ॥३॥
माते परीस थोरी कथा ।
भाड घेतां न लाजे ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
थोरी - थोर.
भाड - वाईट मार्गाने मिळविलेले द्रव्य.
रवरव - एक प्रकारचा नरक.
अर्थ :
पुढील चरणात सांगितलेल्या हरिदासांची भेट घेतल्यास उभयतांना नर्कास जावे लागेल.॥१॥
ज्या हरिकथेची थोरवी मातेप्रमाणे, तिला विकून पैसे घेताना यांना लाज वाटत नाही.॥ध्रु.॥
असे द्रव्य देणारा व घेणारा दोघेही नरकास जाणारे आहेत. उभयतांना रवरव नर्काची प्राप्ती होईल॥२॥
तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे हे लोक हाव धरून नर्कास जातात.॥३॥
०६६ कीर्तनाचा विकरा मातेचे गमन
कीर्तनाचा विकरा मातेचे गमन ।
भाड खाई धन विटाळ तो ॥१॥
हरिभक्ताची माता हे हरिगुणकीर्ती ।
इजवर पोट भरती चांडाळ ते ॥ध्रु.॥
अंत्यज हा ऐसे कल्पांती करीना ।
भाड हे खाईना जननीची ॥२॥
हरिभक्ताची माता हे हरिगुणकीर्ती ।
इजवर पोट भरती चांडाळ ते ॥ध्रु.॥
तुका म्हणे त्याचे दर्शन ही खोटे ।
पूर्वजासी नेटे नरका धाडी ॥३॥
हरिभक्ताची माता हे हरिगुणकीर्ती ।
इजवर पोट भरती चांडाळ ते ॥ध्रु.॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
विकरा - विक्री.
भाड - लाच, कुंटणपणा करून मिळविलेले द्रव्य.
नेटे - त्वरेने.
अर्थ :
हरिकीर्तनाची विक्री करणे, त्यापासून पैसा मागणे हे मातेशी गमन केल्याप्रमाणे आहे अशा प्रकारचे धन हे वाईट मार्गाचे असल्याने त्याचा विटाळच होतो.॥१॥
श्रीहरीची गुणकीर्ती ही हरिभक्ताची माता असते इच्यावर जे पोट भरतात ते चांडाळच होत.॥ध्रु.॥
अंत्यजही आपल्या आईस विकून पैसे घेईल असे कल्पांतीही घडणार नाही.॥२॥
तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे कथेची विक्री करणारे लोक असतात, त्यांचे दर्शनही मला खोटे वाटते तो आपल्या कृत्याने आपल्या पूर्वजास नरकास धाडतो.॥३॥
०६७ मोल घेऊनिया कथा जरी करी
मोल घेऊनिया कथा जरी करी ।
तरी भंगो हरी देह माझा ॥१॥
माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा ।
तरी झडो जाणा जिव्हा माझी ॥२॥
साह्य तू जालासी काय उणे तुपे ।
आणीक भूतापे काय मागो ॥३॥
तुका म्हणे सर्व सिद्धि तुझे पायी ।
तू माझा गोसावी पांडुरंगा ॥४॥
निरूपण :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).
शब्दार्थ:
तपेु - तुझ्या जवळ.
अर्थ :
द्रव्याचे मोल घेऊन जर मी कथा करीन तर माझा हा देह भंगून जावो.॥१॥
माझी कथा तुम्ही करावी असे जर मी कुणास म्हणीन तर माझी जीभ झडून जावी.॥२॥
देवा, तू एकदा साह्य झाल्यावर तुझ्याजवळ काय उणे आहे? मग इतर लोकांजवळ आणखी काय मागावे?॥३॥
तुकोबा म्हणतात, देवा, सर्व सिद्धी तुझ्या पायी आहेत पांडुरंगा, तू माझा गोसावी, स्वामी आहेस.॥४॥
भजन - अभंग श्रवण
क्रमांक | गीत | डाउनलोड |
---|---|---|
१. | जय जय रामकृष्ण हरि | Download |
२. | आम्हा घरी धन शब्दांची रत्ने | Download |
३. | जय जय विठोबा रखुमाई | Download |
गायन : रघुनाथ खंडाळकर पखवाज : तुकाराम भूमकर ध्वनी मुद्रण : अंकुश घोलप |
||
४. | सुंदर ते ध्यान | Download |
५. | लहानपण देगा देवा | Download |
गायन : तुकाराम गणपती, कडयनल्लूर, तमिळनाडू |
तुकाराम - सत्यजीत रे
भारत रत्न सत्यजीत रे (०२-०५-१९२१ - २३-०४-१९९२) यांनी इंदुनाथ चौधरी यांच्या विनंतीनुसार ‘तुकाराम’ पुस्तकाचे मुखपृष्ठ केले. साहित्य अकादमी यांच्या
भारतीय साहित्याचे निर्माते या मालिकेतील १९७५ साली ‘तुकाराम’ हे पुस्तक भालचंद्र नेमाडे (२७-०५-१९३८-) यांनी लिहिले. रे ब्रह्मो समाजाचे सभासद होते. ब्रह्मो समाजाच्या सभासदांना तुकारामांची ओळख मुख्यत्वे भारतीय प्रशासकीय सेवेचे पहिले अधिकारी सत्येन्द्रनाथ ठाकुर (टॅगोर) (१८४२-१९२३) यांच्या ‘नव-रत्नमाला वा शास्त्रीय प्रवचन, काव्य ओ विविध कविता, एवं महाराष्ट्रीय भक्त कवि तुकारामेर जीवनी ओ अभंग संग्रह’ यांच्या पुस्तकामुळे झाली. त्यांचा नोकरीचा बराचसा काळ अहमदाबाद, मुंबई, पुणे, कारवार या भागात गेला. या काळातील वास्तव्यात प्रार्थनसमाजियांशी आलेल्या संबंधामुळे त्यांचे लक्ष तुकोबांकडे वळले. १८७१ साली पुणे येथे न्यायाधीश असतांना ते तेथील प्रार्थनासमाजात मराठीत प्रवचन देत असत. नंतरच्या


काळात त्यांचे धाकटे बंधू कविवर्य रवीन्द्रनाथ ठाकुर (१८६१-१९४१) यांनी तुकोबांचे निवडक अभंग बंगालीत भाषान्तर केले. रविन्द्रनाथांनी त्यांच्या अनुवादाने तुकारामांचे संक्षिप्त चरित्र वाचकांसमोर ठेवले. रे शांति निकेतन मध्ये नन्दलाल बोस (१८८३-१९६६) यांचे विद्यार्थी होते. १९४५ साली नन्दलाल बोस यांनी महात्मा गांधी यांच्या विनंतीनुसार तुकोबांचे रेखाचित्र काढले होते. रे यांनी प्रसन्न मुद्रेचे तुकाराम साकारले आहेत.
वैश्विक " ज्ञानदेव-तुकाराम" कलादालन
संत तुकाराम चत्तुर्थ जन्मशताब्दी निमित्त वैश्विक कलापर्यावरण , पुणे आयोजित रेखाचित्र प्रदर्शन

१. वाटचाल माळीनगर - विजय वाडेकर

२. वारकरी - विजय वाडेकर

३. वाटचाल माळीनगर - पांडुरंग पवार

४. देहू मंदिर - दिलीप माळी

५. निमगांव केतकी तळ - भास्कर हांडे

६. विणेकरी वाखरी तळ - भास्कर हांडे

७. कदम वसती विसावा - भास्कर हांडे

८. चिन्चेच झाड, पंढरपूर - भास्कर हांडे
तुकाराम महाराजांचे चरित्र
ब्रेल आवृत्ती

लेखक - श्रीधर मोरे
ब्रेल रूपांतर - सरोज टोळे मूल्य - १३०/- रुपये
प्रकाशक -
फुलोरा बेल प्रकाशन
3/B , उदयपार्क,कर्वे पुतळा,
कोथरूड, पुणे - ४११०३८.
सूचना:
वरील zip file मध्ये tukaram_charitra.wbr file आहे. Download केल्यानंतर आपणास जिथे Braille printer असेल तिथे tukaram_charitra.wbr file print करावी लागेल. खालील पत्त्यांवर print करण्याची सोय आहे. या शिवाय आपल्या नजिकच्या परिसरात दृष्टिबाधितांच्या शाळेत print करण्याची सोय असू शकेल.
1. Jagruti Blind Girls School,
Markal Road, Alandi Devachi ,
Pune 412105.
Phone : 02135-232290
2. National Association for the Blind, India,
Department of Employment, 2nd floor,
11/12, Khan Abdul Gaffar Khan Road
Worli Seaface, Mumbai 400 025.
Phone : 022-498 8134
आनंद ओवरी - संहिता
ब्रेल आवृत्ती
लेखक - दिगंबर बाळकृष्ण मोकाशी
रंगावृत्ती -अतुल पेठे
ब्रेल रूपांतर - सरोज टोळे
प्रकाशक -
फुलोरा बेल प्रकाशन
3/B , उदयपार्क,कर्वे पुतळा,
कोथरूड, पुणे - ४११०३८.
सूचना:
वरील zip file मध्ये anandowari.wbr file आहे. Download केल्यानंतर आपणास जिथे Braille printer असेल तिथे anandowari.wbr file print करावी लागेल. खालील पत्त्यांवर print करण्याची सोय आहे. या शिवाय आपल्या नजिकच्या परिसरात दृष्टिबाधितांच्या शाळेत print करण्याची सोय असू शकेल.
1. Jagruti Blind Girls School,
Markal Road, Alandi Devachi ,
Pune 412105.
Phone : 02135-232290
2. National Association for the Blind, India,
Department of Employment, 2nd floor,
11/12, Khan Abdul Gaffar Khan Road
Worli Seaface, Mumbai 400 025.
Phone : 022-498 8134

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया ।।1।।
तुळसी हार गळा कासे पीतांबर । आवडे निरंतर ते चि रूप ।। धृ ।।
मकरकुंडले तळपती श्रवणीं । कंठी कौस्तुभमणि विराजित ।।2।।
तुळसी हार गळा कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ।। धृ।।
तुका ह्मणे माझे हे चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ।।3।।
तुळसी हार गळा कासे पीतांबर । आवडे निरंतर ते चि रूप ।। धृ।।
मार्क्सवादी दिनकर केशव बेडेकर(१९१०-१९७३) हे संस्कृतीचे समग्रपणे विचार करणारे अभ्यासक होते. त्यांचे असे निरीक्षण आहे की मराठीत पहिली लघुकथा, नव्हे लघुत्तम कथा तुकोबांनी अभंग छंदात लिहिली. तुकोबा अशी कथा का लिहू शकले याचे मार्मिक विश्लेषणही केले. बेडेकर म्हणतात,“मला तुकारामांबद्दल नेहमीच वाटत आले आहे की हा साधू खरा विरक्त नव्हताच. त्यांच्यात एक जिवंतपणा, आशावाद व रंग आहे. ‘असार जीवित केवळ माया’ हे रडगाणे तुकारामांनी कधी गायले का ? तुकोबा म्हणतात - ‘तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी॥’. थोडक्यात म्हणजे तुकारामांचे प्रेम त्यांच्या कानड्यावर असेल, नव्हे होतेच; पण हे मोठे कसदार प्रेम होते. त्यात ही मस्तपणा होता. व ज्याला आपण आधुनिक मराठीत ‘जीवनावरचे प्रेम’ म्हणतो, तोच रंगेलपणा तुकारामांच्या वाणीत व वागण्यात होता. निदान असावा, असा माझा अंदाज आहे. नाहीतर अशी सुंदर व डौलदार लघुत्तम कथा इतक्याच मोजक्यात शब्दांत त्यांना कशी लिहिता आली असती ? या कथेत काय नाही ? रस जवळ जवळ सगळेच आहेत. पेचप्रसंग आहे. खलपुरुष आहे. नायकनायिका तर आहेतच आणि पेचप्रसंगाची उकल अशी अनपेक्षितपणाचा टोला हाणणारी आहे की ओ. हेन्रीच्या आधी शेकडो वर्षे होऊन गेलेल्या या कथाकाराने, त्याच्या तंत्राने जणू मात केली आहे.”
बेडेकरांनी कथेच्या विश्लेषणाबरोबर व मूल्यमापनाबरोबर कथेतून तुकोबांचे ‘खंबीर व प्रेमळ व्यक्तित्व’ आपल्याला दिसत असल्याचे नमूद केले आहे.
सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥१॥
व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥२॥
वृक्षाचिया माथा सोडिला ससाना । धनुष्यासी बाणा लावियेले ॥३॥
तये काळी तुज पक्षी आठविती । धावे गा श्रीपती मायबापा ॥४॥
उडोनिया जाता ससाना मारील । बैसता विंधील पारधी तो ॥५॥
ऐकोनिया धावा तया पक्षियांचा । धरिला सर्पाचा वेश वेगी ॥६॥
डंखोनि पारधी भुमीसी पाडिला । बाण तो लागला ससान्यासी ॥७॥
ऐसा तू कृपाळु आपुलिया दासा । होसील कोंवसा संकटींचा ॥८॥
तुका म्हणे तुझी कीर्ति त्रिभुवना । वेदाचिये वाणी वर्णवेना ॥९॥
६०७ पृ १०९ ( शासकीय )
तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक
ज्येष्ठ वद्य ७, शके १९३९.
शुक्रवार १६ जून,२०१७.
देहूतील मुख्य देऊळवाड्यातून प्रस्थान.
पालखीचा मुक्काम: इनामदारसाहेब वाडा,देहू.
नाचत पंढरिये जाऊ रे खेळिया ।
विठ्ठल रखुमाई पाहू रे ॥ध्रु.॥
आनंद तेथीचा मुकियासी वाचा ।
बहिर ऐकती कानी रे ।
आंधळयासी डोळे पांगळांसी पाय ।
तुका म्हणे वृध्द होती तारुण्ये रे ॥
नाचत पंढरिये जाऊ रे खेळिया ।
विठ्ठल रखुमाई पाहू रे ॥ध्रु.॥

शनिवार, १७ जून,२०१७.
पहिली विश्रांती : अनगडशहा बाबा - अभंग आरती.
दूसरी विश्रांती : चिंचोली पादुका - अभंग आरती.
दुपारचे भोजन : निगडी.
पालखीचा मुक्काम : विठ्ठल मंदिर, आकुर्डी.

रविवार १८ जून,२०१७.
पहिली विश्रांती : एच.ए.कॉलनी, पिंपरी.
दूसरी विश्रांती : कासारवाडी.
दुपारचे भोजन : दापोडी.
तिसरी विश्रांती : शिवाजीनगर.
चौथी विश्रांती : तुकाराम महाराज पादुका मंदिर,फर्ग्युसन रस्ता.
पालखीचा मुक्काम : निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे.

सोमवार १९ जून,२०१७.
निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे.
मंगळवार २० जून,२०१७.
पहिली विश्रांती :भैरोबा नाला.
दुपारचे भोजन : हडपसर.
तिसरी विश्रांती : मांजरी फार्म.
चौथी विश्रांती : लोणी काळभोर रेल्वे स्टेशन.
पालखीचा मुक्काम : विठ्ठल मंदिर, लोणी काळभोर.

बुधवार २१ जून,२०१७.
पहिली विश्रांती : कुंजीरवाडी फाटा.
दुपारचे भोजन : ऊरुळीकांचन.
तिसरी विश्रांती : जावजीबुवाची वाडी.
पालखीचा मुक्काम : भैरवनाथ मंदिर यवत.

गुरुवार २२ जून,२०१७.
दुपारचे भोजन : भांडगाव.
तिसरी विश्रांती : केडगाव चौफुला.
पालखीचा मुक्काम : विठ्ठल मंदिर,वरवंड.

शुक्रवार २३ जून,२०१७.
पहिली विश्रांती : भागवत वस्ती.
दुपारचे भोजन : पाटस.
तिसरी विश्रांती : १.रोटी - अभंग आरती, २.हिंगणी गाडा.
चौथी विश्रांती : १.वांसुदे, २.खराडवाडी.
पालखीचा मुक्काम : उंडवडी गवळ्याची.

शनिवार २४ जून,२०१७.
पहिली विश्रांती : उंडवडी पठार.
दुपारचे भोजन : बऱ्हाणपूर.
तिसरी विश्रांती : मोरेवाडी.
चौथी विश्रांती : सराफ पेट्रोल पंप,बारामती.
पालखीचा मुक्काम : शारदा विद्यालय,बारामती.

रविवार २५ जून,२०१७.
पहिली विश्रांती : मोतीबाग.
दूसरी विश्रांती : १.पिंपरी ग्रेफ, २.लिमटेक.
दुपारचे भोजन : काटेवाडी.
तिसरी विश्रांती : भवानीनगर साखर कारखाना.
पालखीचा मुक्काम : मारुती मंदिर, सणसर.

सोमवार २६ जून,२०१७.
पहिली विश्रांती : बेलवडी - गोल रिंगण.
दुपारचे भोजन : बेलवडी.
तिसरी विश्रांती : शेळगाव फाटा.
चौथी विश्रांती : गोतंडी.
पालखीचा मुक्काम : निमगाव केतकी.

मंगळवार २७ जून,२०१७.
पहिली विश्रांती : तरंगवाडी कॅनॉल.
दूसरी विश्रांती : गोकुळीचा ओढा.
दुपारचे भोजन : इंदापूर - गोल रिंगण.
पालखीचा मुक्काम : इंदापूर.

मंगळवार २८ जून,२०१७.
पहिली विश्रांती : गोकुळीचा ओढा,विठ्ठलवाडी.
दूसरी विश्रांती : १.वडापुरी, २.सुरवड.
दुपारचे भोजन : बावडा.
पालखीचा मुक्काम : सराटी.

गुरुवार २९ जून,२०१७.
पहिली विश्रांती : माने विद्यालय गोलरिंगण.
दुपारचे भोजन : अकलूज :
पालखीचा मुक्काम : विठ्ठल मंदिर,अकलूज.

शुक्रवार ३० जून,२०१७.
पहिली विश्रांती : माळीनगर : उभे रिंगण.
दुपारचे भोजन : माळीनगर.
तिसरी विश्रांती : पायरीचा पूल.
चौथी विश्रांती : १.कदम वस्ती, २.श्रीपूर साखर कारखाना.
पालखीचा मुक्काम : बोरगाव.

शनिवार १ जुलै,२०१७.
पहिली विश्रांती : माळखांबी.
तिसरी विश्रांती : तोंडले-बोंडले(धावा).
चौथी विश्रांती : टप्पा.
पालखीचा मुक्काम : पिराची कुरोली.

रविवार २ जुलै,२०१७.
तिसरी विश्रांती : १.वाघडवस्ती, २.भंडी शेगाव.
चौथी विश्रां : बाजीराव विहीर - उभे रिंगण.
पालखीचा मुक्काम : वाखरी तळ.
सोमवार ३ जुलै,२०१७.
दुपारचे भोजन : वाखर.
तिसरी विश्रांती : पादुका अभंग आरती, उभे रिंगण.
पालखीचा मुक्काम : पंढरपूर.

मंगळवार, ४जुलै,२०१७
नगरप्रदक्षिणा, पंढरपूर.
आपला अभिप्राय
आपल्या अभिप्रायानेच आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. कृपया आपले मौल्यवान अभिप्राय आम्हाला कळवा.