Font Problem

     
 
प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ

प्रस्तावना -  श्रीतुकाराम गाथा (देहू प्रत)

सदानंद मोरे,

   

 

    महाराष्ट्रातील भागवत धर्माच्या मंदिराचे कळस संतश्रेष्ठ, कविकुलगुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगांनी भाविकांना व बुध्दिमंतांना, ग्रामीणांना आणि नागरांना, कवींना आणि समीक्षकांना, स्वदेशवासीयांना आणि परदेशस्थांना गेले साडेतीन शतके सारखाच वेध लावला आहे.

          ब्रिटिशांनी १८१८ साली पेशवाई बुडविल्यानंतर थोडयाच दिवसांत महाराष्ट्राच्या ग्रंथव्यवहारात मुद्रणयुग अवतीर्ण झाले. मुद्रणयुगाच्या प्राथमिक अवस्थेपासूनच तुकाराम महाराजांच्या अभंगांनी वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दिसून येते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या आरंभापासून मुद्रित झालेल्या तुकाराम-गाथ्यांचा परामर्श वि. ल. भावे, बाबाजी गणेश परांजपे, पु. मं. लाड यांनी घेतला आहे. अलीकडच्या काळात सदानंद मोरे यांनी 'तुकाराम दर्शन' या ग्रंथामधून विस्तृतपणे या प्रयत्नांचा ऐतिहासिक आढावा घेऊन त्यांचे सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले आहे.

       सर्व प्रकाशित गाथ्यांचे परीक्षण केले असता असे लक्षात येते, की त्यांच्यापैकी एकही गाथा तुकाराम महाराजांच्या श्रीक्षेत्र देहूच्या परिसरात प्रचलित असलेल्या बोलीत रचलेल्या अभंगांच्या संहितेवर आधारित नाही. स्वतः महाराजांनी स्वहस्ते सर्व अभंग लिहून काढले असते आणि ते सर्व जतन करून ठेवण्यात आले असते, तर कोणतीच समस्या वा अडचण उभी राहिली नसती; परंतु त्यांच्या हातचे समजले जाणारे एकुलते एक हस्तलिखित देहू देवस्थानच्या संग्रहात आहे. इंद्रायणीच्या डोहातून तुकोबांच्या वह्या तरंगून सुरक्षित, कोरडया वर आल्यावर भाविकांनी प्रसाद म्हणून त्यांची पाने लुटून नेल्याचे तुकाराम-चरित्रकार महिपती सांगतात. कारण काहीही असो, महाराजांच्या हातची पूर्ण संहिता उपलब्ध नाही, हे खरे.

        महाराजांचे लेखक संताजी तेली जगनाडे व संताजींचे चिरंजीव बाळोजी यांनी लिहून ठेवलेले सुमारे दोन हजार अभंग हे पाठप्रामाण्याचा विचार करता महत्त्वाचे ठरतात, यात काहीच शंका नाही. त्यांतील संताजीच्या हातचे तेराशे अभंग वि. ल. भावे यांनी प्रकाशित करून बरीच वर्षे झाली. बाळोजींचे हस्तलिखित अप्रकाशितच आहे. अर्थात संपूर्ण जगनाडे संहिता विचारात घेतली, तरीदेखील तिच्यात महाराजांच्या एकूण अभंगांपैकी निम्म्यापेक्षाही अधिक अभंग दाखल नाहीत.

        सद्यःकालीन प्रचलित गाथ्यांपैकी बरेच गाथा पंढरपूर येथे सिध्द झालेले असून, ते उत्तरकालीन आहेत. त्यामुळे त्यांचे प्रामाण्य शाबीत करू पाहणाऱ्यांना दंतकथांचा व आख्यायिकांचा आधार घ्यावा लागतो. याविषयीचे सविस्तर विवेचन पु. मं. लाड व अ. का. प्रियोळकर यांनी केलेले आहे.

   अशा परिस्थितीत देहू येथेच सिध्द झालेली संहिता महत्त्वाची ठरते, हे उघड आहे. ही संहिता संपूर्ण आणि प्राचीन असेल, तर दुधात साखर पडली, म्हणावी लागेल.

     देहू परिसरात सिध्द झालेली एक संपूर्ण संहिता देहूचे संशोधक ह.भ.प. श्रीधरबुवा मोरे-देहूकर यांच्या संग्रही आहे. ही संहिता तिच्यापेक्षा प्राचीन संहितेची नक्कल असली, तरी एकोणिसाव्या शतकातील असल्याने, तिचे मूल्य तसे कमी वाटत असले, तरी देहू परंपरेतील संपूर्ण अशी एकमेव उपलब्ध हस्तलिखित प्रत असल्याने तिला अमूल्यच मानावे लागेल आणि तिच्यापेक्षा प्राचीन पाठ देणारी हस्तलिखित प्रत उपलब्ध होत नसल्याने, देहू प्रत म्हणून तीच छापली गेली पाहिजे, असा एक पर्याय होता. स्वतः तुकोबांनी स्वहस्ते लिहिलेले अभंग, तुकोबांच्या समकालीनाने किंवा लगतच्या उत्तरकालीनाने लिहिलेले अभंग साडेचार हजारांच्या आसपास मिळत नसल्याने आणि देहूप्रत पुढे येणे हे सांप्रदायिकांच्या व अभ्यासकांच्या दृष्टीने गरजेचे असल्याने, हाही पर्याय अजिबात टाकाऊ होता, असे नाही.

      दुसरे असे, की तुकोबांच्या पश्चात देहू देवस्थान संस्थानमध्ये तुकोबांचे सर्व अभंग समाविष्ट असलेली संहिता (अर्थात अनेक वह्यांमध्ये) उपलब्ध होती. त्यामुळे एका बाजूला आपण मृगजळाच्या पाठी लागलो आहोत, असे म्हणण्याचीही सोय नव्हती. महाराजांच्या वैकुंठगमनानंतर थोडयाच दिवसांनी तुकोबांचा वेध लागलेले कचेश्वर भट ब्रह्मे चाकणकर, अभंग लिहून घेऊन पाठ करावे व त्यांच्या आधारे कीर्तन करावे, या हेतूने तेव्हा खेड मुक्कामी असलेले तुकारामपुत्र नारायणबाबा यांना भेटले. काही अभंग लिहून द्या, अशी विनंती केली. त्यावर नारायणबाबांचे 'अंबाजीचे घर। तेथे जावे। सर्वही संग्रह तुकोबाच्या वह्या। जावे लवलाह्या तुम्ही तेथे॥' असे सांगितले. त्यानुसार कचेश्वर देहूला गेले. अंबाजीला- म्हणजे तुकोबांच्या नातवाला- थोरल्या मुलाचे- महादेवबाबांचे चिरंजीव आबाजीबाबा यांना भेटले व त्यांनी त्यांजकडून अभंग मिळवले.

      इंग्रजी राजवट स्थिर झाल्यावर येथील नवशिक्षित तरुण आपल्या धर्माचा व समाजरचनेचा पुनर्विचार करू लागले. यातूनच दादोबा पांडुरंग यांनी कधी पुढाकार घेऊन, तर कधी मागे राहून, परमहंस सभा, प्रार्थना समाज या चळवळी सुरू केल्या. या चळवळींचे तत्त्वज्ञान सिध्द करताना त्यांना तुकोबांच्या अभंगांचा उपयोग झाला. दरम्यान १८५८ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हाचे डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन सर अलेक्झांडर ग्रँट व गव्हर्नर सर बार्टल फ्रिअर सुज्ञ व उदारमतवादी होते. ग्रँट साहेबांनी तुकाराम महाराजांचे अभंग वाचले, तेव्हा ते चकितच झाले व ते त्यांची स्तुती करू लागले. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शंकर पांडुरंग पंडित ही मातब्बर मंडळी ग्रँटचे विद्यार्थी. तुकोबांचा महिमा त्यांनी आपल्या गुरूकडून ऐकलेला. शिवाय दादोबा आणि त्यांचे परमहंस सहकारी तेच सांगत होते. त्यामुळे या नवपदवीधरांमध्ये तुकारामविषयक आकर्षण निर्माण झाले व तुकोबा त्यांच्या प्रार्थना समाजाचे केंद्र बनले. दरम्यान प्रसिध्द कायदेपंडित विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी गणपत कृष्णाजींच्या छापखान्यातून गाथ्याची पूर्ण आवृत्ती पंढरपूर प्रतीवरून प्रसिध्द केली.

       महाराष्ट्राच्या सुशिक्षितांमधील वातावरण अशा प्रकारे तुकाराममय होत असताना इंदुप्रकाश प्रेसचे जनार्दन सखाराम गाडगीळ यांनी गाथा छापायचे ठरवले व मुंबई सरकारकडे आश्रय मागितला. ग्रँट साहेबांच्या शिफारशीवरून सरकारने २४००० रुपये मान्य केले. संस्कृत, प्राकृत, ग्रीक, लॅटिनचे जाणकार शंकर पांडुरंग पंडित आणि विष्णु परशुराम पंडित यांच्याकडे संपादनाची जबाबदारी टाकण्यात आली. १८६९ १८७३ मध्ये हा गाथा दोन भागांत प्रकाशित झाला.

      पंडितांनी संपादनासाठी देहू, तळेगाव, पंढरपूर व कडूस येथील प्रती वापरल्या. पैकी देहू हस्तलिखित त्यांना तुकाराम महाराजांच्या तत्कालीन वंशजांकडून प्राप्त झाले. हे हस्तलिखित वंशजांकडे परंपरेने आलेले असून, ते महाराजांचे ज्येष्ठ पुत्र महादेवबाबा यांच्या हातचे असल्याचे संपादकांना सांगण्यात आले. तळेगाव प्रत ही त्र्यंबक कासार यांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस केलेली देहू प्रतीची व्यवस्थित नक्कल होती.

     पंडितद्वयीने संपादनासाठी देहूहून नेलेले महादेवबाबांच्या हातचे हस्तलिखित देहूला परत आलेच नाही. त्यामुळे परंपरेवर विश्वास ठेवून सदर हस्तलिखित महादेवबाबांच्या हातचे मानायचे नाही, असे ठरवले, तरी हे हस्तलिखित प्राचीनतम व पारंपरिक, महाराजांच्या घरातलेच असल्याने त्याच्या विश्वसनीयतेसंबंधी शंकाच उरत नाही.

        प्रस्तुत गाथा प्रसिध्द झाल्यानंतर वारकऱ्यांना तो मान्य होणे साहजिकच होते. तत्कालीन प्रसिध्द वारकरी कीर्तनकार ह.भ.प. भाऊसाहेब काटकर यांचे शिफारसपत्र गाथ्याला जोडले आहे. ते प्रातिनिधिक समजायला हरकत नाही. नंतर पंढरपूरमधील महंतमठपतीच आपापल्या पोथ्या घेऊन प्रकाशनाच्या व्यवहारात उतरल्यावर वारकऱ्यांमध्ये प्रस्तुत गाथा काहीसा मागे पडणे स्वाभाविकच समजायला हवे.

        अर्थात प्रस्तुत इंदुप्रकाश किंवा पंडिती गाथा अंतिमतः देहू येथील हस्तलिखितावर आधारित असला, तरी तो देहू प्रतीची यथाशब्द छपाई नाही. पंडित आधुनिक विद्येत पारंगत असल्याने त्यांनी देहूप्रत सरळ छापण्याऐवजी त्यांना उपलब्ध झालेल्या हस्तलिखित पोथ्यांवरून तुकाराम-गाथ्याची चिकित्सक किंवा पाठशुध्द आवृत्ती सिध्द करण्याचे ठरवले. उपलब्ध हस्तलिखितांमधील जे पाठ त्यांना शुध्द वाटले, ते स्वीकारून त्यांनी त्यांचा समावेश मुख्य संहितेत केला. जे पाठ त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अस्वीकार्य वाटले, ते त्यांनी स्वीकृत पाठांवर आकडे टाकून तळटीपांमधील त्याच आकडयांपुढे पाठभेद म्हणून छापले. ते कोणत्या हस्तलिखितात आढळले, याचाही उल्लेख केला.

       तुकाराम-गाथ्याची संशोधित आवृत्ती म्हणून पंडिती प्रतीचे स्थान व मूल्य काय, हा वेगळा प्रश्न आहे. परंतु इतिहासाचार्य राजवाडयांसारख्या चिकित्सक शिरोमणीने त्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली, तर त्यांचेच शिष्य म्हणविणाऱ्या भाव्यांनी त्यावर टीकेची झोड उठवली.

     संशोधितचिकित्सक संहितेचे म्हणून एक महत्त्व असते, हे निदान ज्यांना महाभारताच्या भांडारकर प्रतीची माहिती आहे, त्यांना सांगायला नको. पण प्रत्येक संहितेचे सुध्दा स्वतंत्र स्थान व महत्त्व असते, हेही विसरता कामा नये. विशेषतः गाथ्याला आधारभूत ठरलेल्या देहू संहितेचे, ती देहूत सिध्द झालेली, स्वतः तुकोबांच्या उच्चारशैलीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिचित असलेल्यांनी सिध्द केलेली व उपलब्ध संपूर्ण संहितांमधील सर्वांत प्राचीन असल्यामुळे तर अनेक अंगांनी वैशिष्टयपूर्ण ठरते.

      संपादक, प्रकाशक, मुद्रक यांनी त्यांना उपलब्ध झालेल्या हस्तिलिखितांपैकी देहू व तळेगावची हस्तलिखिते मूळ मालकांस परत न करता गहाळ केली, या त्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल त्यांना बोल लावण्यात आता अर्थ नाही. 'यद् गतं तद् गतं' एवढेच म्हणून त्याविषयी शोक करण्याने काही निष्पन्न होणार नसल्यामुळे तो मुद्दा सोडून देऊ. (पंढरपूर प्रत म्हणजे गणपत कृष्णाजीचा छापील गाथा. कडूस प्रतीचे मालक देहूकरांपेक्षा चतुर असल्याने त्यांनी संपादनाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच आपले हस्तलिखित परत नेले.) उलट, शंकर पांडुरंग आणि विष्णु परशराम या पंडितांचे आभार यासाठी मानायला हवेत, की त्यांनी अस्वीकार्य वाटलेले देहूप्रतीतील पाठ तळटीपांत नोंदवले. कारण त्यामुळे या तळटीपांमधील संपादकांनी न स्वीकारलेल्या पाठांची त्यांची मुख्य संहितेतील मूळ ठिकाणी पुनःस्थापना करून देहू संहितेची पुनर्रचना करणे शक्य होते. तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाच्या त्रिशतकोत्तर सुवर्णसोहळावर्षाचे निमित्त साधून देहू देवस्थान प्रकाशने करीत असलेला प्रस्तुत गाथा म्हणजे पंडितीप्रतीवरून सिध्द करण्यात आलेली देहू संहितेची पुनर्रचना किंवा पुनःस्थापना होय. हा काहीसा उलटा प्रवास आहे. संशोधित प्रतीचे निस्संपादन करून मूळ प्रतीचे केलेले पुनःसंपादन आहे. पण ते आवश्यक होते व त्याला दुसरा पर्याय नव्हता, इलाजही नव्हता.

     अर्थात हे काही यांत्रिकपणे केलेले तांत्रिक काम नव्हे. तळेगाव, पंढरपूर व कडूस येथील संहिताही महत्त्वाच्या आहेत. त्यांत निर्माण झालेले पाठभेद म्हणजे निव्वळ प्रमाद अशी आमची भूमिका नाही. देहू प्रतीतही हस्तदोष, नजरचुका यांमुळे घोटाळे होणे शक्य होते. तसेच, अन्य संहितांचे कर्तेही आपापल्या परीने जबाबदारीनेच काम करीत होते. तेव्हा ज्या ठिकाणी देहू प्रतीतील पाठ भाषिक, तात्त्वि, सामाजिक, ऐतिहासिक, इ. बाजूंनी विचार केला असता, निःसंशयपणे निरर्थक किंवा असंभाव्य वाटले, तेथे इतर प्रतींमधील पाठ आदरपूर्वक स्वीकारले आहेत. या प्रक्रियेत आमची निवड शंभर टक्के अचूक व आक्षेपातीत आहे, असा आमचा दावा नाही, ही प्रक्रिया कधीही न संपणारी आहे.

      प्रश्न केवळ पाठभेदांचाच नाही. कोणताही अभंगगाथा हे एक संकलन-संपादन असते. गाथा म्हणजे जाणीवपूर्वक ठरवून केलेली प्रकरणवार ग्रंथरचना नव्हे. प्रत्येक अभंग हा एक स्वतंत्र एकक (unit) म्हणून वाचून, त्याचा अर्थनिर्णय करता येतो व बहुतेकांचा कल त्याकडेच असतो.

     पण हे काही एवढे सरळ-सोपे प्रकरण नाही. तुकोबांचे अभंग सहजस्फूर्त असत. पण ते एखाद्या विवक्षित प्रसंगाला अनुलक्षून एकापेक्षा अधिक अभंगही रचीत. अशा वेळी हे सर्व अभंग एकमेकांशी आंतरिकरीत्या संबध्द असल्याने त्या सर्वांचा मिळून एक गट होई. या गटातील अभंगांचा क्रम अथवा ओळही तितकीच महत्त्वाची. अर्थनिर्णयाच्या दृष्टीने ही बाब फार महत्त्वाची.

      महाराजांच्या अभंगांच्या देहू प्रतीच्या संपादकांना, ते देहूचेच असल्यामुळे कालदृष्टया तुकोबांना अधिक जवळचे असल्याने तुकारामचरित्र चांगले अवगत होते. महाराजांनी कोणत्या प्रसंगी, किती अभंग, कोणत्या क्रमाने रचले, याचीही माहिती त्यांना बरीच होती. नसल्यास बुजुर्गांकडून मिळण्याचीही शक्यता होती. त्यांनी हे काम गंभीरपणे व कष्टपूर्वक केलेले दिसते. संहितेत अनेक ठिकाणी अभंगांचे गट आकडे टाकून निश्चित केले आहेत. कितीतरी गटांना अनुरूप शीर्षके देण्यात आलेली आहेत. कालांतराने संहितीकरणाचे केंद्र देहूहून पंढरपूरला गेल्यावर ही जाणीवच लुप्तप्राय झाली व महाराज मंडळींनी मूळ ओळींत ढवळाढवळ करून कीर्तनाची सोय वगैरे आनुषंगिक बाबी पुढे ठेवून अभंगांची आपापल्या बुद्ध्यनुसार वर्गीकरणे केली. देहूप्रत ही या ढवळाढवळीपासून मुक्त असल्याने सर्वश्रेष्ठ प्रत आहे.

    पंडिती प्रतीत दुबार आलेले अभंग प्रस्तुत प्रतीत एकदाच घेण्यात आलेले आहेत. प्रचलित पंढरपूरकेंद्रित प्रतींपेक्षा या प्रतीत जास्त अभंग आहेत. पंडितांनी घेतलेले काही अभंग वगळण्याची वेळ एकदाच आली. तिचा खुलासा करणे भाग आहे.

॥शिवाजी राजे यांचे स्वामीस अबदागिरी घोडा,

कारकून असे न्यावयास पाठविले, ते अभंग॥'

    या मथळयाखाली पंडिती प्रतीत १४ अभंग येतात. त्यांतील अभंग पंढरपूर प्रतीत व वारकऱ्यांमध्ये प्रचलित असलेल्या अन्य प्रतींत सापडतात. पंडिती प्रतीतील अतिरिक्त 5 अभंग प्रस्तुत गाथ्यात आम्ही वगळले आहेत. हे अभंग सरळ सरळ उत्तरकालीन प्रक्षेप आहेत. अशा प्रकारचे प्रक्षेप होण्याचे एक कारण म्हणजे मूळ वहीत कोरी राहिलेली पाने.

      उपर्युक्त पाच अभंगांतील (महाराष्ट्र शासनाची आवृत्ती, अभंग क्रमांक १८८६-१८९०) तुकाराम महाराजांचे स्वतः विषयीचे उल्लेख त्यांच्या स्वरूपाशी व विचारांशी विसंगत आहेत.

     परंतु हा काही आमच्या व्यक्तिनिष्ठ धारणेचा भाग नव्हे. तुकाराम महाराज शिवरायांना रामदासांकडे जायला सांगत असतील, तर त्याला आम्ही कोण हरकत घेणार ? पण ऐतिहासिक वस्तुस्थिती अशी आहे, की इ. स. १६५० पर्यंत रामदास कृष्णाकाठी नुकतेच येऊन, दाखल होऊन, कार्य करू लागले होते व त्यांची माहिती फारशी कोणाला असण्याची शक्यता नव्हती. त्यांना मानमान्यताही मिळाली नव्हती. उलट, तुकोबा प्रसिध्दीच्या आणि सन्मानाच्या शिखरावर होते. अशा परिस्थितीत ते स्वतःची अशी निंदा करीत शिवबांना विन्मुख पाठवतील, हे शक्य नाही.

     पण मुद्दा केवळ शक्यतेचाही नाही. ज्या कोणी रामदासभक्ताने हेतुतः किंवा सद्भावनेने (good faith) हे अभंग रचले, तो इतिहासविषयक पूर्ण अडाणी असल्यामुळे त्याने या अभंगांमध्ये अष्टप्रधानांचा उल्लेख करताना प्रतिनिधी, राजाज्ञा अशा शिवोत्तर काळातील अधिकाऱ्यांचा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे, १६५० पर्यंत ज्याला शिवरायाचे नावही माहीत असणे सुतराम् शक्य नव्हते, तो भूषण कवी शिवदरबारात आणून बसवला आहे आणि सुमंत व डबीर ही एकाच पदाची दोन भाषांमधील दोन नावे असली; तरी ती दोन स्वतंत्र अधिकाऱ्यांची पदनामे मानली आहेत. त्यातही मौज अशी, की शिवराज्यभिषेकापर्यंत प्रचलित असलेल्या डबीर या फारशी भाषेतील शब्दाला सुमंत हा पर्याय राज्यव्यवहारकोशामुळे त्यानंतर प्रचलित झाला. रामदासभक्तांनी भूषण कवीप्रमाणे राज्यव्यहारकोशकर्ते रघुनाथपंत यांनाही १६५० पूर्वी पुणे परिसरात दाखल करण्याचा चमत्कार केला आहे.

     अर्थात या प्रसिध्द रचना रामदासभक्तांच्या असल्या, तरी त्यांचा समावेश देहू वा तळेगाव प्रतीत करण्याचे काम मात्र त्यांचे नव्हे. त्याच्या निदान दोन शक्यता आहेत. ) देहू प्रतीची नक्कल करणारे त्र्यंबक कासार यांनी एखाद्या रामदासी बाडातून हे अभंग आपल्या (तळेगाव) प्रतीत समाविष्ट केले असतील. तेथून ते मूळ देहू प्रतीत नकलून घेण्यात आले असतील. देहू प्रतीत मुळाला सोडून वेगळया पाठांचा समावेश (मूळ पाठ खोडून) झालेले दिसून येतात. हे उत्तरकालीन देहूकरांचे काम होय. ) अशाच एखाद्या उत्तरकालीन देहूकराने उपर्युक्त रामदासी प्रक्षेप देहू प्रतीत सामावून घेतले असतील. तिथून ते त्र्यंबक कासाराच्या वहीत नकलले गेले.

      मुळात रामदासी संप्रदायातच या अभंगांची निर्मिती कशी झाली, याचा उलगडा करणेही फारसे अवघड नाही. मल्हार रामराव चिटणीस हे शिवशाहीचे बखरकार अठराव्या-एकोणिसाव्या शतकाच्या संधिकाळात होऊन गेले. त्यांचा रामदासांच्या संप्रदायाशी निकट संबंध होता. खुद्द सांप्रदायिक बखरकार हनुमंतस्वामी आणि चाफळ संस्थानाधिकारी रंगो लक्ष्मण मेढे व चिटणीस हे एकत्र लिखाण करीत. हनुमंतस्वामीच्या रामदासांच्या बखरीची वाढीव दुसरी आवृत्ती स्वामींच्याच आज्ञेवरून चिटणीस व मेढे यांनी तयारकेली.

      शासकीय प्रतीतील उपर्युक्त अभंग चिटणीसांच्या बखरीत शिवाजीत्तुकाराम भेटीचा प्रसंग सांगताना येतात, हे सांगितले, म्हणजे या प्रक्षेपांचा वेगळा उलगडा करायची गरज नाही. चिटणीस, हनुमंतस्वामी व कदाचित मेढे यांनी भेटीचे वर्णन करताना बहुधा हे अभंग रचले असावेत. अर्थात त्यात आपण काही गैर करत आहोत, असे त्यांना वाटायचे काही कारण नव्हते. त्यांनी केले, ते प्रामाणिकपणे व रामदासांचा महिमा वाढविण्यासाठी. ही घटना खरोखर घडली व तुकोबांनी शिवरायांना रामदासांकडे जायला सांगितले, ही त्यांची प्रामाणिक समजूत होती. तिच्या पोटी त्यांनी हे केले. तुकोबांनी शिवरायांना गद्यात उपदेश करण्याऐवजी अभंगांत करणे अधिक सयुक्तिक वाटल्याने त्यांची गद्याऐवजी पद्य अभंग करून ते मूळ अभंगांची ओळ विस्कळीत करून त्यांच्यांत मध्येच घुसडले. पण त्यामुळे वृत्तविसंगती निर्माण होते, ओघ बिघडतो, हे त्यांच्या लक्षात आले नाही. परंतु साताऱ्याच्या दरबारात प्रचलित असलेली, पण शिवकाळात मुळातच नसलेली अधिकारपदे त्यांची अडाणीपणे अभंगांत आणली. अर्थात त्यांच्या अडाणी प्रामाणिकपणामुळेच प्रस्तुत प्रक्षेप ओळखणे शक्य झाले. असो.

सौजन्य : श्री तुकाराम महाराज देवस्थान, देहू ४१२१०९.