Font Problem

     
 
प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ

तुकाराम महाराज आणि महात्मा गांधी 

- सचिन परब

   

 

    चले जाव, करेंगे या मरेंगे, हे राम... अशा साधासुध्या शब्दांना वेदमंत्रांहून मोठं प्रामाण्य भारतवर्षात मिळालं. कारण त्यामागे मोहनदास करमचंद गांधी या साध्यासुध्या दिसणाऱया महापुरुषाच्या संतपणाचं सामर्थ्य होतं. हे संतपण आलं होतं ते खरयाच्या प्रयोगातून आणि संस्कारातून. देशोदेशींचे, पिढ्यानपिढ्यांचे संस्कार रिचवून असं सामर्थ्य उभं राहतं. त्यात एक संस्कार मराठी माती घडवणाऱ्या तुकाराम महाराजांचाही होता.

     आपल्या मराठी मनांवर कळत नकळत असा संस्कार होत असतो. पण रिचवण्या आणि पचवण्याआधीच तो संस्कार कापरासारखा उडून जातो. मात्र गांधीजींनी तुकोबारायाचे संस्कार कसे पचवले होते, ते समजून घेण्याचा सोपा मार्ग आहे. गांधीजींनी तुकोबांच्या सोळा अभंगांचे भाषांतर वाचण्याचा. गांधीजींच्या भाषांतरात साहेबाचा भाषेचा, त्या भाषेच्या संपूर्णपणे वेगळ्या पार्श्वभूमीचा कोणताही अडथळा न होता तुकोबांचे विचार जसेच्या तसे वाचकांपर्यंत पोहचतात. लेखक आणि भाषांतरकारातलं असं अद्वैत क्वचितच अनुभवायला मिळतं. दोन सच्च्या वैष्णवांमधलं हे अद्वैत.

    विशेष म्हणजे गांधीजींनी मराठी मातीत बसून हे लिहिलंय. हे भाषांतर त्यांनी येरवडा तुरुंगात म्हणजे त्यांच्या शब्दांत येरवडा आश्रमात बंदी असताना केलंय. त्यांच्या सगळ्या सोळा अभंगाचं भाषांतर आता एकामागून एक रोज देणार आहोत. त्यानंतर संतपरंपरेतल्या आणखी काही अभंगांची भाषंतरे आम्ही वारी संपेपर्यंत सादर करणार आहोत.

    आज त्यातला पहिला अभंग गाधीजींचा सर्वाधिक आवडता अभंग. भाषांतराची तारीख आहे, १६ ऑक्टोबर. आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रांत त्यांनी या अभंगाचा उल्लेख केला आहे. त्यांना या अभंगांमध्ये आपली तीन माकडे दिसत असत...

पापांची वासना नको दांवू डोळा l त्याहुनि आंधळा बराच मी ll

निंदेचे श्रवण नको माझे कानी l बधिर करोनि ठेवी देवा ll

अपवित्र वाणी नको माझ्या मुखा l त्याजहुनि मुका बराच मी ll

नको मज कधी परस्त्रिसंगती l जनांतुन मातीं उठता भली ll

तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा l तू एक गोपाळा आवडसी ll

O God, let me not be witness to desire for sin, better make me blind;

Let me not hear ill of anyone, better make me deaf;

Let not a sinful word escape my lips, better make me dumb;

Let me not lust after another's wife, better that I disappear from this earth.

Tuka says: I am tired of everything worldly, Thee alone I like, O Gopal.

      संत नामदेवांनी भागवतधर्माची पताका अटकेपार लावली.  संपूर्ण भारतभर त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीची मोहर उमटवली. गुजरातही त्याला अपवाद नव्हता. गुजराततेतल्या वैष्णव संतावंर नामदेवांचा प्रभाव स्पष्ट आहे. सर्वात प्रसिद्ध गुजराती संतकवी नरसी मेहतांच्या काव्यात तर नामदेवांचा उल्लेख अनेकदा येतो. ज्याने नामदेवासाठी दूधभात खाल्ला. ज्याने नामदेवासाठी मंदिर फिरवले असे भगंवताचे वर्णन त्यांनी केले आहे.

            नरसी मेहतांच्या भक्तिकाव्याने सबंध गुजरातेवर प्रभाव टाकलाय. धामिर्क वैष्णव कुटुंबात जन्मलेल्या गांधीजींवरही त्याचा प्रभाव होता. विशेषत: नरसींच्या 'वैष्णव जन तो...' ने तर त्यांच्यावर लहानपणापासून गारूड केलं होतं. गांधीजींचा ध्यास नरसींनी वर्णन केलेला खरा वैष्णव बनण्याचाच होता.

      त्यामुळे गांधीजींनी तुकाराम गाथा हाती घेतली असेल तेव्हा त्यांना 'जे का रंजले गांजले' हा अभंग सर्वात आधी आपला वाटला असावा. गांधीजींनी आपल्या अनुवादातही सर्वात वरचे स्थान याच अभंगाला दिले आहे.

      शाळेतल्या निबंधपासून प्रमुख पाहुण्याच्या वापरून गुळगुळीत झाला असला तरी पुन्हा एकदा मूळातून वाचायला हवा. 'आपल्या नोकरचाकरांवर मूलासारख प्रेम करणारा तोच खरा साधू' अशी रोकडी व्याख्या त्यात आहे. आनंदाची गोष्ट ही इथे ही व्याख्या आणि त्याचा अनुवाद हे शब्दांचे बुडबुडे नाहीत. दोन्ही महात्म्यांनी हे शब्द आपल्या जीवनात उतरवून दाखविलेत.

जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपले ।। १।।

तोची साधू ओळखावा ।। देव तेथे चि जाणावा ।।धृ.।।

मृदू सबाह नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ।। २।।

ज्यासि अंपगिता नाही । त्यासि घरी जो हृदयी ।। ३।।

दया करणे जे पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ।। ४।।

तुका म्हणे सांगू किती । तो चि भगवंताची मूर्ती ।। ५।।

Know him to be a true man who takes to his bosom those who are in distress. Know that God resides in the heart of such a one. His heart is saturated with gentleness through and through. He receives as his only those who are forsaken. He bestows on his man servants and maid servants the same affection he shows to his children. Tukaram says: What need is there to describe him further? He is the very incarnation of divinity.

    गांधीजी आणि आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचा प्रवास एकाच दिशेने पण समांतर झाला. आंबेडकरवाद्यांनी गांधीजींना समजून घेतले नाही आणि गांधीवाद्यांनी आंबेडकरांना. दोघांचा वारसा सांगणाऱ्या पुढाऱ्यांनी या दोघांना एकत्र आणलं ते फक्त राजकीय फायद्यासाठी. अन्यथा या दोन्ही विचारधारा जवळही येऊ नयेत म्हणून डोळ्यात तेल घालून प्रयत्न केले.

    असे कितीही प्रयत्न केले असले, तरी अनेक बाबतीत गांधी आणि आंबेडकर एकमेकांची गळाभेट अनेकदा झालीय. तुकाराम त्यातली एक गोष्ट. स्वत:ला 'यातिहीन' म्हणणारा आणि विद्रोहाची पताका उंचावणारा तुकाराम आंबेडकरांना आपलासा वाटलाच. पण तितकाच 'विष्णुदास' असणारा आणि पदोपदी संतसंग मागणारा तुकाराम गांधीजींना आवडणे तितकेच स्वाभाविक होते.  आपण दोघांच्याही पूर्वपरंपरेत शोभून दिसणारा तुकाराम समजून घेऊया. एकदा ते झाले की गांधी आणि आंबेडकर दोघेही आरशासारखे समोर दिसू लागतील.

महारासि सिवे। कोपे ब्राम्हण तो नव्हे।।

तया प्रायश्चित्त कांही। देहत्याग करितां नाही।।

नातळे चांडाळ। त्याचा अंतरी विटाळ।।

ज्याचा संग चित्ती। तुका म्हणे तो त्या याती।।

He who becomes enraged at the touch of a Mahar is no Brahmin.

There is no penance for him even by giving his life.

There is the taint of untouchability in him who will not touch a Chandal.

Tuka says: A man becomes what he is continually thinking of.

     नंतरच्या काळात सर्वोदयीचे  आश्रमातल्या प्रार्थना, भजन हे सारे माणसं घडवण्याचेच प्रयोग होते. स्वत: मोहनदासाचा महात्मा बनण्याचा प्रवासही अशाच प्रयोगांचा होता. प्रयोग, सत्याचे प्रयोग. साधन स्वत:, साधक स्वत: आणि साध्यही स्वत:चंच. तुकारामही असेच आतआत डोकावत सत्यापर्यंत पोहोचलेले. भगवंताच्या भेटीसाठी स्वत:च धावायचं, स्वत:च पडायचं, स्वत:च स्वत:ला हुरूप द्यायचा आणि स्वत:च स्वत:ला घडवायचं. तुकारामांचा कोणी गुरु नाही. गांधीजींचही तसंच. त्यांनी अनेकांचा गुरु म्हणून उल्लेख केला, पण फुलटाइम गुरु त्यांनाही नव्हता.

     तसं पाहिलं, तर सद्विचार हेच या दोघांचे मार्गदर्शक होते. हे विचार जीवनात उतरवण्यासाठी दोघांनीही आटापिटा केला. विचार जीवनात उतरविणं हेच ज्ञान असतं. सॉक्रेटिस याविषयी ठाम सांगतो , virtue is knowledge असे विविध सद्विचार गांधीजींनी आश्रम भजनमाला मध्ये एकत्र आणले आहेत. आजचा अभंग संतपणाबद्दलचा.

नाहीं संतपण मिळतें हें हाटीं। हिंडतां कपाटीं रानींवनीं ।।

नये मोल देतां राशी । नाहीं तें आकाशीं पातळीं तें।।

तुका म्हणे मिळे जिवाचियें साठीं । नाहीं तरीं गोष्टी बोलों नये ।।

Saintliness is not to be purchased in shops nor is it to be had for wandering nor in cupboards nor in deserts nor in forests. It is not obtainable for a heap of riches. It is not in the heavens above nor in the entrails of the earth below. Tuka says: It is a life’s bargain and if you will not give your life to possess it better be silent. 24-10-1930

            पावन देश कोणता, तुकाराम महाराज म्हणतात, जेथे हरिचे दास जन्म घेतात तो. त्या अर्थाने महाराष्ट्र आणि सौराष्ट्र हे दोन्ही प्रदेश अती पावन. संतांची मांदियाळी दोन्हीकडे बहरली. गांधीजी सौराष्ट्रातलेच. दुदैर्व हे की सौराष्ट्रातली जातीची उतरंड अजूनही पूर्णपणे ढळलेली नाही. तुकारामांनंतर शंभर वर्षांतच देहू ते पंढरीच्या वाटेत असणाऱ्या पुण्यात अस्पृश्यांना थुंकण्यासाठी गळ्यात गाडगी बांधावी लागली.

    पण म्हणून भागवत धर्माने केलेल्या क्रांतीचं महत्त्व कमी होत नाही. महाराष्ट्रात अशी एकही जात नव्हती ज्यात त्याकाळी एकही संत झाला नाही. तुकोबांनी आपल्या अभंगात या संतांची जातवार यादीच दिली आहे. हा एक सामाजिक दस्तावेजच आहे. ज्ञानदेवे रचिला पाया... तुका झालासे कळस या बहिणाबाईंच्या अभंगा इतकाच मोलाचा.भारतीय इतिहासातील एका मोठ्या सामाजिक क्रांतीचा हा सज्जड पुरावा आहे. गांधीजींनी अनुवादासाठी हा अभंग निवडला नसता तरच नवल. त्यांनी उभ्या केलेल्या स्वातंत्र्य संगरातही अशीच समाजाच्या प्रत्येक घटकांत त्यांना जागृती अपेक्षित होती. काही प्रमाणात ती सफलही झाली. दोन्ही क्रांत्या अस्सल भारतीय मातीतल्या होत्या. दोन्ही तत्त्वज्ञानांचं अधिष्ठान भक्ती होतं. परिभाषा ही आध्यात्मिक होती, भारतीयांच्या मनात रूजलेली. त्यामुळेच वेदांचा हवाला देत जाती-धर्म नाकारण्यात विरोधाभास उरला नाही...

पवित्र तें कुळ पावन तो देश। जेथें हरिचे दास घेती जन्म।।

कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक।।

वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं।।

अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं।।

वैश्य तुळाधार गोरा कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ।।

कबीर मोमीन लतिब मुसलमान। शेणा न्हवी जाण विष्णूदास।।

काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु। भजनीं अभेदू हरिचे पायीं।।

चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सवेर्श्वर ऐक्य करी ।।

नामयाची जनी कोण तिच भाव ।  जेवी पंढरीराव तियेसवें।।

मैराळ जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों।।

यातायातीधर्म नाहीं विष्णूदासा ।  निर्णय हा ऐसा हा वेदशास्त्रीं।।

तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ। तारिले पतित नेणों किती।।

Blessed is that family and that country where servants of God take birth. God becomes their work and their religion. The three worlds become holy through them. Tell me who have become purified through pride of birth? The Puranas have testified like bards without reserve that those called untouchables have attained salvation through devotion to God. Tuladhar, the Vaishya, Gora, the potter, Rohidas, a tanner, Kabir, a Momin, Latif, a Muslim, Sena, a barber, and Vishnudas, Kanhopatra, Dadu, a carder, all become one at the feet of God in the company of hymn singers. Chokhamela and Banka, both Mahars by birth, became one with God. Oh, how great was the devotion of Jani the servant girl of Namdev! Pandharinath (God) dined with her. Meral Janak’s family no one knows, yet who can do justice to his greatness? For the servant of God there is no caste, no varna, so say the Vedic sages. Tuka says: I cannot count the degraded.

      नामजपाला भारतीय अध्यात्म आणि तत्त्वज्ञानात मोठी जागा मिळाली आहे. भगवत्भक्तीच्या या पहिल्या पायरीबद्दल संतसाहित्यात सर्वाधिक लिहिले गेलंयं. विशेष म्हणजे सामाजिक दृष्टी असलेल्या संतांनी आणि वेदांताचा पुरस्कार करणाऱ्या नव्याजुन्या तत्त्ववेत्त्यांनीही नामजपला प्राधान्य दिले आहे.

     तुकाराम महाराजांनी अनेक अभंगांमध्ये याच नामजपाचं महात्म्य गायले आहे. आजचा अभंगही त्यातलाच एक. हा अभंग सांगतो, विठोबाला शरण जाणं आणि त्याच्या नामाचा जप करणं हेच सगळ्या ज्ञानाचे सार आहे. मात्र लोक यापैकी पहिला भाग सोडून केवळ दुसरा दर्शनी सोपा वाटणारा नामजपाचाच मार्ग उचलतात. त्यामुळे देवाचिये द्वारी क्षणभरच काय तासंतास उभं राहूनही अधीर्मुर्धी मुक्तीही मिळत नाही.

    गांधीजींनी अनेकदा रामनामाचा महिमा सांगितला आहे. त्यांच्या या श्रद्धेविषयीचे काही प्रसंगही आहेत. एवढंच नाही तर शेवटचा श्वास घेतानाही त्यांच्या मुखी रामनामच होतं.

वेद अनंत बोलला । अर्थ इतकाचि शोधिला ।।

विठोबासी शरण जावे । निजनिष्ठ नाम गावें ।।

सकळशास्त्रांचा विचार ।अंति इतकाचि निर्धार ।।

अठरापुराणी सिद्धांत । तुका म्हणे हा चि हेत ।।

The essence of the endless Vedas is this:

Seek the shelter of God and repeat His name with all thy heart.

The result of the cogitations of all the Shastras is also the same;

Tuka says: The burden of the eighteen Puranas is also identical.

     'कसं जगायचं, कसं वागायचं' या विषयावरच सर्वाधिक आणि सवोर्त्तम चिंतन भारतात झालं. दुदैर्व हेच आयतेपणाला मिळालेल्या फाजील प्रतिष्ठेमुळे या सगळ्या चिंतनाचे वाटोळे झाले. कर्मसिद्धांत, कर्मकांड यांना तर अकर्मण्यतेसाठी पूरेपूर वापरून घेण्यात आलं.

    'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' चही तेच झालं. वास्तविक हे समर्पण आणि भगवतनिष्ठेच्या परमावधीचे तत्त्वज्ञान आहे. मी भगवंताचे काम करीन, तर माझा चरितार्थ तोच चालवेल असा विश्वास सांगणारं हे तत्त्वज्ञान. हे जीवनात उतरवणही महाकर्मकठीण.

    भारतीय तत्त्वज्ञानावरची राख झटकताना संतांनी प्रामुख्याने कर्मयोगाचाच अंगार फुलवला. कबीर, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, चोखामेळा यांनी शिकवला तो आत्मगौरवातून उभा राहणारा कर्मवादच. गेल्या शतकातही विवेकानंद, टिळक, अरविंद, गांधीजी, विनोबा, गाडगेबाबा यांनीही हाच कर्मयोग वेगवेगळ्या परिभाषेत मांडला. 

            तुकारामांनी या अभंगात आपल्या नेहमीच्य पद्धतीने रोकडा कर्मवाद मांडला आहे. योग्य अयोग्य हे असं आहे. आता तुम्हीच काय करायचं ते ठरवा असं सांगणारा हा तुकोबाचा कर्मवाद... आणि गांधीबाबाचाही.

पुण्य पर उपकार पाप ती परपीडा । आणिक नाही जोडा दुजा यासी ।।

सत्य तो चि धर्म असत्य ते कर्म । आणिक हे वर्म नाही दुजे ।।

गति ते चि मुखी नामाचे स्मरण । अधोगती जाण विन्मुखते ।।

संताचा संग तो चि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ।।

तुका म्हणे उघडे आहे हित घात । जयाचे उचित करा तैसे ।।

Merit consists in doing good to others, sin in doing harm to others.

There is no other pair comparable to this.

Truth is the only religion (or freedom); untruth is bondage,

there is no secret like this.God’s name on one’s lips is itself salvation,

disregard (of the name)know to be perdition.

Companionship of the good is the only heaven,studious indifference is hell.

Tuka says: It is thus clear what is good and what is injurious, let people choose what they will.

    गांधीजींना मराठी येत होतं का, बहुधा नव्हतंच. महाराष्ट्रात त्यांचं अनेक वर्षाचं वास्तव्य, मराठीचं गुजराती-हिंदी-संस्कृतशी असलेलं साम्य यामुळे त्यांना निदान मराठी कळत असावं, असं  मानता येईल. असं असतानाही त्यांनी तुकारामांच्या गाथेमधल्या शेकडो अभंगांमधून अवघे सोळा अभंगांची केलेली निवड निव्वळ अप्रतिम आहे.

     तुकारामांच्या अभंगांचे अनुवाद आश्रम भजनावलीसाठी आहेत.  त्यातून गांधीजींचं सगळं तत्त्वज्ञान आणि संस्कार स्पष्ट होतात. गांधीजींनी आपले वाटतील ते ते अभंग यात निवडले आहेत. त्यामुळे तुकोबांच्या अभंगांची निवड एवढी उत्तम झाली असावी.

            अर्थात या अभंगांचे अर्थ समजून घेण्यासाठी त्यांना अनेकांची मदत झाली असेलच. महादेवभाई देसाई, स्वामी आनंद, काका कालेलकर, विनोबा, किशोरीलाल मश्रूवाला या गांधीजींच्या सगळ्या सावल्यांना मात्र मराठी उत्तम येत होतं. त्यापैकी काहीजण अनुवादाच्या प्रसंगी येरवड्यालाही सोबत होते. पण त्यांनी शब्दांचे अर्थ सांगितले असतील, या हृदयीचे त्या हृदयीपर्यंत पोहोचलेला भाव ट्रान्स्लेट होण्यासाठी हवं असतं अद्वैत. ते या दोन महात्म्यांमध्ये निश्चित होतं.

            लगेच आठवणारे तुकारामांचे बहुतेक अभंग या सोळा अभंगांमध्ये सापडतात ते उगाच नव्हे! उदाहरणार्थ पुढे गाणं म्हणून गाजलेला, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हा अभंग.

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हात धरुनिया ।।

चालो वाटे आम्ही तुझाचि आधार । चालविसी भार सवे माझा ।।

बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केलो देवा ।।

अवघे जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ।।

तुका म्हणे आता खेळतो कौतुके ।जाले तुझे सुख अंतर्बाही ।।

Wherever I go, Thou art my companion.

Having taken me by the hand Thou movest me.

I go alone depending solely on Thee.

Thou bearest too my burdens.

If I am likely to say anything foolish,

Thou makest it right.

Thou hast removed my bashfulness and madest me self-confident,

O Lord. All the people have become my guards, relatives and bosom friends.

Tuka says: I now conduct myself without any care.

I have attained divine peace within and without.

            तुकारामांचा गांधीजींच्या एकूणच व्यक्तिमत्त्वावर प्रभाव होता. त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्यांनीही तो प्रभाव नोंदवलाही आहे. लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिकानावाचं सदाशिव विनायक बापट यांचं पुस्तक आहे. त्यात १९१७ सालच्या आठवणींमध्ये त्यांनी लिहिलं आहे, ‘आश्रमाची सर्व व्यवस्था पाहून आम्ही परत येत असता निम्या वाटेवर महात्माजी आश्रमाकडे चालले आम्हास भेटले. भगवद्भक्त श्री तुकोबाप्रमाणे ती शांत वैराग्यमूर्ती डोक्यास गुजराथी पांढरे पागोटे घालून अंगात खादीचा अंगरखा घातलेली अनवाणी येत असलेली आम्ही दुरून पाहिली‘.

     लोकमान्यांच्या प्रभावात असलेल्या बापटांचे हे निरीक्षण आहे, हे विशेष. वास्तविक टिळकवादी बड्या नेत्यांनी गांधीजींना कधीच आपले मानले नाही. उलट राष्ट्रीय लढ्याचे केंद्र पुण्यातून हलले याविषयी कायम हळहळ व्यक्त केली. त्यात ब्राह्मण बहुजन असा संघर्षाचाही एक पदर होता. त्यातून मग गांधीजींवर विखारी टीका झाली.

    असं असलं तरी गांधीजींना टिळकांविषयी प्रचंड आदर होता. आपल्या महाराष्ट्रयात्रेचे वर्णन करताना त्यांनी लिहिलं आहे, जिथे लोकमान्य टिळक महाराजांचा जन्म झाला. आधुनिक युगाचे नायक असलेले शिवाजी महाराजांची जी भूमी आहे. जिथे तुकारामांनी आपले कार्य केले. ती महाराष्ट्राची भूमी माझ्यासाठी तीर्थक्षेत्राइतकीच पवित्र आहे... महाराष्ट्राने एकदा ठरवलं की तो कोणतीही अशक्य गोष्ट वास्तवात उतरवू शकतो, असं मी नेहमीच म्हणतो.

    वादाचे, कार्यपद्धतीतले फरक असले तरी टिळक आणि गांधी या दोन्ही महापुरुषांमधले अद्वैतही आगळे होते. त्यामुळेच तर टिळकांच्या नेतृत्त्वाची धुरा गांधीजींनी यशस्वीपणे खांद्यावर घेतली. दोघांच्याही तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान श्रीमद्भगवद्गीताच होते. गांधीजींवर तुकारामांचा प्रभाव होता. टिळकांवरही तो होताच होता. गीतारहस्याची सुरुवात तुकोबांच्याच अभंगाने झाली आहे. गीतारहस्यात तुकोबांचे एकूण २३ अभंग आहेत. टिळक आणि गांधी उपकारे देह कष्टवणाऱ्या या दोन विभूती होत्या. 

काय वाणू आता न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ।

थोरीव सांडिली आपुली परिसे । नेणे सिवों कैसे लोखंडाशी ।

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टविती उपकारें।

भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देही ।

तुका म्हणे सुख पराविया सुखें। अमृत हे मुखे स्रवतसे ।

How now shall I describe (the praises of the good);

my speech is not enough (for the purpose).

I therefore put my head at their feet.

 The magnet leaves its greatness and does not know that it may not touch iron.

Even so good men's powers are for the benefit of the world.

They afflict the body for the service of others.

Mercy towards all is the stock-in-trade of the good.

They have no attachment for their own bodies.

Tuka says: Others' happiness is their happiness; nectar drops from their lips.

१०

    आपल म्हणजे भारतीय अध्यात्म म्हटल की जगण्यापासून पळून गेलेला जंगलामध्ये ध्यान लावून बसलेला साधुबुवा आठवतो. मोक्ष हेच आपल्या अध्यात्माचे अंतिम ध्येय, मग समष्टीचा, समाजाचा त्याच्याशी काय संबंध, अस वाटत खर. पण जगन्मिथ्या मानणाऱ्या शंकराचार्यांनी भारतभर चारदा परिक्रमा का केली? भवसागर पार करण्याविषयी बोलणाऱ्या संतांनी सर्वसामान्यांची काळजी का वाहिली?

   मला मुक्ती नको, असं रोकडेपणे सांगणारा तुकोबा या प्रश्नांची अगदी खणखणीत उत्तर देतात. आजच्या अभंगात हे उत्तर अगदी सविस्तर आहे. नाहीतर आधीच्या वाक्यात 'बैसला गोविंद जडोनिया चित्ती' म्हणणारा तुकाराम पुढच्याच वाक्यात 'बळबुद्धी त्याची उपकारासाठी' से सांगतात ? चित्ती गोविंद जडवण्यासाठी बळबुद्धी उपकारासाठी वापरण्याचं हे अध्यात्म आहे. हे आर्मचेअर तत्त्वज्ञान नाही, जीवनाचं, जगण्याचं आणि मातीशी जोडलेलं तत्त्वज्ञान आहे.

भवसागरातून पार व्हायचं आहे, हे खरं. पण त्यासाठी संसार सोडून संन्यास नको. उलट सुखी संसारच हवा. आपले देव, ऋषी, आचार्य, संत सगळे बहुतांशी संसार करणारे आहेत.सगळ्या महापुरुषांनी लोकांमध्ये लोकांसारखं राहुन लोकांमधला राम जागवून रामाला आपल्याशी जोडण्याचे काम त्यांनी केलं. रामाचे काम करण्याचा त्यांचा मार्ग हाच होता आणि हाच मार्ग असू शकतो. तुकाराम आणि गांधीजी दोघांचीही आयुष्य याला साक्ष आहेत.

मुक्तिपांग नाही विष्णुचिया दासा । संसार तो कैसा न देखती ।।

बैसला गोविंद जडोनिया चित्ती ।आदि तेचि अंती अवसान ।।

भोग नारायणा देऊनि निराळी । ओविया मंगळी तोचि गाती ।।

बळबुद्धी त्यांची उपकारासाठी । अमृत ते पोटी साठवले ।।

द्यावेत तरी देवा च सारिखी । आपुली पारखी नोळखती ।।

तुका म्हणे त्यांचा जीव तोचि देव । वैकुंठ तो ठाव वसती तो ।।

To the servants of Vishnu there is no yearning even for salvation;

they do not want to know what the wheel of birth and death is like.

Govind sits steadily settled in their hearts; for them the beginning and the end are the same.

They make over happiness and misery to God and themselves remain untouched by them,

the auspicious songs sing of them.

Their strength and their intellect are dedicated to benevolent uses;

their hearts contain gentleness.

They are full of mercy even like God; they know no distinction between theirs and others’.

Tuka says: They are even like unto God and Vaikuntha is where they live.

११

     आजकाल साधू आणि संत म्हणवून घेणाऱ्यांचे मठ आणि आखाडे एकमेकांविरुद्ध खरोखरच्या आखाड्यात उभे असल्यासारखे झगडत असतात. त्यांच्यात वर्षानुवर्षं कोर्टकेस सुरु असतात. साधुबोवांना सिक्युरिटी घेऊन फिरावं लागतं. असे आपल्या संतसमाज वगैरे युनियन बनवणारे हे संत खऱ्या संतांना कसं काय ओळखू शकणार. खरा भक्तच दुसऱ्या भक्ताला ओळखू शकतो.

      म्हणून तर विठ्ठलाचे समकालीन भक्त एकटेदुकटे नाही, तर मांदियाळीने फिरत आलेले दिसतात. त्यांनी एकत्र यात्रा केलेल्या आहेत. एकमेकांशी चचेर्तून, एकमेकांच्या व्यक्तित्वातून प्रेरणा घेत विकसित झालेले आहेत. भगवंताच्या आणखी जवळ गेले आहेत. कधी ज्ञानोबांच्या प्रभावातून नामदेवांनी गुरु करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो, तर त्याचवेळेस नामदेवांमुळे ज्ञानेश्वर योगाच्या प्रभावातून बाहेर पडून भक्तीकडे आलेले दिसतात. याचमुळे ज्ञानेश्वरांपासून आजपर्यंत वारकरी संप्रदायाने सदैव आपल्या पूर्वसूरींकडे केवळ आदराने पाहिलेले आहे.

       फक्त आपल्या संप्रदायातीलच नाही, तर अन्य संप्रदायांतील संतांशी या संतांचं फार सौहार्दपूर्ण संबंध होते. नामदेव, तुकाराम, एकनाथ हे तर सुफी संतांशीही अगदी आपलेपणाचे वागल्याचे दाखले आहेत.

भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारुनि ।।

विषय तो त्यांचा जाला नारायण ।  नावडे धन जन माता पिता ।।

निर्वाणी गोविंद असे मागेंपुढें ।  कांहीच सांकडे पडो नेदी ।।

तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साहे । घातलिया भये नरका जाणें ।।

He is a devotee who is indifferent about body, who has killed all desire,

whose one object in life is (to find) Narayana,

whom wealth or company or even parents will not distract,

for whom whether in front or behind there is only God in difficulty,

who will not allow any difficulty to cross his purpose.

Tuka says: Truth guides such men in all their doings.

१२

      गांधीजींच्या लिखाणात , वक्तव्यांत तुकारामांच्या उल्लेख अनेकदा आलाय. गांधींचे समग्र साहित्य इंटरनेटवर उपलब्ध आहे , त्यात ' तुका ' असा सर्च दिला , की अनेक संदर्भ समोर येतात.

            त्यातला महत्त्वाचा संदर्भ वाईच्या भाषणाचा आहे. त्यात असहकार आंदोलनाची तात्त्विक भूमिका समजावून सांगताना त्यांनी तुकारामांचा दाखला दिला आहे. त्यात गांधीजींना ' कठीण वज्रास भेदू ऐसे ' आणि ' नाठाळाच्या माथी हाणू काठी ' सांगायचं असावं , असं वाटतं. महाराष्ट्रयात्रेच्या संदर्भात त्यांनी तुकोबांचा केलेला उल्लेख याच सदरात पूवीर् एकदा आला आहे.

     पुढे हरिजनांच्या सभेसमोर हिंदूधर्माचं मोठेपण सांगताना त्यांनी हा ज्ञानेश्वर आणि तुकारामांचा धर्म असल्याचे सांगितले आहे. हा धर्म चिरकाल टिकणार आहे , असं त्यांनी पुढे म्हटलं आहे. आंबेडकरांच्या धर्मांतराकडे आकर्षणाऱ्या दलितांना हिंदूधर्मात ठेवण्याची गांधीजींची कळकळ होती. कदाचित त्याचाही संदर्भ याला असू शकेल. याच भाषणात दाक्षिणात्य संत थिरुवल्लुवर यांची तुलना केवळ तुकारामांशीच होऊ शकते , असं सांगत ते तुकोबाचं मोठेपण अधोरेखित करतात.

      बंगालहून पाठवलेल्या एका पत्रात गांधीजी देवाच्या अवतारांविषयी लिहितात. तुकाराम , ज्ञानेश्वर , नानक , कबीर हे दैवी अवतार नव्हते का , असा सवाल त्यांनी विचारला आहे. गावांच्या विकासासाठी काम करणाऱ्या तरुणांनी तुकारामासारख्या संतांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी , असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तसेच गोपुरी आश्रमातील एका अंत्यसंस्काराच्या वेळी आपल्या आग्रहानंतर विनोबांनी तुकारामांचा अभंग गायल्याची आठवणही त्यांनी एका प्रार्थनासभेत सांगितली आहे. तसेच आणखी एका अशाच प्रार्थनासभेत बाळासाहेब खेर आणि ठक्करबापांच्या उपस्थितीत त्यांनी तुकारामांचा ' पापाची वासना नको दावूं डोळा ' हा आवडता अभंग उद्धृत केला आहे.

    डॉ. इंदुभूषण भिंगारे यांनी तुकाराम गाथेचं हिंदी भाषांतर केलं होतं. त्याची एक छोटी प्रस्तावना गांधीजींनी लिहिली आहे. आपल्याला फारसं मराठी येत नसलं तरी मला तुकाराम खूप प्रिय आहे , असं त्यांनी यात आवर्जून लिहिलं आहे. या गाथेसाठी त्यांनी शांतिनिकेतनातून खास तुकारामांचं चित्र काढून घेतलं होतं. गांधीजींनी अनुवादित केलेला तुकोबाचा आणखी एक अभंग.

न कळता काय करावा उपाय । जेणे राहे भाव तुझ्या पायी ।।

येऊनिया वास करिसी हृदयी । ऐसं घडे कई कासयाने ।।

साच भावे तुझे चिंतन मानसी । राहे हे करिसी कैं गा देवा ।।

लटिके हे माझे करुनिया दुरी । साच तू अंतरी येउनि राहे ।।

तुका म्हणे मज राखावे पतिता। आपुलिया सत्ता पांडुरंगा ।।

When one does not know, what is one to do so as to have devotion to Thy sacred feet?

When will it so happen that Thou wilt come and settle in my heart?

O God, when wilt Thou so ordain that I may meditate on Thee with a true heart?

Remove Thou my untruth and, O Truth, come and dwell Thou in my heart.

Tuka says: O Panduranga, do Thou protect by Thy power sinners like me.

१३

     'नेमिले या चित्तापासुनिया ' चा इंग्रजी अनुवाद करताना गांधीजींनी मेडिटेट असा शब्द वापरला आहे. मेडिटेशन म्हणजे ध्यान. त्याचा थेट संबंध चित्ताशी आहे. चित्तामधले तरंग नाहीशे करणे म्हणजे योग , असं भगवान पतंजली सांगतात. ध्यान त्या योगाची एक पायरी. त्यामुळे चित्त म्हणजे योग असं समीकरण बांधलं गेलं आहे.

     भगवान पतंजलींनी सांगितलेला योग देव मानणारा आहे की नाही , यावर बरीच मतमतांतरे आहेत. पण असे वाद पुस्तकं लिहिणाऱ्या विद्वानांसाठी असतात किंवा मग डॉक्टरेट मिळवणाऱ्यांसाठी तरी. तुकारामांच्या काळी डॉक्टरेट नव्हती. मग असे लोक शास्त्रार्थाचा किस पाडत मोठे पंडित बनत. त्यातलेच मग तुकारामांना गाथा इंद्रायणीत बुडवण्याचे फतवे काढत. आता इंटरनेटवर एक सर्च मारला की जगभरची विद्वत्ता आपल्या बोटांजवळ येऊन पडते. या ग्लोबल जगात अशा पंडितांची दुकानं बंद पडली आहेत , हे बरं झालंय. पण सर्च मारून मंबाजी होता येईल , तुकाराम नाही.

            तुकारामांना या अशा वादांशी काही घेणंदेणं नव्हतं. तत्त्वज्ञानासाठी त्यांचं जीवन नव्हतं. त्यांच्या जीवनात तत्त्वज्ञान जगायचं होतं. त्यामुळे मग त्यांचा योग त्यांच्या पांडुरंगाशीच होता. योग म्हणजे जोडलं जाणं. ते पूर्णपणे पांडुरंगाशी जोडले गेले होते. तुकारामांनी पतंजलींनी लिहिलेली थिअरी अभ्यासली असेलही , नसेलही. पण त्याने काय फरक पडतोय. ते ती थिअरी प्रॅक्टिकलमधे आणत होते. किंबहुना पतंजलींनी त्यांच्या भोवतालच्या तुकारामांसारख्या योग्यांच्या जीवनातच आपली सूत्र शोधली असतील.

            पतंजलींचं एक भन्नाट योगसूत्र आहे , ' वीतरागविषयं वा चित्तम् '. संतांना आपल्या चित्ताचा विषय बनवा , असा त्याचा साधा अर्थ. आपण ज्यांच्याविषयी विचार करतो , तसे बनतो. संतांचा विचार करा , त्यांच्यासारखे व्हाल. पण रोजच्या व्यवहारातही हे तुकड्या तुकड्यात वापरता येण्याजोगं तत्त्वज्ञान आहे. कॉपोर्रेट जगात आपल्याला एखादा गुण आपल्यात हवा , असं वाटतंय. मग तसा रोजच्या पाहण्यातला माणूस शोधा. त्याचं बारीक निरीक्षण करा. त्या माणसाच्या त्या गुणासंबंधी विचार करून बघा. आपल्यात त्याच्यातला तो गुण कमीअधिक कधी येईल ते कळत पण नाही.

     माणसंच आपल्याला शिकवत असतात. पुस्तकं नाहीत. पुस्तकांनी शिकवलं असं वाटलं , तर बारकाईनं विचार करा. बहुतेक त्या पुस्तकातल्या माणसांनीच आपल्याला शिकवलेलं असतं. गांधीजी , तुकाराम असेच शिकले असावेत.

आणिक दुसरे मज नाही आता । नेमिले या चित्तापासुनिया ।।

पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी । जाग्रती स्वप्नी पांडुरंग ।।

पडिले वळण इंदिया सकळां । भाव तो निराळा नाही दुजा ।।

तुका म्हणे नेत्री केले ओळखण । साजिरे ते ध्यान विटेवरी ।।

This heart of mine is determined that for me now there is nothing else;

 I meditate on Panduranga, I think of Panduranga,

I see Panduranga whether awake or dreaming.

All the organs are so attuned that I have no other desire left.

Tuka says: My eyes have recognized that image standing on that brick transfixed in meditation unmoved by anything

१४

     आतापर्यंत एकही राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनलेला नाही , अशी दोन महत्त्वाची राज्यं कालपर्यंत होती , एक महाराष्ट्र आणि दुसरं बंगाल. आज प्रतिभा पाटलांनी शपथ घेतली की महाराष्ट्र या यादीतून गळेल. या दोन राज्यांत अनेक साम्य असली तरी राष्ट्रपती-पंतप्रधान नसणं , हा निव्वळ योगायोग नाही.

     या दोन्ही राज्यांनी गेल्या दोनशे वर्षांत एकमेकांवर खूप प्रभाव पाडलाय. बंगालचा आपल्या संस्कृती साहित्यावरचा प्रभाव आपल्याला ठावूक आहेच. पण महाराष्ट्राचा प्रभावही बंगालवर आहे. गुरुदेव रवींदनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या बंगाली कवितेचा पुलंनी केलेला अनुवाद शाळेच्या पुस्तकात अभ्यासालाच आहे. पण गुरुदेवांच्या तोडीचेच महाकवी असणाऱ्या अरविंद घोषांनी आपल्या पल्लेदार इंग्रजीत एक दीर्घकविता केलीय , कोणावर माहीतेय , बाजीप्रभूंवर.

     गुरुदेव टागोरांवर तुकारामांचाही प्रभाव होता. त्यांनी तुकारामांचे बारा अभंग बंगालीत अनुवादितही केले आहेत.गुरुदेव आणि गांधीजींचे अगदी घनिष्ट संबंध होते. पण गुरुदेवांना तुकाराम आधीपासूनच माहीत होता. भारतातील पहिले आयसीएस आणि वडील बंधू सत्येंदनाथांमुळे रवींदनाथ तुकारामांकडे आकषिर्ले गेले.

            गांधीजींमुळे गुरुदेवांच्या अगदी जवळच्या एका कलाकाराला तुकाराम कळला. तो कलाकार म्हणजे नंदलाल बोस. ते जागतिक कीतीर्चे चित्रकार. जगभर त्यांची प्रदर्शने भरली होती. तीस वर्ष त्यांनी शांतिनिकेतनातल्या कलाभवनचं प्रमुखपद भुषवलं. गांधीजींनी त्यांना तुकारामाची चित्र काढण्याची विनंती केली होती. डॉ. इंदूभुषण भिंगारेंनी तुकारामांच्या अभंगांचं ' तुकाराम की राष्ट्रगाथा ' या नावाने हिंदी भाषांतर केलं होतं. त्याला गांधीजींनी प्रस्तावना लिहिली आहे. आणि या पुस्तकात तुकारामांची चांगली चित्रं छापून यावीत म्हणून नंदलाल बोसांकडून चित्रं काढून घेतली. यात पुस्तकात बोसांची तीन चित्रे आहेत.या तुकारामाला गांधीजी , रवींदनाथ आणि नंदलाल बोस अशा तीन दिग्गजांचा स्पर्श असल्याचा विचार डोक्यात येतो. आणि मग हा तुकाराम वेगळाच वाटू लागतो.

न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो।।

ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणि लोकांसी हेचि सांगे।।

विटंबो शरीर होत का विपत्ती । परि राहो चित्ती नारायण।।

तुका म्हणे नासिवंत हे सकळ । आठवे गोपाळ तेचि हेत।।

 What though I get nothing to eat and have no progeny? I

t is enough for me that Narayanas grace descends upon me.

My speech gives me that advice and says likewise to the other people.

Let the body suffer; let adversity befall one,

 enough that Narayana is enthroned in my heart.

Tuka says: All the above things are fleeting; my welfare consists in always remembering Gopal.

१५

     आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र ग्यानबा तुकारामाच्या गजरात डोलत असताना , आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये तुकारामाचे शब्द ऐकू आले. नव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपल्या पहिल्या भाषणात तुकारामांचा अभंग सांगितला. जे का रंजले गांजले...

            विठ्ठलमुक्तीला साठ वर्ष होत असताना महाराष्ट्राची लेक देशातील सवोर्च्च पदावर बसते , हा एक आनंददायी योगायोग आहे. आणि तेव्हा ती लेक आपल्या भाषणात तुकाराम , गांधीजी आणि आंबेडकर या तिघांची नावं घेते , यापरता आनंद तो काय.

    मावळते राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनाही तुकाराम माहित आहे. त्यांनीही त्यांच्या ' विंग्ज ऑफ फायर ' या प्रसिद्ध पुस्तकात तुकारामांचा अभंग दिलाय. बहुधा पद्मभूषण मिळाल्यानंतरचा आनंद व्यक्त करताना त्यांनी लिहिलंय , आनंदाचे डोही आनंद तरंग. या प्रकरणाचा हिंदीतला अनुवाद करताना प्रख्यात कवी गुलजारांनी या अभंगाचाही गोड हिंदी अनुवाद केला आहे. तो अगदी मिळवून वाचण्यासारखा आहे.

लागोपाठ दोन राष्ट्रपतींवरचा तुकारामांचा प्रभाव हा काय फक्त एक योगायोग मानायचा ?

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।।

गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।।

न लगे मुक्ती आणि संपदा ।  संतसंग देई सदा ।।

तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।

O God, grant only this boon. I may never forget Thee; and I shall prize it dearly. I desire neither salvation nor riches nor prosperity; give me always company of the good. Tuka says: On that condition Thou mayest send me to the earth again and again.

१६

     सामाजिक परिवर्तनाचा रथ गांधीजींनी आणि त्यांच्या अनुयायांनी पुढे नेला.  साने गुरुजींनी विठ्ठलमंदिराची मुक्तीचा दिलेला यशस्वी लढा याचं खणखणीत उदाहरण आहे.

      विठ्ठलमुक्ती आंदोलनाचा यंदा हिरकमहोत्सव. विठ्ठलमंदिरात कथित अस्पृशांना प्रवेश मिळाला त्याला या १० मे रोजी साठ वर्षं पूर्ण झाली. दलितांच्या मंदिरप्रवेशासाठी एक ब्राम्हण नेता आपला जीव पणाला लावतो. आपल्याच जातीतल्या कट्टरांशी भांडतो. त्याच्या पाठिशी उभे राहतात तेही बहुसंख्य ब्राम्हणच. ही भारताच्या इतिहासातली एक फार मोठी घटना आहे. साने गुरुजींच्या दहा दिवसांच्या उपोषण काळात सेनापती बापट , आचार्य अत्रे , अच्युतराव पटवर्धन , दादासाहेब मावळंकर , बबनराव बडवे , पांडुरंग उत्पात , तात्या डिंगरे अशा ब्राम्हण पुढाऱ्यांनी आपली सारी पुण्याई चंदभागेच्या वाळवंटात उभी गुरुजींच्या मागे पुढे केली.

      साने गुरुजी गांधीजींचं तत्त्वज्ञान आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच लढत होते. पण बडव्यांनी एका गांधीवादी पुढाऱ्याला गाठून गांधीजींना या आंदोलनाबद्दल गैरसमज करून दिले. त्यामुळे गांधीजींनी गुरुजींना उपोषण मागे घेण्याची तार केली. पण गुरुजी हाडाचे गांधीवादी. सत्य आपल्या सोबत असल्याचा पूर्ण विश्वास असल्याने त्यांनी गांधीजींचा आदेशही धुडकावून लावला. लोकसभेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब मावळंकर यांनी गांधीजींचे गैरसमज दूर केल्यावर मात्र त्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर लागलीच पावलं उचलली गेली आणि विठ्ठलमंदिर सर्वांसाठी खुले झाले.

तुकोबाच्या विठोबाची मुक्ती करण्यासाठी गांधीजींचं तत्त्वज्ञान धावलं. पण मुळात ते तत्त्वज्ञान तुकोबांच्या तत्त्वज्ञानापेक्षा वेगळं कुठे होतं ?

शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी ।।

विसर तो न पडावा । माझा देवा तुह्यांसी ।।

पुढे फार बोलो काई । अवघे पायी विदित ।।

तुका म्हणे पडिलो पाया । करा छाया कृपेची ।।

This is my last prayer, saintly people listen to it,:

God, do not forget me; now what more need I say,

Your holy feet know everything.

Tuka says: I prostrate myself before Your feet,

let the shadow of Your grace descend upon me.

सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स